Wednesday, October 31, 2018

|| भास्करगड आणि हरिहर ||


'ऑक्टोबर हिट भयंकर असते भाऊ, त्यात ट्रेक आणि किल्ले भटकंती न केलेली बरी !' असे फुकट सल्ले ऐकून घेतले जात होते मात्र खरेतर आत्ताच्या आत्ता कामाच्या व्यापातून बाहेर पडून पुन्हा "छोटा रिचार्ज" मारणे खूपच गरजेचे वाटत होते.
नुकतेच देवीचे नवरात्र सुरू होऊन ३,४ दिवसच झाले होते. एकीकडे ऐन नवरात्रीत आपल्या देवीच्या दर्शनाला आतूर झालेले देवीभक्त आणि दुसरीकडे आपल्या लाडक्या सह्याद्री च्या भेटीला आतूर झालेले सह्यभक्त दोघांच्या मधील साम्य म्हणाल तर, आपल्या ईश्वरावर असलेली प्रचंड 'श्रद्धा' आणि कोणाचीही, कशाचीही पर्वा न करता त्याला भेटण्याची लागलेली 'ओढ.' मग काय इकडे 'देवीचे घट' बसले आणि आम्हा मंडळींचा 'घाटातून' प्रवास सुरू झाला.... ते थेट भास्करगड आणि हरिहर या जोड किल्ल्यांच्या भेटीला.
१२ ऑक्टो. ला चंदन नगर येथून रात्री ११ वाजता निघणारी बस बरोब्बर ११ वाजता निघाली खरी पण पुणे ते नाशिक जेवढा प्रवास असेल तितके अंतर पुण्यातच पूर्ण करण्याचा जणू 'पण' करूनच.. चंदननगर - स्वारगेट - कात्रज - सिव्हगड रस्ता - वडगाव - नांदेड गाव (त्यात नांदेड सिटी त्यात शेवटची गल्ली मग शेवटचे वळण घेऊन शेवटच्या इमारतीपाशी थांबून शेवटच्या फ्लॅट मधल्या शेवटच्या खोलीत पार कोपऱ्यात बसून, 'आजून लांब गाडी कशी बोलविता येईल?' हा विचार करत बसलेल्या विनय धनश्री ला घेऊन) - चांदणी चौक - बाणेर - (म्हणजेच १० जनपथ रोड) - कोकणे चौक मार्गे १३ ऑक्टो. पहाटे १ वाजता पुण्याबाहेर पडली आणि "बाप्पा मोरया" चा जयघोष झाला.
वाटेत कितीही उशीर होवू देत पण चालीरीती आणि परंपरांचा मान ठेवत 'नारायणगाव बस थांब्यावर' गरमागरम 'मसाला दुधाचा' आस्वाद घेण्यासाठी न चुकता आम्ही थांबलो आणि '१५ तोफांची सलामी देऊन' अर्थात दूध आणि १५ क्रीमरोल चोपून आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. आता आमचे चालक जागे आहेत ना, याची खात्री करत १० जनपथ वर राहणारा आमचा काथ्या (विकास) आणि काथ्या जागाच आहे ना, हे तपासात बसायला 'मी' :D असे तिघेच जागे होतो (तिसरा आपला चालक) आणि बाकी मंडळी गाडीच्या घर्र-घर्रर्रर आवाजा मध्ये स्वतःचे घोर्र-घोर्रर्ररर आवाज मिसळत गुडूप झाली होती. सकाळी ७ वाजता आमचा दुसरा थांबा झाला आणि काही शिकारी आपापली शिकार उरकून आले. (अर्थबोध होत नसेल तर खाजगीत संपर्क करावा) पुढे काही वेळातच आमचा बेस कॅम्प अर्थात तळथांब असलेल्या 'निरगुडपाडा' या छोटेखानी टुमदार गावात आम्ही उतरलो.
अनेक धार्मिक स्थळे, असख्य मंदिरे, कुंभ मेळ्यासारके पवित्र मेळे भरणारा नाशिक जिल्हा केवळ तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध नाही तर तेथे मिळणारी गोड द्राक्षे, सह्याद्री चे उत्तुंग कडे आणि निसर्गाचा वरदहस्त लाभलेला एक रांगडा आणि मनमोहक जिल्हा म्हणून देखील प्रसिद्ध आहे. इतिहासाची साक्ष देणारा आणि ज्याचा भूगोल देखील प्रसिध्द आहे अश्या या नाशकाच्या पश्चिमेकडे त्र्यंबकेश्वर च्या बाजूने जी उत्तुंग अशी सह्याद्रीची रांग दिसते तिला "त्रिंबक रांग" म्हणून ओळखले जाते. गोदावरी नदीचे उगम स्थान असलेला ब्रह्मगिरी पर्वत, वीर हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून ओळखला जाणारा अंजनेरी पर्वताला सामावून घेतलेल्या या रांगेत 'भास्कर किंवा बसगड' आणि 'हरिहर' हे २ किल्ले आपली ओळख आजही राखून आहेत. याच दोन किल्ल्यांवर 'माथा टेकण्यासाठी' आता आम्ही सज्ज होत होतो. पोहे आणि कोऱ्या चहाचा आस्वाद घेऊन आमची गाडी बाजूला लावली गेली आणि फक्त पाण्याच्या बाटल्या घेऊन 'हर हर महादेव!' च्या जयघोषात साधारण साडेनऊ वाजता मंडळी निघाली किल्ले भास्करगडा कडे. 



कोवळी उन्हे आता मोठी होत होती आणि साक्षात 'रवी-भास्कर' त्यांच्याच नावानी प्रसिध्द असलेल्या भास्कर गडावर आमची साथ देत होता. पहिला कारवी चा टप्पा पार करून डाव्या हाताच्या वळणावर पोचेस्तोवर घामाच्या धारा सुरू देखील झाल्या होत्या, पण आता चहूबाजूला असलेले गगनभेदी कडे पवनराजला प्रवेश नाकारत होते. गप्पा गोष्टी करीत मंडळी पुढे चालत होती आणि किल्ल्या संबंधी असलेली माहिती इतरांना सांगत प्रवास सुरू होता. साधारण ११ वाजता समोर आकाशाला भिडलेल्या भास्कर गडाच्या सुळक्यापाशी आम्ही पोहचलो आणि त्याच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या निमुळत्या वाटेवर लागलो उजव्या हाताला खोल दरी आणि डाव्या हाताला कातळ कडा असा प्रवास करून सरतेशेवटी अत्यंत कोरीव अश्या गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहचलो. बेसॉल्ट च्या खडकात तयार झालेल्या या किल्याची बरीच पडझड झालेली आहे आणि वरून वाहून आलेले दगड आणि माती यांच्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त प्रवेशद्वार हे बुजून गेलेले आहे यातून आत प्रवेश करताना आपल्याला पूर्णपणे वाकून किंवा बसून आत जावे लागते. अश्या या द्वारातून आत जाताना बसून जावे लागते म्हणून तर त्याला 'बसगड' म्हणत नसतील ना ? अशी पुसटशी शंका मला त्यावेळी येऊन गेली.

आत प्रवेश करून सर्पिलाकार नागमोडी पायऱ्याची वाट पार करीत आम्ही योगायोगाने मध्यानाला बरोब्बर सूर्य-भास्कर डोईवर असतानाच भास्कर गडाचा माथा गाठला होता. माथ्यावर गडाचा इतिहास आठविताना त्याची सध्याची अवस्था पाहून खूपच वाईट वाटले, इ.स. १२७१ ते १३०८ काळात देवगिरी च्या अधिपत्याखाली असलेला हा किल्ला पुढे बहामनी आणि निजामशाहीत गेला. इ.स. १६२९ मध्ये बंड करून हा किल्ला शहाजी राजांकडे आला आणि १६३३ च्या सुमारास तो शहाजी राजेंकडून मोघलांच्या हवाली गेला. १६७० ला शिवरायांचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी मोघलांकडून हा किल्ला काबीज केला मात्र १६८८ ला पुन्हा तो मोघलांच्या ताब्यात गेला.१७३० मध्ये कोळ्यांनी बंड करून हा किल्ला जिंकून घेतला आणि त्या नंतर १८१८ पर्यन्त हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता. अश्या या रांगड्या गडाची आजची अवस्था खूपच बिकट आहे, वर एका पडक्या वाड्याचे अवशेष आपले अस्तित्व सिद्ध करण्याकरिता आजही धडपडत आहेत, पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नसून अत्यंत सुरेख कोरीवकाम असलेली सातवाहन काळातील टाकी आपली ओळख तेव्हढी टिकवून आहेत एक छोटेखानी छप्पर वा भिंत नसलेल्या हनुमानाच्या मंदिरी,
'बजरंगबली केवळ आपल्या अफाट ताकदीच्या जोरावर तग धरून उभे आहेत' या सगळ्यांच्या साथीला वाढलेले गवत आणि असंख्य फुलपाखरे मुक्त विहार करीत आपापल्या परीने गड जागता ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या पलीकडे गडावर पाहण्यासारखे काहीही नाही. निसर्गनिर्मित आजूबाजूला दिसणारे उत्तुंग डोंगर आणि महाकाय दरी इतके पाहून थोडी विश्रांती घेतली आणि लगोलग आमची स्वारी निघाली किल्ले हरिहर कडे. झपाझप पाऊले टाकीत आता आम्ही परतीची वाट धरली होती.आता आमच्या भ्रमंतीचा भाग २ सुरू होणार होता दूरचित्रवाणी वरील मालिका या खऱ्याच असतात या भावनेने त्या मालिका बघणार्यांना मालिकांमध्ये दोन भागात असतो तसाच या २ भागातील 'ब्रेक' देखील अनिवार्यच वाटत होता.त्यात आता पायथ्याला पोहचताच पोटातील कावळे पार हत्ती बनून आवाज देऊ लागलेच होते त्यामुळे थोडी पोटपूजा उरकायची आणि पाठपिशव्या उचलून थेट हरिहर गाठायचा ठराव 'आवाजी मतदानाने' पास झाला आणि नांदेड सिटीतून निघण्यास प्रचंड उशीर झाल्याचे खरे कारण उघडकीस आले. विन्याने घरून बनवून आणलेला 'पोळ्यांचा ढीग' आणि खमंग झणझणीत 'खर्डा' आपल्या पिशवीतू  बाहेर काढला आणि हापापलेली मंडळी त्यावर तुटून पडली सोबतीला बिस्किटे, चिवडा, फुटाणे असा कोरडा खाऊ बाहेर आला आणि गडाच्या पायथ्याशी वनभोजनाचा आस्वाद घेत मंडळी तृप्त झाली. आता दुसऱ्या पर्वाला सुरुवात होत होती.पाठपिशव्या शक्य तितक्या हलक्या करून (म्हणजे जास्तीत जास्त वस्तू दुसऱ्याच्या पिशवीत कोंबून) मंडळी आता पुन्हा तयार झाली व वाटाड्या मामांना घेऊन मूळ वाटेला न लागता मधील २ डोंगर पार करून गडाच्या सोंडेवर पोचण्याचा बेत ठरला जेणेकरून लौकरात लौकर आम्ही गड गाठू शकू.


भास्कर गडाच्या शेजारील डोंगराच्या आता आम्ही पोटात शिरलो होतो. एकमेकांची चेष्टा मस्करी करीत आणि दुर्वास मुनींचे दर २५ फुटांवर फोटो काढीत आमचा प्रवास सुरू होता. वाटेत लागणारा १ टेकडी वजा डोंगर आम्ही पार केला होता आता उन्हाने बराच दम लागत होता पण गप्पांच्या ओघात पावले हळू हळू पुढे टाकत आम्ही प्रवास सुरूच ठेवला होता जरी ऊन बरेच होते तरीही निसर्गातील हिरवळ पूर्ण करपली नव्हती आजूबाजूच्या निसर्गाचा आस्वाद घेत आता आमची स्वारी दुसऱ्या डोंगराच्या मध्यातून एका बाजूने पुढे सुरूच होती डाव्या हाताची दरी आता बरीच खोल वाटू लागली होती त्यावरून आपण बरेच उंचीवर आलो होतो हे समजत होते पण पूर्ण हरिहर आजून समोर आला नव्हता. पुन्हा १५ मिनिटांचा पाणथांबा घेतला आणि थोड फोटोसेशन पार पाडून पुन्हा पाठपिशव्या लादल्या गेल्या. सुमारे २० मिनिटात हाही डोंगर पार करून अडीच तासाच्या पायपीतीअंती आम्ही आतुरतेने वाट पहात असलेल्या 'हरिहर' किल्ल्याच्या सोंडेवर येऊन ठेपलो.
"आपल्या महाकाय उंचीने आकाशाला फाडून पार आत घुसलेला, स्वतःच्या डोईवर निसर्गानेच मानाने दिलेली, हिरवाई ने नटलेली हिरवी-पिवळी मानाची पगडी घालून रुबाबात बसलेला आणि त्यावर जणू मानाचा तुरा म्हणून 'जरीपटका' फडकवत दौलदार पणे शेकडो वर्षे ठाण मांडून बसलेला तो "हरिहर" सर्वांच्या दृष्टीस पडला आणि आलेला थकवा पार लांब पळून गेला. "शंकराच्या पिंडी" प्रमाणे आकार असलेला हा किल्ला म्हणजे सह्यवीरांसाठी एक पर्वणीच. सर्व बाजूने उभे च्या उभे सरळसोट कातळ आणि त्यातील एका कातळावर अत्यंत सफाईदार पणे कोरलेल्या एकावर एक अश्या पायऱ्या, प्रत्येक पायरीवर चढताना तोल संभाळण्यासाठी कोरलेल्या सुरेख खोबण्या लांबून पाहताना मनात नक्कीच धडकी भरवितात. सोंडेवरून त्या पायऱ्या पाहताना मला, 'लहानपणी दिवाळीत केलेल्या किल्यांच्या पायऱ्या आठवत होत्या, लाकडी पट्टीच्या मदतीने २ फूट किल्ल्यावर देखील त्या पायऱ्या बनविताना प्रचंड अवघड वाटत असे' आणि इथे प्रत्यक्षात समुद्रासपाटी पासून सुमारे ३५००  फूट उंच असलेल्या आणि दोन्ही बाजुंना महाकाय दरी असताना कोणत्याही अत्यधुनिक
उपकरणांशीवाय या कातळावर कोरलेल्या पायऱ्या पाहून आपल्याकडील शेकडो वर्षांपूर्वी असलेल्या स्थापत्य कलेचा प्रचंड अभिमान वाटत होता. अत्यंत कठोर मेहनत घेतल्याशिवाय हे शक्य नाही हे पहाताक्षणीच आपणास जाणवते. त्या सर्व जाणत्या, आजाणत्या आजरोजी नावे नसलेल्या पण अमरत्व प्राप्त झालेल्या कलाकारांना मानाचा मुजरा करून आम्ही हा 'माथा' गाठाण्या अगोदरचा शेवटचा थांबा घेतला. थंडगार लिंबू सरबत, कोवळी खमंग काकडी, गूळ दाण्याची चिक्की आणि लिंबू भेळेवर मनसोक्त ताव मारला.सकाळपासून साथ देत आलेले भास्कर राव आता परतीच्या प्रवासाला निघाले होते त्यांना कॅमेरा मध्ये साठविण्यासाठी आता आमची लगबग सुरू झाली व सरतेशेवटी समोरील भास्कर गडाच्या मागे क्षितिजापार त्यांना निरोप देऊन त्या उभ्या सरळ कातळात लाकडी शिडी प्रमाणे कोरलेल्या पायऱ्या गाठण्यासाठी पुन्हा मावळे सज्ज झाले.
केवळ एकेरी वाहतुकीस परवानगी असलेल्या या वाटेने कोणीही ओव्हरटेक करण्याचे धाडस दाखवीत नव्हता (पुणेकर असूनही) एकामागोमाग एक, अत्यंत सावधपणे, काही नवोदितांना योग्य काळजी घेण्याचे संदेश देत मावळे चढाई करीत होते. दोन्हीही बाजूला महाकाय दरी 'आ वासून' उभी होतीच, त्या खोलीची ज्यांना भीती वाटते त्यांनादेखील, "ये मूर्खां कशाला बघतो इकडे तिकडे, इतकी फाटते तर वर बघ ना पायरीकडे. बावळट घाबरतो किती फक्त तोंडात दम.." असे प्रेमाचे सल्ले देखील दिले गेले आणि त्यांना आधार देत १,२,३,४ अश्या त्या उभ्या सर्व पायऱ्या पार करून पहिल्या प्रवेशद्वारात मंडळी पोहचली. दारातून आत शिरून डाव्या हाताच्या कड्याखाली जेमतेम फूटभर रुंदी आणि चार फूट उंची असलेल्या पाउलवाटेवर लागूनच असलेली प्रचंड खोल दरीतील निसर्गाचा आस्वाद घेत सावधपणे पुढे सरकून आता पायऱ्यांच्या दुसऱ्या टप्प्यावर मंडळी पोहचली आता बऱ्यापैकी अंधार झाला असल्याने विजेऱ्या बाहेर निघाल्या आणि त्यांच्या झोतात सावधपणे थोड्याच वेळात आम्ही माथा गाठला.सरतेशेवटी आपल्या गडाच्या किल्ल्यावर मुक्कामी पोहोचल्याचा आनंद आणि समाधान सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होते. गडाच्या माथ्यावर असलेल्या हनुमान मंदिरी व शिवपिंडी वर आम्ही माथा टेकून स्वयंपाक आणि मुक्कामाची जागा शोधू लागलो. गडावर ५,६ तळी आहेत मात्र त्यातील केवळ २ तळ्यातील पाणी आज पिण्यायोग्य आहे. आपल्याच काही मूर्ख आणि स्वयंघोषित ट्रेकर्स नि प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, तेलाची भांडी, माश्याना खाण्यासाठी टाकलेले तेलकट पदार्थ यांनी येथील सुरेख, कोरीव व त्यातील नितळ पाण्याच्या टाक्यांचा आणि तळ्यांचा सत्यानाश केला आहे. गडावर १ सुस्थितील धान्यकोठी आहे आणि तिच्या पाठीमागे पिण्याच्या पाण्याचे टाके आहे त्यामुळे या कोठीत मुक्काम करण्याचा विचार झाला मात्र कोठीमध्ये प्रचंड चिखल आणि पाणी जमा झाले असल्याने मुक्कामाची जागा बदलली गेली. हनुमान मंदिरापाशी उघड्यावरच मुक्काम करावा असे ठरले आणि जागेची टेहाळणी पार पाडतानाच सर्प राजाने दर्शन दिले आणि सगळ्यांचे स्वागत करून पुन्हा बिळात ते लुप्त झाले. त्या बिळाला खुणेदाखल १ दगड ठेवण्यात आला आणि पिंडीपाशी चुलीची तयारी सुरू केली. 

पाठपिशव्या उतरवून साफसफाई झाली, पटापट किराणा, पातेली बाहेर काढून एका बाजूला पद्धतशीरपणे मांडून शेकोटीची लाकडे गोळा झाली हवेतील गारवा आता खूपच सुखद वाटत होता. आता गरज होती ती गरमागरम जेवणाची. झणझणीत रस्सा आणि भात की, चमचमीत मुगाची खिचडी यावर १ छोटेखानी चर्चासत्र पार पडले आणि खिचडी चा बेत मान्य झाला. कांदे बटाटे मिरच्या चिरचिरी सुरू झाली तर काही मंडळी शेकोटीत कांदे बटाटे भाजून त्याची चव चाखण्यात व्यस्त झाली, काही 'चालू' मंडळी सगळे कुठे ना कुठे व्यस्त आहेत हे बघून त्यातल्या त्यात सपाट जागेवर आपल्या पथाऱ्या पसरवून आपली जागा आरक्षित करीत होती.
'आजवर आपण घरातील कोणतेही काम केलेले नाही तसेच लहानपणी आईचे आणि आत्ता बायकोचे आपण सांगकाम्या नाहीत हे आमच्या काथ्या ने आज सिद्ध केले', कारण किरणांच्या यादीतील केवळ दाणे, तांदूळ आणि डाळ या ३ गोष्टी वगळता बाकी सगळा 'आनंदच' होता मुख्य म्हणजे मॉलिश साठी किंवा उत्तर

भारतीयांमध्ये वापरले जाणारे 'सरकी चे तेल' आणि 'आलं लसूण च्या पेस्ट' ची पाकीट च्या पाकीट का आणली होती याचे उत्तर तो आजुनही देत नाही.(काहीतरी स्कीम असणार नक्की) पण आता पर्याय काहीच नव्हता. जी उपलब्ध सामुग्री आहे त्यात स्वयंपाक उरकून जे आहे त्यात समाधान मानणे हेच आमच्या हाती होते. त्यातल्या त्यात थोडे जास्त समाधान मिळविण्यासाठी प्रत्येक जण 'काथ्या वर आवाज उठवून आपापल्या परीने जमेल तसे ज्ञानामृत पाजून वर खुमासदार शिव्या हासडून समाधान मिळवू लागला. या 'सुवर्ण संधी' चा न चुकता सर्वांनीच फायदा घेतला' आणि पुन्हा पुढील तयारीला लागलो. कांदे बटाटे बारीक चिरून, दाणे भाजुन घेऊन मस्त फोडणी पडली आणि मसाला खिचडी शिजेस्तोवर दाणे, कांदा मसाला व आलं-लसूण पेस्ट घालून (ही पेस्ट आम्ही चहा सोडून सगळ्यात घातली, सकाळी दात घासायला देखील हीच वापरावी असेही सुचविण्यात आले तरीही पुढील १० ट्रेक पुरेल एवढी ती शिल्लक राहिली) झणझणीत खर्डा केला गेला आणि रटरटणारी खिचडी खाली उतरवली गेली. गरमागरम खिचडी, झणझणीत खर्डा, चमचमीत लोणचे, खमंग चटणी, शेकोटीत भाजलेले कांदे बटाटे असा 'पेशल-मेनू' आता पुढ्यात आला आणि "वदनी कवळ घेता.." चा जप म्हणून भोजनाचा कार्यक्रम पार पडला. मधेच काही नेहमीचे आवडते पदार्थ आठवले जसे की, पापड, साजूक तूप की लगेच 'तोंडी लावणं' म्हणून काथ्या च्या नावाचा उद्धार होत आणि पुढील जेवणाला प्रारंभ होत. थंडगार वाऱ्यात, निसर्गाच्या कुशीत, गडाच्या त्या उंच माथ्यावर केवळ आमचाच गट (ग्रुप) मोठ्या समाधानाने भोजन उरकून पोटोबा शांत करून आता गप्पांचा फड जमवित होता. आधीच्या भ्रमंतीचे किस्से, पुढील प्लान, शिवकथा, साप आणि त्यांचे किस्से यावर मनसोक्त गप्पा रंगल्या आणि मध्यरात्रीच्या आसपास त्या अफाट उंचीवर, दगडाची उशी डोक्याला घेऊन, नभांगणला अंगावर ओढून मंडळी निद्राधीन झाली.

हरिहर च्या माथ्यावरून फुटणारं तांबडं त्याच्या प्रकाशात चमचमणारी शिखरं आणि त्याने फुलांवरून पसरलेले सोनेरी गालिचे,पहाटेचा बोचरा पण गोडच वाटणारा गारवा, वानरांची सुरू झालेली दंगा मस्ती आणि पक्षायांचा किलबिलाट म्हणजे निसर्गाने जणू आमच्यासाठी गायलेली 'भूपाळी' च होती. अश्या त्या पवित्र वातावरणात आमची सकाळ झाली आजूबाजूचं मनमोहक दृष्य नजरेत भरभरून साठवत आम्ही लगोलग भटकंती सुरू केली. प्रातर्विधी उरकून आता या मंगल वातावरणात गरज होती ती फक्कड चहाची. 'टी-मास्तर' तसेच 'भरारी चे येवले' हे किताब मिरवणारा काथ्या लगोलग कामाला लागला आणि काही वेळातच आमच्यासमोर 'अमृतकुंभ' घेऊन हजर झाला. कडक बासुंदी चहा आणि जिवाभावाचे पार्ले जी चा आनंद घेऊन पुन्हा भटकंती सुरू झाली. थोड्याच वेळात गडावरील गर्दी वाढू लागली तसे आम्ही लोकांनी पण परतीचा मार्ग धरला. लगोलग पाठपिशव्या भरल्या आणि गडाची अंतिम भ्रमंती सुरू केली. गडाचे पठार तसे निमुळते असल्याने आणि वरती पाहण्यासारखे काही नसल्याने आजूबाजूचं निसर्ग, सह्यदऱ्यांचं कातळवैभव पाहात आमचा विहार सुरू होता. प्राचीन काळापासून महाराष्ट्रातील बंदरांमध्ये उतरणारा माल हा नाशिकच्या बाजारात आणला जात त्यावेळी गोंडा घाटातून येणाऱ्या मालावर नजर ठेवण्यासाठी मुख्यतः या गडाचा वापर होता. थोड्या भटकंती नंतर आता पुणे गाठणे गरजेचे होते म्हणून आम्ही गडाला मुजरा केला आणि त्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांवरून पुन्हा गड उतरून सुमारे २ तासात आमच्या गाडीपाशी पोहचलो.
परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली खरी पण निघाल्यापासून थोड्याच अंतरावर असलेल्या एका सुरेख 'बांधा' ला पुन्हा मंडळी खाली उतरली. थंडगार पाण्यात गडाच्या पायथ्याला मनसोक्त पोहुन आणि शेकड्याने सूर मारून झाल्यावर पुन्हा ताजेतवाने मावळे गाडीत बसले आणि पुण्याचा प्रवास सुरू झाला. वाटेत झुणका भाकर, खर्डा, व्हेज थाळी आणि लिटर च्या लिटर ताक ढोसून पुन्हा धष्टपुष्ट गडी तयार झाले आणि अभिजात भारतीय संगीता मधील सर्व पैलू उघडिले गेले. काही (अ)रसिकांनी आता डुलकी घेणे पसंत केले.
परतीचा प्रवास पुन्हा सुरू होणाऱ्या कामांची आठवण करून देत होता खरा.पण त्या सर्व कामांवर हिमतीने मात करण्यासाठी लागणारी ताकद आता आम्ही सोबत घेऊन निघालो होतो. दोन दिवसाच्या गडाच्या आठवणीत मी देखील थोडा हरपून गेलो. तोंडावर येऊन ठेपलेल्या 'दसऱ्याचे सोने' मी आज दोन दिवस आगोदरच लुटून आणले होते. खरंतर त्या सह्याद्री ने, निसर्गाने स्वतःहूनच आम्हाला ते भरभरून दिले होते. असे "सोने लुटायला कायम सीमोल्लंघन करीत राहा!" असा संदेश तो देतोय असा मला भास झाला आणि माझी डुलकी काही काळ उघडली. गाडीतिल मंडळींची, सध्या वाहिनिवर व सोमी वर ताज्या असलेल्या #मीटू या विषयाची चर्चा सुरू होती ती चर्चा मधेच तुटली व पुन्हा दिवाळीतील गड भ्रमंती चे प्लान झाले. कोण कोण दिवाळीतील ट्रेकला येणार? या प्रश्नावर अभिमानाने एकसुरात #मीटू म्हणीत आम्ही पुण्यनगरिस परत पोहचलो.


भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे
९८२२८७७७६७


मोहिमेतील सहभागी मावळे : निखिलेश,स्वप्नील,महेश,सुनील,दुर्वास,श्रीकांत,विनय,विकास, आमोद,निलेश.








Friday, December 15, 2017

कणखर सहयाद्रीचा सौंदर्यपुर्ण नजराणा - अलंग व मदन

अलंग, मदन कुलंग हे त्रिकुट म्हणजे महाराष्ट्राच्या कणखर सहयाद्रीचा सौंदर्यपुर्ण नजराणा.सह्याद्री मधे भटकंती करणा-या सह्यवेड्य़ाला कायमच अलंग, मदन कुलंग हे तीन अवाढव्य किल्ले एकदा तरी सर करावेत हे स्वप्न असतेच. तेच स्वप्न उराशी बाळगून सर्व सह्यप्रेमी कायम त्या संधीची वाट पहात असतात. जशी या तिघांची चमत्कारी नाव तशी यांची चमत्कारी रचना, अलंग मदन कुलंग ही त्रिकूट त्यांच्या उच्चाराप्रमाणेच सर करण्यास देखील भयंकर किचकट. त्यांची नाव घेताना जीभ टाळूला लागते मात्र त्यांची महाकाय उंची बघून -याच जणांची जीभ घश्यात जाऊन तोंडाचा '' देखील होतो. महाराष्ट्राचे एवरेस्ट म्हणून मान मिळवलेल्या कळसूबाई शिखराच्या डोंगररांगेत औंढाचा किल्ला,पट्टा ,बितनगड,हरिशचंद्र, हरिहर ,त्र्यंबकगड, अंजनेरी,खुट्टा सुळका ,कात्राबाई चा डोंगर अजोबा पर्वत, रतनगड अश्या एकापेक्षा एक उंची गाठणा-या सुळक्यांच्या सह्यरांगेमधे नाशिक जिल्ह्यातील अकोले तालुकयात उत्तूंग शिखरातून मान वर करायला लावणारे अलंग, मदन कुलंग हे सह्यमल्लांनप्रमाणे ठाण मांडून बसलेले तीन किल्ले आपले लक्ष वेधून घेतात.
महाराष्ट्राला लाभलेल्या अतीभव्य दिव्य अजस्त्र सह्यरांगेतील मानाचे आणि बरेच कठीण समजले जाणारे अदभूत, चमत्कारी, भयंकर अवघड तितकेच रहस्यमय असे हे तीन किल्ले सर करावेत हेच स्वप्न उराशी बाळगणा-या सह्यप्रेमी मधे अर्थात आम्हीही अफ़वाद नव्हतोच. त्यात कुलंग किल्ला सर केल्यापासून तर ही ओढ आणखीनच वाढली होती पण काही ना काही कारणाने आमचे जाणे रद्द होत होते. अखेरीस डीसे. , या दिवसात मोहीम आखली गेली आणि तब्बल १३ मावळे रवाना झाले किल्ले 'अलंग' कडे. आयत्या वेळी पुन्हा अड्चण आल्याने मला, भास्कर, अमोद आणि कौस्तुभ ला दि. ला निघणे अशक्य झाले म्हणून तारखेला सकाळी निघण्य़ाचा बेत झाला पण माझे काम दुस-या दिवशी सकाळीही पुर्ण होईना शेवट माझी वाट पाहून दुपारी १२ च्या सुमारास ते तिघे पुढे निघाले, मात्र मलादेखील हि संधी सोडायची नव्हती म्हणून जरा उशीरा का होईना पण मि पुणे ते नाशीक फ़ाटा भाड्य़ाने गाडी करून तर नाशिक फ़ाट्य़ावरून रांजणगाव ची एस.टी. पकड्ली मंचर ला या तिघांना येऊन मिळालो आणि आमच्या पुढच्या प्रवासाला सुरूवात झाली. वाटेत अतीविषारी समजल्या जाणा-या घोणस या सर्पराजांचे दर्शन घेवून दि. डीसे. ला सुमारे रात्री .३० वाजता आम्ही आमची गाडी घाटघर या टुमदार गावी लावली आमचा वाटाड्य़ा ( येथे 'वाटाड्य़ा' म्हणजे आमची वाट पाहून पाहून ज्याची पार 'वाट' लागली होती असा  देखील अर्थ घेता येईल ) लक्ष्मण ला घेवून बरोब्बर रात्रौ .३५ ला किल्ल्याकडे कूच केले.
गप्पा मारत दरमजल करीत रात्री विजे-यांच्या मदतिने आमचा प्रवास सुरू होता. चंद्राच्या नितळ प्रकाशात आम्ही लोक चढण चढून जंगलाच्या वाटेला लागलो होतो सुमारे तासाभराच्या पायपिटी अंती आम्ही पहिला थांबा घेतला पुढे सरसावलो. आता बरीच खडी चढण लागली होती आणि छातिचे भाते चांगलेच वाजू लागले होते पण अगोदरच खूप उशीर झाल्या असल्याकारणाने कमीत कमी थांबे घेत पुढ्च्या दीड तासात आम्ही घाटघर च्या वाटेने लागणा-या लोखंडी शिडीपाशी पोहचलो. पुन्हा जरा विश्रांती घेवून सरळ कड्याला लावलेल्या त्या शिडीवरून आम्ही पुढे सरसावलो आणि लौकरच गडाच्या पहिल्या दरवाज्यापाशी पोहचलो. हा दरवाजा दरड कोसळून पुर्णपणे बंद झालेला असून त्याच्या बाजूच्या कड्यावरून सावधानतेने वर चढत आपल्याला दरवाज्याच्या वरची वाट पकडावी लागते. त्यापुढे सुमारे १५ मिनिटे कड्य़ाच्या जरा अवघड चढणीनंतर आम्ही गडाच्या कुषीत असणा-या आड्व्या कपारीपाशी पोहचलो. त्याच कपारीतून एकावेळी एकच माणूस जाऊ शकेल अश्या
पाऊलवाटेने उजवीकडे गडाचा माथा आणि डावीकडे आवंढा काढणारी दरी पकडून पाऊण तासाचा वेढा मारून आम्ही  तासाअंती गडावरील अतिशय सुंदर आणि रेखीव अश्या गुहांपाशी साधारण रात्रीचे वाजता मुक्कामाला पोहचलो. "गुढ अंधार, थंडगार घोंघावणारा बोचरा वारा, मंद चंद्रप्रकाश, पुढ्यात असलेल्या महाकाय दरीत जमा होणारे धूके आणि त्या वातावरणात आजूनच महाकाय वाटणारे समोर उभे असलेले अवाढव्य मदन कुलंग किल्ले, रात्री वाजता सुखरूप पोहचून अलंग किल्ल्यावर बसून या सगळ्य़ाची अनुभुती घेत होतो आमचे जेवण उरकत होतो." बाकी मंडळी त्या वातावरणात केव्हाच निद्रीस्त झाली होती. गुहेत थोडी जागा करून आता आम्हिही आमच्या पथा-या पसरल्या आणि त्य निसर्गाच्या कुषित निद्राधीन झालो.
डीसे. २०१७ सकाळी च्या सुमारास जाग आली तेव्हा बाकी मंडळी उठून बरेच जण आपापल्या शिकारीला गेले होते. (अर्थबोध होत नसेल तर तज्ञाचा सल्ला घ्यावा) आम्ही देखील आता पटापट आवरण्य़ास सुरूवात केली नाष्टा तयार होईस्तोवर पटकिनी गडाचा माथा गाठला. सुरेख कोरलेली पाण्य़ाची १०-१२ टाकी दिसली या टाक्यांचा विस्तार बघुन यांचे त्याकाळचे वैभव काही औरच असावे याची कल्पना आली, तसेच गडाचे काही अवशेष,लहानसे मंदीर असा गडावरील परीसर न्याहाळत आम्ही माथ्यावरील प्रशस्त पठारावर आलो होतो."पूर्वेला कळसूबाई पार आभाळ फ़ाडून वर घूसली होती, औंढाचा किल्ला,पट्टा ,बितनगड कोवळी उन्ह खात निवांत पहुडले होते ,उत्तरेला
हरिहर ,त्र्यंबकगड, अंजनेरी धूक्यातून हात दाखवित होते तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबाचा गड, खुट्टा सुळका , रतनगड, कात्राबाई चा डोंगर आपली पंगत मांडून सोनेरी किरणातून त्या निसर्गावर मुक्त उधळण करीत होते असा चहूबाजूंनी वेढलेल्या परिसराला न्याहाळत असताना सह्याद्री चे खरे प्रेम, सौदर्य हपापल्या सारखे शक्य तितके मनात, डोळ्य़ात साठवत होतो." फ़ारसा वेळ घालवता क्लिकक्लिकाट करण्य़ाकरीता कॅमेरा काढला तेव्हा त्यात बिघाड झाल्याचे लक्षात आले तसे फ़ार वाईट वाटले मग थोडे मोबाईल वरच फ़ोटो काढून पुन्हा गुहेपाशी परत आलो. तोवर मंड्ळी आवराआवर करत होती. गरमागरम मॅग्गी वर ताव मारून पुन्हा पाठपिशव्या भरल्या गेल्या मंडळी तयार झाली पुढच्या प्रवासाला,अलंग कडून मदन वर जाण्य़ाकरीता संपूर्ण किल्ला उतरून जाण्य़ाची गरज नाही, अलंग आणि मदन च्या मधल्या घळी मधे उतरणे आणि मदन किल्ला करून पुन्हा घळीत येवून आपण पुढे कुलंग किल्ला देखील गाठू शकतो वा खाली उतरू शकतो.
अलंग ला मुजरा करून मावळे आता पुढे निघण्याच्या तयारीला लागले होते, कातळारोहण कलेत पारंगत असलेला आणि त्याच्या अनुशंगाने तांत्रीक बाजू जाणणारा ट्रेकरच केवळ या किल्लांच्या मोहिमा आखू शकतात. कातळारोहणाचे केवळ पुस्तकी ज्ञान असणारे नव्हे तर २०१२ साली जगातील सवोच्च शिखरमाउंट एव्हरेस्ट’ पादांक्रात करून आलेले आमचे मित्र आदरणीय  एव्हरेस्ट वीरटेकराज आधीकारी’ हे जातीने आमच्या मोहिमेचे नेतृत्व करीत होते त्यामुळे त्यांनी सेनापती च्या नात्याने सर्वात पुढे कूच केले, अलंग किल्ल्यावरून खाली उतरण्य़ास दगडात कोरलेल्या पाय-या लागतात पण उभ्या खडकातील केवळ छींन्नी हतोड्य़ाच्या मदतिने कोरलेल्या या पाय-या आकाराने लहान असून उतरताना समोर ४५०० फ़ूटाची वासून बसलेली खोल दरी आपली नजर फ़िरवीत असते, अतिषय सावध गतिने सर्वजण या पाय-या उतरून एका छोट्य़ाश्या गुहेपाशी पोहचलो काही वेळासाठी तिथे गप्पांचा फ़ड रंगला कारण त्याच्याच पुढे साधारण ८०-९० फ़ूटाच्या सरळसोट कड्य़ावरून आता आम्ही दोराच्या मदतिने कडा उतरणार होतो. आवश्यक असणारी सर्व खबरदारी घेतल्यानंतर एकापाठोपाठ एक असे सर्वजण तो उभा कडा उतरून खाली आलो. पुढे थोड्य़ाच
अंतरावर पुन्हा दोराच्या मदतिने आम्ही आजून छोटा ट्प्पा पार करून पुढे सरसावलो. येथून पुढील वाट ही डावीकडे कडा उजवीकडे सरळ दरीमुळे जास्त धोकादायक आहे. जेमतेम पाऊल ठेवून पुढे जाता येते. पुर्ण काळजीने, शांतपणे, निसर्गाचा, सहयाद्रीचा तो सौंदर्यपुर्ण नजराणा पहात आम्ही एकापाठोपाठ एक जण पुढे सरकत होतो. (येथे ओव्हरटेक शक्यच नाही,कोणी 'ओव्हरटेक' करण्याचा प्रयत्न केला तर तो 'वरचाटेक' ठरण्याची शक्यताच जास्त आहे.) साधारण १५-२० मिनीटाच्या प्रवासाअंती आम्ही सर्वजण खिंडी पाशी पोहचलो. 'समोर ४८२२ फ़ुट उंचीवर ठाण मांडून बसलेला मदन किल्ला मला एखाद्या वेटोळे मांडून बसलेल्या सुस्त अजगरा सारखा वाटत होता.' मदन सर करून पुन्हा याच खिंडीतून आम्ही खाली उतरून परतीच्या मार्गावर निघणार होतो त्यामुळे पाठपिशव्या खिंडीतच ठेवून आम्ही आता थोड्य़ा उजवीकडे असणा-या धोकादायक अश्या वाटेवर आलो. येथून जाताना मागे कुलंग गडावर आमचा मित्र सत्या लहान वाटेवर पाऊल टाकताना जी कसरत करीत होता तीच कसरत आता आम्ही सर्वजण करत होतो त्यावेळी मला कुलंग च्या वेळी झालेल्या विनोदाची पुन्हा आठवण झाली, या वाटेने चालणे म्हणजे 'संजय लीला भंसाळी चे (सो-कॉल्ड) अवाढव्य चीत्रपट ५१२ एम बी च्या पेन ड्राईव्ह मधे बसविण्य़ासाठी जी कसरत करावी लागेल तिच कसरत आम्हाला या ठिकाणी करावी लागत होती.'या कडा तुट्लेल्या वाटेने जाताना वाटेत
काळजी घेणे गरजेचे असून काही ठिकाणी दोर लावणे आवश्यक आहे. ही वाट पार करून आता सर्वजण स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना असलेल्या मदन गडाच्या कोरीव पाय-यांपाशी पोहचलो होतो. येथूनच पुढे तुट्लेल्या कड्य़ाला दोर लावून प्रस्थारोहण करून आपण गडाचा माथा गाठतो.मदनगडा वरील चढण ही तशी अलंग गडा वरील कातळकड्या पेक्षा सोपी, परंतु खाली सरळ दरीमुळे भयंकर धोकादायक आहे. समाजहीत जाणणा-या गिर्यारोहकांनी आधीच बोल्टींग करून ठेवल्यामुळे ही चढण काहीशी सुरक्षित झाली आहे. सर्वप्रथम टेकराज कातळ चढून दोराला बोल्ट्स मध्ये सुरक्षित करून माथ्यावर पोहचला त्यानंतर सर्वांना थोड्य़ा प्रयत्नाअंती माथा गाठता आला. "सह्याद्री वरील तुमच असलेले प्रेम, त्याने देखील प्रेमाचा मान दाखवत तुम्हाला दिलेली साद खाली येखाद्या बोक्याप्रमाणे जीभल्या चाटत वासून बसलेली ती महाप्रचंड दरी, तिची भिती वाटू नये म्हणून त्या सह्याद्री ने आपल्या कड्य़ाचा कुषीत घेवून दिलेला आधार आणि त्याच्या ओढीने अंगातली रग बाहेर पडल्यावर होणारा आनंद जो असतो तो केवळ येथेच मिळतो." वेळेअभावी गडाचा माथा फ़िरता आम्ही सर्वजण माघारी फ़िरलो पुन्हा त्याच वाटेने सावधानतेने घळी पाशी पोहचलो. तोवर सूर्यदेव अस्ताला निघाले होते. पटापटा थेपले, चीवडा आणि बाकी कोरडा खाऊ पोटात ढकलून सर्वजण घळ उतरण्य़ास सज्ज झालो. विजे-यांच्या प्रकाशात आणि गप्पांच्या ओघात संपूर्ण दरी सुमारे तासात उतरून मंडळी विश्रांती साठी थांबली, गडबडीत झालेल्या प्रवासामुळे भरारी चे गायक राकेश च्या गाण्य़ाची मेजवानी मिळाली नव्हती ती सर्वाची ईच्छा राक्याने पूर्ण केली. समोर अंधारात उभे असलेले किल्ले त्यांच्या माथ्यावर पोर्णीमेचा चांदोमामा आणि थंडगार वातावरणात 'वा-याने हालते रान' या सुमधूर गाण्य़ाने सर्वांचे कान तृप्त करून आम्ही पुढील प्रवासाला निघालो. नदीचा टप्पा त्यपुढील टेकडी ओलांडून घाटगर गावी पोहचेस्तोवर १२ वाजत आले होते. पुन्हा थोडी पोटपूजा उरकून धकल्या पावलाने मावळे गाडीत बसले. 

परतिच्या प्रवासात या किल्ल्यांचा इतिहास, त्या किल्ल्य़ांना आजवर जिवंत ठेवणा-या वीरांचा ईतिहास आठविण्य़ाचा प्रयत्न केला, तसा 'अलंग, मदन आणि कुलंग गडाचा इतिहास बहुदा फ़ारसा कुणाला ज्ञात नाही,मराठ्यांची शक्ति ही या गडांवरच आहे हे जाणणा-या इंग्रजांनी त्यांचा अम्मल येताच हेतुपूर्वक गडांची नासधूस केली. ह्याचे सगळ्यात प्रचंड परिणाम अलंग कुलंग मदनगडांना भोगावे लागले असावेत. इंग्रजांनी दुर्ग जिंकून स्थानिकांच्या परंपरागत हक्कांवर गदा आणल्याचे पडसाद त्या काळी स्थानिक जमातींमध्ये देखील उमटले. जुन्नर येथील 'काळा चबुतरा' य़ा आदिवासी लढा म्हणजे याचीच तर आठवण. रतनगड आणि अलंग किल्ल्यांच्या पोटातून ज्या नदीचा उगम झाला ती प्रवरा नदी, तिच्याच खो-यातून मग १८१८ साली महादेवकोळी आणि भील्ल जमातीने महाराष्ट्रातील इंग्रजी सत्तेविरुद्ध लढ्याचा आरंभ केला. या लढ्याचे नेतृत्व रामजी भांगरे आणि रामा किरवा यांनी केले. रामजी भांगरे याने इंग्रजांविरुद्ध जोरदार उठाव केला मात्र नेहमी प्रमाणे फितुरीचा शाप या लढ्यालाही लागला आणि तो लढा शेवटपर्यंत अपयशी ठरला. पुढे हा वारसा भागोजी नाईकाने सुरू ठेवला.अश्या अनेक लढ्यांमुळे आणि त्या वीरांच्या बलिदानाने किमान आपणा सर्वांना आज हे किल्ले उभे तरी दिसत आहे. त्या सर्व विरांना मनोमन प्रणाम केला आणि गाडीच्या धूराळ्य़ात देखील सह्याद्रीच्या शिरपेचात मानाचा तूरा खोचून बसलेले अलंग, मदन आणी कुलंग या मंल्लांचे त्रिकूट पुन्हा नजरेस पडले. '
अंतरजालावरून साभार - किल्ले मदन वर जाणारी वाट
दरवेळी या भागातून प्रवास करताना हे किल्ले दिसले की त्या नंतरच्या कित्येक रात्री आपण यांच्या माथ्यावर पोहचल्याचे स्वप्न पडायचे ते आजच्या परतिच्या प्रवासात मला पडले नव्हते, त्याचे कारण आज ते हवेहवेसे स्वप्न प्रत्यक्ष पुर्णत्वास आले होते. २४ तासाच्या आत हे किल्ले पूर्ण करण्य़ाचे स्वप्न पुर्णत्वास आले होते... पण त्यांचे रांगडे रूप आत्ता जरा हळवे भासत होते. आपल्या लोकांना ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्यांना निरोप देतानाची खिंन्नता त्या अंधारात जाणवत होती. 'मला भेटायला पुन्हा नक्की या असेच तो सांगत असावा' "सह्याद्रीकडून शिकण्य़ासाठी परत आलेच पाहिजे, मैत्री म्हणजे काय हे जाणण्य़ासाठी सह्याद्रीत आलेच पाहिजे, अडचणीची परिस्थीती विनासायास सोडविण्य़ाची शिकवण घेण्य़ासाठी सह्याद्रीत आलेच पाहिजे आणि निसर्गापुढे आम्ही मानव जात किती खुजे आहोत हे लक्षात राहण्य़ासाठी आलेच पाहिजे हेच मनोमन ठरवत पहाटे वाजता सुखरूप पोहचलो ते आज आयुष्यात एक 'उंची' गाठली या समाधानाने...."

 भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे.

मोहिमेत सहभागी मावळे : राकेश जाधव,प्रसाद डेंगळे,अश्विन मेनकुडले,योगेश भडके,सुरज पाटील,सुषांत पाटील,निखिलेश नावाडकर,स्वप्नील राजपूत,सुनिल काटकर,महेश मोरे,विजय मुंडफ़ने,सुरज मानकर,आमोद राजे,भास्कर कुलकर्णी,कौस्तुभ खांदवे,निलेश वाळींबे आणि एव्हरेस्ट वीर टेकराज अधीकारी.
मुलभूत माहिती:
गड प्रकार - खडतर
पुण्यापासून अंतर - २५० किलोमीटर (पुणे-नारायणगाव-आळेफाटा-बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा-घाटघर)
थोडक्यात पण महत्वाचेया गडांवर जाण्याकरीता प्रस्थारोहणाचे तंत्र अवगत असणे, त्याकरीता लागणारे साहित्य असणे, खोलिची भिती नसणे आवश्यक आहे.

आंतरजालावरून साभार