Friday, August 26, 2011

ऎन पावसात खुंटीच्या वाटेने सर.. ॥ किल्ले हडसर ॥

 दि. १३.०८.२०११ वार शनिवार आम्ही मावळ्यांनी बेत केला होता की या स्वातंत्रदिनी आपण कळसूबाई शिखर सर करून यायचे त्याप्रमाणे रात्रौ ११ वा. माझ्या घरापाशी जमण्याचे ठरले आणि चक्क चक्क सर्वजण हजर देखील झाले त्याचक्षणी खरतर माझ्या मनात शंकेची पाल चुकचूकली, की सर्वजण वेळेत हजरच कसे झाले ? (पूर्वानुभव बाकी काय) आम्ही ठरविलेली गाडी माझ्या घरी ११ वा. येणार होती पण पुढे १,२ तास होवून देखील पोहचली नव्हती. गाडीचे चालक त्यांचा भ्रमणध्वनी (ज्याला मराठीत mobile म्हणतात ;))उचलत नव्हते आणि मालक त्यांचा भ्रमणध्वनी उचलून काहीतरी थातूर माथूर उत्तरे देउन त्यांची वेळ मारून नेत होते आणि आमचा वेळ वाया घालवत होते. शेवट १.३० च्या आसपास आमच्या सर्वांच्या “ठरविलेल्या गाडीच्या” आशा संपुष्टात आल्या आणि शनिवारी निघणार असा बेत आखला असल्याने मारूतरायचे स्मरण करून आपण आपल्याच स्वत:च्या गाड्या घेउन निघण्याच्या निर्णय झाला तोच लगेच मारूतराया देखील आम्हाला प्रसंन्न झाले आणि आमच्या प्रवासासाठी एक नव्हे दोन नव्हे तर साक्षात तीन मारूतीची रूपे हजर झाली. मारूती झेन, मारूती स्वीफ़्ट आणि मारूती ईस्टीम. आता जवळपास २ वाजत आले होते पुण्यातून कळसूबाई पायथा गाठायला आता सकाळी उशीर होणार म्हणून आम्ही किल्ला बदलावा या मतावर आलो.”पावसाळ्यात हडसर च्या खुंटीच्या वाटेने चढणे म्हणजे १ धाडस समजतात” त्यामूळे आपण हीच मोहीम आखावी असा धाडसी निर्णय घेण्यात आला आणि गाड्यांचे धूराळे उडाले जून्नर च्या दिशेने !
दि. १४.०८.२०११ जवळपास पहाटे ४ च्या सुमारास आम्ही जुन्नर ST स्थानकात पोहचलो होतो.येथेच थोडी विश्रांती घेउन पुढे निघायचे होते साधारणत: सकाळी ७ ला आम्ही जुन्नर सोडले. रस्त्याच्या दूतर्फ़ा गर्द वनराई पसरली होती दोन्ही बाजूला असलेल्या वडाच्या पारंब्या जणू आमच्या स्वागतालाच हात पसरून उभे असल्याचा भास मला जाणवत होता.सकाळच्या प्रहरी ताई, माई, आक्का विहीरीवर पाणी भरण्यासाठी गर्दी करत होत्या तर वरती आकाशात ’खग’ देखील आपापल्या कामाला लागल्याची चाहूल जाणवत होती.चहूबाजूला उंच डोंगर आम्हाला आपल्या कुशीत घेत तो सह्याद्री आपले विराट रूप आमच्यासमोर मांडून जणू आमचीच वाट पहात असल्यासारखा भासत होता.मधूनच पावसाच्या रिमझिम ’श्रावण सरी’ आपली हजेरी लावत होत्या आणि त्यांच्या साथीलाच जणू गाडीच्या काचेवर वायपर्स खर्र. खर्र. अशी साथ देत एक नवीनच नाद निर्माण करत होत्या.रस्त्याने जाताना घाटात नागमोडी रस्त्याच्या दुतर्फा हिरवाईचा जो काही उत्सव नजरेस पडला, त्यामुळे मूड एकदम प्रसंन्न होऊन गेला होता.डोंगर उतारावरची ती टुमदार कौलारू घरे, वस्त्या पार करत आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या हडसर या गावी पोहचलो आणि तडक आपापली ओझी पाठीवरती घेउन मावळे निघाले किल्ल्यावर...तेही खडतर अश्या खुट्टीच्या वाटेने !
गडावर जाण्यासाठी ३ वाटा आहेत त्यातली सर्वात कठीण आणि प्रस्थारोहणाला अवघड पण, कमी वेळात माथ्यावर (किंवा एकदम वर) पोहचवणारी वाट म्हणजेच “खुंटीची/खुट्ट्याची वाट” म्हणून ओळखली जाते पावसाळ्यात या मार्गाने जाण्याचा अनूभव हा काही औरच असतो आता आमची पाऊले चालत होती त्या पंढरीची त्या सह्याद्रीची वाट.एकंदर १२ मावळे आता पूर्ण जोशात डांबरी रस्ता सोडून बाजूच्या शेतात घूसले होते.पहिल्यांदा पाण्यात, चिखलात पाय खराब होवू नये म्हणून जपत चालणारी पावल थोड्याच मिनीटात, हे शक्य नाही हे अनुभवाने समजून चिखलात पचा पच ढांगा टाकू लागले होते.चहूबाजूला गर्द वनराई आणि थंड हवा मनाला गुदगूल्या करत होती. चढण चढल्यावर घामेजलेल्या देहांना मध्येच रिमझीम सर गारवा देत होती.सुमारे आर्ध्या तासानंतर आम्ही सर्वजण “त्या” जागेवर पोहचलो होतो जिथून कठीण प्रस्थारोहण सुरू होणार होते.सर्वजण ’आ’ वासूनच त्या कातळाकडे बघत असताना मी आणि अमोद ने अंदाज घेण्यासाठी १-२ अयशस्वी प्रयत्न केले.थोडा प्रयत्न आणि घसरणीचा अंदाज घेउन ’हे शक्य होत नाही’ हे समजत होते आणि त्यामुळेच कदाचीत आत्मविश्वास देखील कमी होत चालला होता आता आमच्यातल्या ब-याच मावळ्यांचा हिरमोड झाला होता.पण,“त्या सह्याद्रीने आज आपल्या प्रेमाचा पुन्हा १ पुरावा आम्हास दिला”आणि कोथरूड पुणे येथून आलेल्या काही सवंगड्याची आणि आमची तेथेच भेट झाली.त्यांचा गटप्रमूख ’महेंद्र’ ने सर्वाना खात्री देत काही मि. मद्धेच हा भयंकर टप्पा चुटकीसरशी पार केला आणि वरून बाकी कार्यकर्त्यांसाठी दोर टाकला.या जागेवर “बिले” देणेही फ़ारसे सोपे नसले तरीही दोराचे १ टोक वर अडकवीण्यात आले आणि दुसरी बाजू कमरेला आधारासाठी बांधून दुसरा गडी पुढे सरसावला.थोड्याच प्रयत्नात कोणत्याही दुखापतीविना तो वर पोहचला मग काय एकमेकांना मानसिक आधार देत सर्व मावळे चढाइला लागले कष्टाने पहिली खुंटी पकडून झाली की लक्ष फ़क्त आणि फ़क्त दुस-या खुंटीवर केंद्रीत होत होते ती झाली की तिसरी मग चौथी अस करत करत प्रत्येक जण चढत होता “एकाग्रता” म्हणजे काय आणि ती जर असेल तर ’असाध्य ते साध्य’ कसे होते याची जणू प्रचितीच त्या कातळाने आम्हास दिली होती.बघता बघता सर्वजण वरच्या गुहेपाशी सुखरून पोहचले शेवट सर्वांची दप्तरे दोराने 
 ओढून घेतली गेली व पुढच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू झाली. १० फ़ूटांवरतीच पुन्हा दुस-या कातळाने आवाहन केले आणि पुन्हा त्यात रोवलेल्या खुट्टया आणि खोदलेल्या कपारींचा आधार घेत आम्ही सरसावलो. या टप्प्यात पाठीमागची खोल सरळ दरी आणि पावसाने निसरडे झालेले चढाईचे कडे आमची चांगलीच परीक्षा घेत होते.त्यांना अक्षरश: बिलगून मानवरूपी घोरपडी बनून सर्वानी तो कडा देखील पार केला.पुढच्या १ मि. मधेच मावळे पोहचले होते गडमाथ्यावर आणि सर्वांच्या छात्या त्या २ कड्यांवरच्या शेवाळ्याने, मातीने भरल्या असल्या तरी त्या फ़ुगल्या होत्या “गर्वाने,अभिमानाने आणि त्या अथांग गगनात न मावणा-या आनंदाने” !
गडमाथ्यावरून आजूबाजूचा निसर्ग फ़ारच विलोभनीय दिसत होता. एका बाजूला माणिकडोह धरणाचा महाप्रचंड जलाशय व तिन्ही बाजूंनी पर्वत रांगा त्यात अर्ध्यापर्यंत आलेले कुंद श्रावणी ढग चित्त उल्हसित करून टाकत होते, त्यांना बघतो ना बघतो तर त्यातलेच पान्हावलेले ढग मधूनच एखादी जोरदार श्रावणसर अंगावर शिंपून चित्तवृत्ती उल्हसित करुन टाकत होते.वेलबुट्टीच्या नक्षीने रेखाटलेल्या त्या हिरव्यागार रंगाच्या असंख्य छटांनी भरलेला तो मखमली शालू लपेटून तो सह्याद्री आपले मनोहरी दर्शन देत होता.मग काय पटापट छायाचित्रकार पुढे सरसावले.आता चिखल तुडवत पुढची वाट सुरू झाली आणि आम्ही पोहचलो गडमाथ्यावरच्या “महादेवाच्या मंदिरामध्ये” अजूनही पाषाणात कोरलेले हे मंदिर अगदी उत्तम स्थितीत आहे ४-५ लोक यात आरामशीर मुक्कामी राहू शकतात.आता मावळे माथ्यावर विसावले होते.सातवाहन काळातला हा किल्ला १६३७ मध्ये शहाजीरानी मोघलांच्या हवाली केलेल्या पाच किल्ल्यांनध्ये गणला जातो. थंडगार वा-याच्या साथीत, सह्याद्रीच्या कुशीत, पावसाची टपटप अनूभवत मातीच्या सुगंधात आलेयुक्त चहापान झाले आणि कोरड्या खाऊवर ताव मारून किल्ला दर्शन करत मावळे राजमार्गाने म्हणजेच पाय-याच्या वाटेने पुन्हा उतरायला लागले.वाटेत रानफ़ुलांचा मेवा फ़ारच विलोभनीय दिसत होता जणू चहूकडे गालीचा पसरल्याप्रमाणे तो भासत होता.शेकडो वर्षांपासून आजदेखील हा किल्ला आपले रांगडे रूप धारण करून आहे याची प्रचिती आम्हाला बेलाग कडे आणि उत्तूंग बुरूज देत होते. कातळात कोरलेल्या पाय-या उतरून शेताच्या बांधांवरून प्रवास करताना त्या भाताच्या खेचरांकडे बघताना “निरागसतेचे भाव” मला जाणवत होते. साधारण २ तासाच्या पायपिटीअंती आम्ही हडसर गावाच्या हनूमान मंदिरी मुक्कामी थांबलो होतो.
 २५-३० लोक राहू शकतील आश्या मंदिरात हनूमानाच्या साक्षीने पुन्हा चहापान झाले आणि तयारी सुरू झाली भोजनाची.लगोलग सगळे पुढे सरसावले.पाणी आणून किराणा बाहेर निघाला मंदिराच्या साफ़सफ़ाईला काही मावळे सरसावले तर काही आपणहून कांदे बटाटे चिरू लागले आणि आनंदाश्रूंना वाटा मिळाल्या “बल्लवाचार्याचा” पोशाख परीधान करून मी देखील पुढे सरसावलो. एकीकडे मस्त खिचडी शिजायाला पडली तोवर दुसरीकडे घरून आणलेल्या थेपल्या, पोळ्यांचा फ़डशा पडला आणि गंप्पांच्या,चेष्टा मस्करीच्या ओघात पापड भाजत रटरटलेली खिचडी बघताच पोटातल्या कावळ्यांना शांत करायला मावळ्यांची अंगत पंगत बसून मेजवानीवर ताव मारला गेला.जेवणे उरकून आता एकीकडे भांडी पालथी पडली आणि दुसरीकडे दिवसभराच्या आठवणीत रमत मावळे देखील निद्रीस्त झाले.
दि.१५.०८.२०११ सकाळी मंदिराच्या बाहेरच गावाचे झेंडावंदन असल्याने गावकरी, शाळकरी मुलांसोबत आम्ही सर्वजणांनी देखील तिरंग्याला सलामी दिली.लगेच पुन्हा न्याहरी ची लगबग सुरू झाली आणि कांदेपोहे व खास श्रावणी सोमवार स्पेशल साबु. खीचडीवर ताव हाणून आम्ही गावाचा निरोप घेतला. संपूर्ण दिवस हातात असल्याने घरी न जाता “चावंड” किल्ल्याला भेट देउनच परतीला निघायच असा प्रस्ताव मान्य झाला आणि तडक गाड्यांनी कूच केले चावंड च्या दिशेने !      
प्रसिद्ध कुकडी नदीच्या खो-यात आपल्याच थाटात उभी असलेली टुमदार कौलारू घरे, चहूबाजूला डोंगर, संतविचाराने रंगविलेल्या भिंती, बागडणारी मुले, १-२ लहान पण सुरेख मंदिरे, गावात मधोमध बांधलेला ’पार’ त्याच्या बाजूलाच दगडाच सुबकतेने कोरून काढलेली विहीर,छोटेखानी टपाल खात्याच्ये कार्याल्य आणि प्रेमाची हाक जाणणारी माणसे यांनी नटलेल्या “चावंडवाडी” या पायथ्याच्या गावी पोहचताच आपणास अगदी गावालाच चिटकून उभा असलेला उत्तूंग आणि निधड्या छातीचा कडा आव्हान देत उभा असतो तोच “प्रसंन्नगड उर्फ़ चावंड” किल्ला होय !
गाड्या अडथळा येणार नाहीत अश्या जागेवर उभ्या करून फ़क्त पाण्याच्या बाटल्या घेउन आता सर्वजण किल्ला सर करण्याकरीता पुढे सरसावले.किल्ल्य्याची उंची खूप नसल्यामुळे फ़ार दमछाक होणार नव्हती याची कल्पना सर्वांना होतीच.(नाहीतर काय डोंबल चढणार हे) मावळे आता गर्द झाडीमधून नागमोडी पाऊलवाटेने सपासप पुढे सरसावले होते. थोडे अंतर चालून जातो तोच सरळसोट कातळात जेमतेम पाउल बसेल अश्या तिरक्या खोबण्यांनी आमचे लक्ष वेधून घेतले. त्या कोरलेल्या खोबण्यांमध्ये चढताना तोल जाउन काही अपघात होवू नये म्हणून कठड्यासारख्या आधाराला लावलेक्या शिड्या दिसत मात्र होत्या पण त्या स्वत:च इतक्या अगतिकतेने खाईवर जेमतेम लटकलेल्या दिसत होत्या की त्यावर शरीराचा भार टाकण्याची कल्पनाच शक्य नव्हती आम्ही सगळे सावधतेने तो टप्पा पुर्ण केला आणि मग सुरू झाला गड प्रवेशाचा मार्ग.जवळपास १००-१२५ पाय-या चढून आम्ही गडाच्या मुख्य दरवाज्यापाशी पोहचलो. श्री. गणेशाचे सुंदर शिल्प कोरलेल्या भिंतीपाशी रस्ता डावीकडे वळून मगच दरवाजा बांधून काढला आहे जेणेकडून खालून थेट दरवाज्यावर हल्ला करणे अशक्य होईल.गडमाथ्यावर पोहचेस्तोवर तासभर वेळ देखील चिक्कार होता. गडावर आता आमचा फ़ेरफ़टका सुरू होता.बालेकिल्ल्यावरील शिव मंदिरी आम्ही नतमस्तक होवून दुस-या बाजूस असलेल्या कोरीव अश्या    तळ्यांपाशी पोहचलो. प्रगत शास्त्र आणि उत्तम शिल्पकलेचा अनूभव आम्ही समोरच पहात होतो.सुबक अश्या ७ कोरीव बारमाही पाणी असलेल्या तळ्यांच्या काठावर आता मावळे विसावले होते.एका वर्तूळाकार खड्ड्यात खडकाच्या 
बांधानीच एकमेकांपासून विलग केलेली ही “सप्ततळी” फ़ारच सुरेख आहेत. आजूबाजूचा परीसर न्याहळताना गडाचे नाव प्रसंन्नगड का याचा पुरावाच आता मिळत होता.”गार वा-याच्या झुळकेबरूबर ताल धरून त्या गडावर नावाप्रमाणेच प्रचंड वाढलेले ते हत्ती गवत “ऎरावताप्रमाणे” डोलत त्या वा-याचा मनमूराद आनंद घेत होते. चहूबाजूच्या त्या सह्यकड्यांवरून कोसळणारे असंख्य जलप्रपात आपल्या सह्याद्रीचे पाय धुण्यासाठीच जणू झेप घेताना भासत होते आणि त्याच्या पायाच्या स्पर्शाने पावन झालेले ते तीर्थ चंदेरी रेघांच्या रूपाने लांबवर पसरत जाताना फ़ारच विलोभनिय भासत होते. थोड्या वेळातच सूर्यनारायण आपल्या परतीचे संकेत देवू लागला आणि वरून दिसणा-या काळ्या आईच्या कुशीत राबणारा शेतकरी दादाची परतीच्या मार्गाला निघायाची लगबग सुरू झालेली बघताच आम्हीदेखील भानावर येउन गडाला मुजरा ठोकला.” लाडक्या सह्याद्रीला रामराम करून त्याच्यी माती हातापायावर तशीच ठेवून तिला जपत जुन्नर गाठले.जुन्नर ला मस्त खानावळ बघून सर्वांनी गुलाबजामयुक्य अश्या थाळीवर मनमुराद ताव हाणला आणि १ गाडी येथूनच मुंबई ला निघाली आणि राहिलेल्या २ गाड्यांनी पुनवडीस प्रस्थान केले.
गाडीत माझ्याबरोबर आठवणी देखील प्रवास करत होत्या.आठवत होता तो सह्याद्री जेवताना भूकेलेल्या जिवांनी ना हात धुतले होते ना कपडे साफ़ केले होते. लागलेली भूक त्या सह्याद्रीचे प्रेम आणि तो निसर्ग मला सांगत होता साद घालत होता...
“माझ्याकडे आलात की मातीतही हात घालायचा असतो, जाऊ द्यायची असते नखांमध्ये ती माती. आरे पोरांहो, ते अरोग्य शास्त्र, हायजिन, बियजिन सगळ पुढे आलं बाबा, मी या सर्वांच्या फ़ार फ़ार आधी आहे रे. आठवतय का ? ते विज्ञानाचं पुस्तक माझ्या फ़ार नंतर हातात आलय तुमच्या. ते आल्यावर हेल्थ वगैरे समजल हो तुम्हाला पण... पण आयुष्याची खरीखुरी ’गंमत’ मात्र हरवून गेलात रे तूम्ही.म्हणूनच सांगतो, माझ्यापासून दूर जाऊ नका रे पोरांनो मी भुकेलेला आहे तुमच्या प्रेमाचा !“
 मी आमच्या सह्याद्री ची ती साद,त्याची ती हाक ऎकली होती त्याच्या हाकेचा मान ठेउन मी पण आता त्या शहराच्या गर्दीत प्रवेश करत होतो अर्थात पुढच्या मोहिमेची आखणी करतच !

भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश वाळिंबे
९८२२८७७७६७

मोहिमेतील सहभागी मावळे :-             
अमोद राजे,निलेश महाडीक, प्रसाद डेंगळे,अक्षय बोरसे,अमित गाजरे,वल्लभ येवलेकर,विकास पोखरकर,अनिल पिसाळ,हेमंत जगताप,सुषांत पाटील,सुरज आणि निलेश वाळिंबे.  



Friday, July 22, 2011

सह्याद्रीतली संगीत मैफ़ल – एक स्वप्नपूर्ती


भटक्या सह्यवीरांना आपल्या सह्याद्रीबाबत वाट्टेल ती स्वप्न पडत असतात. तसच मधे मलादेखील स्वप्न पडल होत , “आपण मित्रांसमवेत मस्तपैकी सह्याद्रीच्या कुशीत आहोत पाऊसाच्या चमत्काराने आपला सह्याद्री अंगावर हिरवी शाल पांघरून आपले मनोहर रूप सर्वांसमोर मिरवतोय, थंड हवा मस्त शीळ घालतीय आणि त्याच मंजूळ शिळेची साथ संगत पकडत “बासरीचे” सूर त्या सह्याद्रीत घुमत आहेत जणू तो मुरलीधर स्वत: या स्वर्गरूपी सह्याद्रीत प्रगटलाय आणि आपल्या सूरेल स्वरांनी वातावरण अजूनच धूंद करतोय सारी दु:ख, सा-या वेदना क्षणात दूर होवून मी त्या मंजूळ स्वरांमद्धे त्या गारव्यात पूर्ण हरवून गेलोय ! ”  आणि तेवढ्यात आईच्या हाकेने मला जाग आली. नेहमीचेच आळस देउन उठलो खरा पण पडलेल स्वप्न स्वस्थ काही बसून देईना.शेवट १६ जुलै चा दिवस उजाडला आणि आमचे परंम मित्र आणि प्रसिद्ध बासरीवादक ’श्री. अमित काकडे’ यांच्या कृपेने ते माझ स्वप्न एकदाच सत्यात उतरलच... !
१५ ला रात्री आम्याचा फोन आला,“निल्या उद्या सकाळी ५.३० ला पुणे स्टेशन ला भेट मस्त “पेबच्या” किल्ल्यावर भटकंती करून येउयात खास तूला ऎकावयाला बासरी घेउन येतोय !“ 

“क्या बात है ! झक्कास,पोहचलोच समज” असा १ ओळीचा प्रतीसादाने फोन बंद झाला आणि सकाळी ६.०५ ला मी, अनिल, अमित, अशुतोष आणि संजय असे ५ जण सिंहगड खर तर सिंव्हगड एक्स्प्रेस नी कर्जत ला रवाना झालो. सकाळची न्याहरी म्हणून अंडा आम्लेट आणि व्हेज कटलेट वर गाडीतच मस्त ताव मारून ८ वा कर्जत गाठले.आज आमच्या गाड्या वेळेत सुटल्या होत्या पण अनिल ची गाडी काही आज वेळेत सुटली नव्हती त्यामूळे त्याने कर्जत स्टे. ला १ अयशस्वी प्रयत्न केला.(अर्थबोध होत नसेल तर खाजगीत संपर्क करा) आणि लगेचच आम्ही लोकलने नेरळ स्टे. गाठले.नेरळहून आम्हाला संजय नामक सारथ्याचे दर्शन घडले आणि “एका रिक्षेत सारथीसह (फ़क्त )६ जण कसे आरामशीर बसू शकतात हे उदा: सह स्पष्ट करत आम्हा मावळ्यांना किल्ले पेबच्या पायथ्याला असलेल्या “फ़णसवाडीत” सुखरूप (अस आता म्हणतोय) पोच केले.वाडीत पोहचताच निथळ खळखळणा-या झ-याचा आवाज जणू आज सूरांची मैफ़ल ‘नक्की’ याची पावती देवून गेला.इथेच आम्हाला “गुरूप्रसाद” वाटाड्या म्हणून मिळाला आणि साक्षात आमचा गुरूच असल्याचा पुरावा देउन गेला.
पेब उर्फ़ विकटगड आता आम्हाला आव्हान देत होता. गडाच्या पायथ्याशी असलेल्या “पेबी” या देवीवरून याला पेब असे नाव पडले.हा किल्ला स्वराज्यात सामील झालेला असून महाराजांनी धान्य कोठारासाठी याचा उपयोग केला अश्या नोंदी आढळतात. साधारण सकाळी ९ च्या आसपास आम्ही मावळ्यांनी गडाकडे प्रस्थान केले.
अतिशय मनमोहक वातावरण होते लांबवर गडावरून पडणारा धबधबा आमचे लक्ष ओढून घेत होता आणि आपोआपच पाउले झपाझपा पडत होती जवळपास १ तासातच आम्हाला आता चढण लागायला लागली.वरूणराजाच्या कृपेने आजूबाजूचा परीसर चांगलाच खूलला होता. रान चांगलेच माजल्याने ते तूडवतच आता आमचा प्रवास सूरू झाला.चहूबाजूला हिरवी वनराई मनाला आणि शरीराला सतत गुदगूल्या करत होती. संपूर्ण रस्ता भलताच निसरडा झाल्याने जागोजागी लोटांगणे घालतच मावळे पुढे चालत होते त्यातही लोटांगणे घालण्यात अनिल आघाडीवर होता.हिरवीगार गवताची पाती वा-याच्या झुळूकेबरोबर अल्लड्पणे डोलताना फ़ारच सुंदर भासत होती. जवळपास २ तासानंतर १ छोटासाच पण पाऊसामूळे जरा कठीण वाटावा असा १ Rock Patch पार करून मावळे माथ्यावर विसावले. मावळ्यांचा आनंद आता गगनात मावेना, मग काय... “क्षत्रीय कुलावतंस.....” च्या घोषणेने सारा आसमंत दुमदूमला आणि जणू महाराजांनी “आजून मी इथेच आहे तूमच्याच बरोबर” याचाच काय तो पुरावा म्हणून त्या कातळकड्यांमधून “प्रतीध्वनी” उमटले.एका कड्याला डाव्या बाजूला ठेउन उजवीकडे हिरव्या रंगाच्या असंख्य छटांची शाल पांघरून बसलेल्या जवळपास २००० फ़ूट खोल दरीतल्या त्या निसर्गाची किमया पहात आम्ही पुढे सरसावलो आणि १० मि. मद्धेच डाव्या हाताला वरच्या बाजूस असलेल्या प्रचंड मोठ्या आणि अतिशय स्वच्छ अश्या गुहेच्या तोंडापाही आपापल्या पाठा टेकल्या.


गुहेच्या माथ्यावरून छोटासा पण मन चिंब करणारा धबधबा खूपच सुंदर दिसत होता. समोरच्या दरीमधे आता धुक्याने आपली चादर पांघरून पांढ-या शुभ्र दरीचे मनमोहक दर्शन दिले होते आणि गार वारा आता वरूणराजाच्या आगमनाची चाहूल देतो तोच, धो धो करून आपली हजेरी लावून देखील गेला. आता पोटातले कावळे आपली चाहूल भासवत होते मग काय पटापटा बत्ती पेटली आणि गारव्यात मस्तपैकी खीचडी रटरटली तीकडे चुलीवर गुरूने सगळे पापड भाजून तयार ठेवलेच होते. आता पापड म्हणल की माकड आलच त्यामूळे त्या रानटी माकडांच्या साथीनेच या शहरी वानरांनी मस्त पापड खिचडीवर ताव हाणला.
आता पोटोबा शांत झाले होते वातावरण हलकासा गारवा मनाला गिरक्या घालून परत त्या शुभ्र दरीत लुप्त होत होता पावसाची रिमझीम सुरूच होती आणि अचानक त्या गुहेतल्या प्रसंन्न शांततेत काही क्षणातच “पहाडी” रागाचे ते मंजूळ स्वर निनादले आणि अमित ने ताबडतोप ’वाह वाह’ ची दाद मिळवली.मग काय फ़र्माईशी सुरूच झाल्या पहाडी,शिवरंजनी असे एकापेक्षा १ राग त्या वातावरणाला आजून धूंदी आणत होते मग फ़िल्मी संगीत म्हणून खास हिरोची धून झाली आणि तिर्थ विठ्ठल या अभंगाने मैफ़लीची (वेळेअभावी) सांगता झाली.मी आता पूरता हरवून गेलो होतो माझे स्वप्न आज सत्यात उतरल्याचा आनंद काही औरच होता हिरव्या शालीने नटलेल्या त्या सह्यकुशीत आज मी बासरीचा मंजूळ आवाज ऎकत होतो आणि साथीला होते ते कोसळणारे धबधबे, पावसाच्या जलधारा, टप टप पडणारे ते टप्पोरे थेंब, आणि लडीवाळ शीळ घालत जाणारा तो वारा ! कोणताही ताण, क्षिण मनावर नसेल तर “पवित्र मनाला”   येणा-या त्या अनुभूतीने मला आनंदून टाकल होत. सगळे मावळे सापाने कात टाकून पुन्हा तरूण व्ह्यावे त्याप्रमाणे तरतरीत झाले होते आणि आम्ही अमित काकड्यांचे ’आभार’ मानून आता बालेकिल्ला सर करायला पुढे सरसावलो होतो.गुहा डाव्या हाताला ठेवून सरळ पुढे गेल्यावर शेवटी रस्ता संपतो आणि वरून पडणा-या पाण्यामूळे थेट खोलवर दरीत एक घळ उतरते बरोब्बर तिच्या तोंडालाच १ लोखंडी शिडी एका कातळावर घट्ट बसवलेली दिसते. बास, त्याच शिडीवर चढून धुक्याचे ढग पार करून आम्ही आता जणू स्वर्गप्रवेश केला होता आणि आमच्या सर्वांच्या नजरेसमोर पसरला होता, शेकडो वर्षे पहाडासारखी छाती ठोकून उभा ठाकलेला तो अथांग सह्याद्री...

 वरून माथेरान,नाखिंडाचा डोंगर,कलावंतीण,सोनोरी असे अनेक दुर्ग आम्हास खुणावत होते. तो सह्याद्री आपल्या अंगावर पांघरलेली धुक्याची चादर काही क्षण झटकून समोरची हिरवीगार कुरणे,झाडी,वेल्या,धबाबा कोसळणारे धवधबे,शिखरावरून जणू नक्षी काढावी त्याप्रमाणे चंदेरी झालर घेउन थेट पायथा गाठणारे ते झरे शिवणापाणी चा खेळ खेळणारे ते दवबिंदू आशी अनेक मनोहरी दृष्ये दाखवून परत शाल लपेटून बसत होता.अगदी ताज्या ताज्या हिरव्यागार गवतावरून आम्ही भटके मुक्तपणे विहार करत होतो.थोडे अंतर गेल्यावर आम्ही एका छोटेखानी पण सुंदर अश्या शंकराच्या मंदीरापाशी पोहचलो.भोलेनाथाचे दर्शन करून आता परतीला निघायचे होते.
निघताना प्रत्येकाने आपली प्रकट मुलाखत देवून अशुतोष च्या ’स्व’-वाहिनीला सहकार्य केले, आणि घसरत घसरतच जवळपास मावळे परतीला निघाले.तास दिड तासात आम्ही गुरूच्या घरी पोहचलो दुध नसले तरी “मायेच्या साईने” भरभरून असा गरमागरम चहा मारून पुन्हा संजयच्या रथात बसून नेरळ स्टे. गाठले आणि कर्जत ला वडापाव हाणून कशीबशी रेल्वेत जागा मिळवली.२ तास उभे राहून संजयच्या करामती बघत पुणे स्टे. गाठले आणि शेवट उतरल्यावर दोस्तांनी पुढच्या मोहीमेच्या आखण्या करत एकमेकांना मिठ्या मारल्या व आपापल्या घरी रवाना झाले. मी स्वप्नपूर्तीचा आनंद घेत घरी जाउन आता पुन्हा आपल्या सह्याद्रीचे एक नवे स्वप्न पाहण्यासाठी लगेचच हंतरूणात पसरलो होतो......   

Friday, July 8, 2011

॥ वारी दुर्ग आणि धाकोबाची ॥

                                            ॥ वारी दुर्ग आणि धाकोबाची ॥
जेष्ठ महीना आला की पंढरीची वारी करणा-या वारक-याला ज्याप्रमाणे आपल्या पंढरीची ओढ लागते अगदी तशीच अवस्था मृग नक्षत्र सुरू झाली की, हा निसर्गच जणू ज्यांची पंढरी त्या गड्यांची,मावळ्यांची पाउले देखील त्याच पांडूरंग रूपी सह्याद्रीच्या वाटेने पडू लागतात.आणि मग तयारी सुरू होते त्या सह्यवारी ची....

जेष्ठ वद्य सप्तमी ला पंढरपूरी निघालेले वारकरी  माउली, तुकारामांच्या 
जयघोषात पुण्यात दाखल झाले आणि आम्ही सवंगड्यांनी श्री. छत्रपतींचे स्मरण करून आमच्या या सह्यवारीसाठी २५ ता. दुपारी पुण्याहून प्रस्थान केले. स्थान ठरले होते “दुर्ग आणि धाकोबा”खर तर आपण यांना किल्ले असे म्हणू शकत नाही पण ही आहेत घाटमाथ्यावरील अत्यूच्य २ डोंगरशिल्पे. सर्व मावळे नारायण पेठेत माझ्या घरापाशी जमून आम्ही राजे च्या हडपसरच्या घरी पोहचलो दुपारी १२ वा. निघणारी आमची बस ठरलेल्या वेळेनुसार “बरोब्बर” दुपारी ३ वाजता गणेशस्तवन करून (एकदाची) निघाली.यावेळी आम्ही २ गाड्या करून निघालो होतो त्याचे कारण काही मावळे वेळेअभावी १ दिवस लौकर परतणार होते ते १ गाडी घेउन परत येउ शकतील ही सोय बघून २ गाड्या घेउन जाण्याचे नियोजन होते. जाताना वाटेत चाकण फ़ाटयाला पेढ्याला घेउन (खायचे पेढे न्हवेत हे !, हे आमचे परममित्र अमित पानसरे उर्फ़ पेढ्या होय.) गाडी पुढे निघाली आणि मा. राजे दुस-या गाडीत असल्याचा गैरफ़ायदा घेत अ(ना)वश्यक ब्रेक, थांबे घेत आम्ही जवळपास संध्या. ६ च्या सुमारास महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी च्या पायथा गाठला आणि एकवार किल्ल्याला तसेच महाराजांच्या अश्वारूढी पुतळ्याला मुजरा ठोकून दुर्ग चा माथा गाठण्याकरीता कूच केले. 
जाताना वाटेत हेम्याच्या श्रवणीय गाण्यांची साथ वातावरण आजून धुंद करत होते.वाटेत सरपंचाची गाठ घेउन त्यांनाही गाडीत घेउन आम्ही सर्वजण जवळपास रात्रौ  ८.३०च्या  सुमारास पोहचलो. गाडीतुन उतरताक्षणी आपण स्वर्गात प्रवेश केल्याचे जाणवले आणि सगळ्यांना आपण ढगात चालत आहोत असा भास झाला.आता ब-यापैकी अंधार पडला होता त्यामूळे तडक दुर्गादेवी मंदीरात पोहचलो.

चार नक्षीदार खांबांनवरती कौलारू छप्पर सांभाळत प्रचंड ऊन,वारा,पाऊसाची तमा न बाळगता गेली अनेक वर्ष निसर्गावरती मात करत हे मंदीर आजही शान सांभाळून उभे आहे. चहूबाजूला प्रचंड झाडी आणि मोठठाले खडक अश्या जागेत जेमतेम ६-७ लोक झोपू शकतील येवढ्याच चौरसामद्धे मधोमध अत्यंत रेखीव “देवीचा तांदळा” सगळ्यांच्या मनात घर करून न जाईल तर नवलच ! दुर्गवाडीतल्या वनवाश्यांनी यथाशक्ती या मंदीराची उभारणी केली आहे.देऊळाच्या आजूबाजूस अनेक शेंदूर फ़ासलेले पाषाण इतर देवांची प्रतिकात्मक रूपे म्हणून मोठ्या ऎटीत स्थामापंन्न झाले आहेत. देवीच्या पुढ्यात नतमस्तक होऊन सर्वजण जवळच असलेल्या समाजमंदीरापाशी पोहचलो आणि एकदाच आमच्या “विठोबाच्या” (सह्याद्री) कुशीत शिरल्यावर आता आठवण झाली ती “पोटोबाची”.

परंपरेचा मान ठेवून आचा-याचा पोशाख मला चढवण्यात आला आणि हातात कांदे आणि सुरी (जिच्यापुढे तलवार देखील नांगी टाकेल) देवून झालेला आनंद व्यक्त करण्याकरीता आनंदआश्रूंना वाट करून देण्यात आली.बेत ठरला गरमागरम खिचडी आणि पापडाचा. जावई बाप्पू अर्थात प्रसाद डेंगळे (तृतीय) यांना जातीने हजर राहणे शक्य नव्हते तरीदेखील आपली “बत्ती” माझ्याकडे सुपूर्त करून मित्रप्रेमाचे ज्वलंत उदा: देवून गेले म्हणून, त्याच दोस्तीला सलाम करून डेंगळ्यांच्या बत्तीला “आग” लावण्यात आली आणि फ़ोडणी पडली यावेळी झाकण्यासाठी ताटली नसल्याकारणाने दोन पातेलीच एकावर एक रचून खिचडी शिजवण्यात आली तर दुसरीकडे ’राक्या’ आणि ’सुध्या’ डोळ्यात चुलीचा धुर जात असतानादेखील डोळ्यावर काळे चष्मे चढवून (रात्रौ ११ वा.) आपले पापड भाजण्याचे काम व्यवस्थीत पार पाडीत होते.जवळ्पास अर्ध्या झोपा झाल्यावर बिरबलाची खिचडी शिजण्यास जितका वेळ लागला असावा तेवढ्याच वेळात (कदाचित जास्त पण कमी नाही) सरतेशेवटी खिचडी रटरटली आणि क्षणार्धात उड्या पडल्या,बघता बघता दोन पातेली खिचडी कधी गायप झाली हे समजलेच नाही. लगेचच जवळच असलेल्या ओढ्यावर भांडी धुण्याचा सामूदाईक कार्यक्रम पार पाडून झोपण्याची तयारी सुरू झाली. समाजमंदीरात मूंगळे आणि पावसाचे पाणी येत असल्यामूळे काही मावळे देविच्या मंदिरी आणि काहीजण गाडीतच निद्रीस्त झाले.       
                                                       
पहाटे ६ वा. च्या सुमारास पावसाच्या हलक्या सरीने जणू जागे होण्यासाठीस “गजर” केला आणि मला जाग आली.दुर्गादेवीच्या छत्रछायेखाली कालची झोप फ़ारच गाढ झाली होती जाग येताक्षणी आजूबाजूला नजर गेली आणि आपण आजून स्वप्नातच आहोत असा भास झाला.”अतिशय प्लेझंट थंडगार हवा अंगात मस्त जोम प्राप्त करत होती, रोज सकाळी उठल्यावर येणारा आळस तर चक्क आज गैरहजरच होता, मोत्यांचा वर्षाव करावा तशी टपो-या थेंबांची उधळण आजूबाजूची गर्द हिरवी झाडी आपल्या फ़ांद्या,पानातून करत आम्हाला “सु-प्रभात” म्हणत होते,पक्ष्यांचा किलबीलाट मनाला गुदगुल्या करून ’चला तयारीला लागा तो निसर्ग खुणावतोय!’ असा संदेश देत होता.” तडक आमची तयारी सुरू झाली. प्रचंड पावसामूळे आज दुपारचे जेवण रद्द करून सकाळच्या न्याहरी वरच जोर द्यायचा ठरले. पटापटा पोर आपपल्या पद्धतीत “वाघ,ससे मारून आली”(अर्थबोध होत नसेल तर मला सकाळी भेटा ! :P) थोबाड खंगाळून आंघोळीच्या गोळ्या वाटण्यात आल्या आणि सर्व प्रार्तविधी आटोपले.कात्याने चहाचे आधण ठेवले तर इकडे मी पोहे भिजत घालून फ़ोडणीची तयारी केली थोड्याच वेळात आमचा “कांदेपोहे” (अहो तो नव्हे) कार्यक्रम पार पडून देवीचा आशिर्वाद घेउन आम्ही डोंगरमाथा गाठला.एका उंच टेकाडावर असंख्य लहान मोठे सुळके असेच वर्णन या माथ्याचे करता येईल.       

जाताना पावसाच्या धारा मन चिंब करत होत्या सतत पडणा-या पावसामुळे जागोजागी छोटे छोटे धबधबे सर्वांना आकर्षीत करत होते,क्षणात धुक्याची लाट आपल्या जादूने सारा परीसर अदृष्य करत होती, मेघांच्या दुनीयेत सर्वजण जणू स्वर्ग विहार करत होते, त्या उत्तूंग शिखरांनी आपला देह थंड करून निसर्गाची हिरवीगार शाल अंगावर लपेटून घेतली होती त्यावर दवांचे लहान लहान ठिपके आणि विवीध फुले जणू शालीवर कढलेली नक्षीच वाटत होती.एखाद्या नववधूने जसे नटावे तसा तो सह्याद्री नुकत्याच झालेल्या पावसामुळे नटून आमच्यासमोर उभा होता.बघता बघता सर्वजण या विलोभनीय वातावरणात हरवून गेले असतानाच त्या निसर्गाचे खरे रक्षक आणि जवळचे मित्र विंचू,खेकडा यांनीपण आपले दर्शन देउन आपले उपस्थीती दर्शवली. थोडा वेळ गप्पा मारून आम्ही आता “धाकोबाच्या” दिशेने निघालो होतो बरोबर सरपंच वाटाड्याच्या भुमीकेत होतेच. जाताना जितका जमेल तेवढा तो निसर्गाचा आनंद हावरटासारखा उरात साठवत सर्वजण पुढे चालले होते. यावेळी भटकंतीची मजा काही औरच होती कारण सतत कोसळणारा पाऊस आणि कायमच खाली उतरलेले ढग यातून चालताना “स्वर्गभ्रमंतीचा” जो काही आनंद मिळत होता त्याला तोडच नाही. खंत फ़क्त एकच होती की फोटो फ़ार काही काढता येत नव्हते पण पाऊस कमी झाला की परत येऊ असा निश्चय करत पुढे जात होतो आणि तसही मनाच्या कप्प्यांमद्धे बंदिस्त झालेली ही विलोभनीय दृष्ये, हे वातावरण थोडच कधी विसरण शक्य होत ? वाटेत अनेक प्रकारच्या फ़ुलांची रांग पायघड्या घातल्या प्रमाणे पसरली होती. दोन अडीच तासची पायपीट करून १ चढण पार केल्यावर आम्ही आता पोहचलो होतो धाकोबा वर.


या ठिकाणी आजुबजूचा परीसर अंत्यत रमणीय दिसतो घाट्माथ्यावरचे सर्वात उंच असे हे शिखर आहे. हे आडवेतिडवे पसरलेले पठार म्हणजेच देशाची सीमा होय. दुसरीकडे खोल दरीत दिसतो तो कोकणतळ. हरीश्चंद्रगडापासून अगदी दक्षिणेकडील सिद्धगडापर्यंतची डोंगररांग तसेच गोरखग,मच्छिंद्रगड,नाणेघाट,शिवनेरी,जिवधन,वांदरलिंगीचा उत्तूंग सुळका, ही सह्याद्रीची भुषणे आपण येथून न्याहळू शकतो मात्र ढग असल्यामूळे आम्ही या आनंदाचा फ़ारसा आस्वाद घेउ शकलो नाही.हरीश्चंद्र च्या कोकण कड्यासमानच इथेदेखील १ कोकणकडा आपले स्वागत करतो डोंगरावर  छोटेखानी “डाकेश्वराचे” मंदीर सोडले तर वास्तव्याला जागा नाही.मंडळी आता मंदीरापाशी पोहचली होती सध्या या मंदीराच्या जिर्णोध्दाराचे काम सुरू आहे त्यामूळे बाहेरूनच दर्शन घेउन आता उतरणीच्या वाटेत काही गुहा लागतात तेथे पोचायाचे ठरले.अचानक पेढ्याची हाक आली..निल्या लौकर केमेरा काढ साप आहे इथे! मग काय सगळे छायाचित्रकार आपापले छंद जोपासायला पुढे सरसावले.

वेळेअभावी येथून काही सैनीक म्हणजेच कात्या,राहूल्या,भास्कर,अक्षय माघारी फ़िरून लौकरच पुण्याला रवान होणार होते त्यांना घेउन सरपंच परतीला निघाले आणि आम्हाला गुहेकडे जाण्याची वाट दाखवली.आम्या,विज्या,पेढ्या,सुध्या,राक्या,निळकंठ,हेम्या आणि मी आम्ही मंडळी दाखवीलेल्या वाटेने निघालो. कोणालाच माहीत नव्हते या वाटेवर काय “वाट” लागणार आहे ते...   



आम्ही सर्वजण आता गुहेकडे निघालो होतो. पाऊस थांबायच नाव घेत नव्हता आणि धुक्याची चादत अखंड पसरून वातावरणात वेगळाच रंग आणत होती.आम्हाला सांगीतल्या प्रमाणे साधारण १ तासात आम्ही पुहेपाशी पोचावयास पाहीजे होतो पण जवळपास २ तास होऊन गेले तरी आम्हाला गुहा लागली नव्हती.प्रचंड धुक्यामूळे बाजूचा माणूस दिसणे अवघड झाले होते. काही वेळाने आम्ही सर्वजण थांबलो पाणी कोसळण्याचा आवाज येत होता थोडे धुके सरल्यावर रस्ता कधीच चुकला आहे आणि आता आम्ही एका मोठ्या धबधब्याच्या माथ्यापाशी पोहचलो आहोत हे लक्षात आले दु. ४ वाजत आले होते आजून १,२ तासात अंधार होण्याअगोदरच गुहा सापडणे आवश्याक होते.काहींचे मत माघारी फ़िरायचे ठरले पण तो रस्ता पण सापडेलच याची खात्री नव्हतीच तसेच २ तासात सर्व अंतर पार होणे पण शक्य नव्हते त्यामूळे म्हागारी फ़िरायचे नाही हे मी पक्के करून सर्वांना पटवून दिले. पण काही नविन मावळे माझ्यावर (भितीने) फ़ारच रागावलेले दिसले त्यात राजेने देखील आत १ धाडसी निर्णय घेतला आणि या धबधब्यातूनच कडेने खाली उतरत जायचे नदी पकडून जवळचे गाव गाठायचे असे पक्के झाले.ठरल्याप्रमाणे राजे सर्वात पुढे मग विज्या आणि नंतर सर्वजण व शेवट मी आश्या पद्धतिने मोहीमेची सुरूवात झाली. बाजूलाच प्रचंड जलप्रपात, चहूबाजूला धुके,तूफ़ान पाऊस आणि निसरडी वाट यातून प्रत्येकजण एकमेकांची साथ घेत उतरत होता. नवीन मावळ्यांची शब्दश: “फ़ाटली” होती पण त्यांना धिर देण्याचे काम बाकी सवंगडी जोमाने करत होते.कोणतीही चुक फ़ार महागात पडणार होती एका ठिकाणी कातळावरून बसूनच सर्वांना पुढे सरकायचे होते थोड घसरण देखील थेट धवधब्यात निमंत्रण होत नेमक त्याच ठिकाणी माझ्या बुटाचा सोल थोडासा फ़ाटला म्हणून पुढे असलेल्या विज्याला सोल कापून टाक सांगीतल तर भाईने माझा पायच ओढला माझी क्षणभर तंतरून मी थेट दगडातून उगवलेल्या निवडूंगाला आधार म्हणून धरल खर पण हाताचा “झारा” करून घेतला. बघता बघता तासाभरात आम्ही नदीची वाट पकडली. गाव आता जवळ दिसत होत घाबरलेले चेहरे देखील आता हसू लागले होते. जाताना गावाच्या अगदी अलीकडे डोंगराच्या पायापाशी अगदी चिटकून पुढे अलग झालेला सुळका आम्हाला जिवधनच्या 'वांदरलिंगी' चा भास करून गेला.
आता आम्ही गावात पोहचलो होतो एका घरात पोहचताच आपण आंबोली या गावी सुखरूप पोहचलो आहोत ही गोष्ट उमगली.मावशींच्या हातचा गरमागरम चहावरील प्रेमाची साय मन तृप्त करून गेली. गावातीलच १ जीपने आम्ही नारायणगाव गाठून पुढे दुस-या वाहनाने पुनवडीस निघालो वाटेत समाधान उपहारगृहात समाधान होइस्तोवर पोरांनी मटण भाकरीवर ताव हाणला नी पुन्हा गाडीत बसले. सकाळपासून सोसाट्याचा वारा आणि धो धो पावसात प्रचंड भिजल्याने जवळपास सर्वांनाच थंडी भरली होती, पाण्याने जड झालेले ओझे सांभाळत केलेल्या साहसाने संपूर्ण अंग आता दुखायला लागल होत पण त्याची पर्वा होती कोणाला ? मी डोळे मिटून दिवसभराच्या गोष्टींनद्धे कधीच रमून गेलो होतो..


 “निसर्गाने आज जिवनाचे नवे धडे दिले होते म्हणाला होता, “घाबरू नका, माझ्याकडे पहा कोणत्याही परिस्थीतीत मी कसा तग धरून उभा आहे माझ्या जंगलातल्या वृक्षाच्या फ़ांद्या बघा कशा हातात हात गुंफ़ून एकत्र विहार करत आहेत, एकमेकांना खांदयाचा आधार देत पाय रोवून उभे आहेत, शांत रहा मीच वाट दाखवीन तुम्हाला फ़क्त मनानी हरू नका ! काहीही न बोलता तो बरच काही सांगून गेला होता. आज अजून १” थरार” आपल्या अनूभवाच्या गाठोड्यात बांधून समृद्ध झालेले मावळे पुन्हा पुढच्या ट्रेक चे स्वप्न मनाशी बाळगून आपली सह्यवारी पुर्ण झाल्याच्या आनंदात आता परतीच्या प्रवासाला निघाले होते...पण मन मात्र तिकडेच कुठेतरी हरवल होत !”
भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे.