Monday, November 19, 2012

बाळासाहेब





“माझ्या तमाम हिंदु बंधू, भगिनी आणि मातांनो !”  या वाक्यानिशी लाखो टाळ्यांच्या गजरात आपल्या डरकाळीने अवघा हिंदूस्थान हादरवून टाकणारा ‘ढाण्या वाघ’ आज अगोदरच वाघांची संख्या कमी होत असलेल्या या हिंदूस्थानातून आपल्या परतीच्या प्रवासाला निघून गेला.
श्रीधर अर्थात बाळ केशब ठाकरे, प्रबोधनकारकांच्या झूंजार विचारांपासून प्रेरणा घेउन, जगविख्यात व्यंगचित्रकार म्हणून आपली ख्यात्यी पसरविलेल्या या कलाकाराने तब्बल पाच दशके या महाराष्ट्रावर आधिराज्य गाजविले.तमाम भारतवासियांच्या गळ्यातला ताईत बनलेली ही व्यक्ती आपल्या धारेधार कुंचल्यातून कपटी राजकारण्यांवर फ़टकारे मारीत एक विराट संघटना बांधून त्याचा पक्ष उभा करतो त्यावरच न थांबता तो सत्तेत आणून सत्ता देखील गाजवितो. हो पण स्वत: मात्र कधीही खूर्चीच्या मोहात न अडकता ‘रिमोट’ बनून सर्व सत्तेवर आपला अंकूश ठेवतो. आपल्या रोखठोक, फ़क्त आणि फ़क्त सत्य-वाणीने खास ठाकरे स्टाईलने संपूर्ण हिंदूस्थान ढवळून काढणा-या त्या हिंदूरृद्यसंम्राटास आमचा मानाचा मुजरा.
बाळासाहेब, तूम्ही आपल्या परखड विचारांचे मराठी मनावर कोरलेले संस्कार आम्ही कदापी विसरू शकत नाही. पण आपल्या धगधगत्या शब्दरूपी ज्वाळांनी आता यापुढे हा आसमंत प्रकाषमान होणार नाही याची मनाला बोचरी लागते.
गर्व से कहो हम हिंदू है ।
होय ! फ़क्त हिंदूच.
प्रांताप्रांतातील लोक हिंदू म्हणून जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत तरणोपाय नाही.
माझ्या शिवसैनिकांनीच बाबरी पाडली आणि मला त्याचा सार्थ अभिमानच आहे.
पाकिस्तानने जर हायड्रोजन बॉंब तयार केले तर आम्ही काय जपमाळ धरून मणी ओढत बसायचे काय ?  ….   
छत्रपती शिवरायांना आपले दैवत मानून शिवतिर्थावरून गेली सत्तेचाळीस वर्ष अश्या धगधगत्या असंख्य,अगणित गोळ्यांचा वर्षाव करणारी ती तोफ़ काल अखेर त्याच शिवतिर्थावर अश्रूंच्या असंख्य पाटांमधे भिजून कायमची थंड झाली.आज त्यांचा लाखोंच्या संख्येतला तो कडवा,राकट,निर्भिड शिवसैनीक म्हणत असणार, “साहेब,आम्हाला क्षमा करा. तूमच्यासाठी नडलो  तूमच्यासाठीच भिडलो पण… पण खर सांगतो साहेब आज मात्र त्या ‘यमापूढे’ अडलो !”  
 आपल्या परखड विचारांनी आणि धारधार वाणीने अलोट गर्दीचे उच्चांक मांडणा-या या वाघाला छोट काम कधी मान्यच नव्हत ‘चारचौघांसारखा मृत्यू, ही कल्पनाही मला असह्य वाटते.मला मृत्यू असा हवा की तो अविस्मरणिय ठरावा.’ हे स्वप्न देखील त्यांनी आज पूर्ण केले. हिंदूस्थानातून आलेला त्या जनसागराने त्यांचेच अलोट गर्दीचे सर्व उच्चांक मोडून काढले.न भूतो न भविष्यंती महायात्रेने’आपण कोण होतो,काय आहोत आणि काय असणार’ हेच आज देखील पून्हा सिद्ध केले.कधिही न थांबणा-या मुंबापुरीला आज तूम्ही पूर्णपणे स्तब्ध केलेत.
मा. बाळासाहेब,आमच्यासारखे तमाम हिंदुस्थानातील सर्व चाहते आपणास कदापी विसरणार नाहीतच पण फ़क्त एक वचन द्या, सूवर्ण झळाळीने उजळून भगव्या झालेल्या त्या तूमच्या स्वर्गातल्या जागेवर बसून तूम्ही आणि स्वत: शिवराय या हिंदूस्थानावर आपली करडी नजर सदैव ठेवा आणि आपला आवाज या पृथ्वीतलावर आम्हाला कायम ऐकू येवूद्यात कारण…
गर्जना तूमची होताच, भरते देशद्रोह्याला कापरे,हिंदूस्थानात फ़क्त आणि फ़क्त एकच साहेब…..  ॥ बाळ केशव ठाकरे ॥

आपल्याबद्दल बोलायची लिहायची आमची लायकी नाही, पण तरिही आपल्या या छोट्याश्या चाहत्याकडून आपणास भावपूर्ण श्रद्धांजली. जय महाराष्ट्र…. निलेश गो. वाळिंबे.


Thursday, August 23, 2012

‘भरारी’ पून्हा एकदा रसाळगडावरी….



या वर्षी पावसाने ‘आषाढ’ संपत आला तरी दडी मारून बसल्याने आता खरच पाण्याचा प्रश्ण अवघड होत चालला होता पुणे शहर आणि परीसरात आत्तापर्यंत धो धो कोसळणारा पाऊस आजून कुठेच दिसेना म्हणून पुणेकर नाराज तर होतेच पण तिकडे काळ्या आईची काळजी घेणा-या शेतकरी दादाच्या तोंडाचच पाणी आता पळायची वेळ होती, म्हणूनच की काय पण जीथे मस्त पाऊस झालाय असा आम्हा सवंगड्यांचा आवडता, सदाबहार 'कोकण' सारखा आम्हाला खुणावत होता, आमच्या नजरेसमोर येत होता. पण एक अडचण होती.. जातीवंत ट्रेकर आणि छायाचित्रकार म्हणून ओळखले जाणारे आमचे मित्र श्री. निखील केळकर यांना मागील वर्षापासून पायाच्या गंभीर दुखापतीमूळे आपल्या सह्यभ्रमंतीचा छंद जोपासू शकत नव्हते, पण आता त्यांनादेखील राहवत नव्हते आणि निसर्गाच्या त्या हिरव्यागार कुशीत त्यांना सध्या शक्य होइल अश्या ठिकाणी जाण्याकरीता आमचे प्रयत्न सुरू होते. दोन वर्षापूर्वीच्या स्वातंत्रदिनी सगळेजण रसाळगडावर खास ध्वजारोहणाला आलो होतो तेव्हाच खरतर अस ठरवल होत की पून्हा जेव्हा जमेल तेव्हा नक्की परत फ़ेरी मारायची.मग काय निखील ला पण या किल्ल्यावर चालण शक्य होत. म्हणून लगेचच एकमत झाले आणि १४ व १५ जूलै या तारखांनवर शिक्कामोर्तब केले.
१३ ला मेलामेली उरकत सर्वजण रात्री ९.३० वा डेक्कन ला भेटतील असे ठरले आणि अतिशय धक्कादायक असा प्रकार घडला, तो असा की सर्वजण चक्क ९.३० लाच भेटले. मग सर्वांचे जेवण उरकून शेवट राजे बशीत (बसमध्ये) बसून आम्हा सर्वांना घ्यायला आले आणि एक नव्हे दोन नव्हे तब्बल १५ मावळ्यांनी ‘भरारी’ घेतली ती थेट कोकणच्या वाटेने. ताम्हीणी मार्गे आता बस कोकणात उतरत होती आणि कवी अमित काकडेंच्या अतीशय रसभरीत कवीतांचा आस्वाद घेत मंडळी उद्याचे बेत शिजवीत होती. चहापाण्याचे २-३ थांबे आणि डुलक्या घेत साधारण पहाटेच्या सुमारास आम्ही खेड मार्गे गडाच्या पायथ्याला आलो.
१४ जूलै २०१२: डोळे उघडून बाहेर बघतो तोच आपण कोकणात आल्याची खात्री पटली. भोवतालचा हिरवा गार निसर्ग आमच्या स्वागताला तयारच होता. पटापट सर्व साहीत्य गाडीतून उतरवण्यात आले आणि सॅक भरल्या गेल्या. माझ्या बरगड्यांना मागील आठवड्यात पडल्यामूळे जरा मार लागला होता म्हणून माझ ओझ पाटलांच्या खांद्यावर लादून आम्ही गडावर कूच केले. आजूबाजूचा थंडगार वारा दूरवर पसरलेल्या हिरवाई बरोबर आपले लडीवाळ खेळ करत मस्त विहार करत होता. लांबपर्यंत पसरलेले पांढरे ढग पिंजून ठेवलेला कापूस जणू भासत होते. अश्या धुंद वातावरणात मावळे पुढे सरकत होते. वाटेत निसर्गाच्या अद्भूत किमयेमूळे वाहणारे झरे आपल्या मधूर पाण्याने आमची तृष्णा भागवत होते. रसाळगडावर पोहचण्यासाठी तूम्हाला त्याच्या डाव्या बाजूने प्रदक्षीणा सुरू करावी लागते आणि बरोब्बर पलिकडल्या बाजूस पोहचून मग माथ्यावर प्रवेश करावा लागतो. आता सर्वजण धूक्याच्या लाटांमधून विहार करत अतीशय मनोहरी असे किल्ल्याचे रूप समोरून बघत होतो. समोरच असलेले दोन दरवाजे आणि आज सुद्धा त्यांचे रक्षण करणारे ते बुलंद बुरूज सर्वांचे लक्ष वेधत होते.आम्ही आता गडात प्रवेश करत होतो. वाटेवरच असणा-या आणि सहसा न आढळणा-या त्या 'मिशीवाल्या' मारूतरायाच्या मंदिरी मस्तक टेकवून बलोपासना झाली आणि शनिवार सार्थकी लावत आम्ही गडमाथ्यावर आलो. आता तो थंडगार वारा जणू आमची भेट झाली म्हणूनच की काय पण लहान पोराप्रमाणे आमच्याशी खेळत होता. आणि आम्ही पण त्याच्या त्या दंग्यापासून सावरत त्याचा आनंद घेत आता आई 'झोलाई' च्या मंदीरात दाखल झालो होतो. गडाचे विस्तीर्ण पठार, सोसाट्याचा वारा, चहूबाजूला पसरलेला तो हिरवा रंग त्याच्याबरोबर लपंडाव खेळणारे ते धूक्याचे ढग पाठीमागे मनोहरी अशी दिपमाळ व उत्तूंग ध्वजस्तंभ आणि समोर साक्षात माता झोलाई अश्या त्या मंगलमय वातावरणात तूमच्या,आमच्या,आपल्या त्या राजाच्या,त्या परमेश्वराच्या,त्या शिवरायाच्या स्मरणार्थ मग एकच आवाज घुमला आणि "क्षत्रीय कुलावतंस....” च्या आरोळीने सारा आसमंत दुमदुमून गेला.
मंडळी आता आपले ओझे उतरवून मंदिराची थोडी साफ़सफ़ाई करीत होते. साफ़सफ़ाई करता करता सगळ्यांना गरमागरम चहा ची आठवण होत होती म्हणून लगेच सलग ३-४ वर्षे 'टी मास्टर' म्हणून किताब मिळवीणारे विकास पोखरकर उर्फ़ कात्या यांनी आपली कंबर कसली आणि थोड्याच वेळात फ़क्कड आलेयुक्त चहा आणि गरमागरम मॅगी आमच्या पुढ्यात सादर झाले. गरमागरम चहा आणि मॅगीचा आस्वाद घेत आता पुढच्या आखणीची चर्चा सुरू झाली आणि आत्ता झोपणेच कसे 'आवश्यक' आहे हे प्रत्येकाने (काहीही न सांगता) मान्य करत आपापल्या पथा-या पसरल्या. थोड्या वेळातच घोरण्याच्या प्रचंड आवाजाने (बापरे! याला घोरणे म्हणतात ? ) मला मात्र जाग आली आणि अत्यंत त्रासीक चेह-याने मी सर्वत्र पहात असतानाच गाभा-यातील देवीचे देखील हात तीच्या कानावर असल्याचे मला भासले.ती देखील (बिच्चारी) काहीच करू शकत नाहीये हे लक्षात आल्यावर मी सुद्धा आता समस्त "घोर कंपनी" च्या नावानी शिव्या हासडून बाहेर दिपमाळेपाशी येउन बसलो. काही वेळातच माझ्यासारखे आजून काही त्रस्त बाहेर येउन माझ्या घोळक्यात सामील झाले होते पण आतल्या लोकांचे "घोरणे" काही बंद होण्याचे नाव नव्हते.आता तर एकमेकांशी जणू स्पर्धाच सुरू आहे अश्या थाटात 'एकापेक्षा एक' चे अंतीम पर्व चालू झाले होते,काहीवेळाने ती स्पर्धा संपूष्टात येउन आता "समूहगान" सुरू झाल्याचा भास मला झाला. शेवट झोप बाजूला ठेउन आपण जेवण्याची पूर्वतयारी करावी या मतावर आम्ही जागे असलेली 'अघोर' (जी घोरत नव्हतो ती) मंडळी आलो आणि कामाला सुरूवात केली. कांदे, बटाटे,तोंडली,वांगी स्वच्छ धुवून चिरून ठेवली आणि किराणा व्यवस्थीत लावून ठेवण्यात आला. दुपारच्या जेवणाला मस्त कांदे, बटाटे, मटकी, वांगी अश्या सर्व भाज्यांचा 'भोगी स्टाईल' रस्सा करण्याचा बेत ठरला व तशी सर्व तयारी करून ठेवण्यात आली.
वामकुक्षी झाल्यावर आता गप्पा ठोकत गडावर फ़ेरफ़टका सुरू होता.मधूनच पावसाच्या सरी आमच्या भेटीला येत मन एकदम चिंब करून जात होत्या. त्या पावसात मनमुराद भिजत आम्ही मंडळी गडावर फ़ेरफ़टका मारत होतो.समोर पसरलेला सह्याद्री आपल्या पहाडी दर्शनाने रूबाबदार तर दिसत होताच पण हिरव्या रंगाच्या त्या असंख्य छ्टांनी रंगलेला तो भरजरी शालू लपेटून त्याचे रूप फ़ारच मोहक भासत होते. चकदेव पर्वताच्या लांबवर पसरलेल्या डोंगररांगा धूक्याच्या त्या शुभ्र पडद्यामागून जणू दुधाने अंघोळ करून नुकत्याच समोर उभ्या होत्या. निसर्गसौदर्याने नटलेल्या सुप्रसिद्ध अश्या महाबळेश्वरच्या डोंगरांगाना समांतर अशी सुमारगड रसाळगड आणि महीपतगड या तीन किल्ल्यांची ही रांग त्या महाबळेश्वरच्या सौदर्याला तोडीचे आव्हान देत उभी असलेली मला भासली आणि " त्या निरागस निसर्गाच्या मनात कधीच शर्यत नसते "तो कायम सुरेखच असतो हे 'त्रीवार सत्य' क्षणभर मी विसरूनच गेलो होतो. लांबवर पसरलेली हिरवळ त्यावर पडलेले दवबिंदू जणू मोत्यांची उधळण केल्याप्रमाणे भासत होते. काही हौशी छायाचीत्रकारांच्या कॅमेरांचा क्लिक-क्लीकाट चालू होता तर 'बिक्या' सारखे रसीक वय विसरून त्या वातावरणात धुंद होऊन आपल्या खास करामती (माकडचाळे) दाखवत लोकांचे मनोरंजन करत होते.तर काही मंडळींनी खास वायर चा 'गळ' बनवून त्या गळाला लागण्यासाठी जवळच्याच तळ्यातल्या माश्यांना गळ घालीत बसले होते. जलधारांच्या वर्षावान न्हाउन निघालेल्या गडकोटांच्या तटबंद्या पावसाळ्यात एका आगळ्या लकाकीनच तळपून निघाल्या होत्या त्यांना बघताना तिथ घडलेल्या प्रसंगाची भाषाच जणू त्यांच्यावर उमटू लागली होती.हिरव्या शालीन नटलेला तो सह्याद्रीचा काळा फ़त्तर आपली ती रौद्रता बाजूला सारून हिरवाईचा साज घेउन आज माझ्यासमोर उभा होता.
आता पून्हा मंदीरात येउन आम्ही जेवणाची तयारी सुरू केली होती मला प्रथेस मान देउन बल्लवाचार्याचा पोशाख चढविण्यात आला आणि तयारी सुरू झाली रस्सा बनवायला. तर दुसरीकडे चुल मांडून त्यावर भात रांधायला टाकण्यात आला.रस्सा बनवताना बिक्या ने घरून आणलेला मिरचीचा ठेचा जरा माझ्या हातून जास्तच् पडला गेला आणि खरी मॅच इथे सुरू झाली. रस्सा उकळताना मस्त वास होता पण चव घेतल्यावर त्यातला झटका जाणवत होता मग पाणी घालून तो वाढवण्यात आला तरीदेखील तो तिखटच म्हणून साखर घालण्यात आली तरी झटका काही जाईना शेवट पोह्यासाठी आणलेल्या दाण्यांना टॉवेल मध्ये गुंडाळून त्यांचा कूट करून तो घालण्यात आला आणि तिखट्पणा जरा कमी झाला.या सगळ्या प्रयोगामध्ये बराच वेळ गेला तोपर्यंत पोटातल्या कावळ्यांचे पार हात्ती झाले होते. मग लगेचच अंगत पंगत बसली आणि गरमागरम भात व रस्स्यावर उड्या पडल्या. सोबत तोंडी लावण म्हणून पापड,फ़रसाण,पु-या,चटणी आणि तिखट लागल तर बिस्कीटे असा मस्त मेनू हारपून मंडळीनी तृप्तीचे ढेकर दिले. पुढे ताट वाट्या भांडी घासण्याचा सामूदाईक कार्यक्रम पार पाडून ग्रुप फोटोशेशन पार पडले आणि गप्पांचा फ़ड रंगला.गप्पांच्या ओघात तिन्हीसांज कधी झाली आणि सूर्यनारायण परतीला कधी निघाले हे कळाले देखील नाही. परतीला जाताना जणू त्यांचा निरोपच घेउन येतोय अगदी अश्याच अविर्भावात समोरून पाऊस येताना दिसला आणि ते विहंगम दृश्य कायमचे मनावर कोरले गेले.
पून्हा गड किल्ले आणि मागच्या ट्रेकच्या आठवणीत मावळे त्या पावसातच गप्पा करत बसले.मधेच सरपणासाठी असलेल्या कु-हाडी लाच 'सब्जेक्ट' बनवून खास तिच्या सोबत छायाचित्रण झाले.आता तसा अंधार पडत चालला होता म्हणून सर्वजण मंदिरात आलो आणि साफ़सफ़ाई करून अंग कोरडे करून आतमद्धे रसाळगडाच्या मागील फ़ेरीच्या गप्पा सुरू झाल्या तर काही मंडळी खास रात्री गडावर फ़ेरफ़टका मारून आले आमच्यातले गि-या आणि देबू खास गडपायथ्याच्या वस्तीवर जाउन ताजे दूध चहासाठी घेउन आले आणि पुन्हा चहापान पार पडले.रात्री फ़ारशी भूक नसल्याने आणि दुपारचा भात शिल्लक असल्याने त्यालाच मस्त फ़ोडणी दिली गेली आणि मंदिरात आता तानसेन आणि कानसेन यांची जंगी संगीत मैफ़ल बसली.
भरारी पथकाचा तानसेन किताब पटकवणारे श्री. राकेश यांनी गणेशस्तवन करून मैफ़ीलीला सुरूवात केली आणि मराठी अभंग,जुनी नवीन फ़िल्मी गीते, भावगीते आशी एकामागे एक फ़र्माईश होतच राहीली. "वाह वा" ! "क्या बात है" ! ची दाद रसीकांकडून मिळवत मध्यरात्र उलटेस्तोवर राकेश साहेब आपल्या खड्या स्वरांनी गड जागता ठेवत राहीलेशेवटी गझल गायली गेली आणि तीलाच भैरवी मानून मंडळी त्या मंगल वातावरणात निद्रादेवतेच्या अधिन झाली.
१५ जूलै २०१२ : सकाळी ६,७ च्या सूमारास सर्व मावळे जागे झाले होते. (सत्या सोडून) आपापली शिकार उरकून प्रत्येकजण पून्हा गडावर पडलेल्या त्या कोवळ्या उन्हात फ़ेरफ़टका करून आला आणि परत एकदा खाण्यासाठी सज्ज झाला. (खाणे आणि जाणे (कूठे ते विचारू नका) हे सोडून काहीही केल नाही यांनी) मग मस्तपैकी कांदा बटाटा पोहे बनवण्यात आले आणि वरून मस्त कोथंबीर आणि तळणीच्या मिरचीने सजवून त्यावर गडी तूटून पडले.पोटभर पोहे चोपून त्यावर मस्त चहा झाला आणि मंदिराची साफ़सफ़ाई करून झोलाई देवीला, मूबलक पाऊस पडावा म्हणून साकडे घालून सर्वजण परतीला निघालो.
परतीच्या वाटेत देखील निसर्गाचा ती मूक्त उधळण सुरूच होती. पावसाच्या जलाभिषेकाने तो रसाळगड न्हाउन निघत होता, चहुबाजूस संपूर्ण हिरवळ पसरली होती, अवखळ खेळत निघालेले झरे कड्यापाशी पोहचून धबाबा कोसळणारे धबधबे बनलेले पाहून मनाला वेगळाच आनंद देत होते.त्या झ-यातले पाणी विकतच्या मिनरल वॉटरच्या अनेक पटीने शुद्ध आणि गोड लागत होते.त्या निसर्गाची जादू बघून छोट्याश्या झ-यापाशी काहीकाळ फोटो काढत गप्पा मारून ते पाणी पित "झरझरते नभ घागर मंथर, थरथर एकटवाणी । अंथरलेली हिरवळ त्यातून मंतरलेले पाणी ॥" या कवितेच्या ओळी गुणगुणत सर्वजण गाडीपाशी पोहचलो.आणि थेट सावित्री नदीचा तीर गाठला. मग काय पटापटा कार्यकर्ते सावित्रीतील पाण्याने पवित्र होवून पून्हा गाडीत आसनस्त झाले. आता गाडीत गाण्यांच्या भेंड्यांना काही वेगळाच रंग चढला होता. अखंड प्रवासात काही खरी काही ऐन वेळी बनवलेली असंख्य गाणी गात पून्हा पौड मद्धे सहभोजनाचा कार्यक्रम पार पडला आणि सर्वजण पुढच्या ट्रेकचे प्लान करतच पुण्यनगरीत हजर झालो.घरी पोहचल्यावर त्या नितांत सुंदर सह्याद्रीचे ते मनोहारी दृष्य मनाच्या कप्प्यात घर करून बसल्याचे जाणवले एकासूरात कोसळणारे ते प्रपात त्याच्याशी लगट करू पाहणारे दाट धूके भर्राट वा-याचे झोत आणि ती निरव शांतता यात एका आगळयाच् रानभूलीने माझ्या मनाचा ताबा आजूनही सोडला नव्हता तश्याच धूंदीत मी कधी झोपलो हे मला कळाले देखील नाही.


भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच),
निलेश गो. वाळिंबे
९८२२८७७७६७

सहभागी मावळे :- भास्कर कुलकर्णी (बिक्या), राकेश जाधव (राक्या),विकास पोखरकर (कात्या), निखील केळकर (केळ्या), प्रसाद डेंगळे (तृतीय,वारे बत्तीवाले), निलेश महाडीक (शाहू) , सतीश सूर्यंवंशी (सत्या),देबशीश नाथ (देबू), गिरीश कोळपकर (गि-या),सूरज पाटील (बिबट्या),कौस्तूभ खांडवे, अमित गाजरे,अमोद राजे,निलेश वाळिंबे.



Monday, June 4, 2012

होता उन्हाळा पण सर झाला ॥ सिंदोळा ॥


“ आता पावसाळ्याची वाट नको रे बघत बसायला.. चला एवढही काही उन वाटत नाहीये !” हे वाक्य ‘ऐकून’ आणि ‘ऐकवून’ “भरारी ग्रुप” मधील सगळ्यांनाच वीट आला होता त्यामूळे आता “बासच” या एका शब्दानेच त्या वाक्याला पूर्णविराम दिला गेला आणि तारखा ठरल्या २६,२७ आणि २८ मे. २०१२ सगळ्यांना फोन झाले काही जणांना शक्य नव्हत तर काही जण उन्हामूळे होणा-या त्रासाबद्दल सांगून रडत होते. पण सह्यवीरांपुढे रणरणत्या उन्हाला घाबरण आता शक्य नव्हत. रापलेला आणि तापलेला आपल्या जवळच्या सवंगड्याच अर्थात सह्याद्रीच विराट आणि राकट रूप कधी दिसतय असच त्याच्या मित्रांना आता वाटू लागल होत. यावेळी शिवजन्माने पवित्र झालेल्या जून्नर तालूक्यातल्या किल्ल्यापैकीच सहसा न होणारा किल्ला निवडण्यात आला समूद्रसपाटीपासून अंदाजे ११२८ मीटर उंची असलेला आणि “मध्यम श्रेणीतला” असून देखील शेवट्च्या टोकाला थोडासा खडतर झालेला असा “किल्ले सिंदोळा”
ठरल्याप्रमाणे २६ ला रात्री १२ वा. सर्वजण खास पोशाख म्हणजेच फ़ाटलेल्या वा फ़ाडलेल्या हाप चड्ड्या, मळके टी शर्ट, मोठाल्या सॆक,दोर अश्या ऐवजासह तयार झाले ड्रायव्हर विनोद हा अमोद राजे ला घेउन निघाला आणि पुढे राजे एकेकाला गाडीत कोंबत मला डेक्कन ला भेटला आणि जाताजाता शाहू म्हणजेच आमचे निलेश महाडीक आणि विश्रांतवाडीस शरदरावांचे कोंबीग ओपरेशन करून “बाप्पा मोरया” च्या गजरात गाडीने ‘भरारी’ घेतली जून्नर च्या दिशेने. गाडी चालक विनोदला आमचे पेहेराव नवरदेवाच्या वरातीला चाललो असल्यासारखे का वाटले किंवा वरातीतल्या घोड्यांसारखे का भासले असावे माहीत नाही पण त्यांनी तडक राजांना सवाल केला.. राजे कुठे लग्नाला का ? :O नाही ! असे उत्तर मिळाल्यावर त्यांनी दुसरी शंका विचारली मग कुठे मोठा कार्यक्रम दिसतोय. :D तेव्हा लक्षात आलेच की हा जरा भारीच माणूस होता (पुढे अजून कळेलच) वाटेत चहापान करून तोफ़ांवर (क्रीमरोल) ताव मारून पुणे-नारायणगाव-जुन्नर-गणेश खींड-पारगाव फ़ाटा-पारगाव आणि बगाडवाडी असा प्रवास करत आम्ही पहाटे साडेतीन चार च्या दरम्यान पारगावात पोहचलो.सरकारी कृपेने दिवसभर वीज नसल्याने गावतल्या गिरण्या रात्री सुरू असल्याचे दिसले आणि तिथेच पहूडलेल्या मामांना विचारत गावतल्या सुंदर अश्या विठ्ठलाच्या मंदीरात पांडूरंग चरणी सा-या पुंडलीकांनी आपापल्या पथा-या पसरल्या. २-३ तासाच्या डुलकीनंतर पहाटे ६.३० ला वा-याच्या मंद झुळूकेसोबतच गावातल्या आजोबांनी मंदीरात घंटानाद केला आणि आम्हाला त्या प्रसंन्न वातावरणात जाग आली. उन्ह डोक्यावर यायच्या आत गडावर जायचे असल्याने पटापटा सर्वजणांनी नदीच्या काठावरच आपापली शिकार उरकून घेत,लगोलग गरमागरम वडापाव,चटकदार भेळ,मिसळ आणि बिस्कीटे खात पोटातली मोकळी केलेली जागा भरून काढली. आणि मुबलक पाण्याचा साठा, कोरडा खाउ काहींच्या खांद्यावर तर शेगडी आणि मॆगी माझ्या खांद्यावर लादून मावळे त्या वीराट सह्याद्रीच्या कुशीत शिरले.

या भागात बिबट्यांच वास्तव्य जास्त असल्याने तो दिसावा (पण लांबून) असे मनोमन वाटत होते. उन्हाळा असल्याने संपूर्ण जंगल करपल होत. प्रचंड प्रमाणात रानटी झाड आपले काटे पसरून आम्हाला त्यांच्या अस्तीत्वाची जाणीव करून देत होते. सदैव सह्याद्रीची सखी असलेली ‘कारवी’ आज फ़ारच रागावलेली भासत होती आपल खरखरीत रूप दाखवत तीन पार ओरबाडून काढल होत पण साथीला असलेल्या करवंदाच्या जाळ्या तोंड आंबट गोड करत, “त्या कारवीच मनावर घेउ नका हं ! घ्या माझा रानमेवा खा आणि त्या वेदना विसरून जा “आसच जणू सांगत होत्या.रान तूडवत वाट शोधण सुरू होत मी आणि राजे पुढे जाउन वाट शोधत होतो आणि आजूबाजूचा सह्याद्रीचा विस्तीर्ण पसारा बघत मावळे पुढे येत होते.सकाळची वेळ असून देखील तस ब-यापैकी उन लागत होत पण पाणी फ़ार जपून वापरायच हे सर्वांनी पक्क केल होत. तासाभरात अर्धा डोंगर चढून मावळे चालत होते, समोर एकच ध्येय होते त्या लाडक्या सह्याद्रीच्या कड्यावर जाउन त्याच्या कुशीतला वारा प्यायचे. मधेच मला आणि अमोद ला जरा आड वाटेने जावून थोडस थ्रील करायचा कीडा वळवळला आणि बाकी पोरांना पुढे धाडून आम्ही कडा पकडला. कड्यावरून चढत जात असताना पाठीवर ओझे असल्याने चांगलीच तहान लागली पण लक्षात आले की सर्व पाणी त्या ग्रूपमधे होते मग काय.. हळूहळू तशीच चढाई सुरू ठेवली पण थोड्याच वेळात घशाला फ़ारच कोरड पडली होती आजून कडा पार करून पाउल वाटेवर लागायला साधारण ७०-८० फ़ूट अंतर बाकी होते तिथे चक्कर आल्यासारखे झाले म्हणून वाटेतच असलेल्या  एका मोठया कपारीत आम्ही बसलो आणि पाठीवरच्या ओझ्यात चाचपणी सुरू केली त्यात नशीबाने लिंब सापडली आणि मग त्यालाच कापून तोंडात ठेवली त्याने जरा बरे वाटले ५ मिनीटात पुढे निघू अस ठरवून वर चढून आलेला कडा न्याहाळत होतो तो राजेला कपारीत ‘बिबट्याची विष्ठा आणि काही हाडे दिसली’ काही क्षण आराम करून आम्ही पुढली वाट धरली शेवटच्या टप्प्यात पुन्हा मला तहानेने व्याकूळ झालेले पाहून पायवाटेने कड्यावर पोचलेला शाहू पाण्याच्यी बाटली घेउन थोडा खाली उतरला आणि माझी तृष्णा भागवून आम्ही पुन्हा सर्वजण कडा पार करून वर आलो आता आम्ही सोंडेवर येउन पोहचलो होतो. दोन्ही बाजूला खोल दरी उजवीकडे लांबवर पसरलेला  पिंपळगाव जोगे धरणाचा चमचमता जलाशय आणि डाव्या हाताला खाली दिसणा-या टुमदार घरांच्या वाड्या, वस्त्या, तर तळपत्या सूर्याला आव्हान देत रूबाबात उभ्या असलेल्या लांबवर पसरत गेलेल्या डोंगररांगा आणि पिवळ्या धमक गवतात काळ्या कातळात कोरीवपणे आपले ठाण मांडून बसलेला सिंदोळा आम्हाला समोर दिसत होता. जाताना वाटेत दोन डोंगरातून पडलेल्या कपारीमधे थोडासा ओलावा दिसला, या ठीकाणी पाणीसाठा असावा असा अंदाज आल्याने सर्वजण त्या घळीतून वरपर्यंत चढून गेलो.घळीच्या टोकावर पोहचताच जंगली प्राण्यांचा जो उग्र वास येतो असा प्रचंड उग्र वास यायला लागला थोडे वाकून बघीतल्यावर लक्षात आले की आत थोडे पाणी आहे पण तिथे मधमाश्यांनी आपली ठाणी मांडली होती आणि घळीच्या वरच एक गुहा दिसत होती त्यात व्यवस्थीत चारा पसरलेला दिसत होता आणि सर्वात जास्त वास तिथूनच येत होता थोडे आजूबाजूला पाहील्यावर तिथे देखील “बिबट्याची विष्ठा” आढळली. थोडक्यात हे साहेबांचे निवास्थान आहे अशी आमची खात्री झाली आणि लगेचच तिथून रामराम घेतला व गडमाथा गाठायला सुरू केले. 

शेवटच्या टप्प्यात आता मावळे पोहचले होते या ठीकाणी वाट थोडीशी बिकट झालेली आहे, अतीशय अरूंद वाट एका बाजूला प्रचंड खोल दरी आणि वाटेवर तयार झालेला घसारा यामूळे जरा सावधतेने पावले टाकीत आम्ही पुढे सरसावलो. पावसाळ्यात ही वाट भयंकर अवघड होत असणार त्यामूळे आम्ही आत्ताच आलो ते बरे झाले असा विचार (मनात) करत सर्वजण माथ्यावर पोहचलो.गडाच्या प्रवेशद्वारात दोन फ़ुटके बुरूज आपले अस्तीत्व टिकवून शेकडो वर्षानंतर देखील तग धरून आहेत. समोरच अत्यंत सुंदर असे गणेशशिल्प कोरलेले असून त्यासमोर कोण्या सह्यभक्ताने निरांजन ठेवलेले आहे. गडात प्रवेशाचा हा एकमेव मार्ग आहे.हा किल्ला टेहाळणी साठी वापरत असणार याची खात्रीच आपणाला येथे पटते. गडावरून माझा आवडता हडसर, चावंड,शंभोचा डोंगर,दूर्ग चे विस्तीर्ण पठार,ढाकोबा,नाणेघाट,जीवधन तसेच हरीषचंद्रगडाची लांबवर पसरलेली रांग अगदी स्पष्टपणे दिसते. या सर्व गडांना मुजरा करून त्यांचे राकट रूप डोळ्यात साठवत आम्ही गडावरील टाक्यांपाशी पोहचलो पण पूर्ण अटून गेलेल्या टाक्यांजवर पोहचल्यावर मॆगी कार्यक्रम रद्द करून फ़क्त बरोबर असलेला खाउ खाण्याचे ठरले. गडावर बघण्यासारखे अजून काहीच शिल्लक नाही आणि सावलीसाठी झाड देखील नसल्याने आम्ही लवकरच त्याचा निरोप घेउन मुख्य दरवाज्यापाशीच आमच्या शिदो-या उघडल्या. सफ़रचंद,केळी,भाकरी,चटणी,खाकरा,लोणच,पोळीचा लाडू,भडंग अश्या ना ना पदार्थांवर ताव मारून पाणी पिउन आम्ही उतरायला सुरूवात केली. साधारण २,३ च्या सुमारास आम्ही पायथा गाठला आणि ऊसाचा रस पिउन लगेचच गाडीत बसलो कारण की सूर्यास्ताच्या आत नाणेघाटावर पोहचून सूर्यनारायणाच्या नीरोप समारंभाचे छायाचीत्रण करावयाचे होते.५ च्या सूमारास ज्याला सरकारी भाषेत ‘रस्ता’ म्हणले जाते अश्या भयानक वाटेने हाड खिळखीळी करीत आम्ही नाणेघाट गाठले.   
   
नाणेघाट सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी खोदला गेलेला हा घाट फ़ारच सुंदर आणि प्रसिद्ध अशी जागा आहे.पावसाळ्याच्या सुमारास या ठिकाणी पर्यटकांची खूप गर्दी असते. महाराष्ट्रातील प्राचीन असे सातवाहन कूळ ज्यांचे राज्य इ.स. पूर्व अडीचशे वर्ष तर ते इ.स. नंतर अडीचशे वर्षे असे जवळजवळ पाचशे वर्ष होते. त्यांचीच “प्रतिष्टान” (जून्नर) ही राजधानी. त्यांच्याकडून सातवाहन काळात कल्याण ते प्रतिष्ठान (जून्नर) या राजमार्गावर नाणेघाट डोंगर फ़ोडून या मार्गाची निर्मीती केली गेली.प्राचीनकाळी कल्याण बंदरामद्धे परकीय लोक विशेषत: रोमन व्यापारी आपला माल घोडे अथवा बैलावर वाहून नेत असत.हा माल प्रामुख्याने सातवाहन काळातली राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीस व्यापारासाठी नेला जाई.त्यासाठी व्यापा-याकडून जकात गोळा केली जात. त्याच जकातीसाठी बांधलेला आदमासे चार फ़ूट व्यासाचा आणि पाच फ़ूट उंचीचा सुरेख असा दगडी रांजण शेकडो वर्षानंतर आजही येथे रूबाबात उभा आहे.जकातकर रूपाने यात तत्कालीन ‘कर्षापण’ नावाची नाणी टाकली जात असत.नाणेघाट चढून गेल्यावर प्रथमदर्शी दृष्टीक्षेपात पडणारी कातळात कोरलेली ऎसपैस आणि सुंदर गुहा आणि पाण्याचे कुंड हेच येथील महत्वपूर्ण वैशीष्ट होय.या गुहेत साधारणत: पाऊणशे लोक सहज राहू शकतात.गुहेमधील तिन्ही भिंतींवर लेख कोरलेला दिसतो. हा लेख वीस ओळींचा असून मध्य भागातील भिंतीवर १० तर उजवीकडील भिंतीवर १० ओळी आढळतात.हा लेख ब्राम्ही लिपीतला असून या लेखामध्ये अनेक अंकनिर्दिष्ठ संख्या आहेत.येथे पुरातत्व विभागाने संरक्षक कठड्यांबरोबरच त्या गुहेला दरवाजे बसवून तेलकट रंगाचे लेप फ़ासून त्याचे सौदर्य पार धुळीस मिळविलेले पाहून मनाला असंख्य यातना होतात पण घाटमाथा आणि कोकण यांचा देखणा मिलाप घडवून आणणा-या या जागेला ‘स्वर्ग’ म्हणणे अतीशयोक्ती ठरणार नाही.घाटाच्या डाव्या बाजूला हाताच्या अंगठ्याप्रमाणे दिसणारा सुळका आपले लक्ष वेधून घेतो यालाच “नानाचा अंगठा” असे सुरेख नाव देत लोकांनी आपलेसे करून घेतले आहे. तर उजव्या बाजूला दिसणा-या अतीउच्च दाबाच्या विद्यूत तारांचे मोठाले वीजवाहक मनोरे थेट हजारो फ़ूट खोल कोकणात उतरताना पाहून मन चकीत होते.आजुबाजूला दिमाखात उभ्या असलेल्या शिवनेरी,हडसर,चावंड व जिवधन या चार किल्ल्यांच्या मिलापाने नाणेघाटाची संरक्षक फ़ळी बनलेली आहे.याच निसर्गरम्य वातावरणात आमचा जेवणाचा आणि मुक्कामाचा बेत ठरला होता.मे महीना असल्यामुळे कुंडातील पाणी आटले होते म्हणून मी,अमोद आणि शाहू गावातील विहीरीवरून पाणी आणण्यासाठी बाहेर पडलो तर बाकी कार्यकर्ते गुहेतील साफ़साफ़ाई करण्यात गूंग झाले.विहीरीवर पाणी काढत असताना अमोदच्या हातून पोहरा पाण्यात पडला आणि पुढचा अर्धा तास तो काढण्यासाठी कराव्या लागलेल्या कसरती व करामतींमुळे निसर्गाने नकळत एक नवा अनूभव शिकवला होता.     
संध्याकाळ ओसरून आता अंधार पडत चालला होता आणि फ़क्कड चहा आणि गरमागरम मॆगी बरोबर गप्पा रंगत होत्या. तर दुसरीकडे जेवणाची पूर्वतयारी सुरू झाली होती.आमचे वाहन चालक श्री. विनोद गाडी सोडून आमच्याबरोबर राहणार नव्हते ते गाडीतच झोपणार होते. पण निसर्गात भटकंतीचा आजीबातच आनंद आणि रस नसलेले त्यात भर म्हणून कानावर आलेल्या अफ़वांमूळे आणि काही लोक त्यांचा पाठलाग करीत आहेत अश्या होत असलेल्या भासांमूळे त्या अंधारात आणि सूसाट वा-यांच्या आवाजात त्यांची चांगलीच तंतरली आणि ‘मला आजच मुलगा झालय हो..काही बरवाईट झाल तर मी फ़ार अडचणीत येईन, काहीही करा पण इथून चला!’ अश्या याचना कम हट्टच त्यांनी धरला.  सरतेशेवटी त्यांच्यावर ओढावलेल्या परिस्थीतीमूळे आम्ही सर्वांनी तेथून जवळच असलेल्या एका घराच्या पडवीत जेवण बनवून मुक्काम टाकायचे ठरवले.विनोद साहेबांच्या आणा-भाकांमूळे गुहेत राहण्याशी इच्छा तशीच मनात दाबून त्या टुमदार घराच्या मस्त सारवलेल्या अंगणात आमच्या चुली आणि बत्त्या पेटल्या तसे सर्वजण मदतीला आले.कोणी भांडी साफ़ केली, कोणी कांदे चिरले,कोण पापड भाजू लागले तर काहीजण विजे-या हातात घेउन स्वत: सूर्यनारायण बनून आमचे उर्जास्त्रोत होवून आम्हास प्रकाश पुरवू लागले.खांद्यावर पंचा टाकून मला आचा-याचा पारंपारीख पोशाख परीधान करण्यात आला.थोड्याच वेळात साजूक तुपातील मुगाची खिचडी रटरटली आणि तळणीच्या मिरच्या,लोणच,कांदा तोंडीलावण म्हणून घेत मस्त आडवा हात मारण्यात आला.गरमागरम खिचडीला पापडाच्या चमच्यांची साथ वर मस्त ढगाळ हवा (हो ! चक्क मे महीन्यात पण) खालपर्यंत उतरलेले ढग हवेत थंडावा आणि चहूबाजूनी अथांग सह्याद्रीचे रिंगण अशी आमची पंगत रंगली होती.जेवणानंतर शेणानी सारवलेल्या त्या भुसभूशीत जमिनीवर सर्वजण आडवे झाले आणि गप्पा रंगू लागल्या.गप्पांच्या नादात मध्यरात्र कधी उलटून गेली आणि आमच्या नयनांवर निद्रदेवतेने कधी बस्तान बसविले हे कळालेच नाही.

पहाटे पाचालाच अगदी कानापाशीच कोंबड्यानी बांग ठोकली आणि आम्ही सर्वजण जागे झालो.आजूबाजूला अगदी जमिनीपर्यन्त ढग उतरले होते मग नानाच्या अंगठ्याला एक धावती भेट दिली गेली आणि थंडगार हवेमध्ये मस्त गरमागरम पोहे त्यावर फ़रसाण असा नाष्टा तयार झाला.न्याहरी उरकून, सह्याद्रीस मुजरा करून आम्ही उन्हाळ्यात भटकंती करून देखील निसर्गाने दिलेल्या या गारव्याचा, आनंदाचा अनुभव घेउन पुण्यनगरीस रवाना झालो.
जाताना बरेच जण आम्हाला ‘ऐन रणरणत्या उन्हाळ्यात जाणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे’ असे म्हणत होते त्यांना गेल्यावर अभिमानाने सांगायचे होते……

‘पहाडासमीप छाती ज्यांची, नजर ज्यांची करारी
फ़क्त त्यांनीच घ्यावी या सह्याद्रीत “भरारी”.. या सह्याद्रीत “भरारी” !’       

भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे


मोहिमेतील सहभागी सदस्य :-   शरद येवले, प्रसाद डेंगळे उर्फ़ वारे बत्तीवाले उर्फ़ सर डेंगळे तृतीय, निलेश महाडीक उर्फ़ शाहू, पाटील बंधू बिबड्या व चित्ता,अमोद राजे आणि निलेश वाळिंबे. 








Thursday, May 17, 2012


जिथे मराठा वीर जाहला,
छत्रपती तो ‘शिवा’ अवतरला,
गनीमांचा जो काळ जाहला,
मुजरा करीतो त्या सह्याद्रीला ॥१॥

पाहूनी  प्रचंड उत्ताल कडे,
शत्रूला मग धडकी भरे,
ज्यांनी हाहाकार माजवीला,
मुजरा करीतो त्या सह्याद्रीला ॥२॥

मालूस-यांचा तानाजी चे,
देशपांद्यांचा बाजीप्रभू चे,
रक्त सांडूनी ‘पावन’ झाला,
मुजरा करीतो त्या सह्याद्रीला ॥३॥

‘हिंदूराष्ट्र’ हे स्थापन करण्या,
अभेद्य शत्रूला मारण्या,
‘गनिमीकावा’ जिथे जन्मला,
मुजरा करीतो त्या सह्याद्रीला ॥४॥

स्वप्न ‘जीजाऊ’ ने पाहीले,
‘शिवबाने’ साक्षात दाखविले,
सदैव ‘रक्षण्या’ उभा राहीला,
मुजरा करीतो त्या सह्याद्रीला ॥५॥

~निलेश ©


Friday, April 27, 2012

नूतन वर्षाची सुरूवात.. ॥ शिवतिर्थ रायगड ॥



१ जानेवारी फ़िरंगी नूतन वर्षाची सुरूवात आपल्या सह्याद्रीत करूनच कामाला सुरवात करावी ही इच्छा अनेक दिवस मनात होती. अखेर या वर्षी हा योग आलाच. सकाळी १० वा अमोद ला फोन झाला. दुपारी २ वा निघायचे ठरले आणि मी, अमोद्, अमीत  माझ्या घरापाशी दुपारी भेटलो आणि पुढे चांदनी चौकात राहूल आम्हाला भेटला. अमोदच्या पायाला दुखापत झाली असल्याने आम्ही फ़क्त अश्या गडावरच जाउ शकणार होतो जेथे गाडी वरपर्यंत पोहचेल. आणि हेच दुखणे आमच्या पथ्यावर पडले आणि आम्ही राजधानी “रायगडाची” निवड केली. नूतन वर्षाची सुरूवात यापेक्षा अजून चांगली होणे शक्य नव्हते.तडक निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आणि आम्ही ताम्हीणी मार्गे कूच केले.  
प्रत्येक मराठी माणसाची सर्वात अभिमानाची गोष्ट कोणती असेल तर शिवरायांची राजधानी “रायगड” होय. इ.स. १६७० च्या सुमारास महाराजांनी आपली राजधानी राजगडहून रायगडास हलविली. मुंबईचे गोरे इंग्रज, जंजी-याचा सिद्दी यांच्या हालचालीवर बारीक लक्ष रहावे आणि घाटमाथा व कोकण या दोन्ही भागावर सुरक्षीतता राखता यावी तसेच मोघलांना सहजासहजी शिरकाव करणे अवघड पडावे म्हणून ‘खास’ याची निवड करण्यात आली. त्याच रायगडाचे दर्शन आज आम्ही करणार होतो. मधे चहा नाष्टाचा एक थांबा घेउन आम्ही गाड्या पुन्हा दामटल्या. खराब रस्ता असल्याने आम्हाला पोहचता पोहचता जवळ्पास ७ वाजले होते.  आता अमोद च्या पायाला दुखापत झाल्याने ‘रज्जूमार्ग’ अर्थात ‘रोप-वे’ नेच वर जाण्याचे ठरविले होते. मग काय अवघ्या ४-५ मिनीटात रायगडाच्या उत्ताल कड्याचे दर्शन करत आम्ही ‘शिवतिर्थावर’ पाउल ठेवले आणि थोड्याच वेळात आम्ही होळीच्या माळावर पोहचलो. येथेचे गो.नी.दा. च्या प्रयत्नाने स्थापन झालेल्या छत्रपतींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होवून थोडावेळ गडमाथ्यावर विसावलो आता पोटातल्या कावळ्यांची चाहूल लागल्याने मस्तपैकी झुणका भाकरीचा बेत ठरला आणि गडावरच वस्तीला असलेल्या धनगराच्या झापावर आम्ही तळ ठोकला हात,पाय धूवून होइस्तोवर मस्तपैकी गरमागरम पिठल,भाकरी,खरडा,पापड असे सुग्रास जेवण पुढ्यात हजर होते मग काय सारवलेल्या अंगणात पंगत बसली आणि सर्वांनी आडवा हात मारून तृप्तीचे ढेकर दिले.रात्रीचे ९ वाजत आले होते ब-यापैकी अंधार पडला असला तरी हवेत मस्त गारवा होता आणि झोपही आली नव्हती म्हणून आम्ही सर्वजण जगदीश्वर मंदीराकडे गेलो. अथांग नभाच्या खाली मंदीराच्या परीसरातच आता आमच्या गप्पा रंगल्या आणि सर्वजण तेथेच गप्पा मारत निद्राधीन झालो.


पहाटे थंड वा-याच्या झुळूकेबरोबरच कोंबड्याची बांग आली आणि सूर्योदयापूर्वीच आम्ही जागे झालो मग काय “महाराष्ट्रातल्या प्रत्येक फोटोग्राफ़रला हवी असणारी संधी आम्हालादेखील मिळाली ” तडक होळीच्या माळावरच्या पठारावर धूम ठोकली आणि आयुष्य सार्थकी करणा-या त्या श्री. शिवछत्रपतींच्या पुर्णाकृती पुतळ्याचे फोटोशेसन सुरू झाले.वेळ थोडाच असल्यामुळे लगेच तोंडे खंगाळून आम्ही किल्ला दर्शनास निघालो. पुतळ्याच्या समोरच असलेल्या विस्तीर्ण बाजारपेठेचा फ़ेरफ़टका झाला. पेठेच्या दोन्ही बाजूस २२ दुकाने आहेत आणि बरोबर मधल्या दुकानावर सुंदर नागाचे शिल्प कोरलेले आपणास आढळते.येथून आम्ही थेट टकमक टोक गाठले.लगोलग गडाचा बालेकिल्ला, मंत्र्यांची घरे, राणीमहाल,पीलखाना, कोठारे,गडाचे वैभवात भर घालनारे मनोरे, मंदीरे सगळ्यांची धावती भेट घेतली. आता आम्ही पोहचलो होतो त्या भव्य राजमहालात, होय हीच ती जाग जिथे महाराज आपला न्यायनिवाडा करीत. त्याच दरबारात आम्ही हजर होतो. सगळ्यांचे उर भरून आले होते. नव्याने स्थापन झालेल्या महाराजांच्या पुतळ्यास आम्ही सर्वांनी मुजरा केला. महाराज्यांच्या कर्तृत्वाची ओळख आपणास रायगड भेटीत समजते. येथील ठिकाणे आज जरी आपण पाहीली तरी गतकालातील वैभवाची कल्पना आल्याखेरीज राहत नाही.अती विस्तीर्ण परीसर आणि तरीदेखील अतीशय नियोजनबद्ध आखणी पाहून महाराजांची आठवण आल्याखेरीज राहात नाही.चौफ़ेर विचार करून राजधानी म्हणून याचीच निवड का केली असावी याचा प्रत्यय आपणास गडावर आल्यावर मिळतो. इतिहास चाळता सभासद लिहीतो, राजा खास जाऊन पाहता गड बहुत चखोट, चौतर्फ़ा गडांचे कडे तासील्या प्रमाणे,दिड गाव उंच पर्जंन्याकाळी कडियावरी गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबादही पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतू तो उंचीने थोडका, दौलताबादचे दसगुणी उंच असे देखोनी बहुत संतुष्ट जाले आणि बोलले “तस्तास जागा गड हा करावा” मराठी अस्मीतेसाठी आणि फ़क्त आपल्या प्रजेसाठी अहोरात्र झटलेल्या अती धाडसी आणि बुद्धीमान अश्या शिवरायच्या या निर्णयाचा अभिमान बाळगत आम्ही सर्वजण दरबारतून निघून 
जगदीश्वराच्या मंदीरी दाखल झालो होतो, हेच ते मंदीर जेथील शिवाची स्थापना साक्षात आमच्या या महाराष्ट्राच्या या भारतभूच्या तमाम हिंदूंच्या “शिवा”नेच केली आहे. सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमत् छत्रपती शिवाजीराजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला. शिवपिंडीला प्रणाम करून आम्ही पूर्वेकडील शिवसमाधी पाशी पोहचलो.येथेच महाराजांनी अखेरची “चिरनिद्रा” घेतली. ‘शिवसमाधी’ म्हणजे अष्टकोनी जोते असूम त्यावर दगडी कळस चढविलेला आहे आणि आतमधील फ़रसबंदीत शिवस्मारक उभारले आहे. येथे सभासद म्हणतो,”क्षत्रियकुलावतंस श्रीमन्ममहाधीराज शिवाजी महाराज यांचा काल शके१६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे जाहला.देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्वराचा तो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर द्क्षणभागी केले ” सर्वजण भावविभोर होवून समाधीसमोर शांत बसून शिवस्मरण करून महाराजांना श्रद्धांजली वाहून बाहेर पडलो.पुढे मी आणि अमीत महादरवाज्यास भेट देउन विस्त्रीर्ण आणि अभेद्य अश्या तटबंदीला सलाम करून पुन्हा माथ्यावर पोहचलो आणि सर्वांनी वेळेअभावी परतीचा निर्णय घेतला गेला.
 गडाला मुजरा ठोकून आमचा परतीच प्रवास सुरू झाला होता नवीन वर्षाची सुरूवात तर छान झाली होती पण मनात काही सलत होते. याच रायगडावर महाराजांनी अशी माणसे तयार केली जी देशासाठी आपल्या प्राणांची पर्वा करीत नसत आज कुठे मिळतील ती मराठी माणसे ? याच दरबारी बसून सच्चा आणि योग्य न्यायनिवाडा झाला, येथे ना कधी जातीचे राजकारण झाले ना घराणेशाही होती तो राजांचा महाराष्ट्र आज कुठे आहे ? या गडावरचे ते वैभव तो सोहळा ती देशभक्ती कुठे पहावयास मिळेल मला. बत्तीच मण सुवर्णाचे सिंहासन होते याच ठिकाणी कुठे गेले ते ? इ.स.१६७३ मधे रायगडी भेट देणारा इंग्रज वकील टोमस निकल्स गडाविषयी लिहीतो “फ़क्त मुबलक अंन्न पुरवठा झाला तर हा किल्ला अल्प शिबंदीच्या सहाय्याने संपूर्ण जगाशी लढू शकतो” पण … पण आज हाच आमचा रायगड सांभाळायला आमच्याकडे आमच्या सरकारकडे वेळ नाही. प्लास्टीक च्या बाटल्या आणि पिशव्यांनी त्याला बसत चाललेला विळखा त्याला कधी गिळेल सांगता येत नाहीये. जगाशी सोडा आपल्याच लोकांशी आता त्याला त्याच्या अस्तीत्वासाठी लढावे लागतय हे जाणवून मनाला दुख: झाल. आणि  स्वत:च्या मनाशी, “नवीन वर्षात कमीत कमी प्लास्टीक वापरीन” हे ठरवूनच आज निद्रीस्त झालो.

भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे
९८२२८७७७६७