Wednesday, November 6, 2013

भरारी ची स्वारी.. ॥ कुलंग ॥ गडावरी.


महाराष्ट्राला जगाच्या नकाशावर मान मिळवून देणार एक नाव म्हणजे ‘सह्याद्री’. निसर्गाची अद्भुत अशी किमया ,एक चमत्कारच म्हणावा असा तो सह्याद्री. असंख्य आक्रमण पचवून कायम आपले रक्षण करत आज हजारो वर्षे आपल्या रांगड्या, रूबाबदार रूपात, ताठ कण्याने उभा असलेला तो सह्याद्री. आपले आक्राळ रूप आणि भव्य उंचीने भल्याभल्यांना ज्याने नामोहर केले आणि असंख्य जणांना ज्याने आपल्या प्रेमात देखील पाडले तोच हा सह्याद्री. अश्या या सह्याद्रीत देखील आपल्या उत्तूंग उंचीने आणि खडतर व बिकट वाटेने स्वत: चे वेगळेपण जपणारी अशी कळसुबाई शिखराची सह्याद्री शृंखला म्हणजे काय विचारता... इगतपूरीच्या दक्षिणेला सह्याद्रीची ही कळसुबाईची बेलाग शृंखला पुर्व पश्चिम पसरली आहे. या रांगेत अलंग, मदन, कुलंग,पारबगड, रतनगड कळसुबाई असे अनेक किल्ले शेकडो वर्षे आपले ठाण मांडुन बसलेले आहेत. सह्याद्री पर्वताची उंची याच रांगेत  सर्वात जास्त आहे. बेलाग कडे,पाताळ्स्पर्शी द-या व उध्वस्त झालेल्या वाटा यामुळे सह्यविरांना कायमच या किल्ल्यांवर जाणे आव्हानात्मक व तितकेच थरारक वाटते. याच रांगेतले अलंग, मदन, कुलंगगड हे दुर्गत्रिकूट म्हणूनच चढायला सर्वात कठीण मानले जाते. ‘भरारी’ च्या मावळ्यांचे कुलंग वर चढाई करण्याचे स्वप्न काही ना काही कारणांने आजवर बाकी राहिले होते. पण या दिपावलीच्या पूर्वसंध्येला ही नामी संधी आम्ही नक्कीच सोडणार नव्हतो. जेथे आकाश देखील ठेंगणे वाटते अश्या ‘कुलंग’ ला बिलगण्याचा बेत भरारी मधे शिजला आणि मेलामेली उरकून २५ ऑक्टो. २०१३ ला रात्रौ १२ वाजता मंडळी भेटली व विघ्नहर्ता श्री गणेशाचे स्तवन करून आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आम्हा मावळ्यांचा प्रवास सुरू झाला किल्ले कुलंग च्या वाटेने.

प्रवासात गप्पा गोष्टी करत, डुलक्या घेत पहाटे पहाटे जाग आली ती थेट कळसूबाईच्या पायथ्याच्या वारी घाटातून खाली उतरत असतानाच, सत्याला शिकारीची हुक्की आल्याने (अर्थबोध होत नसेल तर सत्याशी संपर्क करावा) तिथे काही काळ थांबून  इंदोरे मार्गे आंबेवाडीला आमची गाडी पोहोचली. आंबेवाडी गावात गाडी लावून आम्ही मावळे पुढे कुलंग कडे कूच करणार असे ठरले होते. छोटेखानीच पण टुमदार अश्या अंबेवाडीत गाडीला आराम देवून आमचा वाटाड्या ‘कैलास’ ला सोबत घेतले आणि किराणा व इतर साहित्याची विभागणी उरकली. गावातूनच समोर आपल्या अलंग-मदन आणि कुलंग हे महामल्ल आम्हाला खुणावत उभे होते. ४८२२ फुट एवढी प्रचंड उंची असलेला, अंगा-पिंडानं धष्टपुष्ट असा कुलंग अगदी उठून दिसत होता. कुलंग वर चढाई करण्याकरीता आता भरारी चे मल्ल देखील आपले शड्डू ठोकून तयार होते. तूप पोळीवर ताव मारून पाणपिशव्या भरून घेत आता आंबेवाडीला पाठ दाखवून आम्ही सर्वजण त्या निसर्गाचा आस्वाद घेत आमची वाटचाल सुरू केली.
आमच्या दोन्ही बाजूला कारवीच्या दाट झाडीतून आम्ही पुढे सरकत होतो. नुकताच पावसाळा संपला असल्याने ‘कारवी’ चांगलीच माजली होती. आमच्यापेक्षा उंच झाडी सर्वत्र असल्याने उन्हाच्या झळा जाणवत नव्हत्या पण पायपीट करून घामाच्या धारा मात्र लागल्या होत्या. मधे मधे पाणवठ्यांवर थांबत आम्ही त्या कातळातून वाहत आलेल्या थंडगार पाण्यावर आमची तृष्णा भागवत पुढच्या प्रवासाला निघत होतो. २ तास जंगल तूडवल्यानंतर आता एका धबधब्याजवळ सर्वजण थांबलो. तेथे जरा पोटपूजा उरकून थोडी विश्रांती घेत असतानाच आम्ही आज येतोय या आनंदाच्या बातमीनेच जणु काही, आमच्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी आकाशात विमान सोडण्यात आले की काय..
असा आम्ही सवंगड्यांनी अंदाज बांधला आणि त्या विमानाची काही छायाचित्रे घेतली गेली. जरा ताजेतवाने झाल्यावर नव्या दमाने आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला होता. अजूनही तासभर जंगलातूनच आमची वाटचाल सुरू होती. पुढल्या तासात आम्हाला पहिला रॉक पॅच लागला. इथे पाठीमागे बघीतल्यावर आपण चालत आलेल्या अंतराचा अंदाज सर्वप्रथम समजला. जवळपास एका छोट्या गडाची उंची आम्ही गाठली होती. अंतर जरी बरेच कापले होते तरी समोरचा कुलंग मात्र अजुनही मान पूर्ण वर केल्याशिवाय दिसत नव्हता. येथून पुढे वाटचाल करत गेल्यावर थोडीशी कठीण अशी कुलंगवर चढणारी धार लागली. सावध पवित्रा घेवून धारे वरुन चढायला सुरुवात केली. या ठिकाणी आपल्याला काळ्या कभिन्न कातळात कोरलेल्या पाय-या लागतात, ज्या की पटकन नजरेत येत नाहीत. सुरवातीला अत्यंत छोट्या नि नजरेस न पडणा-या ह्या पाय-यांचा आकार पुढे मात्र ब-यापैकी वाढत जातो. तशी आपली वाट सुकर होत जाते. या इतक्या छोट्या पाय-यांपाशी आमचा खंदा कार्यकर्ता  ‘सत्या’ कसा काय येणार, त्याचा पाय यात कसा मावणार अशी १ शंका माझ्या मनाला चाटून गेली पण तो माझा एक गैरसमज होता हे सत्या ने दाखवून दिले.
 (खर तर या इतक्या लहान खोबणीमधे सत्याने आपला (हत्ती)पाय रोवून येणे म्हणजे ५१२ एम बी च्या पेन ड्राईव्ह मध्ये संजय लिला भंसाळी चे २ चित्रपट कॉपी करण्यासारखे होते. असो.) अजून थोडे चालून गेल्यावर १ कडक असा पॅच लागतो येथे जरा जास्त सावधान रहावे लागते. अतिशय अरूंद वाट एका बाजूला कातळ तर दुसरीकडे थेट दरी दिसते. पण सर्वजण तो टप्पा देखील पार करून आता शेवटच्या टप्प्यात आले होते. येथे गडाचा पहिला दरवाजा लागतो येथेच बाजूला अतिशय सुबक आणि स्वच्छ अश्या २ गुहा आपल्या नजरेस पडतात. त्या ठिकाणी जरा विश्रांती घेवून थोड्याश्या अवघड अश्या पाय-या पार करून आम्ही आता अवाढव्य आणि अत्यूच्य अश्या कुलंग गडावर अवतरलो होतो.

 विस्तीर्ण अश्या कुलंग गडावर रानफ़ुलांची जणू जत्राच भरली होती. श्वेतांबरा,तेरडा, निसूर्डी, नभाळी, पांडा अश्या नानाविविध फ़ुलांनी पठार गच्च भरल होत. सोनकीचे तर गालिचेच आमच्या स्वागताला पसरले होते. सोबतीला फ़ुलपाखरे  जणू अत्तरदाण्या घेवून आमच्या स्वागताला तयार होती तर भूंग्याची गुणगुण आमच्या स्वागताची सनईच असल्याचा भास क्षणभर झाला. अश्या मस्त वातावरणात मग कॅमेरांचा क्लिक-क्लिकाट झाला. दरवाज्यातून आत गेल्यावर उजव्या हाताला आपल्याला गुहा लागतात. आमचा मुक्काम तिकडे ठरला असल्याने आता आम्ही सर्वजण तिकडे प्रयाण केले. पण मुंबई वरून २५ जणांच्या एका समुहाने अगोदरच गुहेचा ताबा घेतला असल्याने आम्ही रात्री गडाच्या पहिल्या दरवाज्यापाशी असलेल्या गुहेत राहण्याचा बेत केला. आणि आत्ता येथेच चहापान उरकून गडावर भटकून येणे निश्चित केले. लगोलग भरारी ‘टी मास्टर’ विकास ने मस्त चहा आणि गरमागरम मॅगी आम्हा सर्वांसाठी बनवले त्यावर मनसोक्त ताव मारून आमची भटकंती सुरू झाली. गुहेजवळच्या पायवाटेने थोडे पुढे गेल्यावर पाण्याची २-३ टाकी लागतात. ही टाकी ब-यार्पैकी मोठी असून ती पूर्णपणे कातळात कोरलेली आहेत. यातील पहिल्या टाक्यातील पाणी हे पिण्यायोग्य आहे. या
टाक्यांच्या वरील बाजूस २ उध्वस्त वाड्यांचे अवशेष दिसतात. या वाड्यांच्या आकारमानावरुन येथे नक्कीच मोठ्या प्रमाणात वस्ती असावी असे वाटते. वाडे पाहून सूर्यास्ताला खास कुलंगच्या पश्चिम टोकावर जायचे आम्ही ठरवले होते पण अचानक आलेल्या ढगांमुळे आमचा तो बेत रद्द झाला पण सूर्यास्त दिसला नाही तरिही निसर्गाने आपली जादू आम्हाला दाखवलीच. गडाचे ते विहंगम दृश्य पाहुन सर्व सामानसुमानासह आम्ही खालच्या गुहांकडे प्रस्थान केले. खालच्या गुहांमधे आता साफ़सफ़ाई करून थंडगार हवेत आमच्या गप्पांचा फ़ड जमला होता.एकीकडे गप्पा आणि दुसरीकडे रात्रीच्या भोजनाची पुर्वतयारी सुरू होती. तयारी पूर्ण झाल्यावर पाकशाळेचा ताबा सन्मानपूर्वक माझ्याकडे सोपविण्यात आला. आजचा मेनू होता मुगाची खिचडी, पापड चटणी आणि सोनपापडी. एकिकडे खिचडी शिजत होती तर तिकडे चुलीवर सुध्या ने पापड भाजून ठेवले होते. थोड्यावेळातच खिचडी रटरटली आणि त्याच्या वासाने आमचे जठराग्नी प्रज्वलीत झाले, तशी पंगत मांडली गेली आणि ‘फ़ुल्ल टू’ ताव मारला गेला. सह्याद्री च्या कुशीत बसून त्यातल्याच तळ्यांमधले ते अमृतासमान पाणी वापरून व तिथल्याच चुलींचे निखारे सा-या स्वयंपाकाची चवच बदलतात याची आज पुन्हा अनुभूती आली.

मनसोक्त ताव मारून पोटोबा शांत झाले होते. हवेत देखील आता गारवा खेळत होता. सभोवताली एकदम मस्त वातावरण होते. वरती नभांगणात ता-यांची देखील मैफ़ल सजली होती. त्यांचा लख्ख प्रकाशाने सारा आसंमंत चमकून निघाला होता. एवढ्या भव्य उंचीवर जणू त्या शेकडो तारका, नक्षत्रांच्या बैठकीतच आपण दाटीवाटीने बसल्याचा मला भास होत होता. लांबवर दिसाणारी गावे/वाड्या आता त्या तारकांच्या प्रकाशातच गाढ झोपले होते. मधेच एखादा निखळता तारा आमच्या इच्छापूर्तीचे आश्वासन देत गायप होत होता. अश्या त्या अंगावर हलका शहारे आणणारा थंडगार वारा नि आकाशात नटलेले तारांगण अश्या मदधुंद वातावरणात गड ‘जागता’ ठेवण्यास सज्ज झाले भरारी चे तानसेन. गुहेच्या दिवडीत लावलेला दिवा त्याचा मंद पण  तेजस्वी प्रकाश त्या प्रकाशात आता ‘राकेश’ नि आपले सूर आळवले आणि वातावरणात आजूनच धुंदी चढली… वा वाहवा ची दाद, टाळ्यांचा गजर, एकावर एक फ़र्माइशी आणि वन्स मोअर चा आवाज यांनी मध्यरात्र उलटली. आणि मोठ्या समाधानाने त्या गुहेतच सर्वजण निद्राधीन झालो. 

पहाटे पहाटे अक्षय ने मला जोरजोरात हाका मारून उठवले कारण, आमचा वाटाड्या कैलास ला जनावराच्या (सापाच्या) फ़ूत्कारांचे आवाज ऐकू आले आणि त्याने एकच गोंधळ मांडला म्हणून आम्ही उठून पाहू लागलो आणि सकाळी सकाळीच खळखळाटी हास्याने आमची पहाट झाली. त्याच झाल अस की काही मावळे स्लिपींग बॅग च्या आत झोपून आपल्या घोरण्याच्या कला सादर करत असताना… कैलास ला (अर्धवट)झोपेतून जाग आली आणि या अजगरांच्या घोरण्याला तो सापांचे फ़ुत्कार समजला होता. हा कार्यक्रम संपतो तो, थोड्याच वेळात लांबवर दिसणा-या कळसूबाई शिखरामागुन आपल्या भगव्या, सोनेरी छटांनी सारा आसमंत रंगवत सूर्यनारायण अवतरले आणि पाखरांचा किलबीलाटाने सार रान जाग झाल, तसा सारा माहोलच बदलून गेला. आता मावळे पून्हा एकवार गडावर हजर झाले. प्रार्तर्विधी आटोपून आम्ही आता गडाच्या पूर्वेकडे कूच केले. मदन, अलंग, कळसुबाई सारे सारे त्या कोवळ्या उन्हात न्हाऊन निघत होते त्यांना एक वेगळाच टवटवीत पणा आला होता. आळस झटकून, बलोपासना झाल्यावर,चंदनाच्या ऊटीने अभ्यंग स्नान उरकून,आई भवानीच्या आशिर्वादाचे तिलक आपल्या कपाळावर रेखून, देशरक्षणार्थ उभ्या असलेल्या मावळ्याचा रूबाब त्या कड्या शिखरांमधे दिसत होता.ते सारे सृष्टीच चैतन्य उरात साठवून आम्ही गडाच्या टाक्यांच्या समोरची दिशा पकडली आणि  एका घळीपाशी येऊन थबकलो. दुर्गस्थापत्याचा मोठा अविष्कार कुलंगच्या या घळीत पाहायला मिळाला.
 या घळीत वरील बाजूने येणार्‍या धबधब्याचे पाणी अडवून ठेवण्यासाठी बांधारा घातलेला दिसतो. या बांधा-याचे पाणी अडविण्यासाठी वरच्या बाजूस अनेक टाकी कोरून काढलेली आहेत. जेणेकरुन आधी धबधब्याचे पाणी या टाक्यांमध्ये जमा होईल, मग ही टाकी पूर्ण भरल्यावर त्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी बांधा-यांमधूनच एक वाट काढून दिलेली आहे या वाटेने हे पाणी वहात येते व एका गोमुखातून खाली पडून शेवटाला दरीत फेकले जाते.  केवळ अप्रतीम रचना बघताना ज्याने कोणी ही सुंदर रचना केली आहे, त्या स्थापत्यकाराचे नाव अज्ञात आहे हे आमच्या लक्षात आले. आज एवढे सुंदर काम करून ज्याने आपले नाव देखील कोरले नाही हे पाहून ‘गड बघायला येवून, जाताना आपली नावे कोरून जाणा-या त्या क्षूद्र मनोवृत्तीच्या माणसांबद्दलचा माझा राग आजूनच वाढीस लागला.’ पुढे थोडा फ़ेरफ़टका करून आम्ही पुन्हा गुहेपाशी जमल्यावर भरारी चे योगगुरू श्री. सतिश निकमांकडून काही योगसाधनेचे धडे गिरवीले गेले आणि  फ़ोडणीच्या भाताचा गरमागरम न्याहरीवर आडवा हात व कडक चहा मारून आवराआवर केली गेली. आता गडाला मुजरा ठोकून सर्वजण परतीच्या प्रवासाला निघालो.

गड उतरताना तसा कसच लागणार होता.पहिले दोन पॅच तर अगदीच व्यवस्थित उतरायला लागणार होते.एक जरी पाय चुकला तर खाली दरी आ वासुन उभी होती. सरळ उतरायला फ़ारस जमत नव्हत. कारण माझ्या पायात जरा गोळा आला होता त्यात पाठीमागे बॅग खाली टेकत होती. मग क्रॉस होऊन कातळभिंतिचा आधार घेऊन उतरण चालू केली. तर काहि कार्यकर्ते उलटे उतरत होते. एकमेकांना आवज, आधार देत सर्व कडे पार करून एकदाचे कारवीच्या रानात घुसलो आणि घसरगुंड्या करत पुढल्या तासा,दिड तासात सर्वांनी गडाचा पायथा गाठला. पायथ्यालाच एका ओढ्यामधे मग धडाधड उड्या पडल्या आणि मनाने शुद्ध असलेल्या मंडळींनी आपली शरिरशुद्धीदेखील उरकली. “नहा, धोके, चकाचक होके…” सर्वजण गाडीत बसलो आणि पुनवडी कडे मार्गस्थ झालो. गप्पा, गाणी करत वाटेत हॉटेल सर्जा मध्ये तांबडा-पांढरा रस्सा, भाकरी, शेव भाजी आणि मास वडी वर मनसोक्त ताव मारून. प्रसाद डेंगळे उर्फ़ वारे बत्तीवाले अर्थात डेंगळे तृतीय यांच्या अभिनव शोधांवर जोरदार चर्चा झाडत वेळ कसा गेला कोणाच्याच लक्षात आले नाही. कुलंग स्वारीचे (आणि डेंगळे च्या शोधांवरच्या चर्चेचे देखील ) अनेक दिवसांचे स्वप्न आज पूर्णत्वाला आले होते.  भरारी च्या मावळ्यांनी आज आकाशाला गवसणी घालण्याचा एक यशस्वी प्रयत्न पार केला होता. हाता पायांमधे वेदना, खरचटणे हे तर नेहमीचेच होते.पण आज त्या सह्याद्रीच्या कुशीत जे काही अनुभवलं जे काही मिळवल ते केवळ एक स्वप्न होतं. कुलंग वर चढाई केल्याच समाधान होत.भरारी च्या शिरपेचात आज मानाचा अजून एक तूरा खोवला गेला होता. शांतपणे गाडीत डोळे बंद करून बसलो होतो मधेच जाग आली तर महाराष्ट्रात संताच्या वास्त्यव्याने पवित्र झालेल्या देहू, आळंदी, च्या जवळून आम्ही पुण्यनगरीत प्रवेश करीत होतो त्या पवित्र भुमी जवळच होत्या म्हणूनच असेल कदाचीत पण अचानक त्या वाटेवर श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचे बोल आठवले आणि मन समाधान पावले…. “याच साठी केला होता अट्टाहास !”

भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे.                                                                                                                                    ९८२२८७७७६७






मार्ग :- पुणे-नारायणगाव-संगमनेर-भंडारदरा-बारी-ईंदोरे-अंबेवाडी
पाण्याची सोय :- गडावर मुबलक पाणी आहे पण वाटेतल्या प्रवासात पाण्याचा भरपूर साठा असणे अत्यावश्यक.
लागणारा कालावधी :- अंबेवाडीतून सुमारे ४-५ तास.
  
इतर छायाचित्रांसाठी :- https://picasaweb.google.com/111727050074656731618/Kulang2627Oct2013?feat=email

https://plus.google.com/photos/116885383589105899440/albums/5940068771074651201


https://plus.google.com/photos/105098712578296142266/albums/5940103945063919681?authkey=CK7H1v3h5cKqXg

मोहिमेतील सहभागी मावळे :- सतिश सुर्यवंशी (सत्या), सतिश निकम (रॉकेल), राकेश जाधव (राक्या),अक्षय बोरसे (नथूराम), सुधीर जुगधर (सुध्या), अमित पानसरे (पेढ्या), विकास पोखरकर (कात्या), प्रसाद डेंगळे (वारे बत्तीवाले, डेंगळे तृतीय) अमोद राजे (सेनापती), निलेश वाळिंबे (वाळ्या)      

Tuesday, October 29, 2013

॥ शुभ दिपावली ॥

जागोजागी आकाश कंदील, पणत्यांचे स्टॉल दिसू लागले, की वेध लागायचे ते दिवाळीच्या सुट्टीचे. घराघरातून भाजण्यांचा सुटलेला खमंग वास मग उरात साठवून आम्ही पोर नदी, बांधकाम सुरू असलेली एखादी इमारत, मैदान अश्या जागांवरून दगड,माती गोळा करून मग किल्ला बनवत. आपला किल्ला झाला की नंतर मित्राचा असे अनेक किल्ले मोठ्या आनंदाने बनवले जात. आधुनिकतेचा वारसा जपण्य़ासाठी मग त्या किल्ल्यांनमधे एखादे कारंजे, विमान, विमानतळ, रेल्वे, पवनचक्की हे देखील दाखवले जात. एकमेकांना मदत करण्याची, आधुनिकतेचा वारसा जपण्याची, आपल्या सह्याद्रीचा अभिमान बाळगण्याची, प्राणांची बाजी लावणा-या मावळ्यांचा, राजांचा मान राखण्याची सवय, एकत्रपणे कष्ट करण्याची गोडी आपोआप लागली जात.
घरची परिस्थीती तशी बेताचीच त्यामुळे आम्हा दोन भावात मिळून ५० रूपयांपेक्षा जास्त फ़टाके आणायचे नाहीत हे आईने अगोदरच बजाबलेले असे. मग बाबांबरोबर सारसबागेत फ़टाक्यांच्या दुकानांकडे आमचा मोर्चा वळत असे. मी पानपट्टी घेतो, तू लवंगी घे अश्या चर्चा  आम्हा भावांमधे घडत आणि जेमतेम एका लहान पिशवीत मावतील  एवढे फ़टाके घेवून आम्ही परतत असू. घरी आल्यावर रात्री जागून लवंगीच्या सरीतला एकएक फ़टाका सुट्टा करून सर्व फ़टाके दोघांमधे मग मोठ्या आनंदाने समान वाटून दोन मोठ्या पिशव्या केल्या जात. तशी शिकवणच दिली जात असे.भावांमध्ये सारख वाटून एकत्र आनंद लुटण्याचा मजा काही औरच होता हे नक्कीच त्या वयात देखील उमजत असे.
मोती साबण, उटणे लावून केलेले अभ्यंग स्नान.ताटाच्या बाजूने काढलेल्या रांगोळीचे देखील तेव्हा मोठे अप्रूप वाटे. लाडू,चिवडा,कडबोळी, चकली च्या फ़राळावर सर्वांसमवेत मग ताव मारला जात.वर्षातून फ़ारफ़ार तर दोन ड्रेस मिळत आणि ते ही कोणत्याही नामांकीत कंपनीच्या ‘ब्रॅंड’चे नसलेले. तरिही त्यात संपूर्ण ‘कंफ़र्ट’ मिळत असे.बेताच्या परीस्थितीत देखील पूर्ण कुटुंब मोठ्या आनंदाने आणि जल्लोशात दिवाळीचा सण साजरा करत.जे मिळते त्यातच मनसोक्त आनंद लुटून समाधान मानण्यासा ‘संस्कार’ त्याकाळी आपल्या बालमनावर नकळत कोरला जात.
पण आज ती मजा खरच राहिली आहे का ? ते संस्कार ती शिकवण कुठे हरवली आहे का ? सतत पैश्याच्या मागे फ़िरणारे आम्ही हजारो रूपये खर्च करूनदेखील त्या आनंदाला मूकत चाललोय असे कधीतरी वाटते. मोठ्ठाली घर, गाड्या,पैसा आज आपल्या दारात आहेत पण आपला आनंद, समाधान, स्वास्थ्य हरवत चालल्यासारख वाटतय. कारण ‘लक्ष्मी’ च्या मागे लागताना आपण ‘पैश्याच्या’ मागे धावट सुटलोय असे जाणवते.स्पर्धेच्या गतिमान चक्रात आपण अभिमन्यू प्रमाणे अडकत आहोत असे जाणवले की मनाला क्लेश होतो.संपत्ती सर्वांना हवी असते पण पैसा आणि लक्ष्मी यातला फ़रक आपल्या हजारो वर्षाच्या परिपक्व संकृतीने, जेष्ठ व्यक्तींनी आपल्याला समजावलाय.तो आपल्याला समजलाच नाही हे लक्षात येते.
“जो मागच्या दरवाजातून वा गुपचूप येतो, बायकोच्या कानात हळूच सांगतो,असतो भरपूर पण आनंदाबरोबर कायम  असमाधान आणि एक भिती घेवून येतो तो “पैसा” व जो समोरच्या दारातून योग्य कष्टाच्या मोलात, वाजत, गाजत दिमाखात आणि फ़क्त आनंदच घेवून येतो जिचा उपभोग केवळ आपणच नव्हे तर आपले कुटुंबीय आणि आपल्या आजूबाजूचा समाज देखील मोठ्या समाधानाने, संयमाने घेतात ती “लक्ष्मी”.
अश्या या पवित्र लक्ष्मी चा सण म्हणजे ही ‘दिपालवी’ ! “म्हणूनच या मंगल प्रसंगी आपल्या घरात ती “लक्ष्मी” व तिचे पावित्र्य सदैव नांदो,आपली भरभराट होवो आणि आपणास निरोगी, समाधानी,आयुष्य लाभो हिच या दिपावली च्या शुभदिनी ‘वाळिंबे’ परिवाराकडून परमेश्वर चरणी प्रार्थना ! ॥ शुभ दिपावली ॥


निलेश गो. वाळिंबे.   


Tuesday, October 1, 2013

|| मढे घाट ||

पावसाळ्याचे दिवस आले की  मनाला कसा वेगळाच आनंद होतो, आणि मग त्या आनंदात आपल्या मनाचा गारवा शोधायला तूमच्या आमच्यासारखे सह्यप्रेमी निघतात त्या निसर्गाच्या कुशीत. मस्तपैकी पाऊस लुटायला, भिजायला. त्याच्या त्या जलधारांनी शरिरालाच नव्हे तर आपल्या मनालादेखील तो गारवा देण्यासाठी सगळे बाहेर पडतात.आम्हालादेखील पुढच्या आठवड्यात काही सवंगड्यांसमवेत किल्ले तोरणाची सफ़र घडवून आणायची होती. पण त्यांना खाली पायथ्याला जेवण देण्याचे ठरल्याने आज जेवणाचे पैसे देवून यायचे ठरले होते. याच कारणासाठी  सत्या आज सकाळी सकाळीच घरी हजर झाला म्हणाला, चला ते पैसे देवून जरा पाऊस बघून येऊयात. मग मुहूर्ताला मोडता कशाला कोण घालेल.. मी पण लगेच हो म्हणालो आणि आम्ही दोघांनी कात्रज गाठले. सकाळी सकाळी जातानाच वाटेत ‘पारिजातकाच्या’ सड्याने आणि त्याच्या सुघंधाने आम्हाला एकदम टवटवीत केले.त्याची काही छायाचित्रे टिपून पुढे मी, आमोद आणि सत्या ३ टाळकी निघाली आपल्या ‘मनाचा गारवा’ शोधायला...

गाडीतून चेलाडी फ़ाटा, नसरापूर मार्गे टुमदार अश्या वेल्ह्याच्या पायथ्याला पोचलो तेव्हा वरूणराज आमच्या स्वागताला तयारच होते. मागच्या महिन्यात उन्हाने भाजला गेलेला, महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तोरण्यावर निसर्गाने आपल हिरव मखमली तोरण चढवून त्याला कधीच सजवून टाकल होत. पावसाची रिमझीम, कुंद हवा, चहूबाजूला सह्याद्रीच्या कुशीतून पावसाची चाहूल देणारा हिरवागार पसरलेला तो गवतांचा, रानफ़ुलांचा भव्य मेळावा आणि इतिहासाची साक्ष देत शेकडो वर्षे रूबाबात उभा असलेला तोरणा बघताच मन अगदी प्रसन्न झाले.गडाच्या पायथ्याला ज्या खानावळ वाल्यांना पैसे देयचे होते ते देवून टाकले आणि पुढच्या आठवड्याची ऑर्डर पक्की करून टाकली. मग जरा थांबून गरमागरम कांदेपोहे आणि फ़क्कड कटींग मारता मारता आता या समोर पसरलेल्या निसर्गात काही काळ घालवूनच माघारी फ़िरण्याचा बेत झाला म्हणून गाडी माघारी घेण्याऎवजी पुन्हा थोडी पुढे दामटून निसर्गाने लयलूट केलेल्या व ऐतिहासीक महत्व असलेल्या अश्या ”मढे घाटाकडे” प्रस्थान केले.
                         
मढे घाट, मढे घाटाच्या सौदर्याला हळवी पण अतिशय पवित्र अशी किनार लाभलेली आहे.. आपल्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आपल्या राजाकडे, जीवलग मित्राकडे आपल्या परमेश्वराकडे गेलेला सुभेदार नरवीर तानाजी मालूसरे राजाच्या प्रेमापोटी मुलाचे लग्न बाजूला सारून प्रथम किल्ले कोंढाणा स्वराज्यात सामील करून घेण्याच्या मोहिमेसाठी आग्रह करू लागला. म्हणाला.. “राजे… आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे !” आपल्या भावाला ‘सूर्याजीला’ बरोबर घेवून जीवाची परवा न करता, आपल्या प्राणांची बाजी लावून तो थोर योद्धा, सिंहासारखा लढला अखेर धारातिर्थी पडला पण राजाचा गड तो कोंढाणा जिंकून घेतलाच.पश्चात त्या वीर सुभेदाराचे त्या योद्ध्याचे ते पार्थिव (मढे) त्यांच्या कोकणातील ‘उमरठ’ या गावी याच घाटमार्गातून नेण्यात आले तेव्हापासून या घाटाला ‘मढे घाट’ असे संबोधू लागले. काय काय माहिती असेल या घाटाला तिथल्या या निसर्गाला, काय काय पाहिले असेल याने. त्या थोर योद्ध्या चे पार्थीव या वाटेने जाताना किती अश्रू ढाळले असतील त्या घाटानी,तिथल्या कडेकपा-यांनी, पालखीवर चिरविश्रांती साठी निघालेल्या त्या तानाजीच्या चेह-यावर आपल्या मुलाच्या लग्नाची चिंतेची पुसट रेषाही नसेल कारण त्याला खात्री असेल माझा राजा हे सर्व यथायोग्य पार पाडेलच आणि मुलाच्या लग्नापेक्षा महत्वाचे आपले स्वराज्य, त्यासाठी कामी येणे यासारखा बहूमान नाही. उलट त्याच्या चेह-यावर असतील ते फ़क्त पराक्रमाचे भाव.आउसाहेबांचा आवडता कोंढाणा त्यांना मिळवून दिल्याबद्दल चेह-यावर उमटलेले समाधान.आपल्या सख्ख्या भावापेक्षा जवळचा आपला ताना आज या स्वराज्यासाठी कामी आला याचे दु:ख त्या राजाला देखील आवरले नसेल साक्षात त्याच्या आसवांनी ही पवित्र भूमि भिजली असेल. किती थोर असेल ती वाट आणि तो निसर्ग. या सगळ्या गोष्टींचा आज तो घाट साक्षीदार बनून  त्या जागी शेकडो वर्ष उभा आहे.आज त्या निसर्गाशी बोलायची कला मला जमली असती तर त्याने मला या सत्य कथा सांगितल्या असत्या. पूर्वाजन्मीचे पुण्य कदाचीत की आज त्या थोर वाटेवर आम्हास जायला मिळाले. धन्य ती वाट, धन्य तो तानाजी, धन्य ते राजे आणि धन्य तो निसर्ग. अश्या या पवित्र घाटात आम्ही पोहचलो होतो. तिथे कर्णावाडी नावाच्या वाडीत आम्ही गाडी लावली व वीर तानांजीचे स्मरण करून त्या अत्यंत शांत पण विलोभनीय जागेत भटकंतीला सुरूवात केली. 


                           थंड हवा, वा-याच्या झुळूकेनिशी नववधू प्रमाणे लाजणारी ती गवताची पाती, हातात हात गुंफ़ून जन्मोजंन्मांचे सोबती असल्याप्रमाणे वरून आपल्या प्रवासाला निघालेले ते काळे ढग जणू आपल हरवलेल कोणी सापडल की काय.. त्या अत्यानंदात त्या सह्याद्रीच्या अतीउंच कड्यांना त्या ढगांनी मारलेल्या त्या मिठ्या आणि आनंदाश्रू अनावर व्हावे तश्या धबाबा कोसळणा-या त्या जलधारा.त्या निसर्गाची ती किमया बघतच आम्ही बागडत होतो. डोंगर कड्यावरून आपल्या जिवाभावाच्या मैत्रीणीला त्या धरणीमातेला बिलगण्यासाठी आतूर झालेले अंगावर चंदेरी शाल पांघरून तीला बिलगणारे ते धबधबे खूपच मनमोहक दिसत होते. जागोजागी अवखळ  झरे आपल्या नागमोडी वाटांनी खळखळाट करत आपला आनंद व्यक्त करत होते.मधूनच येणा-या धूक्याच्या लाटांनी पहिला अंक संपून पडदा पडावा नी लगेच दुस-या अंकाला तितक्याच जोमाने सुरूवात व्हावी असा भास होत होता. शेतावर जीव ओवाळून टाकणारा शेतकरी दादापण जोमानी कामाला लागला होता. आपल्या ढवळ्या पवळ्याला पण त्यानी मदतीला आणल होत. मधेच १ बगळा त्या बैलाच्या पाठीवर बसून जणू आपल्याच हातात त्याची वेसण असल्याच्या थाटात भाव खावून जात होता. सभोवतालचे दाट जंगल पुर्णत: धुक्यात बुडाल्याने आमचा आता स्वर्गविहार सुरू होता. वातावरणातील त्या धुक्याच्या जादूने अगोदरच सुंदरता लाभलेल्या त्या वृक्ष वेली अजूनच विलोभनीय भासत होत्या. मढे घाटाची अजून एक ओळख पटवून देणारा म्हणजे तिथला महाकाय, उंचावरून कोसळणारा जलप्रपात. मनाला भूरळ घालणारा “लक्ष्मी धबधबा”.  त्याच्या त्या एकसंघ आवाजाने आता आम्ही त्याच्याकडे प्रस्थान केले. पूर्ण भरलेले आपले शुभ्रांग मोठ्या आवेशाने खाली कोकणात लोटून देताना दिसणारे ते विहंगम दृश्य.भगवान शंकराचे तांडव नृत्य सुरू असताना होणारा शंखनाद, असंख्य एकसंध मृदुंगाचे आवाज ज्याप्रमाणे भासत असतील तसा तो त्याचा नाद तो आवाज. पट्टीच्या गायकाने मल्हार आळवावा असे ते सूर. कोसळणा-या त्या प्रपाताचे ते विलोभनीय दृश्य पाहताना काही काळ आम्ही स्वत: लाच विसरून गेलो होतो. तो सोहळा कायमचा डोळ्यात साठवत पुन्हा माघारी फ़िरलो आणि दोन्ही बाजूला गर्द झाडीत वसलेल्या छोटेखानीच पण डुमदार ‘कर्णावाडीत’ येवून पोहचलो. फ़ारसा वेळ नसल्याने  आता परतीला निघायचे होते. गाडीत बसून पावसाची रिमझीम ऐकत वाटेत मग पोटपुजेला थांबलो. आज सत्याला फ़ारशी भूक नसल्याने तिघात फ़क्त १ व्हेज. थाळी, २ चिकन थाळी, १ अंडा मसाला, ४ रोट्या, भात, भजी आणि कोल्ड्रिंक एवढाच मेनू मागवला गेला.निसर्गाच्या कुशीत काही तास घालवल्यावर हवाहवासा वाटणारा तो मनाचा गारवा आता आम्हाला सापडला होता. ते मदमस्त वातावरण तो निसर्ग त्याची ती किमया, ती जादू , तो थंड वारा, ती हिरवळ सगळ सगळ कस उरात भरून घेतल होत. त्या निसर्गाचे “आभार” मानून पुन्हा येण्याच्या बोलीवर आम्ही परतीला निघालो होतो. धुक्याची नवलाई, मनाला चिंब करणा-या पावसाच्या सरी, मधूनच दाटून आलेल्या कृष्णमेघांना दूर सारून त्या अजस्त्र सह्यकड्यांना आणि हिरवाई ने नटलेल्या धरणी मातेला लखलखणा-या पाचूंचे रूप बहाल करणारे ते कोवळे कवडसे, साक्षात लक्ष्मी चे नाव धारण करून तिच्याप्रमाणेच ओथंबून वाहणारा तो अजस्त्र धबधबा हीच तर खर आम्हा सवंगड्यांच्या या छोट्याश्या निसर्गयात्रेची फ़लश्रुती होती !


भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे
९८२२८७७७६७


Tuesday, June 4, 2013

तो आला !

आज ऑफ़िसच्या बंद काळ्या काचांच्या आड नित्यनियमाने काम सुरू होते. पण मन सकाळपासूनच कुठेतरी हरवले होते.. आहो का काय विचारता. सकाळी येतानाच ‘ती’ ज्याची आतूरतेने वाट बघतीये असा ‘तो’ लवकरच येतोय असा संदेश आला होता. सकाळीच लक्षात आल होत तिच्या.. त्या धरणीमातेच्या. येणा-या जाण्या-या च्या डोळ्यांत धूळ उडवत, दरवाजे खीडक्या वाजवत, रस्त्यावरचा सारा पाचोळा उधळत, आत्ताच काढलेला केर गावभर पसतर ती, एखाद्या नुकत्याच तारूण्यात आलेल्या सुंदर तरूणीला आपला स्वप्नातला तो राजकूमार, तोच प्रियकर भेटून जो आनंद होतो आणि मग ती जशी अल्लड्पणे सैरभैर पळत सूटते अगदी तशीच ती ‘वावटळ’ तीला निरोप देउन गेली होती. काय सांगू काय आनंद झाला होता तीला. आतातर तीची तयारी देखील सुरू झाली असेल…
त्याच्या स्वागताला आता ढगांचे ढोल आणि विजांचे ताशे येतील, त्याच्या आगमनावर त्या टप्पो-या थेंबांच्या  लेझीमतालाने सारा आसमंत वाजू लागेल, मोर आपला मोहक पिसारा फ़ुलवून थूई थूई नाचू लागेल. आजवर बहरलेला तो गुलमोहर आपल्या लाल फ़ूलांचा गालीछा सा-या रस्त्यावर पसरवेल.तो येणार म्हणून धरणीमाता आपल्या मातीत लपलेल्या “अत्तराची कूपी” या पृथ्वीवर सडयासारखी शिंपडेल आणि सारी पृथ्वी आणि निसर्ग फ़ुलून जाईल. तूमच्या आमच्यासारखे ‘जीव’ देखील त्या गंधाने सुखावतील. सप्तरंगांची उधळण करत इंद्रधनूची कमान उभारून ती त्याच स्वागत करेल.चहूकडे हिरव्या रंगाच्या असंख्य छ्टा पसरतील आता मी नटणार, सजणार या निसर्गाला बहर येणार.अस ती म्हणत असेल आणि तिकडे….
खिडकीतून डोळे किलकीले करीत आजोबा आपल्या अर्धांगिनीकडे बघून आपली कवळी सावरत एक स्मीतहस्य करतील, क्षणात या निसर्गाच्या कृपेने याच्याच आगमनाने दोघे आपल्या तारूण्यातल्या त्या नाजूक आठवणीत हरवून जातील, ‘ईश्श काहीतरीच तूमच आपल !’ या कायम हवाश्या वाटणा-या वाक्याने आजोबा मनोमन खूष होतील.हातातील जपमाळेला जरा आराम पडेल आणि जून्या नाजूक आठवणी, गप्पांमधे दोघे रंगून जातील. गप्पा मारताना आजोबा नातवंडासाठी कागदाच्या होड्या बनवून देतील तर आजी गरमागरम कुरडई च्या खाऊच पोरांसाठी तळण तळेल. आता नातवंड देखील रत्यावर झालेल्या ओढ्यातून आपली नाव सोडतील, ती मधेच पडेल, मधेच अडेल कदाचीत बूडेल, पण काहीही झाल तरी आपली ती कागदी बोट तरावी त्या कृत्रीम लाटांना पार करत रस्त्याच्या त्या बाजूला जावी म्हणून प्रयत्न सुरूच असतील. एक बुडाली तर काय झाल, दुसरी बनवली जाईल माझी नाही पण ताईची तिकडे पोहचली म्हणून देखील एकच जल्लोश केला जाईल.हार न मानण्याचा आणि दुस-याच्या आनंदात सहभागी होण्याचा ‘संस्कार’ आपोआप त्या बालमनांवर रूजला जाईल.पायातली स्लीपर पाण्याबरोबर वाहून जाताना मागे पळून तीला पकडण्यासाठी पोरांची पळापळ सुरू असेल. चिखलाची परवा न करता एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण सुरूच असेल.
ऑफ़ीसातून निघताना तीला घरी घेवून जायचय हे तो विसरला नसेल, गाडीवरून ट्राफ़ीकमधून भिजत निघाला असेल जाताना आपल्या पुढच्याच्या गाडीचा चिखल चूकवत आपल्या गाडीने मागच्याला भरवायचा खोडकर आनंद त्याला मिळत असेल. जाताना सिग्नल ला अडोश्याल्या उलटी करून ठेवलेल्या काळ्या छत्रीत ती पांढरी शूभ्र मोग-याची फ़ूल ठेवून स्वत: पावसात भिजत उभा असलेला तो पो-या त्याच्या नजरेस नक्कीच पडेल १० चे ३ गजरे घेउन तो पुढे निघेल.ती बसमधून उतरत आपली रंगींत छत्री उघडत स्वत: ला सावरत त्याला म्हणेल,’सांगत होते रेनकोट घे बरोबर..’ त्यावर तो फ़क्त स्मितहास्य देत तिच्या छत्रीत शिरत थोडा आडोश्याला उभा राहील, मग खिशातले ते मोग-याचे हार आपल्या ओंझळीत घेऊन तिच्या चेह-याजवळ नेत तिला निरखेल, डोळे मिटून त्या ताज्या मोग-याचा मंद वास घेत त्याचा ओला स्पर्श ती अनूभवत असेल. जणू जगातली सर्वात महाग भेट मिळाल्याच्या आनंद तिच्या नजरेत बघताना, छत्रीतून ओघळणारे ते थेंब तिच्या केसांवर पडतील आणि ओली झालेली ‘बट’ झटकण्याची ती अदा बघतानाच त्या थेंबाचे तूषार नकळत त्याच्या चेह-यावर उडतील. त्या टप्पो-या थेंबात विरघळणारी ती आणि तिच्यात विरघळणारा तो आता ऑफ़ीसातून उचलून आणलेल्या टिशु पेपरने आपल्या मोबाईलवर जमलेली वाफ़ पूसेल आणि घरी फ़ोन करून पावसामूळे जरा उशीर होतोय अशी बतावणी करेल. दोघे मस्त गरमागरम कांदा भजी आणि कडक चहा मारूनच घराकडे निघतील.गेल्यावर मऊ मूगाची खिचडी आणि पापडाचा मेनू ठरला असेल. नकळत  त्यांना देखील आपले प्रेमाचे दिवस आठवून मनाला गुदगुल्या होतील ते देखील आज अजूनच तरूण झाले असतील.अशीच जन्मभर साथ निभावण्याच्या शपथा आपोआपच मनामधे घेतल्या जातील.सगळे दिवस कसे मखमली वाटू लागतील.नुकत्याच तारूण्यात प्रवेश केलेले तरूण तरूणींच तर विचारूच नका. या धरणीला जो आनंद झाला, जो बहार आला  तोच त्यांच्यात पण दिसत असेल. कॉलेज बूडवून मग प्लान होतील, गुपचूप एक कोरडा ड्रेस सॅकमध्ये लपवून ते दोघ बाहेर पडतील, अखंड जलधारात न्हाऊन निघताना त्या खट्याळ मनांना प्रेमाच्या लाटांची एक अनामीक धूंदी चढलेली असेल. गरमागरम कणीस, उकडलेल्या शेंगाची चव आज भलतीच न्यारी लागत असेल. कवी आपली ‘लेखणी’ घेवून बसेल त्याच्या शब्दांनी आज काळजाचा वेध घेतला असेल. तर गायकाचा सूर लागुन त्यातून ‘मल्हार’ उमटेल त्या सूरांनी आज सप्तरंग उधळले असतील.सगळ्याच कलाकारांच्या कलेला कसे एक उधाण आले असेल. सह्याद्रीची बात तर विचारूच नका. त्याच्या कुशीतून असंख्य जलप्रपात कोसळत असतील,हळदही न उतरलेल्या सर्व दागीन्यांनी नटलेल्या नववधूच्या चेह-याची ती लकाकी त्याच्या चेह-यात ओसंडत असेल.आपल्या सहवासात आजवर राहीलेल्या त्या नदिची भेट तिच्या प्रियकर सागराशी घडणार असेल.तिलादेखील आनंदाने पूर आला असेल. निसर्गाचा पूरता दंगा सुरू असेल. झाड,वेली पार बहरून निघतील पानांवर मोत्यांच्या रांगांचा शिवणापाणीचा खेळ रंगला असेल. सगळीकडे कसा फ़क्त आनंद असेल. महत्वाच म्हणजे क्षूद्र अश्या माणूस जातीच्या मनाला आलेली ‘कूबट’ स्वच्छ होईल.त्याच्या विचारांना लागलेली जळमटे आज धूतली जातील त्यानेच मळवलेला तो निसर्ग एकदम साफ़ चकचकीत होईल, शेतकरी दादाच्या डोळ्याचे अश्रू पूसले जातील, बैलजोडीला तयार करत आपल्या ‘हीला’ या सणाला एक तरी दागीना घडवायचा हे स्वप्न उराशी बाळगत तो कामाला लागेल.आपल्या पोटाचा प्रश्ण सूटेल आणि त्या काळ्या आईच्या कुशीत आज पून्हा अंकूर उगवेल.कारण आज तीचा बहर घेवून येणारा ‘तो’ वरूणराज तीला भेटायला आला असेल, तिच्याशी खेळायला आला असेल, तिला आता तो सांभाळणार असेल पूरत्या एका वर्षासाठी.

भेटा अथवा लिहा, (शक्यतो भेटाच)

निलेश गो. वाळिंबे 
९८२२८७७७६७



Thursday, January 10, 2013

कोंडनाळीतूक कोकणकडे…. ! प्रवास नूतन वर्षाचा.


सह्याद्री, त्याच्या कुशीत शिराव त्याचे ते उंच कडे आणि इतिहास जागे करणारे किल्ले यांच्या सानिध्यात रात्र घालवावी, छ. शिवरायांच्या स्मरणाने स्फूर्ती घेऊन आयुष्याच्या रहाटगाड्याला जुंपलेल्या या माणसांनी एक नवी चेतना मिळवून एका नवीन उर्जेने ताजेतवाने व्हाव आणि पुन्हा एकदम फ्रेश मुडने नव्या वर्षातील जबाबदा-यांना सामोरे जाव असं आम्हा सर्वांनाच वाटत होत.मग काय इतिहासाचा साक्षीदार असलेला तो सह्याद्री ज्याने अनेक सत्ताधीश अनुभवले त्याच्या पोटात शिरायच ते थेट आपल्या निसर्गसमृद्धतेचा वारसा लाभलेल्या सर्वांच्याच आवडत्या अश्या कोकणात उतरायच ठरलं आणि मेलामेली पूर्ण होऊन दिवस ठरले २९,३०,३१ आणि १ जाने. २०१३ 
२९ डिसेंबर २०१२ पहाटे ६ वा स्वारगेट बस स्थानकात जमून ६.१५ च्या महाबळेश्वर बसने प्रयाण करण्याचे ठरले आणि एस. टी. महामंडळाच्या परंपरेला गालबोट लागेल अश्या पद्धतीने वागून सव्वा सहाची बस चक्क सव्वा सहालाच निघाली.पण…. पण भरारी ग्रूप चे “T मास्टर” विकास पोखरकर उर्फ़ कात्या यांनी मात्र भरारी ग्रूपच्या परंपरेला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागता कामा नये याची दक्षता घेतलीच.सकाळी ६.१५ ची बस स्वारगेट स्थानकातून बाहेर पडली आणि तीच बस पकडण्याकरीता विकास बरोब्बर ६.१५ लाच पाषाण च्या आपल्या घरातून बाहेर पडला. मग काय, साहेब येस्तोवर त्या बस ला रामराम ठोकून मस्त गरमागर चहा आणि तोफ़ांवर (क्रिमरोल) ताव मारून शेवट पुढच्या म्हणजेच ७.३० च्या बसने सर्व कार्यकर्ते गणरायचे नामस्मरण करून बसमधे बसले आणि ‘टिंग टिंग’ करून  कंडक्टर साहेबांनी ‘डबल’ दिली.  
महाबळेश्वर स्थानकावरून आता आम्हाला पुढच्या बसने दुधगाव हे गाव गाठायचे होते परंतू येथे मात्र महामंडळाने आपली परंपरेला अनुसरून पुढचे ३ तास आमचे पुतळे केले. तेवढ्या वेळात महाबळेश्वरात किराणा खरेदी झाली. मी आणि आमोद नी कात्याला (विकास) खास महाबळेश्वर मेड ट्रेकिंग सॅक घेतली आणि त्याच्या आधिच्या पर्स वजा सॅकसह जेवणाचा बराचसा शिधा त्यात कोंबला.तर शाहूने (निलेश महाडीक) आमच्यासाठी अर्धा किलो फ़ूटाणे आणले.बस ची वाट पहाता पहाता आता सूर्य डोक्यावर आला होता आणि माझे जवळपास सगळे म्हणजे अर्धा किलो फ़ुटाणे संपत आले होते शेवटी बस चा नाद सोडून खाजगी जीप वाल्याला विनंती करून पैष्याची घासागिस करत आम्ही निघालो.(ही अविस्मरणीय अशी जीप आणि त्याचा चालक यांच्यावर एक वेगळा लेख टंकायचा माझा मानस आहे. वेळ मिळाल्यास आपणासाठी अवश्य सादर करेन) वळणावळणाचा घाट रस्ता,जिपमधे देखील आडव झोपायची हौस (खाज),उन्हात खाल्लेले अर्धा किलो फ़ुटाणे आणि बाकी कोणालाही वाटा न दिल्यामूळे जी  फ़ळे भोगावी लागतात ती मलाही भोगावी लागली आणि आमच ‘कोंबड आरवलं’!  शेवट “वकार युनूस” च्या बॉलींगवर माझी विकेट उडाली आणि भरारी च्या सैनिकांनी टाळ्यांच्या गजरात पुढचा प्रवास सुरू केला. (अर्थबोध झाला नसेल तर मला फ़ुटाणे खायला घालून माझ्याबरोबर घाटाचा प्रवास करा.) साधारण ४ च्या सुमारास आम्ही “चतूर्बेट ” गावी उतरलो आणि कूच केले किल्ले मधू-मकरंद गडाकडे. २ तासांच्या पायपिटीअंती आम्ही गडाच्या खांद्यावर असलेल्या ‘घोणसवाडी’ या लहान पण स्वच्छ आणि टुमदार अश्या गावी पोहचलो. एकतर संपूर्ण शाकाहारी आणि मला प्रचंड आवडलेली गोष्ट म्हणजे एकही “कुत्र” नसलेल हे आजवर पाहिलेल एकमेव गाव होय. ह्या गावात तिथल्या अत्यंत प्रेमळ लोकांच्या साथीत आपण एक दिवस तरी घालवलाच पाहीजे हे सर्वांनाच वाटत होते, (मला तर समजलय की गावात कुत्र नाही म्हणून ‘बिक्या’ म्हणे इकडे सहकुटूंब शिफ़्ट होण्याच्या विचारात आहे [ बिक्या- भरारी ग्रुप मधील अशी व्यक्ती आहे कि ज्याला कुत्रे आवडत नाहीत पण कुत्र्यांचे त्याच्यावर प्रचंड प्रेम आहे ] ) तसही तिन्हीसांज होत होती त्यामुळे गडावर मुक्काम करण्यापेक्षा इथेच चूल मांडण्याचा निर्णय झाला आणि सख्ख्या आजीची आठवण करून देणा-या श्रीमती जानकी आज्जींच्या सुंदर अश्या शेणाने सारवलेल्या अंगणात आम्ही मुक्काम ठोकला.
श्रीमती जानकी आंज्जींसमवेत मंडळी, मुक्काम पहिला.
बल्लवाचार्यांचे मानाचे ‘उपरणे’ माझ्या खांद्यावर टाकून मला चूलींचा ताबा देण्यात आला.कात्या चूल पेटवत होता तर अमोद आणि हिमाल्यपूत्र उर्फ़ सुदीप आकाशातले तारे बघत आपल्या ‘अकलेचे तारे’ तोडत होते. शाहू आणि राक्या बाकी तयारी करत होते.थोड्या वेळातच फ़ोडण्या तडकल्या आणि आजच्या रात्रीला मस्त मटार उसळ आणि गरमागरम भात असा मेनू तयार झाला. ‘एक साधी काडी देखील सापडणार नाही अस सारवलेल स्वच्छ अंगण, हवेत छान गारवा एका बाजूला दिमाखदारपणे शेकडो वर्षे आपले पाय रोवून उभा असलेला सह्यद्रीतला तो मकरंद गड, नूकताच पोर्णीमेने सूंदर रूपडे धारण केलेला तो गोरापान चांदोमामा त्याच्या साथीला चमचमणा-या तारका, या सगळ्यांच्या संगतीत मस्त मटार उसळ रस्सा, गरमागरम भातावर ताव मारून मंडळींनी तृप्तीचे ढेकर दिले व त्याच अथांग अवकाशाखाली आम्ही पोरांनी आपापल्या पथा-या पसरल्या आणि गप्पांच्या रंगात मध्यरात्र उलटून गेल्यावर निद्रदेवतेनी सर्वांच्या नयनांवर आरूढ होवून सर्वांचा ताबा कधी घेतला हे कळालेच नाही’.
३०डिसेंबर २०१२ सकाळी ६ च्या सुमारास सर्वांना जाग आली. कात्या आणि शाहू च्या कृपेमुळे प्रसंन्न वातावरणात धारोष्ण दुधाचा फ़क्कड चहा पुढ्यात हजर झाला.चहापान आणि प्रार्तविधी आटोपून आम्ही सर्व साहित्य जानकी आज्जींच्या ओसरीवरच सोडून तडक मकरंद गडावर कूच केले.पांडवकाळात घेउन जाणारा हा किल्ला फ़ारसा मोठा नसून गडावर सुंदर असे ‘शिवाल्य’ बघावयास मिळते.येथे गावतल्या जंगमांकडून दररोज यथासांग पुजापाठ केला जात असून एक जागृत देवस्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे. पांडव अज्ञातवासात असताना या गडावर वास्तव्यास होते त्यावेळी त्यांनी रक्त्या तलाव, मुंगळे तलाव, फ़ुटक्या तलाव अश्या विविध नावांचे एकूण सात तलाव खोदले अशी येथिल अख्यायिका प्रसिद्ध आहे. हे सातिही तलाव आजही आपण पाहू शकतो. एका बाजूला महाबळेश्वर आणि प्रसिद्ध असे जावळी खोरे तर दुसरीकडे चकदेव पर्वत आणि खाली कोकणात उतरणारी भयंकर दरी आपल्या काळजाचा ठोका चुकवते, डाव्या हाताला चमचमणारे कोयना धरणाचे पाणी आपल्या नागमोडी वळणाने लांबवर गेलेले अतिशय विलोभनीय दिसते.चहूकडे दिसणारा अवर्णनीय असा तो नजारा मनात आणि कॅमेरात साठवून मंदिरी पोहचलो आणि ‘शिवनामाचा जप’ करून आम्ही लौकरच पुन्हा घोणसपूर कडे निघालो कारण पुढे बराच प्रवास बाकी होता. आमचे सर्व साहित्य नेण्याकरता पून्हा जानकी आज्जींच्या घरी पोहचलो तर,
“माझ्या नातवंडाना उपाशी पाठवून मी एकटी म्हातारी काय सगळ खाणार का ?”असा तिखट सवाल करून आज्जींनी मायेचा दम भरत प्रचंड आग्रहाने गरमागरम भाक-या आणि चमचमीत चटणी असा अप्रतीम मेनू समोर मांडला. या सह्याद्रीतली माणस कशी अगदी त्या सह्याद्रीसारखीच अंगानी चिवट, दिसायला राकट बोलायला तिखट पण मनाने अत्यंत प्रेमळ आणि हळवीच असतात याचीच अनुभूती आज्जींनी आज पून्हा एकदा दिली. साध्या चटणी भाकरीला आज जी चव होती ती आख्या जन्मात मिळनार नाही हे सर्वांनाच माहिती होते. कारण, ७५-८० वर्ष प्रचंड काबाडकष्ट करून रापलेल ते शरीर जरी पार थकून गेल होत तरी त्यातली माया, आपूलकी आजही ओसंडूनच वाहात होती. वयोपरत्वे डोळ्यांची दृष्टी कमी झाली होती पण त्या नेत्रांमधली प्रेमाची झाक आजदेखील स्पष्ट दिसत होती. कानात बाजूचे आवाज कमी झाले होते, पण काही तासांपूर्वी ओळख झालेल्या आपल्या नातवंडाच्या पोटात भूकेने कोकलणा-या कावळ्यांचे आवाज मात्र त्या आज्जींच्या कानात जणू घूमत होते. त्या भाक-या थापलेले ते मायेचे हात, प्रत्येक घासाघासात असलेले त्या माऊलिचे प्रेम, झणझणीत असली तरी साखर देखील फ़िक्की पडेल इतका मायेचा  गोडवा असलेली ती चटणी आणि आम्ही जेवण करतोय म्हणून आणि  फ़क्त म्हणूनच त्या माउलिच्या चेह-यावरून ओसंडून वाहणारा तो आनंद हे पाहून सर्वांच्याच डोळ्यात आनंदाश्रू तराळले.’रात्रभर पोर बाहेर अंगणात झोपली आणि मी म्हातारी घरात मस्त घोरत पडले’ या गोष्टीची मनाला लागलेली हुरहूर १०० वेळा समजावून पण त्या बिच्चा-या माउलिच्या मनातून काही उतरत नव्हती. शेवटी पुन्हा तूम्हाला भेटायला नक्की येणार आणि घराच्या आतमधे मुक्काम करणार अशी समजूत काढून सर्वांनी त्या लाड पूरवणा-या आज्जींचे आशिर्वाद घेतले आणि जंगम काकांबरोबर पुढच्या खडतर अश्या प्रवासाला निघलो. “मधू किल्ल्यामार्गे कोंडनळीतून कोकणकडे…..”

 पुढचे वर्णन वाचण्या आगोदर मी आपणास एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगू इच्छीतो की, हा ब्लॉग टंकायच्या अगोदर मी पून्हा एकदा खास पूण्यावरून त्या घळीच्या तोंडापाशी जावून स्वखर्चाने १ फ़लक टांगून आलोय…
                                             “वर जाण्यासाठी, खाली उतरण्याचा मार्ग”
असो तरी त्याचा खर्च देणगीपोटी स्विकारला जाईल याची नोंद घ्यावी.असो..


बरेच वर्षात कोणी गेल नाहिये, तूम्ही पण या वाटेने जाण टाळा असा उपदेश वजा सल्ला तसा बरेच जणांनी दिला होता पण ‘किडे/खाज’ काहीही म्हणा हव तर.. पण आम्ही पोरांनी निश्चय पक्का केला होता. (चूलीत गेले असले निश्चय अस नंतर वाटल म्हणा,पण आता कोणाला सांगता) जंगम काकांनी नळीच्या तोंडापाशी आम्हाला सुखरूप पोचविले आणि खाली पोचल्यावर न विसरता फोन करायचाच या बोलीवर आम्हाला निरोप दिला.आता लिड करत होते हिमाल्यपूत्र सुदीप माने.. हातात कूकरी घेउन सपासप वाट काढत पूढे सरकायचे आणि मागच्या मंडळींना वाट करून देयची. घळीच्या अगदी सुरवातीलाच या मार्गानेदेखील कोणी खाली उतरू शकत हीच अतिशयोक्ती वाटते.आणि सुरवातीच्या अगदी ५ मि. मधेच तूम्हाला पुढे येणा-या त्या आक्राळ विक्राळ सह्याद्रीचा अंदाज यायला लागतो. सह्याद्रीवरील प्रचंड श्रध्दा, त्यावरच नितांत प्रेम, निसर्गाची साथ, सोबत असलेले सहकारी, पाणी आणि ग्लूकॉन डी फ़क्त यांच्या जोरावरच प्रत्येकाला ही वाट पार करण शक्य आहे.साधारण दुपारी २.३० च्या सुमारास आम्ही घळीच्या तोंडापासून खाली उतरलो, नव्हे घरंगळलो.समोर दिसणारा सह्याद्रीचा उत्ताल कडा थेट आमच्या नजरेत सूद्धा मावत नव्हता. मधू किल्ल्याची कातळ भिंत पाठीमागे आम्हाला निरोप देत होती आणि दोन्ही बाजूंना थेट गगनाला भिडणारे उंच कातळ मानवाला जणू त्याच्या खूज्या उंचीचीच आठवण करून देत उभे ठाकले होते.तर पुढ्यात खोल दूरवर फ़क्त किर्र झाडी आणि मोठाले खडक आमच्या स्वागताला तयारच होते. निसर्गाने आपल्या संपत्तीची संपूर्ण लयलूट केलेली ही जागा अतिशय सुंदर आहे. अनेक प्रकारच्या वनस्पती, वृक्ष,वेली,झाडे, विवीध पानाफ़ूलांनी नटलेला त्या निसर्गाने असंख्य जातीच्या प्राणी पक्ष्यांना सहारा देत त्या ठिकाणी नंदनवन फ़ुलविले आहे.मोठमोठाले खडक चढून उतरायचे. कधी हातात हात धरून साखळी करून, कधी दोराने तर कधी चक्क बसून घसरगूंड्या सुरूच होत्या.. आठ दहा फ़ूटांचे ते खडक आता चांगलीच परीक्षा घेत होते. त्यातच पाठीवरच्या ३-४ दिवसांचे कपडे पाणी आणि शिध्याने सॅक्स फ़ारच जड झाल्या होत्या.(सर्वात जास्त सामान त्यांच्याच खांद्यावर लादल होत अस ज्यांच म्हणणे असेल त्यांची या ठिकाणी मी माफ़ी मागतो पण ऐनवेळी ‘गाढव’ मिळाली असती तर तूमच्यावर ही वेळ आली नसती :P) त्या ओझ्याने आता घामाच्या धारा लागल्या होत्या. प्रत्येक वळणावर आता पाणी कमी कमी होत चालल होत आणि वळण मात्र वाढतच होती. मधेच अचानक जंगली श्वापदांचा उग्र वास वातावरण अजूनच खराब करत होता. वाटेत सापडणा-या प्राण्यांच्या सांगाड्याला ओलांडून पुढे जातो तो लाल चुटूक खेकड्यांची जत्रा भरलेले खडक दिसत,मधेच चिरतरूण असणा-या सापांनी आपल्या वार्धक्याला मागे सारून पुरावा म्हणून ठेवलेल्या काती कपारींमधे सापडत होत्या.तर मधमाशांचा घोंगवणारा आवाज त्या शांततेला चिरून जात होता. विकासचे पाय आता चांगलेच बोलायला लागले होते.(तसे सगळ्यांचेच बोलत होते पण त्याचे जरा जास्तच बडबड करत होते.) छातीचे भातेदेखील चांगलेच थकायला लागले होते ६ वाजून गेले होते सूर्यनारायणाने तर कधीच पाठ दाखवली होती वरती ‘खग’ देखील आपली दिनचर्या आटोपून पिल्लांच्या ओढीने परतीच्या प्रवासाला निघालेले दिसत होते. अंधार वाढत चालला होता तरी मोठ्ठाले खडक असंख्य दगड गोटे आपल्या अफ़ाट सैन्यासह अजूनही सज्जच होते.शेवट विकासने शरणागती पत्करली आणि आम्ही सर्वांनी देखील आमच्या मोहीमेला स्वल्पविराम देत आपला मूक्काम याच घळीत निसर्गाच्या कुशीत करायचा निर्णय घेतला.झोपताना सपाटीवर, वा पाणवठ्यावर झोपणे तसे धोकादायक होते पण नशीबाने म्हणा सपाटी नव्हतीच. :D १ मोठ्ठा खडक बघुन त्यावरच ४ जणांनी झोपायच आणि २ जण प्रत्येक वेळी राखण करतील अस एकमत झाल.पोटातल्या भूकेच्या कावळ्यांचे आता पार हात्ती झाले होते, पटापटा सॅक सोडून आजूबाजूचा परीसर एकवार न्याहाळून जागेची थोडी साफ़सफ़ाइ केली गेली आणि सरपण गोळा करून लगेच चूल मांडून कात्याने गरमागरम मॅगी तयार केले.गार गार हवेमद्धे रातकिड्यांच्या किर्र्र.. किर्रर्र..च्या पार्श्ववादनात मधूनच एकाधी वा-याची झुळूक पसरलेला पाचोळा पुढे घेउन जात होती जसकाही त्या रातकिड्यांच्या वादनाला दिलेली दादच म्हणाना ! लगोलग झाडावरची पानगळ आता नव्याने त्या उडालेल्या पाचोळ्याच्या जागेचा ताबा घेत होती चमचमणारे काजवे जणू आमच्यासाठीच विजे-या (टॉर्च) घेउन सज्ज असलेल्या सेवकांप्रमाणे आमच्या आजूबाजूला फ़िरत होते आणि ‘काळजी नसावी’ म्हणत आमच्या सोबत राहण्याचे आश्वासन देत होते.एक मोठ्ठा लाकडाचा ओंडका आणून त्याची मस्त शेकोटी पेटवलेली होती तर चुलीवरच्या गरमागरम मॅगी, बिस्कीट यावर मनसोक्त ताव मारून मंडळी आता ‘दुख-या देहांना’ गार गार जाणवणा-या त्या मोठ्ठ्या खडकावर टेकवून थोड्याशा थकलेल्या पण सावध नजरेतूनच या आपल्या आवडत्या तरी आज अचानक लाडक बाळ चिडून अंगावर धावून येत त्याप्रमाणे अंगावर आलेल्या सह्याद्रीतल्या त्या कडेकपा-यांमधे चमकणा-या डोळ्यांचा वेध घेत होती.(स्पष्टच सांगायच तर ‘यांची’ पार ‘फ़ाटली’ होती :D ) मधू किल्ल्यांच्या पाठीमागून आता गोरापान चांदोमामा देखील आमच्या सोबतीला हजर होत होता त्याचे स्वागत करत त्या नभांगणातील काही तारे ओळखण्याचा प्रयत्न करत माझी आणि राजेची ‘रक्षक ड्यूटी’ सुरू होती. निसर्गाच्या कुशीत आज आम्हाला खरोखरच त्याने सर्वकाही विसरायला लावले होते. छोटासा दगड जरी वरून घसरला वा जवळच असलेल्या पाणवठ्यावर आवाज जाणवला की तत्पर्तेने आमच्या विजे-यांचे झोत तिकडे पडत होते. खूपच दमछाक झाल्याने मधूनच डोळे मिटले जात होते. पण येणारा अनुभव फ़ारच भारी होता.थोड्यावेळानंतर मला विश्रांती देत सुदीप शेकोटीपाशी आला आणि मी चमचमणा-या तारकांचेच पांघरूण ओढून त्या मोठ्या खडकशैयेवर आडवा झालो.                
३१ जाने. २०१२ थंडगार वा-याचा मूक्त विहार, पाखरांचा किलबीलाट, धगधगत्या शेकोटीतली आजूनही शाबूत असलेली ती गरम गरम उब आणि गरमागरम चहापानासाठी कात्याने (शिव्या हासडून) केलेला गजर  यामूळे ६ साडे सहाच्या सुमारास मला जाग आली.सकाळी उठल्यावर सर्वांना विश्रांती मिळाली होती खरी पण थंडगार खडकावर झोपून हवेतल्या गारव्याने आता संपूर्ण शरीर दुखायला लागल होत पण पुढचा प्रवास लौकरात लौकर करण गरजेच असल्याने तडक सर्वजण चहापान करून ‘शिकारीला’ जाउन आले. (अर्थबोध होत नसेल तर तज्ञांचा सल्ला घ्या) पटापटा ओझी खांद्यांवर लादून पून्हा कालसारखा प्रवास सुरू झाला.थोड पुढे गेल्यावर थंडगार पाण्याच्या डोह लागला आणि अंग मोकळ करायला किंवा पूर्ण बधीर करायला पोरांच्या उड्या पडल्या. जलक्रीडेचा आस्वाद घेउन पायपीट सुरूच होती पण अजूनही लांबवर फ़क्त उतरती घळ दगड गोटे या पलीकडे काहीच दिसत नव्हते. आता ११ वाजून गेले होते पून्हा घामानी थकून वेग मंदावला होता आणि त्या सह्याद्रीने त्या निसर्गाने आपली किमया दाखवली. अचानक देवदूताप्रमाणे २ दिवसापूर्वी हरवलेला बैल शोधायला म्हणून समोरून “जाधव मामा” आमच्या समोर हजर झाले.’याच वाटेने सरळ चालत राहीलात तर आजून २ तासात तूम्हाला नदीपाशी रस्ता मिळेल’ अस त्यांनी सांगीतल पण २ तास आता २ वर्षाप्रमाणे भासले होते. आमच्या चेह-यांवरचा थकवा ओळखूल बैल नंतर शोधू आधी तूम्हाला शॉर्टकट ने गावात नेतो सांगीतल आणि पून्हा जंगलातल्या डाव्या अंगाला असलेल्या दुस-या वाटेने ५० मि. मधे थेट ‘कळंबली’ या कोकणातल्या छोट्याश्या पण डुमदार गावातल्या आपल्या घरी चहापानाला पोच केल.त्यांच्याच घरात चहापान, थोडी विश्रांती घेतल्यावर जाधव मामांचे उपकार मानून आमच्यातर्फ़े छोटीशी भेट देउन आम्ही पुढल्या प्रवासासाठी महामंडळाच्या २.३० च्या गाडीची वाट पहात कळंबली थांबा गाठला.’वाट पाहीन पण ST नेच जाईन’ या वाक्याला चिकटलेले आम्ही २.३० च्या गाडीसाठी ५ पर्य़ंत त्याच थांब्याला चिकटून बसलो.पण शेवट महामंडळानेच आलो. (बोंबलायला पर्याय होताच कुठे)
६.३० च्या सुमारास आम्ही खेड स्थानकावर उतरलो आता नूतन वर्षाचा सूर्योद्य हा आपल्या लाडक्या रसाळ्गडावरच करायचा अशी प्रत्येकाचीच मनोमन ईच्छा होती.पण रसाळगडावर आता जाण्यासाठी बसची कोणतीही सोय नव्हती. म्हणून एका सह्यप्रेमी रिक्षावाल्या भाउंना भेटून विनंती करण्यात आली आणि आमच्या विनंतीस मान देउन खेडेकर आणि त्यांचे एक मित्र हे आपापले रथ घेउन आमाच्या सेवेस दाखल झाले.जातानाच खेडमधून नॉनव्हेज वाल्यांसाठी व्हेज कोंबडी घेण्यात आली आणि सरत्या वर्षाचा शेवटचा प्रवास सुरू झाला किल्ले रसाळगडाकडे. वाटेत बहूदा नववर्षाच्या शुभेच्छा देयलाच अत्यंत विषारी समजल्या जाणा-या “घॊणस” सापाने आम्हाला दर्शन दिले आणि आम्ही गडपायथ्याला पोहचलो.अर्ध्या तासात गडावर कूच करून पटापट तयारी सुरू झाली. आणि पाश्चात्य पद्धतीने न्यू इयर सेलीब्रेशन म्हणून व्हेज कोंबडीचे चिकन आणि लिंबू सरबत यावर गड्यांनी आडवा हात मारला.आता पोटोबा शांत झाले होते, थंडगार वा-यात आई झोलाई च्या साक्षीत नववर्षाच्या स्वागताला आमचे तानसेन राकेश सरांनी आपले सूर आवळले आणि आम्हा श्रवणभक्तांना आपल्या मधूर सूरांनी न्हाऊ घातले.गाण्यांच्या फ़र्माईची सुरूच होत्या मध्यरात्र उलटून १,२ वाजले व राकेशच्या मंजूळ स्वरांची नववर्षभेट स्विकारून आम्ही सर्वजण निद्राधीन झालो.
१ जाने. २०१३ पहाटे सूर्योद्ययालाच सर्वजण गडमाथ्यावर हजर झालो, नूतन वर्षाच्या त्या पहिल्या किरणांना सूर्यनमस्कार घालून मानवंदना दिली आणि कॅमेरांच्या क्लिक-क्लीकाटात त्याचे स्वागत करून तोंड खंगाळली गेली.माता झोलाई ला दंडवत घालून पून्हा खेड स्थानक गाठले आणि प्रवास सुरू झाला पुण्यनगरीकडे….
बसमधे आम्ही सगळेच थकून बसलो होतो. डोळे मिटून संपूर्ण प्रवास डोळ्यासमोरून तरलत होता.’आज सिद्ध झाल होत की, तूम्ही त्या निसर्गाशी एकनिष्ठ असाल त्याच्यावर मनोमन प्रेम करत असाल तर त्याचा प्रतीसाद तसाच असतो खर तर तूम्ही कसेही असा तो फ़क्त प्रेमच करतो. नाही करत तो’ कोप’ वैगैरे काही.. तो कोप देखील घडवणारे असतात ती तूमची आमची ‘मतलबी माणसच’ तो फ़क्त आपल्याला देतच असतो आपल्या अजस्त्र हातांनी. तो नेहमीच मूक्त उधळण करत असतो आपण फ़क्त संयम पाळून, योग्य ती काळजी घेत, सगळ्या रडगाण्यांना फ़ाटा देत फ़क्त त्या आनंदाची अनुभूती घ्यायची असते बस्स.’ त्या अवघड घळीत दिसायला भयंकर दिसणारा तो सह्याद्री हेच सांगत होता, “आरे उठा, धीर सोडू नका, झटकून टाका तो थकवा ती मरगळ माझ्याकडे बघा आज शेकडो वर्ष मी उन, वारा, पावसाशी झुंजतोय लाखो आक्रमण मी अशी परतवून लावलीयेत तरी आज खंबीरपणे पाय घट्ट रोवून उभाय.माझा आदर्श समोर ठेवा. मला विसरू नका, माझ्यापासून दूर जावू नका, माझा आनंद घ्या, माझ्या कुशीत शिरा आणि बघा काय जादू आहे ते’ तेवढ्यात कंडक्टर साहेबांची “टींग” अशी सिंगल वाजली…आणि आम्ही स्वारगेट स्थानकात उतरलो ते… येत्या वर्षात जास्तीत जास्त ट्रेक आखण्याचा निश्चय करतच.

भेटा अथवा लिहा,(शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे
९८२२८७७७६७
 १ जाने. २०१३ ची मंगल पहाट किल्ले रसाळगडावरून.

सहभागी वीर :- कर्णधार श्री.आमोद राजे,भरारी चे तानसेन श्री.राकेश जाधव , सदा हसतमुख आणि उत्साही असलेले  श्री.निलेश महाडिक उर्फ शाहू, हिमाल्य मोहिमेसाठी सुट्टी  मिळाल्यामुळे  आपल्या संगणक अभियंत्याच्या नोकरीवर खुशाल लाथ मारणारे श्री.सुदीप माने उर्फ हिमालयपुत्र, T मास्तर उर्फ़ कात्या अर्थात श्री. विकास पोखरकर आणि निलेश वाळिंबे (स्वयंघोषीत अध्यक्ष).