जागोजागी आकाश कंदील, पणत्यांचे स्टॉल दिसू लागले,
की वेध लागायचे ते दिवाळीच्या सुट्टीचे. घराघरातून भाजण्यांचा सुटलेला खमंग वास मग
उरात साठवून आम्ही पोर नदी, बांधकाम सुरू असलेली एखादी इमारत, मैदान अश्या जागांवरून
दगड,माती गोळा करून मग किल्ला बनवत. आपला किल्ला झाला की नंतर मित्राचा असे अनेक किल्ले
मोठ्या आनंदाने बनवले जात. आधुनिकतेचा वारसा जपण्य़ासाठी मग त्या किल्ल्यांनमधे एखादे
कारंजे, विमान, विमानतळ, रेल्वे, पवनचक्की हे देखील दाखवले जात. एकमेकांना मदत करण्याची,
आधुनिकतेचा वारसा जपण्याची, आपल्या सह्याद्रीचा अभिमान बाळगण्याची, प्राणांची बाजी
लावणा-या मावळ्यांचा, राजांचा मान राखण्याची सवय, एकत्रपणे कष्ट करण्याची गोडी आपोआप
लागली जात.
घरची
परिस्थीती तशी बेताचीच त्यामुळे आम्हा दोन भावात मिळून ५० रूपयांपेक्षा जास्त फ़टाके
आणायचे नाहीत हे आईने अगोदरच बजाबलेले असे. मग बाबांबरोबर सारसबागेत फ़टाक्यांच्या दुकानांकडे
आमचा मोर्चा वळत असे. मी पानपट्टी घेतो, तू लवंगी घे अश्या चर्चा आम्हा भावांमधे घडत आणि जेमतेम एका लहान पिशवीत
मावतील एवढे फ़टाके घेवून आम्ही परतत असू. घरी
आल्यावर रात्री जागून लवंगीच्या सरीतला एकएक फ़टाका सुट्टा करून सर्व फ़टाके दोघांमधे
मग मोठ्या आनंदाने समान वाटून दोन मोठ्या पिशव्या केल्या जात. तशी शिकवणच दिली जात
असे.भावांमध्ये सारख वाटून एकत्र आनंद लुटण्याचा मजा काही औरच होता हे नक्कीच त्या
वयात देखील उमजत असे.
मोती
साबण, उटणे लावून केलेले अभ्यंग स्नान.ताटाच्या बाजूने काढलेल्या रांगोळीचे देखील तेव्हा
मोठे अप्रूप वाटे. लाडू,चिवडा,कडबोळी, चकली च्या फ़राळावर सर्वांसमवेत मग ताव मारला
जात.वर्षातून फ़ारफ़ार तर दोन ड्रेस मिळत आणि ते ही कोणत्याही नामांकीत कंपनीच्या ‘ब्रॅंड’चे
नसलेले. तरिही त्यात संपूर्ण ‘कंफ़र्ट’ मिळत असे.बेताच्या परीस्थितीत देखील पूर्ण कुटुंब
मोठ्या आनंदाने आणि जल्लोशात दिवाळीचा सण साजरा करत.जे मिळते त्यातच मनसोक्त आनंद लुटून
समाधान मानण्यासा ‘संस्कार’ त्याकाळी आपल्या बालमनावर नकळत कोरला जात.
पण आज ती
मजा खरच राहिली आहे का ? ते संस्कार ती शिकवण कुठे हरवली आहे का ? सतत पैश्याच्या मागे
फ़िरणारे आम्ही हजारो रूपये खर्च करूनदेखील त्या आनंदाला मूकत चाललोय असे कधीतरी वाटते.
मोठ्ठाली घर, गाड्या,पैसा आज आपल्या दारात आहेत पण आपला आनंद, समाधान, स्वास्थ्य हरवत
चालल्यासारख वाटतय. कारण ‘लक्ष्मी’ च्या मागे लागताना आपण ‘पैश्याच्या’ मागे धावट सुटलोय
असे जाणवते.स्पर्धेच्या गतिमान चक्रात आपण अभिमन्यू प्रमाणे अडकत आहोत असे जाणवले की
मनाला क्लेश होतो.संपत्ती सर्वांना हवी असते पण पैसा आणि लक्ष्मी यातला फ़रक आपल्या
हजारो वर्षाच्या परिपक्व संकृतीने, जेष्ठ व्यक्तींनी आपल्याला समजावलाय.तो आपल्याला
समजलाच नाही हे लक्षात येते.
“जो
मागच्या दरवाजातून वा गुपचूप येतो, बायकोच्या कानात हळूच सांगतो,असतो भरपूर पण आनंदाबरोबर
कायम असमाधान आणि एक भिती घेवून येतो तो “पैसा”
व जो समोरच्या दारातून योग्य कष्टाच्या मोलात, वाजत, गाजत दिमाखात आणि फ़क्त आनंदच घेवून
येतो जिचा उपभोग केवळ आपणच नव्हे तर आपले कुटुंबीय आणि आपल्या आजूबाजूचा समाज देखील
मोठ्या समाधानाने, संयमाने घेतात ती “लक्ष्मी”.
अश्या
या पवित्र लक्ष्मी चा सण म्हणजे ही ‘दिपालवी’ ! “म्हणूनच या मंगल प्रसंगी आपल्या घरात
ती “लक्ष्मी” व तिचे पावित्र्य सदैव नांदो,आपली भरभराट होवो आणि आपणास निरोगी, समाधानी,आयुष्य
लाभो हिच या दिपावली च्या शुभदिनी ‘वाळिंबे’ परिवाराकडून परमेश्वर चरणी प्रार्थना
! ॥ शुभ दिपावली ॥
निलेश गो. वाळिंबे.