Tuesday, October 1, 2013

|| मढे घाट ||

पावसाळ्याचे दिवस आले की  मनाला कसा वेगळाच आनंद होतो, आणि मग त्या आनंदात आपल्या मनाचा गारवा शोधायला तूमच्या आमच्यासारखे सह्यप्रेमी निघतात त्या निसर्गाच्या कुशीत. मस्तपैकी पाऊस लुटायला, भिजायला. त्याच्या त्या जलधारांनी शरिरालाच नव्हे तर आपल्या मनालादेखील तो गारवा देण्यासाठी सगळे बाहेर पडतात.आम्हालादेखील पुढच्या आठवड्यात काही सवंगड्यांसमवेत किल्ले तोरणाची सफ़र घडवून आणायची होती. पण त्यांना खाली पायथ्याला जेवण देण्याचे ठरल्याने आज जेवणाचे पैसे देवून यायचे ठरले होते. याच कारणासाठी  सत्या आज सकाळी सकाळीच घरी हजर झाला म्हणाला, चला ते पैसे देवून जरा पाऊस बघून येऊयात. मग मुहूर्ताला मोडता कशाला कोण घालेल.. मी पण लगेच हो म्हणालो आणि आम्ही दोघांनी कात्रज गाठले. सकाळी सकाळी जातानाच वाटेत ‘पारिजातकाच्या’ सड्याने आणि त्याच्या सुघंधाने आम्हाला एकदम टवटवीत केले.त्याची काही छायाचित्रे टिपून पुढे मी, आमोद आणि सत्या ३ टाळकी निघाली आपल्या ‘मनाचा गारवा’ शोधायला...

गाडीतून चेलाडी फ़ाटा, नसरापूर मार्गे टुमदार अश्या वेल्ह्याच्या पायथ्याला पोचलो तेव्हा वरूणराज आमच्या स्वागताला तयारच होते. मागच्या महिन्यात उन्हाने भाजला गेलेला, महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तोरण्यावर निसर्गाने आपल हिरव मखमली तोरण चढवून त्याला कधीच सजवून टाकल होत. पावसाची रिमझीम, कुंद हवा, चहूबाजूला सह्याद्रीच्या कुशीतून पावसाची चाहूल देणारा हिरवागार पसरलेला तो गवतांचा, रानफ़ुलांचा भव्य मेळावा आणि इतिहासाची साक्ष देत शेकडो वर्षे रूबाबात उभा असलेला तोरणा बघताच मन अगदी प्रसन्न झाले.गडाच्या पायथ्याला ज्या खानावळ वाल्यांना पैसे देयचे होते ते देवून टाकले आणि पुढच्या आठवड्याची ऑर्डर पक्की करून टाकली. मग जरा थांबून गरमागरम कांदेपोहे आणि फ़क्कड कटींग मारता मारता आता या समोर पसरलेल्या निसर्गात काही काळ घालवूनच माघारी फ़िरण्याचा बेत झाला म्हणून गाडी माघारी घेण्याऎवजी पुन्हा थोडी पुढे दामटून निसर्गाने लयलूट केलेल्या व ऐतिहासीक महत्व असलेल्या अश्या ”मढे घाटाकडे” प्रस्थान केले.
                         
मढे घाट, मढे घाटाच्या सौदर्याला हळवी पण अतिशय पवित्र अशी किनार लाभलेली आहे.. आपल्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आपल्या राजाकडे, जीवलग मित्राकडे आपल्या परमेश्वराकडे गेलेला सुभेदार नरवीर तानाजी मालूसरे राजाच्या प्रेमापोटी मुलाचे लग्न बाजूला सारून प्रथम किल्ले कोंढाणा स्वराज्यात सामील करून घेण्याच्या मोहिमेसाठी आग्रह करू लागला. म्हणाला.. “राजे… आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे !” आपल्या भावाला ‘सूर्याजीला’ बरोबर घेवून जीवाची परवा न करता, आपल्या प्राणांची बाजी लावून तो थोर योद्धा, सिंहासारखा लढला अखेर धारातिर्थी पडला पण राजाचा गड तो कोंढाणा जिंकून घेतलाच.पश्चात त्या वीर सुभेदाराचे त्या योद्ध्याचे ते पार्थिव (मढे) त्यांच्या कोकणातील ‘उमरठ’ या गावी याच घाटमार्गातून नेण्यात आले तेव्हापासून या घाटाला ‘मढे घाट’ असे संबोधू लागले. काय काय माहिती असेल या घाटाला तिथल्या या निसर्गाला, काय काय पाहिले असेल याने. त्या थोर योद्ध्या चे पार्थीव या वाटेने जाताना किती अश्रू ढाळले असतील त्या घाटानी,तिथल्या कडेकपा-यांनी, पालखीवर चिरविश्रांती साठी निघालेल्या त्या तानाजीच्या चेह-यावर आपल्या मुलाच्या लग्नाची चिंतेची पुसट रेषाही नसेल कारण त्याला खात्री असेल माझा राजा हे सर्व यथायोग्य पार पाडेलच आणि मुलाच्या लग्नापेक्षा महत्वाचे आपले स्वराज्य, त्यासाठी कामी येणे यासारखा बहूमान नाही. उलट त्याच्या चेह-यावर असतील ते फ़क्त पराक्रमाचे भाव.आउसाहेबांचा आवडता कोंढाणा त्यांना मिळवून दिल्याबद्दल चेह-यावर उमटलेले समाधान.आपल्या सख्ख्या भावापेक्षा जवळचा आपला ताना आज या स्वराज्यासाठी कामी आला याचे दु:ख त्या राजाला देखील आवरले नसेल साक्षात त्याच्या आसवांनी ही पवित्र भूमि भिजली असेल. किती थोर असेल ती वाट आणि तो निसर्ग. या सगळ्या गोष्टींचा आज तो घाट साक्षीदार बनून  त्या जागी शेकडो वर्ष उभा आहे.आज त्या निसर्गाशी बोलायची कला मला जमली असती तर त्याने मला या सत्य कथा सांगितल्या असत्या. पूर्वाजन्मीचे पुण्य कदाचीत की आज त्या थोर वाटेवर आम्हास जायला मिळाले. धन्य ती वाट, धन्य तो तानाजी, धन्य ते राजे आणि धन्य तो निसर्ग. अश्या या पवित्र घाटात आम्ही पोहचलो होतो. तिथे कर्णावाडी नावाच्या वाडीत आम्ही गाडी लावली व वीर तानांजीचे स्मरण करून त्या अत्यंत शांत पण विलोभनीय जागेत भटकंतीला सुरूवात केली. 


                           थंड हवा, वा-याच्या झुळूकेनिशी नववधू प्रमाणे लाजणारी ती गवताची पाती, हातात हात गुंफ़ून जन्मोजंन्मांचे सोबती असल्याप्रमाणे वरून आपल्या प्रवासाला निघालेले ते काळे ढग जणू आपल हरवलेल कोणी सापडल की काय.. त्या अत्यानंदात त्या सह्याद्रीच्या अतीउंच कड्यांना त्या ढगांनी मारलेल्या त्या मिठ्या आणि आनंदाश्रू अनावर व्हावे तश्या धबाबा कोसळणा-या त्या जलधारा.त्या निसर्गाची ती किमया बघतच आम्ही बागडत होतो. डोंगर कड्यावरून आपल्या जिवाभावाच्या मैत्रीणीला त्या धरणीमातेला बिलगण्यासाठी आतूर झालेले अंगावर चंदेरी शाल पांघरून तीला बिलगणारे ते धबधबे खूपच मनमोहक दिसत होते. जागोजागी अवखळ  झरे आपल्या नागमोडी वाटांनी खळखळाट करत आपला आनंद व्यक्त करत होते.मधूनच येणा-या धूक्याच्या लाटांनी पहिला अंक संपून पडदा पडावा नी लगेच दुस-या अंकाला तितक्याच जोमाने सुरूवात व्हावी असा भास होत होता. शेतावर जीव ओवाळून टाकणारा शेतकरी दादापण जोमानी कामाला लागला होता. आपल्या ढवळ्या पवळ्याला पण त्यानी मदतीला आणल होत. मधेच १ बगळा त्या बैलाच्या पाठीवर बसून जणू आपल्याच हातात त्याची वेसण असल्याच्या थाटात भाव खावून जात होता. सभोवतालचे दाट जंगल पुर्णत: धुक्यात बुडाल्याने आमचा आता स्वर्गविहार सुरू होता. वातावरणातील त्या धुक्याच्या जादूने अगोदरच सुंदरता लाभलेल्या त्या वृक्ष वेली अजूनच विलोभनीय भासत होत्या. मढे घाटाची अजून एक ओळख पटवून देणारा म्हणजे तिथला महाकाय, उंचावरून कोसळणारा जलप्रपात. मनाला भूरळ घालणारा “लक्ष्मी धबधबा”.  त्याच्या त्या एकसंघ आवाजाने आता आम्ही त्याच्याकडे प्रस्थान केले. पूर्ण भरलेले आपले शुभ्रांग मोठ्या आवेशाने खाली कोकणात लोटून देताना दिसणारे ते विहंगम दृश्य.भगवान शंकराचे तांडव नृत्य सुरू असताना होणारा शंखनाद, असंख्य एकसंध मृदुंगाचे आवाज ज्याप्रमाणे भासत असतील तसा तो त्याचा नाद तो आवाज. पट्टीच्या गायकाने मल्हार आळवावा असे ते सूर. कोसळणा-या त्या प्रपाताचे ते विलोभनीय दृश्य पाहताना काही काळ आम्ही स्वत: लाच विसरून गेलो होतो. तो सोहळा कायमचा डोळ्यात साठवत पुन्हा माघारी फ़िरलो आणि दोन्ही बाजूला गर्द झाडीत वसलेल्या छोटेखानीच पण डुमदार ‘कर्णावाडीत’ येवून पोहचलो. फ़ारसा वेळ नसल्याने  आता परतीला निघायचे होते. गाडीत बसून पावसाची रिमझीम ऐकत वाटेत मग पोटपुजेला थांबलो. आज सत्याला फ़ारशी भूक नसल्याने तिघात फ़क्त १ व्हेज. थाळी, २ चिकन थाळी, १ अंडा मसाला, ४ रोट्या, भात, भजी आणि कोल्ड्रिंक एवढाच मेनू मागवला गेला.निसर्गाच्या कुशीत काही तास घालवल्यावर हवाहवासा वाटणारा तो मनाचा गारवा आता आम्हाला सापडला होता. ते मदमस्त वातावरण तो निसर्ग त्याची ती किमया, ती जादू , तो थंड वारा, ती हिरवळ सगळ सगळ कस उरात भरून घेतल होत. त्या निसर्गाचे “आभार” मानून पुन्हा येण्याच्या बोलीवर आम्ही परतीला निघालो होतो. धुक्याची नवलाई, मनाला चिंब करणा-या पावसाच्या सरी, मधूनच दाटून आलेल्या कृष्णमेघांना दूर सारून त्या अजस्त्र सह्यकड्यांना आणि हिरवाई ने नटलेल्या धरणी मातेला लखलखणा-या पाचूंचे रूप बहाल करणारे ते कोवळे कवडसे, साक्षात लक्ष्मी चे नाव धारण करून तिच्याप्रमाणेच ओथंबून वाहणारा तो अजस्त्र धबधबा हीच तर खर आम्हा सवंगड्यांच्या या छोट्याश्या निसर्गयात्रेची फ़लश्रुती होती !


भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे
९८२२८७७७६७


6 comments:

  1. परत एकदा अप्रतिम वर्णन!!!
    वाटत नाही वर्ष झाले जाऊन मढे घाट ला. परत एकदा सफर घडवून आणलीस...धन्यवाद अध्यक्ष :)

    ReplyDelete
  2. Apratim varnan! Madhe ghaat - bhet lavakarach ghadali paahije.
    -Atul

    ReplyDelete
  3. dhanyavad.....madhe ghat safar 1no.varnan kele tumhi............

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. Thanks for this amazing virtual tour of Madhe Ghat...Very well articulated and described!! Refeshing!

    ReplyDelete
  6. धन्यवाद मित्रांनो...

    ReplyDelete