Tuesday, October 29, 2013

॥ शुभ दिपावली ॥

जागोजागी आकाश कंदील, पणत्यांचे स्टॉल दिसू लागले, की वेध लागायचे ते दिवाळीच्या सुट्टीचे. घराघरातून भाजण्यांचा सुटलेला खमंग वास मग उरात साठवून आम्ही पोर नदी, बांधकाम सुरू असलेली एखादी इमारत, मैदान अश्या जागांवरून दगड,माती गोळा करून मग किल्ला बनवत. आपला किल्ला झाला की नंतर मित्राचा असे अनेक किल्ले मोठ्या आनंदाने बनवले जात. आधुनिकतेचा वारसा जपण्य़ासाठी मग त्या किल्ल्यांनमधे एखादे कारंजे, विमान, विमानतळ, रेल्वे, पवनचक्की हे देखील दाखवले जात. एकमेकांना मदत करण्याची, आधुनिकतेचा वारसा जपण्याची, आपल्या सह्याद्रीचा अभिमान बाळगण्याची, प्राणांची बाजी लावणा-या मावळ्यांचा, राजांचा मान राखण्याची सवय, एकत्रपणे कष्ट करण्याची गोडी आपोआप लागली जात.
घरची परिस्थीती तशी बेताचीच त्यामुळे आम्हा दोन भावात मिळून ५० रूपयांपेक्षा जास्त फ़टाके आणायचे नाहीत हे आईने अगोदरच बजाबलेले असे. मग बाबांबरोबर सारसबागेत फ़टाक्यांच्या दुकानांकडे आमचा मोर्चा वळत असे. मी पानपट्टी घेतो, तू लवंगी घे अश्या चर्चा  आम्हा भावांमधे घडत आणि जेमतेम एका लहान पिशवीत मावतील  एवढे फ़टाके घेवून आम्ही परतत असू. घरी आल्यावर रात्री जागून लवंगीच्या सरीतला एकएक फ़टाका सुट्टा करून सर्व फ़टाके दोघांमधे मग मोठ्या आनंदाने समान वाटून दोन मोठ्या पिशव्या केल्या जात. तशी शिकवणच दिली जात असे.भावांमध्ये सारख वाटून एकत्र आनंद लुटण्याचा मजा काही औरच होता हे नक्कीच त्या वयात देखील उमजत असे.
मोती साबण, उटणे लावून केलेले अभ्यंग स्नान.ताटाच्या बाजूने काढलेल्या रांगोळीचे देखील तेव्हा मोठे अप्रूप वाटे. लाडू,चिवडा,कडबोळी, चकली च्या फ़राळावर सर्वांसमवेत मग ताव मारला जात.वर्षातून फ़ारफ़ार तर दोन ड्रेस मिळत आणि ते ही कोणत्याही नामांकीत कंपनीच्या ‘ब्रॅंड’चे नसलेले. तरिही त्यात संपूर्ण ‘कंफ़र्ट’ मिळत असे.बेताच्या परीस्थितीत देखील पूर्ण कुटुंब मोठ्या आनंदाने आणि जल्लोशात दिवाळीचा सण साजरा करत.जे मिळते त्यातच मनसोक्त आनंद लुटून समाधान मानण्यासा ‘संस्कार’ त्याकाळी आपल्या बालमनावर नकळत कोरला जात.
पण आज ती मजा खरच राहिली आहे का ? ते संस्कार ती शिकवण कुठे हरवली आहे का ? सतत पैश्याच्या मागे फ़िरणारे आम्ही हजारो रूपये खर्च करूनदेखील त्या आनंदाला मूकत चाललोय असे कधीतरी वाटते. मोठ्ठाली घर, गाड्या,पैसा आज आपल्या दारात आहेत पण आपला आनंद, समाधान, स्वास्थ्य हरवत चालल्यासारख वाटतय. कारण ‘लक्ष्मी’ च्या मागे लागताना आपण ‘पैश्याच्या’ मागे धावट सुटलोय असे जाणवते.स्पर्धेच्या गतिमान चक्रात आपण अभिमन्यू प्रमाणे अडकत आहोत असे जाणवले की मनाला क्लेश होतो.संपत्ती सर्वांना हवी असते पण पैसा आणि लक्ष्मी यातला फ़रक आपल्या हजारो वर्षाच्या परिपक्व संकृतीने, जेष्ठ व्यक्तींनी आपल्याला समजावलाय.तो आपल्याला समजलाच नाही हे लक्षात येते.
“जो मागच्या दरवाजातून वा गुपचूप येतो, बायकोच्या कानात हळूच सांगतो,असतो भरपूर पण आनंदाबरोबर कायम  असमाधान आणि एक भिती घेवून येतो तो “पैसा” व जो समोरच्या दारातून योग्य कष्टाच्या मोलात, वाजत, गाजत दिमाखात आणि फ़क्त आनंदच घेवून येतो जिचा उपभोग केवळ आपणच नव्हे तर आपले कुटुंबीय आणि आपल्या आजूबाजूचा समाज देखील मोठ्या समाधानाने, संयमाने घेतात ती “लक्ष्मी”.
अश्या या पवित्र लक्ष्मी चा सण म्हणजे ही ‘दिपालवी’ ! “म्हणूनच या मंगल प्रसंगी आपल्या घरात ती “लक्ष्मी” व तिचे पावित्र्य सदैव नांदो,आपली भरभराट होवो आणि आपणास निरोगी, समाधानी,आयुष्य लाभो हिच या दिपावली च्या शुभदिनी ‘वाळिंबे’ परिवाराकडून परमेश्वर चरणी प्रार्थना ! ॥ शुभ दिपावली ॥


निलेश गो. वाळिंबे.   


Tuesday, October 1, 2013

|| मढे घाट ||

पावसाळ्याचे दिवस आले की  मनाला कसा वेगळाच आनंद होतो, आणि मग त्या आनंदात आपल्या मनाचा गारवा शोधायला तूमच्या आमच्यासारखे सह्यप्रेमी निघतात त्या निसर्गाच्या कुशीत. मस्तपैकी पाऊस लुटायला, भिजायला. त्याच्या त्या जलधारांनी शरिरालाच नव्हे तर आपल्या मनालादेखील तो गारवा देण्यासाठी सगळे बाहेर पडतात.आम्हालादेखील पुढच्या आठवड्यात काही सवंगड्यांसमवेत किल्ले तोरणाची सफ़र घडवून आणायची होती. पण त्यांना खाली पायथ्याला जेवण देण्याचे ठरल्याने आज जेवणाचे पैसे देवून यायचे ठरले होते. याच कारणासाठी  सत्या आज सकाळी सकाळीच घरी हजर झाला म्हणाला, चला ते पैसे देवून जरा पाऊस बघून येऊयात. मग मुहूर्ताला मोडता कशाला कोण घालेल.. मी पण लगेच हो म्हणालो आणि आम्ही दोघांनी कात्रज गाठले. सकाळी सकाळी जातानाच वाटेत ‘पारिजातकाच्या’ सड्याने आणि त्याच्या सुघंधाने आम्हाला एकदम टवटवीत केले.त्याची काही छायाचित्रे टिपून पुढे मी, आमोद आणि सत्या ३ टाळकी निघाली आपल्या ‘मनाचा गारवा’ शोधायला...

गाडीतून चेलाडी फ़ाटा, नसरापूर मार्गे टुमदार अश्या वेल्ह्याच्या पायथ्याला पोचलो तेव्हा वरूणराज आमच्या स्वागताला तयारच होते. मागच्या महिन्यात उन्हाने भाजला गेलेला, महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तोरण्यावर निसर्गाने आपल हिरव मखमली तोरण चढवून त्याला कधीच सजवून टाकल होत. पावसाची रिमझीम, कुंद हवा, चहूबाजूला सह्याद्रीच्या कुशीतून पावसाची चाहूल देणारा हिरवागार पसरलेला तो गवतांचा, रानफ़ुलांचा भव्य मेळावा आणि इतिहासाची साक्ष देत शेकडो वर्षे रूबाबात उभा असलेला तोरणा बघताच मन अगदी प्रसन्न झाले.गडाच्या पायथ्याला ज्या खानावळ वाल्यांना पैसे देयचे होते ते देवून टाकले आणि पुढच्या आठवड्याची ऑर्डर पक्की करून टाकली. मग जरा थांबून गरमागरम कांदेपोहे आणि फ़क्कड कटींग मारता मारता आता या समोर पसरलेल्या निसर्गात काही काळ घालवूनच माघारी फ़िरण्याचा बेत झाला म्हणून गाडी माघारी घेण्याऎवजी पुन्हा थोडी पुढे दामटून निसर्गाने लयलूट केलेल्या व ऐतिहासीक महत्व असलेल्या अश्या ”मढे घाटाकडे” प्रस्थान केले.
                         
मढे घाट, मढे घाटाच्या सौदर्याला हळवी पण अतिशय पवित्र अशी किनार लाभलेली आहे.. आपल्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आपल्या राजाकडे, जीवलग मित्राकडे आपल्या परमेश्वराकडे गेलेला सुभेदार नरवीर तानाजी मालूसरे राजाच्या प्रेमापोटी मुलाचे लग्न बाजूला सारून प्रथम किल्ले कोंढाणा स्वराज्यात सामील करून घेण्याच्या मोहिमेसाठी आग्रह करू लागला. म्हणाला.. “राजे… आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे !” आपल्या भावाला ‘सूर्याजीला’ बरोबर घेवून जीवाची परवा न करता, आपल्या प्राणांची बाजी लावून तो थोर योद्धा, सिंहासारखा लढला अखेर धारातिर्थी पडला पण राजाचा गड तो कोंढाणा जिंकून घेतलाच.पश्चात त्या वीर सुभेदाराचे त्या योद्ध्याचे ते पार्थिव (मढे) त्यांच्या कोकणातील ‘उमरठ’ या गावी याच घाटमार्गातून नेण्यात आले तेव्हापासून या घाटाला ‘मढे घाट’ असे संबोधू लागले. काय काय माहिती असेल या घाटाला तिथल्या या निसर्गाला, काय काय पाहिले असेल याने. त्या थोर योद्ध्या चे पार्थीव या वाटेने जाताना किती अश्रू ढाळले असतील त्या घाटानी,तिथल्या कडेकपा-यांनी, पालखीवर चिरविश्रांती साठी निघालेल्या त्या तानाजीच्या चेह-यावर आपल्या मुलाच्या लग्नाची चिंतेची पुसट रेषाही नसेल कारण त्याला खात्री असेल माझा राजा हे सर्व यथायोग्य पार पाडेलच आणि मुलाच्या लग्नापेक्षा महत्वाचे आपले स्वराज्य, त्यासाठी कामी येणे यासारखा बहूमान नाही. उलट त्याच्या चेह-यावर असतील ते फ़क्त पराक्रमाचे भाव.आउसाहेबांचा आवडता कोंढाणा त्यांना मिळवून दिल्याबद्दल चेह-यावर उमटलेले समाधान.आपल्या सख्ख्या भावापेक्षा जवळचा आपला ताना आज या स्वराज्यासाठी कामी आला याचे दु:ख त्या राजाला देखील आवरले नसेल साक्षात त्याच्या आसवांनी ही पवित्र भूमि भिजली असेल. किती थोर असेल ती वाट आणि तो निसर्ग. या सगळ्या गोष्टींचा आज तो घाट साक्षीदार बनून  त्या जागी शेकडो वर्ष उभा आहे.आज त्या निसर्गाशी बोलायची कला मला जमली असती तर त्याने मला या सत्य कथा सांगितल्या असत्या. पूर्वाजन्मीचे पुण्य कदाचीत की आज त्या थोर वाटेवर आम्हास जायला मिळाले. धन्य ती वाट, धन्य तो तानाजी, धन्य ते राजे आणि धन्य तो निसर्ग. अश्या या पवित्र घाटात आम्ही पोहचलो होतो. तिथे कर्णावाडी नावाच्या वाडीत आम्ही गाडी लावली व वीर तानांजीचे स्मरण करून त्या अत्यंत शांत पण विलोभनीय जागेत भटकंतीला सुरूवात केली. 


                           थंड हवा, वा-याच्या झुळूकेनिशी नववधू प्रमाणे लाजणारी ती गवताची पाती, हातात हात गुंफ़ून जन्मोजंन्मांचे सोबती असल्याप्रमाणे वरून आपल्या प्रवासाला निघालेले ते काळे ढग जणू आपल हरवलेल कोणी सापडल की काय.. त्या अत्यानंदात त्या सह्याद्रीच्या अतीउंच कड्यांना त्या ढगांनी मारलेल्या त्या मिठ्या आणि आनंदाश्रू अनावर व्हावे तश्या धबाबा कोसळणा-या त्या जलधारा.त्या निसर्गाची ती किमया बघतच आम्ही बागडत होतो. डोंगर कड्यावरून आपल्या जिवाभावाच्या मैत्रीणीला त्या धरणीमातेला बिलगण्यासाठी आतूर झालेले अंगावर चंदेरी शाल पांघरून तीला बिलगणारे ते धबधबे खूपच मनमोहक दिसत होते. जागोजागी अवखळ  झरे आपल्या नागमोडी वाटांनी खळखळाट करत आपला आनंद व्यक्त करत होते.मधूनच येणा-या धूक्याच्या लाटांनी पहिला अंक संपून पडदा पडावा नी लगेच दुस-या अंकाला तितक्याच जोमाने सुरूवात व्हावी असा भास होत होता. शेतावर जीव ओवाळून टाकणारा शेतकरी दादापण जोमानी कामाला लागला होता. आपल्या ढवळ्या पवळ्याला पण त्यानी मदतीला आणल होत. मधेच १ बगळा त्या बैलाच्या पाठीवर बसून जणू आपल्याच हातात त्याची वेसण असल्याच्या थाटात भाव खावून जात होता. सभोवतालचे दाट जंगल पुर्णत: धुक्यात बुडाल्याने आमचा आता स्वर्गविहार सुरू होता. वातावरणातील त्या धुक्याच्या जादूने अगोदरच सुंदरता लाभलेल्या त्या वृक्ष वेली अजूनच विलोभनीय भासत होत्या. मढे घाटाची अजून एक ओळख पटवून देणारा म्हणजे तिथला महाकाय, उंचावरून कोसळणारा जलप्रपात. मनाला भूरळ घालणारा “लक्ष्मी धबधबा”.  त्याच्या त्या एकसंघ आवाजाने आता आम्ही त्याच्याकडे प्रस्थान केले. पूर्ण भरलेले आपले शुभ्रांग मोठ्या आवेशाने खाली कोकणात लोटून देताना दिसणारे ते विहंगम दृश्य.भगवान शंकराचे तांडव नृत्य सुरू असताना होणारा शंखनाद, असंख्य एकसंध मृदुंगाचे आवाज ज्याप्रमाणे भासत असतील तसा तो त्याचा नाद तो आवाज. पट्टीच्या गायकाने मल्हार आळवावा असे ते सूर. कोसळणा-या त्या प्रपाताचे ते विलोभनीय दृश्य पाहताना काही काळ आम्ही स्वत: लाच विसरून गेलो होतो. तो सोहळा कायमचा डोळ्यात साठवत पुन्हा माघारी फ़िरलो आणि दोन्ही बाजूला गर्द झाडीत वसलेल्या छोटेखानीच पण डुमदार ‘कर्णावाडीत’ येवून पोहचलो. फ़ारसा वेळ नसल्याने  आता परतीला निघायचे होते. गाडीत बसून पावसाची रिमझीम ऐकत वाटेत मग पोटपुजेला थांबलो. आज सत्याला फ़ारशी भूक नसल्याने तिघात फ़क्त १ व्हेज. थाळी, २ चिकन थाळी, १ अंडा मसाला, ४ रोट्या, भात, भजी आणि कोल्ड्रिंक एवढाच मेनू मागवला गेला.निसर्गाच्या कुशीत काही तास घालवल्यावर हवाहवासा वाटणारा तो मनाचा गारवा आता आम्हाला सापडला होता. ते मदमस्त वातावरण तो निसर्ग त्याची ती किमया, ती जादू , तो थंड वारा, ती हिरवळ सगळ सगळ कस उरात भरून घेतल होत. त्या निसर्गाचे “आभार” मानून पुन्हा येण्याच्या बोलीवर आम्ही परतीला निघालो होतो. धुक्याची नवलाई, मनाला चिंब करणा-या पावसाच्या सरी, मधूनच दाटून आलेल्या कृष्णमेघांना दूर सारून त्या अजस्त्र सह्यकड्यांना आणि हिरवाई ने नटलेल्या धरणी मातेला लखलखणा-या पाचूंचे रूप बहाल करणारे ते कोवळे कवडसे, साक्षात लक्ष्मी चे नाव धारण करून तिच्याप्रमाणेच ओथंबून वाहणारा तो अजस्त्र धबधबा हीच तर खर आम्हा सवंगड्यांच्या या छोट्याश्या निसर्गयात्रेची फ़लश्रुती होती !


भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे
९८२२८७७७६७


Tuesday, June 4, 2013

तो आला !

आज ऑफ़िसच्या बंद काळ्या काचांच्या आड नित्यनियमाने काम सुरू होते. पण मन सकाळपासूनच कुठेतरी हरवले होते.. आहो का काय विचारता. सकाळी येतानाच ‘ती’ ज्याची आतूरतेने वाट बघतीये असा ‘तो’ लवकरच येतोय असा संदेश आला होता. सकाळीच लक्षात आल होत तिच्या.. त्या धरणीमातेच्या. येणा-या जाण्या-या च्या डोळ्यांत धूळ उडवत, दरवाजे खीडक्या वाजवत, रस्त्यावरचा सारा पाचोळा उधळत, आत्ताच काढलेला केर गावभर पसतर ती, एखाद्या नुकत्याच तारूण्यात आलेल्या सुंदर तरूणीला आपला स्वप्नातला तो राजकूमार, तोच प्रियकर भेटून जो आनंद होतो आणि मग ती जशी अल्लड्पणे सैरभैर पळत सूटते अगदी तशीच ती ‘वावटळ’ तीला निरोप देउन गेली होती. काय सांगू काय आनंद झाला होता तीला. आतातर तीची तयारी देखील सुरू झाली असेल…
त्याच्या स्वागताला आता ढगांचे ढोल आणि विजांचे ताशे येतील, त्याच्या आगमनावर त्या टप्पो-या थेंबांच्या  लेझीमतालाने सारा आसमंत वाजू लागेल, मोर आपला मोहक पिसारा फ़ुलवून थूई थूई नाचू लागेल. आजवर बहरलेला तो गुलमोहर आपल्या लाल फ़ूलांचा गालीछा सा-या रस्त्यावर पसरवेल.तो येणार म्हणून धरणीमाता आपल्या मातीत लपलेल्या “अत्तराची कूपी” या पृथ्वीवर सडयासारखी शिंपडेल आणि सारी पृथ्वी आणि निसर्ग फ़ुलून जाईल. तूमच्या आमच्यासारखे ‘जीव’ देखील त्या गंधाने सुखावतील. सप्तरंगांची उधळण करत इंद्रधनूची कमान उभारून ती त्याच स्वागत करेल.चहूकडे हिरव्या रंगाच्या असंख्य छ्टा पसरतील आता मी नटणार, सजणार या निसर्गाला बहर येणार.अस ती म्हणत असेल आणि तिकडे….
खिडकीतून डोळे किलकीले करीत आजोबा आपल्या अर्धांगिनीकडे बघून आपली कवळी सावरत एक स्मीतहस्य करतील, क्षणात या निसर्गाच्या कृपेने याच्याच आगमनाने दोघे आपल्या तारूण्यातल्या त्या नाजूक आठवणीत हरवून जातील, ‘ईश्श काहीतरीच तूमच आपल !’ या कायम हवाश्या वाटणा-या वाक्याने आजोबा मनोमन खूष होतील.हातातील जपमाळेला जरा आराम पडेल आणि जून्या नाजूक आठवणी, गप्पांमधे दोघे रंगून जातील. गप्पा मारताना आजोबा नातवंडासाठी कागदाच्या होड्या बनवून देतील तर आजी गरमागरम कुरडई च्या खाऊच पोरांसाठी तळण तळेल. आता नातवंड देखील रत्यावर झालेल्या ओढ्यातून आपली नाव सोडतील, ती मधेच पडेल, मधेच अडेल कदाचीत बूडेल, पण काहीही झाल तरी आपली ती कागदी बोट तरावी त्या कृत्रीम लाटांना पार करत रस्त्याच्या त्या बाजूला जावी म्हणून प्रयत्न सुरूच असतील. एक बुडाली तर काय झाल, दुसरी बनवली जाईल माझी नाही पण ताईची तिकडे पोहचली म्हणून देखील एकच जल्लोश केला जाईल.हार न मानण्याचा आणि दुस-याच्या आनंदात सहभागी होण्याचा ‘संस्कार’ आपोआप त्या बालमनांवर रूजला जाईल.पायातली स्लीपर पाण्याबरोबर वाहून जाताना मागे पळून तीला पकडण्यासाठी पोरांची पळापळ सुरू असेल. चिखलाची परवा न करता एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण सुरूच असेल.
ऑफ़ीसातून निघताना तीला घरी घेवून जायचय हे तो विसरला नसेल, गाडीवरून ट्राफ़ीकमधून भिजत निघाला असेल जाताना आपल्या पुढच्याच्या गाडीचा चिखल चूकवत आपल्या गाडीने मागच्याला भरवायचा खोडकर आनंद त्याला मिळत असेल. जाताना सिग्नल ला अडोश्याल्या उलटी करून ठेवलेल्या काळ्या छत्रीत ती पांढरी शूभ्र मोग-याची फ़ूल ठेवून स्वत: पावसात भिजत उभा असलेला तो पो-या त्याच्या नजरेस नक्कीच पडेल १० चे ३ गजरे घेउन तो पुढे निघेल.ती बसमधून उतरत आपली रंगींत छत्री उघडत स्वत: ला सावरत त्याला म्हणेल,’सांगत होते रेनकोट घे बरोबर..’ त्यावर तो फ़क्त स्मितहास्य देत तिच्या छत्रीत शिरत थोडा आडोश्याला उभा राहील, मग खिशातले ते मोग-याचे हार आपल्या ओंझळीत घेऊन तिच्या चेह-याजवळ नेत तिला निरखेल, डोळे मिटून त्या ताज्या मोग-याचा मंद वास घेत त्याचा ओला स्पर्श ती अनूभवत असेल. जणू जगातली सर्वात महाग भेट मिळाल्याच्या आनंद तिच्या नजरेत बघताना, छत्रीतून ओघळणारे ते थेंब तिच्या केसांवर पडतील आणि ओली झालेली ‘बट’ झटकण्याची ती अदा बघतानाच त्या थेंबाचे तूषार नकळत त्याच्या चेह-यावर उडतील. त्या टप्पो-या थेंबात विरघळणारी ती आणि तिच्यात विरघळणारा तो आता ऑफ़ीसातून उचलून आणलेल्या टिशु पेपरने आपल्या मोबाईलवर जमलेली वाफ़ पूसेल आणि घरी फ़ोन करून पावसामूळे जरा उशीर होतोय अशी बतावणी करेल. दोघे मस्त गरमागरम कांदा भजी आणि कडक चहा मारूनच घराकडे निघतील.गेल्यावर मऊ मूगाची खिचडी आणि पापडाचा मेनू ठरला असेल. नकळत  त्यांना देखील आपले प्रेमाचे दिवस आठवून मनाला गुदगुल्या होतील ते देखील आज अजूनच तरूण झाले असतील.अशीच जन्मभर साथ निभावण्याच्या शपथा आपोआपच मनामधे घेतल्या जातील.सगळे दिवस कसे मखमली वाटू लागतील.नुकत्याच तारूण्यात प्रवेश केलेले तरूण तरूणींच तर विचारूच नका. या धरणीला जो आनंद झाला, जो बहार आला  तोच त्यांच्यात पण दिसत असेल. कॉलेज बूडवून मग प्लान होतील, गुपचूप एक कोरडा ड्रेस सॅकमध्ये लपवून ते दोघ बाहेर पडतील, अखंड जलधारात न्हाऊन निघताना त्या खट्याळ मनांना प्रेमाच्या लाटांची एक अनामीक धूंदी चढलेली असेल. गरमागरम कणीस, उकडलेल्या शेंगाची चव आज भलतीच न्यारी लागत असेल. कवी आपली ‘लेखणी’ घेवून बसेल त्याच्या शब्दांनी आज काळजाचा वेध घेतला असेल. तर गायकाचा सूर लागुन त्यातून ‘मल्हार’ उमटेल त्या सूरांनी आज सप्तरंग उधळले असतील.सगळ्याच कलाकारांच्या कलेला कसे एक उधाण आले असेल. सह्याद्रीची बात तर विचारूच नका. त्याच्या कुशीतून असंख्य जलप्रपात कोसळत असतील,हळदही न उतरलेल्या सर्व दागीन्यांनी नटलेल्या नववधूच्या चेह-याची ती लकाकी त्याच्या चेह-यात ओसंडत असेल.आपल्या सहवासात आजवर राहीलेल्या त्या नदिची भेट तिच्या प्रियकर सागराशी घडणार असेल.तिलादेखील आनंदाने पूर आला असेल. निसर्गाचा पूरता दंगा सुरू असेल. झाड,वेली पार बहरून निघतील पानांवर मोत्यांच्या रांगांचा शिवणापाणीचा खेळ रंगला असेल. सगळीकडे कसा फ़क्त आनंद असेल. महत्वाच म्हणजे क्षूद्र अश्या माणूस जातीच्या मनाला आलेली ‘कूबट’ स्वच्छ होईल.त्याच्या विचारांना लागलेली जळमटे आज धूतली जातील त्यानेच मळवलेला तो निसर्ग एकदम साफ़ चकचकीत होईल, शेतकरी दादाच्या डोळ्याचे अश्रू पूसले जातील, बैलजोडीला तयार करत आपल्या ‘हीला’ या सणाला एक तरी दागीना घडवायचा हे स्वप्न उराशी बाळगत तो कामाला लागेल.आपल्या पोटाचा प्रश्ण सूटेल आणि त्या काळ्या आईच्या कुशीत आज पून्हा अंकूर उगवेल.कारण आज तीचा बहर घेवून येणारा ‘तो’ वरूणराज तीला भेटायला आला असेल, तिच्याशी खेळायला आला असेल, तिला आता तो सांभाळणार असेल पूरत्या एका वर्षासाठी.

भेटा अथवा लिहा, (शक्यतो भेटाच)

निलेश गो. वाळिंबे 
९८२२८७७७६७



Thursday, January 10, 2013

कोंडनाळीतूक कोकणकडे…. ! प्रवास नूतन वर्षाचा.


सह्याद्री, त्याच्या कुशीत शिराव त्याचे ते उंच कडे आणि इतिहास जागे करणारे किल्ले यांच्या सानिध्यात रात्र घालवावी, छ. शिवरायांच्या स्मरणाने स्फूर्ती घेऊन आयुष्याच्या रहाटगाड्याला जुंपलेल्या या माणसांनी एक नवी चेतना मिळवून एका नवीन उर्जेने ताजेतवाने व्हाव आणि पुन्हा एकदम फ्रेश मुडने नव्या वर्षातील जबाबदा-यांना सामोरे जाव असं आम्हा सर्वांनाच वाटत होत.मग काय इतिहासाचा साक्षीदार असलेला तो सह्याद्री ज्याने अनेक सत्ताधीश अनुभवले त्याच्या पोटात शिरायच ते थेट आपल्या निसर्गसमृद्धतेचा वारसा लाभलेल्या सर्वांच्याच आवडत्या अश्या कोकणात उतरायच ठरलं आणि मेलामेली पूर्ण होऊन दिवस ठरले २९,३०,३१ आणि १ जाने. २०१३ 
२९ डिसेंबर २०१२ पहाटे ६ वा स्वारगेट बस स्थानकात जमून ६.१५ च्या महाबळेश्वर बसने प्रयाण करण्याचे ठरले आणि एस. टी. महामंडळाच्या परंपरेला गालबोट लागेल अश्या पद्धतीने वागून सव्वा सहाची बस चक्क सव्वा सहालाच निघाली.पण…. पण भरारी ग्रूप चे “T मास्टर” विकास पोखरकर उर्फ़ कात्या यांनी मात्र भरारी ग्रूपच्या परंपरेला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागता कामा नये याची दक्षता घेतलीच.सकाळी ६.१५ ची बस स्वारगेट स्थानकातून बाहेर पडली आणि तीच बस पकडण्याकरीता विकास बरोब्बर ६.१५ लाच पाषाण च्या आपल्या घरातून बाहेर पडला. मग काय, साहेब येस्तोवर त्या बस ला रामराम ठोकून मस्त गरमागर चहा आणि तोफ़ांवर (क्रिमरोल) ताव मारून शेवट पुढच्या म्हणजेच ७.३० च्या बसने सर्व कार्यकर्ते गणरायचे नामस्मरण करून बसमधे बसले आणि ‘टिंग टिंग’ करून  कंडक्टर साहेबांनी ‘डबल’ दिली.  
महाबळेश्वर स्थानकावरून आता आम्हाला पुढच्या बसने दुधगाव हे गाव गाठायचे होते परंतू येथे मात्र महामंडळाने आपली परंपरेला अनुसरून पुढचे ३ तास आमचे पुतळे केले. तेवढ्या वेळात महाबळेश्वरात किराणा खरेदी झाली. मी आणि आमोद नी कात्याला (विकास) खास महाबळेश्वर मेड ट्रेकिंग सॅक घेतली आणि त्याच्या आधिच्या पर्स वजा सॅकसह जेवणाचा बराचसा शिधा त्यात कोंबला.तर शाहूने (निलेश महाडीक) आमच्यासाठी अर्धा किलो फ़ूटाणे आणले.बस ची वाट पहाता पहाता आता सूर्य डोक्यावर आला होता आणि माझे जवळपास सगळे म्हणजे अर्धा किलो फ़ुटाणे संपत आले होते शेवटी बस चा नाद सोडून खाजगी जीप वाल्याला विनंती करून पैष्याची घासागिस करत आम्ही निघालो.(ही अविस्मरणीय अशी जीप आणि त्याचा चालक यांच्यावर एक वेगळा लेख टंकायचा माझा मानस आहे. वेळ मिळाल्यास आपणासाठी अवश्य सादर करेन) वळणावळणाचा घाट रस्ता,जिपमधे देखील आडव झोपायची हौस (खाज),उन्हात खाल्लेले अर्धा किलो फ़ुटाणे आणि बाकी कोणालाही वाटा न दिल्यामूळे जी  फ़ळे भोगावी लागतात ती मलाही भोगावी लागली आणि आमच ‘कोंबड आरवलं’!  शेवट “वकार युनूस” च्या बॉलींगवर माझी विकेट उडाली आणि भरारी च्या सैनिकांनी टाळ्यांच्या गजरात पुढचा प्रवास सुरू केला. (अर्थबोध झाला नसेल तर मला फ़ुटाणे खायला घालून माझ्याबरोबर घाटाचा प्रवास करा.) साधारण ४ च्या सुमारास आम्ही “चतूर्बेट ” गावी उतरलो आणि कूच केले किल्ले मधू-मकरंद गडाकडे. २ तासांच्या पायपिटीअंती आम्ही गडाच्या खांद्यावर असलेल्या ‘घोणसवाडी’ या लहान पण स्वच्छ आणि टुमदार अश्या गावी पोहचलो. एकतर संपूर्ण शाकाहारी आणि मला प्रचंड आवडलेली गोष्ट म्हणजे एकही “कुत्र” नसलेल हे आजवर पाहिलेल एकमेव गाव होय. ह्या गावात तिथल्या अत्यंत प्रेमळ लोकांच्या साथीत आपण एक दिवस तरी घालवलाच पाहीजे हे सर्वांनाच वाटत होते, (मला तर समजलय की गावात कुत्र नाही म्हणून ‘बिक्या’ म्हणे इकडे सहकुटूंब शिफ़्ट होण्याच्या विचारात आहे [ बिक्या- भरारी ग्रुप मधील अशी व्यक्ती आहे कि ज्याला कुत्रे आवडत नाहीत पण कुत्र्यांचे त्याच्यावर प्रचंड प्रेम आहे ] ) तसही तिन्हीसांज होत होती त्यामुळे गडावर मुक्काम करण्यापेक्षा इथेच चूल मांडण्याचा निर्णय झाला आणि सख्ख्या आजीची आठवण करून देणा-या श्रीमती जानकी आज्जींच्या सुंदर अश्या शेणाने सारवलेल्या अंगणात आम्ही मुक्काम ठोकला.
श्रीमती जानकी आंज्जींसमवेत मंडळी, मुक्काम पहिला.
बल्लवाचार्यांचे मानाचे ‘उपरणे’ माझ्या खांद्यावर टाकून मला चूलींचा ताबा देण्यात आला.कात्या चूल पेटवत होता तर अमोद आणि हिमाल्यपूत्र उर्फ़ सुदीप आकाशातले तारे बघत आपल्या ‘अकलेचे तारे’ तोडत होते. शाहू आणि राक्या बाकी तयारी करत होते.थोड्या वेळातच फ़ोडण्या तडकल्या आणि आजच्या रात्रीला मस्त मटार उसळ आणि गरमागरम भात असा मेनू तयार झाला. ‘एक साधी काडी देखील सापडणार नाही अस सारवलेल स्वच्छ अंगण, हवेत छान गारवा एका बाजूला दिमाखदारपणे शेकडो वर्षे आपले पाय रोवून उभा असलेला सह्यद्रीतला तो मकरंद गड, नूकताच पोर्णीमेने सूंदर रूपडे धारण केलेला तो गोरापान चांदोमामा त्याच्या साथीला चमचमणा-या तारका, या सगळ्यांच्या संगतीत मस्त मटार उसळ रस्सा, गरमागरम भातावर ताव मारून मंडळींनी तृप्तीचे ढेकर दिले व त्याच अथांग अवकाशाखाली आम्ही पोरांनी आपापल्या पथा-या पसरल्या आणि गप्पांच्या रंगात मध्यरात्र उलटून गेल्यावर निद्रदेवतेनी सर्वांच्या नयनांवर आरूढ होवून सर्वांचा ताबा कधी घेतला हे कळालेच नाही’.
३०डिसेंबर २०१२ सकाळी ६ च्या सुमारास सर्वांना जाग आली. कात्या आणि शाहू च्या कृपेमुळे प्रसंन्न वातावरणात धारोष्ण दुधाचा फ़क्कड चहा पुढ्यात हजर झाला.चहापान आणि प्रार्तविधी आटोपून आम्ही सर्व साहित्य जानकी आज्जींच्या ओसरीवरच सोडून तडक मकरंद गडावर कूच केले.पांडवकाळात घेउन जाणारा हा किल्ला फ़ारसा मोठा नसून गडावर सुंदर असे ‘शिवाल्य’ बघावयास मिळते.येथे गावतल्या जंगमांकडून दररोज यथासांग पुजापाठ केला जात असून एक जागृत देवस्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे. पांडव अज्ञातवासात असताना या गडावर वास्तव्यास होते त्यावेळी त्यांनी रक्त्या तलाव, मुंगळे तलाव, फ़ुटक्या तलाव अश्या विविध नावांचे एकूण सात तलाव खोदले अशी येथिल अख्यायिका प्रसिद्ध आहे. हे सातिही तलाव आजही आपण पाहू शकतो. एका बाजूला महाबळेश्वर आणि प्रसिद्ध असे जावळी खोरे तर दुसरीकडे चकदेव पर्वत आणि खाली कोकणात उतरणारी भयंकर दरी आपल्या काळजाचा ठोका चुकवते, डाव्या हाताला चमचमणारे कोयना धरणाचे पाणी आपल्या नागमोडी वळणाने लांबवर गेलेले अतिशय विलोभनीय दिसते.चहूकडे दिसणारा अवर्णनीय असा तो नजारा मनात आणि कॅमेरात साठवून मंदिरी पोहचलो आणि ‘शिवनामाचा जप’ करून आम्ही लौकरच पुन्हा घोणसपूर कडे निघालो कारण पुढे बराच प्रवास बाकी होता. आमचे सर्व साहित्य नेण्याकरता पून्हा जानकी आज्जींच्या घरी पोहचलो तर,
“माझ्या नातवंडाना उपाशी पाठवून मी एकटी म्हातारी काय सगळ खाणार का ?”असा तिखट सवाल करून आज्जींनी मायेचा दम भरत प्रचंड आग्रहाने गरमागरम भाक-या आणि चमचमीत चटणी असा अप्रतीम मेनू समोर मांडला. या सह्याद्रीतली माणस कशी अगदी त्या सह्याद्रीसारखीच अंगानी चिवट, दिसायला राकट बोलायला तिखट पण मनाने अत्यंत प्रेमळ आणि हळवीच असतात याचीच अनुभूती आज्जींनी आज पून्हा एकदा दिली. साध्या चटणी भाकरीला आज जी चव होती ती आख्या जन्मात मिळनार नाही हे सर्वांनाच माहिती होते. कारण, ७५-८० वर्ष प्रचंड काबाडकष्ट करून रापलेल ते शरीर जरी पार थकून गेल होत तरी त्यातली माया, आपूलकी आजही ओसंडूनच वाहात होती. वयोपरत्वे डोळ्यांची दृष्टी कमी झाली होती पण त्या नेत्रांमधली प्रेमाची झाक आजदेखील स्पष्ट दिसत होती. कानात बाजूचे आवाज कमी झाले होते, पण काही तासांपूर्वी ओळख झालेल्या आपल्या नातवंडाच्या पोटात भूकेने कोकलणा-या कावळ्यांचे आवाज मात्र त्या आज्जींच्या कानात जणू घूमत होते. त्या भाक-या थापलेले ते मायेचे हात, प्रत्येक घासाघासात असलेले त्या माऊलिचे प्रेम, झणझणीत असली तरी साखर देखील फ़िक्की पडेल इतका मायेचा  गोडवा असलेली ती चटणी आणि आम्ही जेवण करतोय म्हणून आणि  फ़क्त म्हणूनच त्या माउलिच्या चेह-यावरून ओसंडून वाहणारा तो आनंद हे पाहून सर्वांच्याच डोळ्यात आनंदाश्रू तराळले.’रात्रभर पोर बाहेर अंगणात झोपली आणि मी म्हातारी घरात मस्त घोरत पडले’ या गोष्टीची मनाला लागलेली हुरहूर १०० वेळा समजावून पण त्या बिच्चा-या माउलिच्या मनातून काही उतरत नव्हती. शेवटी पुन्हा तूम्हाला भेटायला नक्की येणार आणि घराच्या आतमधे मुक्काम करणार अशी समजूत काढून सर्वांनी त्या लाड पूरवणा-या आज्जींचे आशिर्वाद घेतले आणि जंगम काकांबरोबर पुढच्या खडतर अश्या प्रवासाला निघलो. “मधू किल्ल्यामार्गे कोंडनळीतून कोकणकडे…..”

 पुढचे वर्णन वाचण्या आगोदर मी आपणास एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगू इच्छीतो की, हा ब्लॉग टंकायच्या अगोदर मी पून्हा एकदा खास पूण्यावरून त्या घळीच्या तोंडापाशी जावून स्वखर्चाने १ फ़लक टांगून आलोय…
                                             “वर जाण्यासाठी, खाली उतरण्याचा मार्ग”
असो तरी त्याचा खर्च देणगीपोटी स्विकारला जाईल याची नोंद घ्यावी.असो..


बरेच वर्षात कोणी गेल नाहिये, तूम्ही पण या वाटेने जाण टाळा असा उपदेश वजा सल्ला तसा बरेच जणांनी दिला होता पण ‘किडे/खाज’ काहीही म्हणा हव तर.. पण आम्ही पोरांनी निश्चय पक्का केला होता. (चूलीत गेले असले निश्चय अस नंतर वाटल म्हणा,पण आता कोणाला सांगता) जंगम काकांनी नळीच्या तोंडापाशी आम्हाला सुखरूप पोचविले आणि खाली पोचल्यावर न विसरता फोन करायचाच या बोलीवर आम्हाला निरोप दिला.आता लिड करत होते हिमाल्यपूत्र सुदीप माने.. हातात कूकरी घेउन सपासप वाट काढत पूढे सरकायचे आणि मागच्या मंडळींना वाट करून देयची. घळीच्या अगदी सुरवातीलाच या मार्गानेदेखील कोणी खाली उतरू शकत हीच अतिशयोक्ती वाटते.आणि सुरवातीच्या अगदी ५ मि. मधेच तूम्हाला पुढे येणा-या त्या आक्राळ विक्राळ सह्याद्रीचा अंदाज यायला लागतो. सह्याद्रीवरील प्रचंड श्रध्दा, त्यावरच नितांत प्रेम, निसर्गाची साथ, सोबत असलेले सहकारी, पाणी आणि ग्लूकॉन डी फ़क्त यांच्या जोरावरच प्रत्येकाला ही वाट पार करण शक्य आहे.साधारण दुपारी २.३० च्या सुमारास आम्ही घळीच्या तोंडापासून खाली उतरलो, नव्हे घरंगळलो.समोर दिसणारा सह्याद्रीचा उत्ताल कडा थेट आमच्या नजरेत सूद्धा मावत नव्हता. मधू किल्ल्याची कातळ भिंत पाठीमागे आम्हाला निरोप देत होती आणि दोन्ही बाजूंना थेट गगनाला भिडणारे उंच कातळ मानवाला जणू त्याच्या खूज्या उंचीचीच आठवण करून देत उभे ठाकले होते.तर पुढ्यात खोल दूरवर फ़क्त किर्र झाडी आणि मोठाले खडक आमच्या स्वागताला तयारच होते. निसर्गाने आपल्या संपत्तीची संपूर्ण लयलूट केलेली ही जागा अतिशय सुंदर आहे. अनेक प्रकारच्या वनस्पती, वृक्ष,वेली,झाडे, विवीध पानाफ़ूलांनी नटलेला त्या निसर्गाने असंख्य जातीच्या प्राणी पक्ष्यांना सहारा देत त्या ठिकाणी नंदनवन फ़ुलविले आहे.मोठमोठाले खडक चढून उतरायचे. कधी हातात हात धरून साखळी करून, कधी दोराने तर कधी चक्क बसून घसरगूंड्या सुरूच होत्या.. आठ दहा फ़ूटांचे ते खडक आता चांगलीच परीक्षा घेत होते. त्यातच पाठीवरच्या ३-४ दिवसांचे कपडे पाणी आणि शिध्याने सॅक्स फ़ारच जड झाल्या होत्या.(सर्वात जास्त सामान त्यांच्याच खांद्यावर लादल होत अस ज्यांच म्हणणे असेल त्यांची या ठिकाणी मी माफ़ी मागतो पण ऐनवेळी ‘गाढव’ मिळाली असती तर तूमच्यावर ही वेळ आली नसती :P) त्या ओझ्याने आता घामाच्या धारा लागल्या होत्या. प्रत्येक वळणावर आता पाणी कमी कमी होत चालल होत आणि वळण मात्र वाढतच होती. मधेच अचानक जंगली श्वापदांचा उग्र वास वातावरण अजूनच खराब करत होता. वाटेत सापडणा-या प्राण्यांच्या सांगाड्याला ओलांडून पुढे जातो तो लाल चुटूक खेकड्यांची जत्रा भरलेले खडक दिसत,मधेच चिरतरूण असणा-या सापांनी आपल्या वार्धक्याला मागे सारून पुरावा म्हणून ठेवलेल्या काती कपारींमधे सापडत होत्या.तर मधमाशांचा घोंगवणारा आवाज त्या शांततेला चिरून जात होता. विकासचे पाय आता चांगलेच बोलायला लागले होते.(तसे सगळ्यांचेच बोलत होते पण त्याचे जरा जास्तच बडबड करत होते.) छातीचे भातेदेखील चांगलेच थकायला लागले होते ६ वाजून गेले होते सूर्यनारायणाने तर कधीच पाठ दाखवली होती वरती ‘खग’ देखील आपली दिनचर्या आटोपून पिल्लांच्या ओढीने परतीच्या प्रवासाला निघालेले दिसत होते. अंधार वाढत चालला होता तरी मोठ्ठाले खडक असंख्य दगड गोटे आपल्या अफ़ाट सैन्यासह अजूनही सज्जच होते.शेवट विकासने शरणागती पत्करली आणि आम्ही सर्वांनी देखील आमच्या मोहीमेला स्वल्पविराम देत आपला मूक्काम याच घळीत निसर्गाच्या कुशीत करायचा निर्णय घेतला.झोपताना सपाटीवर, वा पाणवठ्यावर झोपणे तसे धोकादायक होते पण नशीबाने म्हणा सपाटी नव्हतीच. :D १ मोठ्ठा खडक बघुन त्यावरच ४ जणांनी झोपायच आणि २ जण प्रत्येक वेळी राखण करतील अस एकमत झाल.पोटातल्या भूकेच्या कावळ्यांचे आता पार हात्ती झाले होते, पटापटा सॅक सोडून आजूबाजूचा परीसर एकवार न्याहाळून जागेची थोडी साफ़सफ़ाइ केली गेली आणि सरपण गोळा करून लगेच चूल मांडून कात्याने गरमागरम मॅगी तयार केले.गार गार हवेमद्धे रातकिड्यांच्या किर्र्र.. किर्रर्र..च्या पार्श्ववादनात मधूनच एकाधी वा-याची झुळूक पसरलेला पाचोळा पुढे घेउन जात होती जसकाही त्या रातकिड्यांच्या वादनाला दिलेली दादच म्हणाना ! लगोलग झाडावरची पानगळ आता नव्याने त्या उडालेल्या पाचोळ्याच्या जागेचा ताबा घेत होती चमचमणारे काजवे जणू आमच्यासाठीच विजे-या (टॉर्च) घेउन सज्ज असलेल्या सेवकांप्रमाणे आमच्या आजूबाजूला फ़िरत होते आणि ‘काळजी नसावी’ म्हणत आमच्या सोबत राहण्याचे आश्वासन देत होते.एक मोठ्ठा लाकडाचा ओंडका आणून त्याची मस्त शेकोटी पेटवलेली होती तर चुलीवरच्या गरमागरम मॅगी, बिस्कीट यावर मनसोक्त ताव मारून मंडळी आता ‘दुख-या देहांना’ गार गार जाणवणा-या त्या मोठ्ठ्या खडकावर टेकवून थोड्याशा थकलेल्या पण सावध नजरेतूनच या आपल्या आवडत्या तरी आज अचानक लाडक बाळ चिडून अंगावर धावून येत त्याप्रमाणे अंगावर आलेल्या सह्याद्रीतल्या त्या कडेकपा-यांमधे चमकणा-या डोळ्यांचा वेध घेत होती.(स्पष्टच सांगायच तर ‘यांची’ पार ‘फ़ाटली’ होती :D ) मधू किल्ल्यांच्या पाठीमागून आता गोरापान चांदोमामा देखील आमच्या सोबतीला हजर होत होता त्याचे स्वागत करत त्या नभांगणातील काही तारे ओळखण्याचा प्रयत्न करत माझी आणि राजेची ‘रक्षक ड्यूटी’ सुरू होती. निसर्गाच्या कुशीत आज आम्हाला खरोखरच त्याने सर्वकाही विसरायला लावले होते. छोटासा दगड जरी वरून घसरला वा जवळच असलेल्या पाणवठ्यावर आवाज जाणवला की तत्पर्तेने आमच्या विजे-यांचे झोत तिकडे पडत होते. खूपच दमछाक झाल्याने मधूनच डोळे मिटले जात होते. पण येणारा अनुभव फ़ारच भारी होता.थोड्यावेळानंतर मला विश्रांती देत सुदीप शेकोटीपाशी आला आणि मी चमचमणा-या तारकांचेच पांघरूण ओढून त्या मोठ्या खडकशैयेवर आडवा झालो.                
३१ जाने. २०१२ थंडगार वा-याचा मूक्त विहार, पाखरांचा किलबीलाट, धगधगत्या शेकोटीतली आजूनही शाबूत असलेली ती गरम गरम उब आणि गरमागरम चहापानासाठी कात्याने (शिव्या हासडून) केलेला गजर  यामूळे ६ साडे सहाच्या सुमारास मला जाग आली.सकाळी उठल्यावर सर्वांना विश्रांती मिळाली होती खरी पण थंडगार खडकावर झोपून हवेतल्या गारव्याने आता संपूर्ण शरीर दुखायला लागल होत पण पुढचा प्रवास लौकरात लौकर करण गरजेच असल्याने तडक सर्वजण चहापान करून ‘शिकारीला’ जाउन आले. (अर्थबोध होत नसेल तर तज्ञांचा सल्ला घ्या) पटापटा ओझी खांद्यांवर लादून पून्हा कालसारखा प्रवास सुरू झाला.थोड पुढे गेल्यावर थंडगार पाण्याच्या डोह लागला आणि अंग मोकळ करायला किंवा पूर्ण बधीर करायला पोरांच्या उड्या पडल्या. जलक्रीडेचा आस्वाद घेउन पायपीट सुरूच होती पण अजूनही लांबवर फ़क्त उतरती घळ दगड गोटे या पलीकडे काहीच दिसत नव्हते. आता ११ वाजून गेले होते पून्हा घामानी थकून वेग मंदावला होता आणि त्या सह्याद्रीने त्या निसर्गाने आपली किमया दाखवली. अचानक देवदूताप्रमाणे २ दिवसापूर्वी हरवलेला बैल शोधायला म्हणून समोरून “जाधव मामा” आमच्या समोर हजर झाले.’याच वाटेने सरळ चालत राहीलात तर आजून २ तासात तूम्हाला नदीपाशी रस्ता मिळेल’ अस त्यांनी सांगीतल पण २ तास आता २ वर्षाप्रमाणे भासले होते. आमच्या चेह-यांवरचा थकवा ओळखूल बैल नंतर शोधू आधी तूम्हाला शॉर्टकट ने गावात नेतो सांगीतल आणि पून्हा जंगलातल्या डाव्या अंगाला असलेल्या दुस-या वाटेने ५० मि. मधे थेट ‘कळंबली’ या कोकणातल्या छोट्याश्या पण डुमदार गावातल्या आपल्या घरी चहापानाला पोच केल.त्यांच्याच घरात चहापान, थोडी विश्रांती घेतल्यावर जाधव मामांचे उपकार मानून आमच्यातर्फ़े छोटीशी भेट देउन आम्ही पुढल्या प्रवासासाठी महामंडळाच्या २.३० च्या गाडीची वाट पहात कळंबली थांबा गाठला.’वाट पाहीन पण ST नेच जाईन’ या वाक्याला चिकटलेले आम्ही २.३० च्या गाडीसाठी ५ पर्य़ंत त्याच थांब्याला चिकटून बसलो.पण शेवट महामंडळानेच आलो. (बोंबलायला पर्याय होताच कुठे)
६.३० च्या सुमारास आम्ही खेड स्थानकावर उतरलो आता नूतन वर्षाचा सूर्योद्य हा आपल्या लाडक्या रसाळ्गडावरच करायचा अशी प्रत्येकाचीच मनोमन ईच्छा होती.पण रसाळगडावर आता जाण्यासाठी बसची कोणतीही सोय नव्हती. म्हणून एका सह्यप्रेमी रिक्षावाल्या भाउंना भेटून विनंती करण्यात आली आणि आमच्या विनंतीस मान देउन खेडेकर आणि त्यांचे एक मित्र हे आपापले रथ घेउन आमाच्या सेवेस दाखल झाले.जातानाच खेडमधून नॉनव्हेज वाल्यांसाठी व्हेज कोंबडी घेण्यात आली आणि सरत्या वर्षाचा शेवटचा प्रवास सुरू झाला किल्ले रसाळगडाकडे. वाटेत बहूदा नववर्षाच्या शुभेच्छा देयलाच अत्यंत विषारी समजल्या जाणा-या “घॊणस” सापाने आम्हाला दर्शन दिले आणि आम्ही गडपायथ्याला पोहचलो.अर्ध्या तासात गडावर कूच करून पटापट तयारी सुरू झाली. आणि पाश्चात्य पद्धतीने न्यू इयर सेलीब्रेशन म्हणून व्हेज कोंबडीचे चिकन आणि लिंबू सरबत यावर गड्यांनी आडवा हात मारला.आता पोटोबा शांत झाले होते, थंडगार वा-यात आई झोलाई च्या साक्षीत नववर्षाच्या स्वागताला आमचे तानसेन राकेश सरांनी आपले सूर आवळले आणि आम्हा श्रवणभक्तांना आपल्या मधूर सूरांनी न्हाऊ घातले.गाण्यांच्या फ़र्माईची सुरूच होत्या मध्यरात्र उलटून १,२ वाजले व राकेशच्या मंजूळ स्वरांची नववर्षभेट स्विकारून आम्ही सर्वजण निद्राधीन झालो.
१ जाने. २०१३ पहाटे सूर्योद्ययालाच सर्वजण गडमाथ्यावर हजर झालो, नूतन वर्षाच्या त्या पहिल्या किरणांना सूर्यनमस्कार घालून मानवंदना दिली आणि कॅमेरांच्या क्लिक-क्लीकाटात त्याचे स्वागत करून तोंड खंगाळली गेली.माता झोलाई ला दंडवत घालून पून्हा खेड स्थानक गाठले आणि प्रवास सुरू झाला पुण्यनगरीकडे….
बसमधे आम्ही सगळेच थकून बसलो होतो. डोळे मिटून संपूर्ण प्रवास डोळ्यासमोरून तरलत होता.’आज सिद्ध झाल होत की, तूम्ही त्या निसर्गाशी एकनिष्ठ असाल त्याच्यावर मनोमन प्रेम करत असाल तर त्याचा प्रतीसाद तसाच असतो खर तर तूम्ही कसेही असा तो फ़क्त प्रेमच करतो. नाही करत तो’ कोप’ वैगैरे काही.. तो कोप देखील घडवणारे असतात ती तूमची आमची ‘मतलबी माणसच’ तो फ़क्त आपल्याला देतच असतो आपल्या अजस्त्र हातांनी. तो नेहमीच मूक्त उधळण करत असतो आपण फ़क्त संयम पाळून, योग्य ती काळजी घेत, सगळ्या रडगाण्यांना फ़ाटा देत फ़क्त त्या आनंदाची अनुभूती घ्यायची असते बस्स.’ त्या अवघड घळीत दिसायला भयंकर दिसणारा तो सह्याद्री हेच सांगत होता, “आरे उठा, धीर सोडू नका, झटकून टाका तो थकवा ती मरगळ माझ्याकडे बघा आज शेकडो वर्ष मी उन, वारा, पावसाशी झुंजतोय लाखो आक्रमण मी अशी परतवून लावलीयेत तरी आज खंबीरपणे पाय घट्ट रोवून उभाय.माझा आदर्श समोर ठेवा. मला विसरू नका, माझ्यापासून दूर जावू नका, माझा आनंद घ्या, माझ्या कुशीत शिरा आणि बघा काय जादू आहे ते’ तेवढ्यात कंडक्टर साहेबांची “टींग” अशी सिंगल वाजली…आणि आम्ही स्वारगेट स्थानकात उतरलो ते… येत्या वर्षात जास्तीत जास्त ट्रेक आखण्याचा निश्चय करतच.

भेटा अथवा लिहा,(शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे
९८२२८७७७६७
 १ जाने. २०१३ ची मंगल पहाट किल्ले रसाळगडावरून.

सहभागी वीर :- कर्णधार श्री.आमोद राजे,भरारी चे तानसेन श्री.राकेश जाधव , सदा हसतमुख आणि उत्साही असलेले  श्री.निलेश महाडिक उर्फ शाहू, हिमाल्य मोहिमेसाठी सुट्टी  मिळाल्यामुळे  आपल्या संगणक अभियंत्याच्या नोकरीवर खुशाल लाथ मारणारे श्री.सुदीप माने उर्फ हिमालयपुत्र, T मास्तर उर्फ़ कात्या अर्थात श्री. विकास पोखरकर आणि निलेश वाळिंबे (स्वयंघोषीत अध्यक्ष).




Monday, November 19, 2012

बाळासाहेब





“माझ्या तमाम हिंदु बंधू, भगिनी आणि मातांनो !”  या वाक्यानिशी लाखो टाळ्यांच्या गजरात आपल्या डरकाळीने अवघा हिंदूस्थान हादरवून टाकणारा ‘ढाण्या वाघ’ आज अगोदरच वाघांची संख्या कमी होत असलेल्या या हिंदूस्थानातून आपल्या परतीच्या प्रवासाला निघून गेला.
श्रीधर अर्थात बाळ केशब ठाकरे, प्रबोधनकारकांच्या झूंजार विचारांपासून प्रेरणा घेउन, जगविख्यात व्यंगचित्रकार म्हणून आपली ख्यात्यी पसरविलेल्या या कलाकाराने तब्बल पाच दशके या महाराष्ट्रावर आधिराज्य गाजविले.तमाम भारतवासियांच्या गळ्यातला ताईत बनलेली ही व्यक्ती आपल्या धारेधार कुंचल्यातून कपटी राजकारण्यांवर फ़टकारे मारीत एक विराट संघटना बांधून त्याचा पक्ष उभा करतो त्यावरच न थांबता तो सत्तेत आणून सत्ता देखील गाजवितो. हो पण स्वत: मात्र कधीही खूर्चीच्या मोहात न अडकता ‘रिमोट’ बनून सर्व सत्तेवर आपला अंकूश ठेवतो. आपल्या रोखठोक, फ़क्त आणि फ़क्त सत्य-वाणीने खास ठाकरे स्टाईलने संपूर्ण हिंदूस्थान ढवळून काढणा-या त्या हिंदूरृद्यसंम्राटास आमचा मानाचा मुजरा.
बाळासाहेब, तूम्ही आपल्या परखड विचारांचे मराठी मनावर कोरलेले संस्कार आम्ही कदापी विसरू शकत नाही. पण आपल्या धगधगत्या शब्दरूपी ज्वाळांनी आता यापुढे हा आसमंत प्रकाषमान होणार नाही याची मनाला बोचरी लागते.
गर्व से कहो हम हिंदू है ।
होय ! फ़क्त हिंदूच.
प्रांताप्रांतातील लोक हिंदू म्हणून जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत तरणोपाय नाही.
माझ्या शिवसैनिकांनीच बाबरी पाडली आणि मला त्याचा सार्थ अभिमानच आहे.
पाकिस्तानने जर हायड्रोजन बॉंब तयार केले तर आम्ही काय जपमाळ धरून मणी ओढत बसायचे काय ?  ….   
छत्रपती शिवरायांना आपले दैवत मानून शिवतिर्थावरून गेली सत्तेचाळीस वर्ष अश्या धगधगत्या असंख्य,अगणित गोळ्यांचा वर्षाव करणारी ती तोफ़ काल अखेर त्याच शिवतिर्थावर अश्रूंच्या असंख्य पाटांमधे भिजून कायमची थंड झाली.आज त्यांचा लाखोंच्या संख्येतला तो कडवा,राकट,निर्भिड शिवसैनीक म्हणत असणार, “साहेब,आम्हाला क्षमा करा. तूमच्यासाठी नडलो  तूमच्यासाठीच भिडलो पण… पण खर सांगतो साहेब आज मात्र त्या ‘यमापूढे’ अडलो !”  
 आपल्या परखड विचारांनी आणि धारधार वाणीने अलोट गर्दीचे उच्चांक मांडणा-या या वाघाला छोट काम कधी मान्यच नव्हत ‘चारचौघांसारखा मृत्यू, ही कल्पनाही मला असह्य वाटते.मला मृत्यू असा हवा की तो अविस्मरणिय ठरावा.’ हे स्वप्न देखील त्यांनी आज पूर्ण केले. हिंदूस्थानातून आलेला त्या जनसागराने त्यांचेच अलोट गर्दीचे सर्व उच्चांक मोडून काढले.न भूतो न भविष्यंती महायात्रेने’आपण कोण होतो,काय आहोत आणि काय असणार’ हेच आज देखील पून्हा सिद्ध केले.कधिही न थांबणा-या मुंबापुरीला आज तूम्ही पूर्णपणे स्तब्ध केलेत.
मा. बाळासाहेब,आमच्यासारखे तमाम हिंदुस्थानातील सर्व चाहते आपणास कदापी विसरणार नाहीतच पण फ़क्त एक वचन द्या, सूवर्ण झळाळीने उजळून भगव्या झालेल्या त्या तूमच्या स्वर्गातल्या जागेवर बसून तूम्ही आणि स्वत: शिवराय या हिंदूस्थानावर आपली करडी नजर सदैव ठेवा आणि आपला आवाज या पृथ्वीतलावर आम्हाला कायम ऐकू येवूद्यात कारण…
गर्जना तूमची होताच, भरते देशद्रोह्याला कापरे,हिंदूस्थानात फ़क्त आणि फ़क्त एकच साहेब…..  ॥ बाळ केशव ठाकरे ॥

आपल्याबद्दल बोलायची लिहायची आमची लायकी नाही, पण तरिही आपल्या या छोट्याश्या चाहत्याकडून आपणास भावपूर्ण श्रद्धांजली. जय महाराष्ट्र…. निलेश गो. वाळिंबे.


Thursday, August 23, 2012

‘भरारी’ पून्हा एकदा रसाळगडावरी….



या वर्षी पावसाने ‘आषाढ’ संपत आला तरी दडी मारून बसल्याने आता खरच पाण्याचा प्रश्ण अवघड होत चालला होता पुणे शहर आणि परीसरात आत्तापर्यंत धो धो कोसळणारा पाऊस आजून कुठेच दिसेना म्हणून पुणेकर नाराज तर होतेच पण तिकडे काळ्या आईची काळजी घेणा-या शेतकरी दादाच्या तोंडाचच पाणी आता पळायची वेळ होती, म्हणूनच की काय पण जीथे मस्त पाऊस झालाय असा आम्हा सवंगड्यांचा आवडता, सदाबहार 'कोकण' सारखा आम्हाला खुणावत होता, आमच्या नजरेसमोर येत होता. पण एक अडचण होती.. जातीवंत ट्रेकर आणि छायाचित्रकार म्हणून ओळखले जाणारे आमचे मित्र श्री. निखील केळकर यांना मागील वर्षापासून पायाच्या गंभीर दुखापतीमूळे आपल्या सह्यभ्रमंतीचा छंद जोपासू शकत नव्हते, पण आता त्यांनादेखील राहवत नव्हते आणि निसर्गाच्या त्या हिरव्यागार कुशीत त्यांना सध्या शक्य होइल अश्या ठिकाणी जाण्याकरीता आमचे प्रयत्न सुरू होते. दोन वर्षापूर्वीच्या स्वातंत्रदिनी सगळेजण रसाळगडावर खास ध्वजारोहणाला आलो होतो तेव्हाच खरतर अस ठरवल होत की पून्हा जेव्हा जमेल तेव्हा नक्की परत फ़ेरी मारायची.मग काय निखील ला पण या किल्ल्यावर चालण शक्य होत. म्हणून लगेचच एकमत झाले आणि १४ व १५ जूलै या तारखांनवर शिक्कामोर्तब केले.
१३ ला मेलामेली उरकत सर्वजण रात्री ९.३० वा डेक्कन ला भेटतील असे ठरले आणि अतिशय धक्कादायक असा प्रकार घडला, तो असा की सर्वजण चक्क ९.३० लाच भेटले. मग सर्वांचे जेवण उरकून शेवट राजे बशीत (बसमध्ये) बसून आम्हा सर्वांना घ्यायला आले आणि एक नव्हे दोन नव्हे तब्बल १५ मावळ्यांनी ‘भरारी’ घेतली ती थेट कोकणच्या वाटेने. ताम्हीणी मार्गे आता बस कोकणात उतरत होती आणि कवी अमित काकडेंच्या अतीशय रसभरीत कवीतांचा आस्वाद घेत मंडळी उद्याचे बेत शिजवीत होती. चहापाण्याचे २-३ थांबे आणि डुलक्या घेत साधारण पहाटेच्या सुमारास आम्ही खेड मार्गे गडाच्या पायथ्याला आलो.
१४ जूलै २०१२: डोळे उघडून बाहेर बघतो तोच आपण कोकणात आल्याची खात्री पटली. भोवतालचा हिरवा गार निसर्ग आमच्या स्वागताला तयारच होता. पटापट सर्व साहीत्य गाडीतून उतरवण्यात आले आणि सॅक भरल्या गेल्या. माझ्या बरगड्यांना मागील आठवड्यात पडल्यामूळे जरा मार लागला होता म्हणून माझ ओझ पाटलांच्या खांद्यावर लादून आम्ही गडावर कूच केले. आजूबाजूचा थंडगार वारा दूरवर पसरलेल्या हिरवाई बरोबर आपले लडीवाळ खेळ करत मस्त विहार करत होता. लांबपर्यंत पसरलेले पांढरे ढग पिंजून ठेवलेला कापूस जणू भासत होते. अश्या धुंद वातावरणात मावळे पुढे सरकत होते. वाटेत निसर्गाच्या अद्भूत किमयेमूळे वाहणारे झरे आपल्या मधूर पाण्याने आमची तृष्णा भागवत होते. रसाळगडावर पोहचण्यासाठी तूम्हाला त्याच्या डाव्या बाजूने प्रदक्षीणा सुरू करावी लागते आणि बरोब्बर पलिकडल्या बाजूस पोहचून मग माथ्यावर प्रवेश करावा लागतो. आता सर्वजण धूक्याच्या लाटांमधून विहार करत अतीशय मनोहरी असे किल्ल्याचे रूप समोरून बघत होतो. समोरच असलेले दोन दरवाजे आणि आज सुद्धा त्यांचे रक्षण करणारे ते बुलंद बुरूज सर्वांचे लक्ष वेधत होते.आम्ही आता गडात प्रवेश करत होतो. वाटेवरच असणा-या आणि सहसा न आढळणा-या त्या 'मिशीवाल्या' मारूतरायाच्या मंदिरी मस्तक टेकवून बलोपासना झाली आणि शनिवार सार्थकी लावत आम्ही गडमाथ्यावर आलो. आता तो थंडगार वारा जणू आमची भेट झाली म्हणूनच की काय पण लहान पोराप्रमाणे आमच्याशी खेळत होता. आणि आम्ही पण त्याच्या त्या दंग्यापासून सावरत त्याचा आनंद घेत आता आई 'झोलाई' च्या मंदीरात दाखल झालो होतो. गडाचे विस्तीर्ण पठार, सोसाट्याचा वारा, चहूबाजूला पसरलेला तो हिरवा रंग त्याच्याबरोबर लपंडाव खेळणारे ते धूक्याचे ढग पाठीमागे मनोहरी अशी दिपमाळ व उत्तूंग ध्वजस्तंभ आणि समोर साक्षात माता झोलाई अश्या त्या मंगलमय वातावरणात तूमच्या,आमच्या,आपल्या त्या राजाच्या,त्या परमेश्वराच्या,त्या शिवरायाच्या स्मरणार्थ मग एकच आवाज घुमला आणि "क्षत्रीय कुलावतंस....” च्या आरोळीने सारा आसमंत दुमदुमून गेला.
मंडळी आता आपले ओझे उतरवून मंदिराची थोडी साफ़सफ़ाई करीत होते. साफ़सफ़ाई करता करता सगळ्यांना गरमागरम चहा ची आठवण होत होती म्हणून लगेच सलग ३-४ वर्षे 'टी मास्टर' म्हणून किताब मिळवीणारे विकास पोखरकर उर्फ़ कात्या यांनी आपली कंबर कसली आणि थोड्याच वेळात फ़क्कड आलेयुक्त चहा आणि गरमागरम मॅगी आमच्या पुढ्यात सादर झाले. गरमागरम चहा आणि मॅगीचा आस्वाद घेत आता पुढच्या आखणीची चर्चा सुरू झाली आणि आत्ता झोपणेच कसे 'आवश्यक' आहे हे प्रत्येकाने (काहीही न सांगता) मान्य करत आपापल्या पथा-या पसरल्या. थोड्या वेळातच घोरण्याच्या प्रचंड आवाजाने (बापरे! याला घोरणे म्हणतात ? ) मला मात्र जाग आली आणि अत्यंत त्रासीक चेह-याने मी सर्वत्र पहात असतानाच गाभा-यातील देवीचे देखील हात तीच्या कानावर असल्याचे मला भासले.ती देखील (बिच्चारी) काहीच करू शकत नाहीये हे लक्षात आल्यावर मी सुद्धा आता समस्त "घोर कंपनी" च्या नावानी शिव्या हासडून बाहेर दिपमाळेपाशी येउन बसलो. काही वेळातच माझ्यासारखे आजून काही त्रस्त बाहेर येउन माझ्या घोळक्यात सामील झाले होते पण आतल्या लोकांचे "घोरणे" काही बंद होण्याचे नाव नव्हते.आता तर एकमेकांशी जणू स्पर्धाच सुरू आहे अश्या थाटात 'एकापेक्षा एक' चे अंतीम पर्व चालू झाले होते,काहीवेळाने ती स्पर्धा संपूष्टात येउन आता "समूहगान" सुरू झाल्याचा भास मला झाला. शेवट झोप बाजूला ठेउन आपण जेवण्याची पूर्वतयारी करावी या मतावर आम्ही जागे असलेली 'अघोर' (जी घोरत नव्हतो ती) मंडळी आलो आणि कामाला सुरूवात केली. कांदे, बटाटे,तोंडली,वांगी स्वच्छ धुवून चिरून ठेवली आणि किराणा व्यवस्थीत लावून ठेवण्यात आला. दुपारच्या जेवणाला मस्त कांदे, बटाटे, मटकी, वांगी अश्या सर्व भाज्यांचा 'भोगी स्टाईल' रस्सा करण्याचा बेत ठरला व तशी सर्व तयारी करून ठेवण्यात आली.
वामकुक्षी झाल्यावर आता गप्पा ठोकत गडावर फ़ेरफ़टका सुरू होता.मधूनच पावसाच्या सरी आमच्या भेटीला येत मन एकदम चिंब करून जात होत्या. त्या पावसात मनमुराद भिजत आम्ही मंडळी गडावर फ़ेरफ़टका मारत होतो.समोर पसरलेला सह्याद्री आपल्या पहाडी दर्शनाने रूबाबदार तर दिसत होताच पण हिरव्या रंगाच्या त्या असंख्य छ्टांनी रंगलेला तो भरजरी शालू लपेटून त्याचे रूप फ़ारच मोहक भासत होते. चकदेव पर्वताच्या लांबवर पसरलेल्या डोंगररांगा धूक्याच्या त्या शुभ्र पडद्यामागून जणू दुधाने अंघोळ करून नुकत्याच समोर उभ्या होत्या. निसर्गसौदर्याने नटलेल्या सुप्रसिद्ध अश्या महाबळेश्वरच्या डोंगरांगाना समांतर अशी सुमारगड रसाळगड आणि महीपतगड या तीन किल्ल्यांची ही रांग त्या महाबळेश्वरच्या सौदर्याला तोडीचे आव्हान देत उभी असलेली मला भासली आणि " त्या निरागस निसर्गाच्या मनात कधीच शर्यत नसते "तो कायम सुरेखच असतो हे 'त्रीवार सत्य' क्षणभर मी विसरूनच गेलो होतो. लांबवर पसरलेली हिरवळ त्यावर पडलेले दवबिंदू जणू मोत्यांची उधळण केल्याप्रमाणे भासत होते. काही हौशी छायाचीत्रकारांच्या कॅमेरांचा क्लिक-क्लीकाट चालू होता तर 'बिक्या' सारखे रसीक वय विसरून त्या वातावरणात धुंद होऊन आपल्या खास करामती (माकडचाळे) दाखवत लोकांचे मनोरंजन करत होते.तर काही मंडळींनी खास वायर चा 'गळ' बनवून त्या गळाला लागण्यासाठी जवळच्याच तळ्यातल्या माश्यांना गळ घालीत बसले होते. जलधारांच्या वर्षावान न्हाउन निघालेल्या गडकोटांच्या तटबंद्या पावसाळ्यात एका आगळ्या लकाकीनच तळपून निघाल्या होत्या त्यांना बघताना तिथ घडलेल्या प्रसंगाची भाषाच जणू त्यांच्यावर उमटू लागली होती.हिरव्या शालीन नटलेला तो सह्याद्रीचा काळा फ़त्तर आपली ती रौद्रता बाजूला सारून हिरवाईचा साज घेउन आज माझ्यासमोर उभा होता.
आता पून्हा मंदीरात येउन आम्ही जेवणाची तयारी सुरू केली होती मला प्रथेस मान देउन बल्लवाचार्याचा पोशाख चढविण्यात आला आणि तयारी सुरू झाली रस्सा बनवायला. तर दुसरीकडे चुल मांडून त्यावर भात रांधायला टाकण्यात आला.रस्सा बनवताना बिक्या ने घरून आणलेला मिरचीचा ठेचा जरा माझ्या हातून जास्तच् पडला गेला आणि खरी मॅच इथे सुरू झाली. रस्सा उकळताना मस्त वास होता पण चव घेतल्यावर त्यातला झटका जाणवत होता मग पाणी घालून तो वाढवण्यात आला तरीदेखील तो तिखटच म्हणून साखर घालण्यात आली तरी झटका काही जाईना शेवट पोह्यासाठी आणलेल्या दाण्यांना टॉवेल मध्ये गुंडाळून त्यांचा कूट करून तो घालण्यात आला आणि तिखट्पणा जरा कमी झाला.या सगळ्या प्रयोगामध्ये बराच वेळ गेला तोपर्यंत पोटातल्या कावळ्यांचे पार हात्ती झाले होते. मग लगेचच अंगत पंगत बसली आणि गरमागरम भात व रस्स्यावर उड्या पडल्या. सोबत तोंडी लावण म्हणून पापड,फ़रसाण,पु-या,चटणी आणि तिखट लागल तर बिस्कीटे असा मस्त मेनू हारपून मंडळीनी तृप्तीचे ढेकर दिले. पुढे ताट वाट्या भांडी घासण्याचा सामूदाईक कार्यक्रम पार पाडून ग्रुप फोटोशेशन पार पडले आणि गप्पांचा फ़ड रंगला.गप्पांच्या ओघात तिन्हीसांज कधी झाली आणि सूर्यनारायण परतीला कधी निघाले हे कळाले देखील नाही. परतीला जाताना जणू त्यांचा निरोपच घेउन येतोय अगदी अश्याच अविर्भावात समोरून पाऊस येताना दिसला आणि ते विहंगम दृश्य कायमचे मनावर कोरले गेले.
पून्हा गड किल्ले आणि मागच्या ट्रेकच्या आठवणीत मावळे त्या पावसातच गप्पा करत बसले.मधेच सरपणासाठी असलेल्या कु-हाडी लाच 'सब्जेक्ट' बनवून खास तिच्या सोबत छायाचित्रण झाले.आता तसा अंधार पडत चालला होता म्हणून सर्वजण मंदिरात आलो आणि साफ़सफ़ाई करून अंग कोरडे करून आतमद्धे रसाळगडाच्या मागील फ़ेरीच्या गप्पा सुरू झाल्या तर काही मंडळी खास रात्री गडावर फ़ेरफ़टका मारून आले आमच्यातले गि-या आणि देबू खास गडपायथ्याच्या वस्तीवर जाउन ताजे दूध चहासाठी घेउन आले आणि पुन्हा चहापान पार पडले.रात्री फ़ारशी भूक नसल्याने आणि दुपारचा भात शिल्लक असल्याने त्यालाच मस्त फ़ोडणी दिली गेली आणि मंदिरात आता तानसेन आणि कानसेन यांची जंगी संगीत मैफ़ल बसली.
भरारी पथकाचा तानसेन किताब पटकवणारे श्री. राकेश यांनी गणेशस्तवन करून मैफ़ीलीला सुरूवात केली आणि मराठी अभंग,जुनी नवीन फ़िल्मी गीते, भावगीते आशी एकामागे एक फ़र्माईश होतच राहीली. "वाह वा" ! "क्या बात है" ! ची दाद रसीकांकडून मिळवत मध्यरात्र उलटेस्तोवर राकेश साहेब आपल्या खड्या स्वरांनी गड जागता ठेवत राहीलेशेवटी गझल गायली गेली आणि तीलाच भैरवी मानून मंडळी त्या मंगल वातावरणात निद्रादेवतेच्या अधिन झाली.
१५ जूलै २०१२ : सकाळी ६,७ च्या सूमारास सर्व मावळे जागे झाले होते. (सत्या सोडून) आपापली शिकार उरकून प्रत्येकजण पून्हा गडावर पडलेल्या त्या कोवळ्या उन्हात फ़ेरफ़टका करून आला आणि परत एकदा खाण्यासाठी सज्ज झाला. (खाणे आणि जाणे (कूठे ते विचारू नका) हे सोडून काहीही केल नाही यांनी) मग मस्तपैकी कांदा बटाटा पोहे बनवण्यात आले आणि वरून मस्त कोथंबीर आणि तळणीच्या मिरचीने सजवून त्यावर गडी तूटून पडले.पोटभर पोहे चोपून त्यावर मस्त चहा झाला आणि मंदिराची साफ़सफ़ाई करून झोलाई देवीला, मूबलक पाऊस पडावा म्हणून साकडे घालून सर्वजण परतीला निघालो.
परतीच्या वाटेत देखील निसर्गाचा ती मूक्त उधळण सुरूच होती. पावसाच्या जलाभिषेकाने तो रसाळगड न्हाउन निघत होता, चहुबाजूस संपूर्ण हिरवळ पसरली होती, अवखळ खेळत निघालेले झरे कड्यापाशी पोहचून धबाबा कोसळणारे धबधबे बनलेले पाहून मनाला वेगळाच आनंद देत होते.त्या झ-यातले पाणी विकतच्या मिनरल वॉटरच्या अनेक पटीने शुद्ध आणि गोड लागत होते.त्या निसर्गाची जादू बघून छोट्याश्या झ-यापाशी काहीकाळ फोटो काढत गप्पा मारून ते पाणी पित "झरझरते नभ घागर मंथर, थरथर एकटवाणी । अंथरलेली हिरवळ त्यातून मंतरलेले पाणी ॥" या कवितेच्या ओळी गुणगुणत सर्वजण गाडीपाशी पोहचलो.आणि थेट सावित्री नदीचा तीर गाठला. मग काय पटापटा कार्यकर्ते सावित्रीतील पाण्याने पवित्र होवून पून्हा गाडीत आसनस्त झाले. आता गाडीत गाण्यांच्या भेंड्यांना काही वेगळाच रंग चढला होता. अखंड प्रवासात काही खरी काही ऐन वेळी बनवलेली असंख्य गाणी गात पून्हा पौड मद्धे सहभोजनाचा कार्यक्रम पार पडला आणि सर्वजण पुढच्या ट्रेकचे प्लान करतच पुण्यनगरीत हजर झालो.घरी पोहचल्यावर त्या नितांत सुंदर सह्याद्रीचे ते मनोहारी दृष्य मनाच्या कप्प्यात घर करून बसल्याचे जाणवले एकासूरात कोसळणारे ते प्रपात त्याच्याशी लगट करू पाहणारे दाट धूके भर्राट वा-याचे झोत आणि ती निरव शांतता यात एका आगळयाच् रानभूलीने माझ्या मनाचा ताबा आजूनही सोडला नव्हता तश्याच धूंदीत मी कधी झोपलो हे मला कळाले देखील नाही.


भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच),
निलेश गो. वाळिंबे
९८२२८७७७६७

सहभागी मावळे :- भास्कर कुलकर्णी (बिक्या), राकेश जाधव (राक्या),विकास पोखरकर (कात्या), निखील केळकर (केळ्या), प्रसाद डेंगळे (तृतीय,वारे बत्तीवाले), निलेश महाडीक (शाहू) , सतीश सूर्यंवंशी (सत्या),देबशीश नाथ (देबू), गिरीश कोळपकर (गि-या),सूरज पाटील (बिबट्या),कौस्तूभ खांडवे, अमित गाजरे,अमोद राजे,निलेश वाळिंबे.