Thursday, May 17, 2012


जिथे मराठा वीर जाहला,
छत्रपती तो ‘शिवा’ अवतरला,
गनीमांचा जो काळ जाहला,
मुजरा करीतो त्या सह्याद्रीला ॥१॥

पाहूनी  प्रचंड उत्ताल कडे,
शत्रूला मग धडकी भरे,
ज्यांनी हाहाकार माजवीला,
मुजरा करीतो त्या सह्याद्रीला ॥२॥

मालूस-यांचा तानाजी चे,
देशपांद्यांचा बाजीप्रभू चे,
रक्त सांडूनी ‘पावन’ झाला,
मुजरा करीतो त्या सह्याद्रीला ॥३॥

‘हिंदूराष्ट्र’ हे स्थापन करण्या,
अभेद्य शत्रूला मारण्या,
‘गनिमीकावा’ जिथे जन्मला,
मुजरा करीतो त्या सह्याद्रीला ॥४॥

स्वप्न ‘जीजाऊ’ ने पाहीले,
‘शिवबाने’ साक्षात दाखविले,
सदैव ‘रक्षण्या’ उभा राहीला,
मुजरा करीतो त्या सह्याद्रीला ॥५॥

~निलेश ©


Friday, April 27, 2012

नूतन वर्षाची सुरूवात.. ॥ शिवतिर्थ रायगड ॥



१ जानेवारी फ़िरंगी नूतन वर्षाची सुरूवात आपल्या सह्याद्रीत करूनच कामाला सुरवात करावी ही इच्छा अनेक दिवस मनात होती. अखेर या वर्षी हा योग आलाच. सकाळी १० वा अमोद ला फोन झाला. दुपारी २ वा निघायचे ठरले आणि मी, अमोद्, अमीत  माझ्या घरापाशी दुपारी भेटलो आणि पुढे चांदनी चौकात राहूल आम्हाला भेटला. अमोदच्या पायाला दुखापत झाली असल्याने आम्ही फ़क्त अश्या गडावरच जाउ शकणार होतो जेथे गाडी वरपर्यंत पोहचेल. आणि हेच दुखणे आमच्या पथ्यावर पडले आणि आम्ही राजधानी “रायगडाची” निवड केली. नूतन वर्षाची सुरूवात यापेक्षा अजून चांगली होणे शक्य नव्हते.तडक निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आणि आम्ही ताम्हीणी मार्गे कूच केले.  
प्रत्येक मराठी माणसाची सर्वात अभिमानाची गोष्ट कोणती असेल तर शिवरायांची राजधानी “रायगड” होय. इ.स. १६७० च्या सुमारास महाराजांनी आपली राजधानी राजगडहून रायगडास हलविली. मुंबईचे गोरे इंग्रज, जंजी-याचा सिद्दी यांच्या हालचालीवर बारीक लक्ष रहावे आणि घाटमाथा व कोकण या दोन्ही भागावर सुरक्षीतता राखता यावी तसेच मोघलांना सहजासहजी शिरकाव करणे अवघड पडावे म्हणून ‘खास’ याची निवड करण्यात आली. त्याच रायगडाचे दर्शन आज आम्ही करणार होतो. मधे चहा नाष्टाचा एक थांबा घेउन आम्ही गाड्या पुन्हा दामटल्या. खराब रस्ता असल्याने आम्हाला पोहचता पोहचता जवळ्पास ७ वाजले होते.  आता अमोद च्या पायाला दुखापत झाल्याने ‘रज्जूमार्ग’ अर्थात ‘रोप-वे’ नेच वर जाण्याचे ठरविले होते. मग काय अवघ्या ४-५ मिनीटात रायगडाच्या उत्ताल कड्याचे दर्शन करत आम्ही ‘शिवतिर्थावर’ पाउल ठेवले आणि थोड्याच वेळात आम्ही होळीच्या माळावर पोहचलो. येथेचे गो.नी.दा. च्या प्रयत्नाने स्थापन झालेल्या छत्रपतींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होवून थोडावेळ गडमाथ्यावर विसावलो आता पोटातल्या कावळ्यांची चाहूल लागल्याने मस्तपैकी झुणका भाकरीचा बेत ठरला आणि गडावरच वस्तीला असलेल्या धनगराच्या झापावर आम्ही तळ ठोकला हात,पाय धूवून होइस्तोवर मस्तपैकी गरमागरम पिठल,भाकरी,खरडा,पापड असे सुग्रास जेवण पुढ्यात हजर होते मग काय सारवलेल्या अंगणात पंगत बसली आणि सर्वांनी आडवा हात मारून तृप्तीचे ढेकर दिले.रात्रीचे ९ वाजत आले होते ब-यापैकी अंधार पडला असला तरी हवेत मस्त गारवा होता आणि झोपही आली नव्हती म्हणून आम्ही सर्वजण जगदीश्वर मंदीराकडे गेलो. अथांग नभाच्या खाली मंदीराच्या परीसरातच आता आमच्या गप्पा रंगल्या आणि सर्वजण तेथेच गप्पा मारत निद्राधीन झालो.


पहाटे थंड वा-याच्या झुळूकेबरोबरच कोंबड्याची बांग आली आणि सूर्योदयापूर्वीच आम्ही जागे झालो मग काय “महाराष्ट्रातल्या प्रत्येक फोटोग्राफ़रला हवी असणारी संधी आम्हालादेखील मिळाली ” तडक होळीच्या माळावरच्या पठारावर धूम ठोकली आणि आयुष्य सार्थकी करणा-या त्या श्री. शिवछत्रपतींच्या पुर्णाकृती पुतळ्याचे फोटोशेसन सुरू झाले.वेळ थोडाच असल्यामुळे लगेच तोंडे खंगाळून आम्ही किल्ला दर्शनास निघालो. पुतळ्याच्या समोरच असलेल्या विस्तीर्ण बाजारपेठेचा फ़ेरफ़टका झाला. पेठेच्या दोन्ही बाजूस २२ दुकाने आहेत आणि बरोबर मधल्या दुकानावर सुंदर नागाचे शिल्प कोरलेले आपणास आढळते.येथून आम्ही थेट टकमक टोक गाठले.लगोलग गडाचा बालेकिल्ला, मंत्र्यांची घरे, राणीमहाल,पीलखाना, कोठारे,गडाचे वैभवात भर घालनारे मनोरे, मंदीरे सगळ्यांची धावती भेट घेतली. आता आम्ही पोहचलो होतो त्या भव्य राजमहालात, होय हीच ती जाग जिथे महाराज आपला न्यायनिवाडा करीत. त्याच दरबारात आम्ही हजर होतो. सगळ्यांचे उर भरून आले होते. नव्याने स्थापन झालेल्या महाराजांच्या पुतळ्यास आम्ही सर्वांनी मुजरा केला. महाराज्यांच्या कर्तृत्वाची ओळख आपणास रायगड भेटीत समजते. येथील ठिकाणे आज जरी आपण पाहीली तरी गतकालातील वैभवाची कल्पना आल्याखेरीज राहत नाही.अती विस्तीर्ण परीसर आणि तरीदेखील अतीशय नियोजनबद्ध आखणी पाहून महाराजांची आठवण आल्याखेरीज राहात नाही.चौफ़ेर विचार करून राजधानी म्हणून याचीच निवड का केली असावी याचा प्रत्यय आपणास गडावर आल्यावर मिळतो. इतिहास चाळता सभासद लिहीतो, राजा खास जाऊन पाहता गड बहुत चखोट, चौतर्फ़ा गडांचे कडे तासील्या प्रमाणे,दिड गाव उंच पर्जंन्याकाळी कडियावरी गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबादही पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतू तो उंचीने थोडका, दौलताबादचे दसगुणी उंच असे देखोनी बहुत संतुष्ट जाले आणि बोलले “तस्तास जागा गड हा करावा” मराठी अस्मीतेसाठी आणि फ़क्त आपल्या प्रजेसाठी अहोरात्र झटलेल्या अती धाडसी आणि बुद्धीमान अश्या शिवरायच्या या निर्णयाचा अभिमान बाळगत आम्ही सर्वजण दरबारतून निघून 
जगदीश्वराच्या मंदीरी दाखल झालो होतो, हेच ते मंदीर जेथील शिवाची स्थापना साक्षात आमच्या या महाराष्ट्राच्या या भारतभूच्या तमाम हिंदूंच्या “शिवा”नेच केली आहे. सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमत् छत्रपती शिवाजीराजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला. शिवपिंडीला प्रणाम करून आम्ही पूर्वेकडील शिवसमाधी पाशी पोहचलो.येथेच महाराजांनी अखेरची “चिरनिद्रा” घेतली. ‘शिवसमाधी’ म्हणजे अष्टकोनी जोते असूम त्यावर दगडी कळस चढविलेला आहे आणि आतमधील फ़रसबंदीत शिवस्मारक उभारले आहे. येथे सभासद म्हणतो,”क्षत्रियकुलावतंस श्रीमन्ममहाधीराज शिवाजी महाराज यांचा काल शके१६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे जाहला.देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्वराचा तो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर द्क्षणभागी केले ” सर्वजण भावविभोर होवून समाधीसमोर शांत बसून शिवस्मरण करून महाराजांना श्रद्धांजली वाहून बाहेर पडलो.पुढे मी आणि अमीत महादरवाज्यास भेट देउन विस्त्रीर्ण आणि अभेद्य अश्या तटबंदीला सलाम करून पुन्हा माथ्यावर पोहचलो आणि सर्वांनी वेळेअभावी परतीचा निर्णय घेतला गेला.
 गडाला मुजरा ठोकून आमचा परतीच प्रवास सुरू झाला होता नवीन वर्षाची सुरूवात तर छान झाली होती पण मनात काही सलत होते. याच रायगडावर महाराजांनी अशी माणसे तयार केली जी देशासाठी आपल्या प्राणांची पर्वा करीत नसत आज कुठे मिळतील ती मराठी माणसे ? याच दरबारी बसून सच्चा आणि योग्य न्यायनिवाडा झाला, येथे ना कधी जातीचे राजकारण झाले ना घराणेशाही होती तो राजांचा महाराष्ट्र आज कुठे आहे ? या गडावरचे ते वैभव तो सोहळा ती देशभक्ती कुठे पहावयास मिळेल मला. बत्तीच मण सुवर्णाचे सिंहासन होते याच ठिकाणी कुठे गेले ते ? इ.स.१६७३ मधे रायगडी भेट देणारा इंग्रज वकील टोमस निकल्स गडाविषयी लिहीतो “फ़क्त मुबलक अंन्न पुरवठा झाला तर हा किल्ला अल्प शिबंदीच्या सहाय्याने संपूर्ण जगाशी लढू शकतो” पण … पण आज हाच आमचा रायगड सांभाळायला आमच्याकडे आमच्या सरकारकडे वेळ नाही. प्लास्टीक च्या बाटल्या आणि पिशव्यांनी त्याला बसत चाललेला विळखा त्याला कधी गिळेल सांगता येत नाहीये. जगाशी सोडा आपल्याच लोकांशी आता त्याला त्याच्या अस्तीत्वासाठी लढावे लागतय हे जाणवून मनाला दुख: झाल. आणि  स्वत:च्या मनाशी, “नवीन वर्षात कमीत कमी प्लास्टीक वापरीन” हे ठरवूनच आज निद्रीस्त झालो.

भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे
९८२२८७७७६७

Friday, August 26, 2011

ऎन पावसात खुंटीच्या वाटेने सर.. ॥ किल्ले हडसर ॥

 दि. १३.०८.२०११ वार शनिवार आम्ही मावळ्यांनी बेत केला होता की या स्वातंत्रदिनी आपण कळसूबाई शिखर सर करून यायचे त्याप्रमाणे रात्रौ ११ वा. माझ्या घरापाशी जमण्याचे ठरले आणि चक्क चक्क सर्वजण हजर देखील झाले त्याचक्षणी खरतर माझ्या मनात शंकेची पाल चुकचूकली, की सर्वजण वेळेत हजरच कसे झाले ? (पूर्वानुभव बाकी काय) आम्ही ठरविलेली गाडी माझ्या घरी ११ वा. येणार होती पण पुढे १,२ तास होवून देखील पोहचली नव्हती. गाडीचे चालक त्यांचा भ्रमणध्वनी (ज्याला मराठीत mobile म्हणतात ;))उचलत नव्हते आणि मालक त्यांचा भ्रमणध्वनी उचलून काहीतरी थातूर माथूर उत्तरे देउन त्यांची वेळ मारून नेत होते आणि आमचा वेळ वाया घालवत होते. शेवट १.३० च्या आसपास आमच्या सर्वांच्या “ठरविलेल्या गाडीच्या” आशा संपुष्टात आल्या आणि शनिवारी निघणार असा बेत आखला असल्याने मारूतरायचे स्मरण करून आपण आपल्याच स्वत:च्या गाड्या घेउन निघण्याच्या निर्णय झाला तोच लगेच मारूतराया देखील आम्हाला प्रसंन्न झाले आणि आमच्या प्रवासासाठी एक नव्हे दोन नव्हे तर साक्षात तीन मारूतीची रूपे हजर झाली. मारूती झेन, मारूती स्वीफ़्ट आणि मारूती ईस्टीम. आता जवळपास २ वाजत आले होते पुण्यातून कळसूबाई पायथा गाठायला आता सकाळी उशीर होणार म्हणून आम्ही किल्ला बदलावा या मतावर आलो.”पावसाळ्यात हडसर च्या खुंटीच्या वाटेने चढणे म्हणजे १ धाडस समजतात” त्यामूळे आपण हीच मोहीम आखावी असा धाडसी निर्णय घेण्यात आला आणि गाड्यांचे धूराळे उडाले जून्नर च्या दिशेने !
दि. १४.०८.२०११ जवळपास पहाटे ४ च्या सुमारास आम्ही जुन्नर ST स्थानकात पोहचलो होतो.येथेच थोडी विश्रांती घेउन पुढे निघायचे होते साधारणत: सकाळी ७ ला आम्ही जुन्नर सोडले. रस्त्याच्या दूतर्फ़ा गर्द वनराई पसरली होती दोन्ही बाजूला असलेल्या वडाच्या पारंब्या जणू आमच्या स्वागतालाच हात पसरून उभे असल्याचा भास मला जाणवत होता.सकाळच्या प्रहरी ताई, माई, आक्का विहीरीवर पाणी भरण्यासाठी गर्दी करत होत्या तर वरती आकाशात ’खग’ देखील आपापल्या कामाला लागल्याची चाहूल जाणवत होती.चहूबाजूला उंच डोंगर आम्हाला आपल्या कुशीत घेत तो सह्याद्री आपले विराट रूप आमच्यासमोर मांडून जणू आमचीच वाट पहात असल्यासारखा भासत होता.मधूनच पावसाच्या रिमझिम ’श्रावण सरी’ आपली हजेरी लावत होत्या आणि त्यांच्या साथीलाच जणू गाडीच्या काचेवर वायपर्स खर्र. खर्र. अशी साथ देत एक नवीनच नाद निर्माण करत होत्या.रस्त्याने जाताना घाटात नागमोडी रस्त्याच्या दुतर्फा हिरवाईचा जो काही उत्सव नजरेस पडला, त्यामुळे मूड एकदम प्रसंन्न होऊन गेला होता.डोंगर उतारावरची ती टुमदार कौलारू घरे, वस्त्या पार करत आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या हडसर या गावी पोहचलो आणि तडक आपापली ओझी पाठीवरती घेउन मावळे निघाले किल्ल्यावर...तेही खडतर अश्या खुट्टीच्या वाटेने !
गडावर जाण्यासाठी ३ वाटा आहेत त्यातली सर्वात कठीण आणि प्रस्थारोहणाला अवघड पण, कमी वेळात माथ्यावर (किंवा एकदम वर) पोहचवणारी वाट म्हणजेच “खुंटीची/खुट्ट्याची वाट” म्हणून ओळखली जाते पावसाळ्यात या मार्गाने जाण्याचा अनूभव हा काही औरच असतो आता आमची पाऊले चालत होती त्या पंढरीची त्या सह्याद्रीची वाट.एकंदर १२ मावळे आता पूर्ण जोशात डांबरी रस्ता सोडून बाजूच्या शेतात घूसले होते.पहिल्यांदा पाण्यात, चिखलात पाय खराब होवू नये म्हणून जपत चालणारी पावल थोड्याच मिनीटात, हे शक्य नाही हे अनुभवाने समजून चिखलात पचा पच ढांगा टाकू लागले होते.चहूबाजूला गर्द वनराई आणि थंड हवा मनाला गुदगूल्या करत होती. चढण चढल्यावर घामेजलेल्या देहांना मध्येच रिमझीम सर गारवा देत होती.सुमारे आर्ध्या तासानंतर आम्ही सर्वजण “त्या” जागेवर पोहचलो होतो जिथून कठीण प्रस्थारोहण सुरू होणार होते.सर्वजण ’आ’ वासूनच त्या कातळाकडे बघत असताना मी आणि अमोद ने अंदाज घेण्यासाठी १-२ अयशस्वी प्रयत्न केले.थोडा प्रयत्न आणि घसरणीचा अंदाज घेउन ’हे शक्य होत नाही’ हे समजत होते आणि त्यामुळेच कदाचीत आत्मविश्वास देखील कमी होत चालला होता आता आमच्यातल्या ब-याच मावळ्यांचा हिरमोड झाला होता.पण,“त्या सह्याद्रीने आज आपल्या प्रेमाचा पुन्हा १ पुरावा आम्हास दिला”आणि कोथरूड पुणे येथून आलेल्या काही सवंगड्याची आणि आमची तेथेच भेट झाली.त्यांचा गटप्रमूख ’महेंद्र’ ने सर्वाना खात्री देत काही मि. मद्धेच हा भयंकर टप्पा चुटकीसरशी पार केला आणि वरून बाकी कार्यकर्त्यांसाठी दोर टाकला.या जागेवर “बिले” देणेही फ़ारसे सोपे नसले तरीही दोराचे १ टोक वर अडकवीण्यात आले आणि दुसरी बाजू कमरेला आधारासाठी बांधून दुसरा गडी पुढे सरसावला.थोड्याच प्रयत्नात कोणत्याही दुखापतीविना तो वर पोहचला मग काय एकमेकांना मानसिक आधार देत सर्व मावळे चढाइला लागले कष्टाने पहिली खुंटी पकडून झाली की लक्ष फ़क्त आणि फ़क्त दुस-या खुंटीवर केंद्रीत होत होते ती झाली की तिसरी मग चौथी अस करत करत प्रत्येक जण चढत होता “एकाग्रता” म्हणजे काय आणि ती जर असेल तर ’असाध्य ते साध्य’ कसे होते याची जणू प्रचितीच त्या कातळाने आम्हास दिली होती.बघता बघता सर्वजण वरच्या गुहेपाशी सुखरून पोहचले शेवट सर्वांची दप्तरे दोराने 
 ओढून घेतली गेली व पुढच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू झाली. १० फ़ूटांवरतीच पुन्हा दुस-या कातळाने आवाहन केले आणि पुन्हा त्यात रोवलेल्या खुट्टया आणि खोदलेल्या कपारींचा आधार घेत आम्ही सरसावलो. या टप्प्यात पाठीमागची खोल सरळ दरी आणि पावसाने निसरडे झालेले चढाईचे कडे आमची चांगलीच परीक्षा घेत होते.त्यांना अक्षरश: बिलगून मानवरूपी घोरपडी बनून सर्वानी तो कडा देखील पार केला.पुढच्या १ मि. मधेच मावळे पोहचले होते गडमाथ्यावर आणि सर्वांच्या छात्या त्या २ कड्यांवरच्या शेवाळ्याने, मातीने भरल्या असल्या तरी त्या फ़ुगल्या होत्या “गर्वाने,अभिमानाने आणि त्या अथांग गगनात न मावणा-या आनंदाने” !
गडमाथ्यावरून आजूबाजूचा निसर्ग फ़ारच विलोभनीय दिसत होता. एका बाजूला माणिकडोह धरणाचा महाप्रचंड जलाशय व तिन्ही बाजूंनी पर्वत रांगा त्यात अर्ध्यापर्यंत आलेले कुंद श्रावणी ढग चित्त उल्हसित करून टाकत होते, त्यांना बघतो ना बघतो तर त्यातलेच पान्हावलेले ढग मधूनच एखादी जोरदार श्रावणसर अंगावर शिंपून चित्तवृत्ती उल्हसित करुन टाकत होते.वेलबुट्टीच्या नक्षीने रेखाटलेल्या त्या हिरव्यागार रंगाच्या असंख्य छटांनी भरलेला तो मखमली शालू लपेटून तो सह्याद्री आपले मनोहरी दर्शन देत होता.मग काय पटापट छायाचित्रकार पुढे सरसावले.आता चिखल तुडवत पुढची वाट सुरू झाली आणि आम्ही पोहचलो गडमाथ्यावरच्या “महादेवाच्या मंदिरामध्ये” अजूनही पाषाणात कोरलेले हे मंदिर अगदी उत्तम स्थितीत आहे ४-५ लोक यात आरामशीर मुक्कामी राहू शकतात.आता मावळे माथ्यावर विसावले होते.सातवाहन काळातला हा किल्ला १६३७ मध्ये शहाजीरानी मोघलांच्या हवाली केलेल्या पाच किल्ल्यांनध्ये गणला जातो. थंडगार वा-याच्या साथीत, सह्याद्रीच्या कुशीत, पावसाची टपटप अनूभवत मातीच्या सुगंधात आलेयुक्त चहापान झाले आणि कोरड्या खाऊवर ताव मारून किल्ला दर्शन करत मावळे राजमार्गाने म्हणजेच पाय-याच्या वाटेने पुन्हा उतरायला लागले.वाटेत रानफ़ुलांचा मेवा फ़ारच विलोभनीय दिसत होता जणू चहूकडे गालीचा पसरल्याप्रमाणे तो भासत होता.शेकडो वर्षांपासून आजदेखील हा किल्ला आपले रांगडे रूप धारण करून आहे याची प्रचिती आम्हाला बेलाग कडे आणि उत्तूंग बुरूज देत होते. कातळात कोरलेल्या पाय-या उतरून शेताच्या बांधांवरून प्रवास करताना त्या भाताच्या खेचरांकडे बघताना “निरागसतेचे भाव” मला जाणवत होते. साधारण २ तासाच्या पायपिटीअंती आम्ही हडसर गावाच्या हनूमान मंदिरी मुक्कामी थांबलो होतो.
 २५-३० लोक राहू शकतील आश्या मंदिरात हनूमानाच्या साक्षीने पुन्हा चहापान झाले आणि तयारी सुरू झाली भोजनाची.लगोलग सगळे पुढे सरसावले.पाणी आणून किराणा बाहेर निघाला मंदिराच्या साफ़सफ़ाईला काही मावळे सरसावले तर काही आपणहून कांदे बटाटे चिरू लागले आणि आनंदाश्रूंना वाटा मिळाल्या “बल्लवाचार्याचा” पोशाख परीधान करून मी देखील पुढे सरसावलो. एकीकडे मस्त खिचडी शिजायाला पडली तोवर दुसरीकडे घरून आणलेल्या थेपल्या, पोळ्यांचा फ़डशा पडला आणि गंप्पांच्या,चेष्टा मस्करीच्या ओघात पापड भाजत रटरटलेली खिचडी बघताच पोटातल्या कावळ्यांना शांत करायला मावळ्यांची अंगत पंगत बसून मेजवानीवर ताव मारला गेला.जेवणे उरकून आता एकीकडे भांडी पालथी पडली आणि दुसरीकडे दिवसभराच्या आठवणीत रमत मावळे देखील निद्रीस्त झाले.
दि.१५.०८.२०११ सकाळी मंदिराच्या बाहेरच गावाचे झेंडावंदन असल्याने गावकरी, शाळकरी मुलांसोबत आम्ही सर्वजणांनी देखील तिरंग्याला सलामी दिली.लगेच पुन्हा न्याहरी ची लगबग सुरू झाली आणि कांदेपोहे व खास श्रावणी सोमवार स्पेशल साबु. खीचडीवर ताव हाणून आम्ही गावाचा निरोप घेतला. संपूर्ण दिवस हातात असल्याने घरी न जाता “चावंड” किल्ल्याला भेट देउनच परतीला निघायच असा प्रस्ताव मान्य झाला आणि तडक गाड्यांनी कूच केले चावंड च्या दिशेने !      
प्रसिद्ध कुकडी नदीच्या खो-यात आपल्याच थाटात उभी असलेली टुमदार कौलारू घरे, चहूबाजूला डोंगर, संतविचाराने रंगविलेल्या भिंती, बागडणारी मुले, १-२ लहान पण सुरेख मंदिरे, गावात मधोमध बांधलेला ’पार’ त्याच्या बाजूलाच दगडाच सुबकतेने कोरून काढलेली विहीर,छोटेखानी टपाल खात्याच्ये कार्याल्य आणि प्रेमाची हाक जाणणारी माणसे यांनी नटलेल्या “चावंडवाडी” या पायथ्याच्या गावी पोहचताच आपणास अगदी गावालाच चिटकून उभा असलेला उत्तूंग आणि निधड्या छातीचा कडा आव्हान देत उभा असतो तोच “प्रसंन्नगड उर्फ़ चावंड” किल्ला होय !
गाड्या अडथळा येणार नाहीत अश्या जागेवर उभ्या करून फ़क्त पाण्याच्या बाटल्या घेउन आता सर्वजण किल्ला सर करण्याकरीता पुढे सरसावले.किल्ल्य्याची उंची खूप नसल्यामुळे फ़ार दमछाक होणार नव्हती याची कल्पना सर्वांना होतीच.(नाहीतर काय डोंबल चढणार हे) मावळे आता गर्द झाडीमधून नागमोडी पाऊलवाटेने सपासप पुढे सरसावले होते. थोडे अंतर चालून जातो तोच सरळसोट कातळात जेमतेम पाउल बसेल अश्या तिरक्या खोबण्यांनी आमचे लक्ष वेधून घेतले. त्या कोरलेल्या खोबण्यांमध्ये चढताना तोल जाउन काही अपघात होवू नये म्हणून कठड्यासारख्या आधाराला लावलेक्या शिड्या दिसत मात्र होत्या पण त्या स्वत:च इतक्या अगतिकतेने खाईवर जेमतेम लटकलेल्या दिसत होत्या की त्यावर शरीराचा भार टाकण्याची कल्पनाच शक्य नव्हती आम्ही सगळे सावधतेने तो टप्पा पुर्ण केला आणि मग सुरू झाला गड प्रवेशाचा मार्ग.जवळपास १००-१२५ पाय-या चढून आम्ही गडाच्या मुख्य दरवाज्यापाशी पोहचलो. श्री. गणेशाचे सुंदर शिल्प कोरलेल्या भिंतीपाशी रस्ता डावीकडे वळून मगच दरवाजा बांधून काढला आहे जेणेकडून खालून थेट दरवाज्यावर हल्ला करणे अशक्य होईल.गडमाथ्यावर पोहचेस्तोवर तासभर वेळ देखील चिक्कार होता. गडावर आता आमचा फ़ेरफ़टका सुरू होता.बालेकिल्ल्यावरील शिव मंदिरी आम्ही नतमस्तक होवून दुस-या बाजूस असलेल्या कोरीव अश्या    तळ्यांपाशी पोहचलो. प्रगत शास्त्र आणि उत्तम शिल्पकलेचा अनूभव आम्ही समोरच पहात होतो.सुबक अश्या ७ कोरीव बारमाही पाणी असलेल्या तळ्यांच्या काठावर आता मावळे विसावले होते.एका वर्तूळाकार खड्ड्यात खडकाच्या 
बांधानीच एकमेकांपासून विलग केलेली ही “सप्ततळी” फ़ारच सुरेख आहेत. आजूबाजूचा परीसर न्याहळताना गडाचे नाव प्रसंन्नगड का याचा पुरावाच आता मिळत होता.”गार वा-याच्या झुळकेबरूबर ताल धरून त्या गडावर नावाप्रमाणेच प्रचंड वाढलेले ते हत्ती गवत “ऎरावताप्रमाणे” डोलत त्या वा-याचा मनमूराद आनंद घेत होते. चहूबाजूच्या त्या सह्यकड्यांवरून कोसळणारे असंख्य जलप्रपात आपल्या सह्याद्रीचे पाय धुण्यासाठीच जणू झेप घेताना भासत होते आणि त्याच्या पायाच्या स्पर्शाने पावन झालेले ते तीर्थ चंदेरी रेघांच्या रूपाने लांबवर पसरत जाताना फ़ारच विलोभनिय भासत होते. थोड्या वेळातच सूर्यनारायण आपल्या परतीचे संकेत देवू लागला आणि वरून दिसणा-या काळ्या आईच्या कुशीत राबणारा शेतकरी दादाची परतीच्या मार्गाला निघायाची लगबग सुरू झालेली बघताच आम्हीदेखील भानावर येउन गडाला मुजरा ठोकला.” लाडक्या सह्याद्रीला रामराम करून त्याच्यी माती हातापायावर तशीच ठेवून तिला जपत जुन्नर गाठले.जुन्नर ला मस्त खानावळ बघून सर्वांनी गुलाबजामयुक्य अश्या थाळीवर मनमुराद ताव हाणला आणि १ गाडी येथूनच मुंबई ला निघाली आणि राहिलेल्या २ गाड्यांनी पुनवडीस प्रस्थान केले.
गाडीत माझ्याबरोबर आठवणी देखील प्रवास करत होत्या.आठवत होता तो सह्याद्री जेवताना भूकेलेल्या जिवांनी ना हात धुतले होते ना कपडे साफ़ केले होते. लागलेली भूक त्या सह्याद्रीचे प्रेम आणि तो निसर्ग मला सांगत होता साद घालत होता...
“माझ्याकडे आलात की मातीतही हात घालायचा असतो, जाऊ द्यायची असते नखांमध्ये ती माती. आरे पोरांहो, ते अरोग्य शास्त्र, हायजिन, बियजिन सगळ पुढे आलं बाबा, मी या सर्वांच्या फ़ार फ़ार आधी आहे रे. आठवतय का ? ते विज्ञानाचं पुस्तक माझ्या फ़ार नंतर हातात आलय तुमच्या. ते आल्यावर हेल्थ वगैरे समजल हो तुम्हाला पण... पण आयुष्याची खरीखुरी ’गंमत’ मात्र हरवून गेलात रे तूम्ही.म्हणूनच सांगतो, माझ्यापासून दूर जाऊ नका रे पोरांनो मी भुकेलेला आहे तुमच्या प्रेमाचा !“
 मी आमच्या सह्याद्री ची ती साद,त्याची ती हाक ऎकली होती त्याच्या हाकेचा मान ठेउन मी पण आता त्या शहराच्या गर्दीत प्रवेश करत होतो अर्थात पुढच्या मोहिमेची आखणी करतच !

भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश वाळिंबे
९८२२८७७७६७

मोहिमेतील सहभागी मावळे :-             
अमोद राजे,निलेश महाडीक, प्रसाद डेंगळे,अक्षय बोरसे,अमित गाजरे,वल्लभ येवलेकर,विकास पोखरकर,अनिल पिसाळ,हेमंत जगताप,सुषांत पाटील,सुरज आणि निलेश वाळिंबे.  



Friday, July 22, 2011

सह्याद्रीतली संगीत मैफ़ल – एक स्वप्नपूर्ती


भटक्या सह्यवीरांना आपल्या सह्याद्रीबाबत वाट्टेल ती स्वप्न पडत असतात. तसच मधे मलादेखील स्वप्न पडल होत , “आपण मित्रांसमवेत मस्तपैकी सह्याद्रीच्या कुशीत आहोत पाऊसाच्या चमत्काराने आपला सह्याद्री अंगावर हिरवी शाल पांघरून आपले मनोहर रूप सर्वांसमोर मिरवतोय, थंड हवा मस्त शीळ घालतीय आणि त्याच मंजूळ शिळेची साथ संगत पकडत “बासरीचे” सूर त्या सह्याद्रीत घुमत आहेत जणू तो मुरलीधर स्वत: या स्वर्गरूपी सह्याद्रीत प्रगटलाय आणि आपल्या सूरेल स्वरांनी वातावरण अजूनच धूंद करतोय सारी दु:ख, सा-या वेदना क्षणात दूर होवून मी त्या मंजूळ स्वरांमद्धे त्या गारव्यात पूर्ण हरवून गेलोय ! ”  आणि तेवढ्यात आईच्या हाकेने मला जाग आली. नेहमीचेच आळस देउन उठलो खरा पण पडलेल स्वप्न स्वस्थ काही बसून देईना.शेवट १६ जुलै चा दिवस उजाडला आणि आमचे परंम मित्र आणि प्रसिद्ध बासरीवादक ’श्री. अमित काकडे’ यांच्या कृपेने ते माझ स्वप्न एकदाच सत्यात उतरलच... !
१५ ला रात्री आम्याचा फोन आला,“निल्या उद्या सकाळी ५.३० ला पुणे स्टेशन ला भेट मस्त “पेबच्या” किल्ल्यावर भटकंती करून येउयात खास तूला ऎकावयाला बासरी घेउन येतोय !“ 

“क्या बात है ! झक्कास,पोहचलोच समज” असा १ ओळीचा प्रतीसादाने फोन बंद झाला आणि सकाळी ६.०५ ला मी, अनिल, अमित, अशुतोष आणि संजय असे ५ जण सिंहगड खर तर सिंव्हगड एक्स्प्रेस नी कर्जत ला रवाना झालो. सकाळची न्याहरी म्हणून अंडा आम्लेट आणि व्हेज कटलेट वर गाडीतच मस्त ताव मारून ८ वा कर्जत गाठले.आज आमच्या गाड्या वेळेत सुटल्या होत्या पण अनिल ची गाडी काही आज वेळेत सुटली नव्हती त्यामूळे त्याने कर्जत स्टे. ला १ अयशस्वी प्रयत्न केला.(अर्थबोध होत नसेल तर खाजगीत संपर्क करा) आणि लगेचच आम्ही लोकलने नेरळ स्टे. गाठले.नेरळहून आम्हाला संजय नामक सारथ्याचे दर्शन घडले आणि “एका रिक्षेत सारथीसह (फ़क्त )६ जण कसे आरामशीर बसू शकतात हे उदा: सह स्पष्ट करत आम्हा मावळ्यांना किल्ले पेबच्या पायथ्याला असलेल्या “फ़णसवाडीत” सुखरूप (अस आता म्हणतोय) पोच केले.वाडीत पोहचताच निथळ खळखळणा-या झ-याचा आवाज जणू आज सूरांची मैफ़ल ‘नक्की’ याची पावती देवून गेला.इथेच आम्हाला “गुरूप्रसाद” वाटाड्या म्हणून मिळाला आणि साक्षात आमचा गुरूच असल्याचा पुरावा देउन गेला.
पेब उर्फ़ विकटगड आता आम्हाला आव्हान देत होता. गडाच्या पायथ्याशी असलेल्या “पेबी” या देवीवरून याला पेब असे नाव पडले.हा किल्ला स्वराज्यात सामील झालेला असून महाराजांनी धान्य कोठारासाठी याचा उपयोग केला अश्या नोंदी आढळतात. साधारण सकाळी ९ च्या आसपास आम्ही मावळ्यांनी गडाकडे प्रस्थान केले.
अतिशय मनमोहक वातावरण होते लांबवर गडावरून पडणारा धबधबा आमचे लक्ष ओढून घेत होता आणि आपोआपच पाउले झपाझपा पडत होती जवळपास १ तासातच आम्हाला आता चढण लागायला लागली.वरूणराजाच्या कृपेने आजूबाजूचा परीसर चांगलाच खूलला होता. रान चांगलेच माजल्याने ते तूडवतच आता आमचा प्रवास सूरू झाला.चहूबाजूला हिरवी वनराई मनाला आणि शरीराला सतत गुदगूल्या करत होती. संपूर्ण रस्ता भलताच निसरडा झाल्याने जागोजागी लोटांगणे घालतच मावळे पुढे चालत होते त्यातही लोटांगणे घालण्यात अनिल आघाडीवर होता.हिरवीगार गवताची पाती वा-याच्या झुळूकेबरोबर अल्लड्पणे डोलताना फ़ारच सुंदर भासत होती. जवळपास २ तासानंतर १ छोटासाच पण पाऊसामूळे जरा कठीण वाटावा असा १ Rock Patch पार करून मावळे माथ्यावर विसावले. मावळ्यांचा आनंद आता गगनात मावेना, मग काय... “क्षत्रीय कुलावतंस.....” च्या घोषणेने सारा आसमंत दुमदूमला आणि जणू महाराजांनी “आजून मी इथेच आहे तूमच्याच बरोबर” याचाच काय तो पुरावा म्हणून त्या कातळकड्यांमधून “प्रतीध्वनी” उमटले.एका कड्याला डाव्या बाजूला ठेउन उजवीकडे हिरव्या रंगाच्या असंख्य छटांची शाल पांघरून बसलेल्या जवळपास २००० फ़ूट खोल दरीतल्या त्या निसर्गाची किमया पहात आम्ही पुढे सरसावलो आणि १० मि. मद्धेच डाव्या हाताला वरच्या बाजूस असलेल्या प्रचंड मोठ्या आणि अतिशय स्वच्छ अश्या गुहेच्या तोंडापाही आपापल्या पाठा टेकल्या.


गुहेच्या माथ्यावरून छोटासा पण मन चिंब करणारा धबधबा खूपच सुंदर दिसत होता. समोरच्या दरीमधे आता धुक्याने आपली चादर पांघरून पांढ-या शुभ्र दरीचे मनमोहक दर्शन दिले होते आणि गार वारा आता वरूणराजाच्या आगमनाची चाहूल देतो तोच, धो धो करून आपली हजेरी लावून देखील गेला. आता पोटातले कावळे आपली चाहूल भासवत होते मग काय पटापटा बत्ती पेटली आणि गारव्यात मस्तपैकी खीचडी रटरटली तीकडे चुलीवर गुरूने सगळे पापड भाजून तयार ठेवलेच होते. आता पापड म्हणल की माकड आलच त्यामूळे त्या रानटी माकडांच्या साथीनेच या शहरी वानरांनी मस्त पापड खिचडीवर ताव हाणला.
आता पोटोबा शांत झाले होते वातावरण हलकासा गारवा मनाला गिरक्या घालून परत त्या शुभ्र दरीत लुप्त होत होता पावसाची रिमझीम सुरूच होती आणि अचानक त्या गुहेतल्या प्रसंन्न शांततेत काही क्षणातच “पहाडी” रागाचे ते मंजूळ स्वर निनादले आणि अमित ने ताबडतोप ’वाह वाह’ ची दाद मिळवली.मग काय फ़र्माईशी सुरूच झाल्या पहाडी,शिवरंजनी असे एकापेक्षा १ राग त्या वातावरणाला आजून धूंदी आणत होते मग फ़िल्मी संगीत म्हणून खास हिरोची धून झाली आणि तिर्थ विठ्ठल या अभंगाने मैफ़लीची (वेळेअभावी) सांगता झाली.मी आता पूरता हरवून गेलो होतो माझे स्वप्न आज सत्यात उतरल्याचा आनंद काही औरच होता हिरव्या शालीने नटलेल्या त्या सह्यकुशीत आज मी बासरीचा मंजूळ आवाज ऎकत होतो आणि साथीला होते ते कोसळणारे धबधबे, पावसाच्या जलधारा, टप टप पडणारे ते टप्पोरे थेंब, आणि लडीवाळ शीळ घालत जाणारा तो वारा ! कोणताही ताण, क्षिण मनावर नसेल तर “पवित्र मनाला”   येणा-या त्या अनुभूतीने मला आनंदून टाकल होत. सगळे मावळे सापाने कात टाकून पुन्हा तरूण व्ह्यावे त्याप्रमाणे तरतरीत झाले होते आणि आम्ही अमित काकड्यांचे ’आभार’ मानून आता बालेकिल्ला सर करायला पुढे सरसावलो होतो.गुहा डाव्या हाताला ठेवून सरळ पुढे गेल्यावर शेवटी रस्ता संपतो आणि वरून पडणा-या पाण्यामूळे थेट खोलवर दरीत एक घळ उतरते बरोब्बर तिच्या तोंडालाच १ लोखंडी शिडी एका कातळावर घट्ट बसवलेली दिसते. बास, त्याच शिडीवर चढून धुक्याचे ढग पार करून आम्ही आता जणू स्वर्गप्रवेश केला होता आणि आमच्या सर्वांच्या नजरेसमोर पसरला होता, शेकडो वर्षे पहाडासारखी छाती ठोकून उभा ठाकलेला तो अथांग सह्याद्री...

 वरून माथेरान,नाखिंडाचा डोंगर,कलावंतीण,सोनोरी असे अनेक दुर्ग आम्हास खुणावत होते. तो सह्याद्री आपल्या अंगावर पांघरलेली धुक्याची चादर काही क्षण झटकून समोरची हिरवीगार कुरणे,झाडी,वेल्या,धबाबा कोसळणारे धवधबे,शिखरावरून जणू नक्षी काढावी त्याप्रमाणे चंदेरी झालर घेउन थेट पायथा गाठणारे ते झरे शिवणापाणी चा खेळ खेळणारे ते दवबिंदू आशी अनेक मनोहरी दृष्ये दाखवून परत शाल लपेटून बसत होता.अगदी ताज्या ताज्या हिरव्यागार गवतावरून आम्ही भटके मुक्तपणे विहार करत होतो.थोडे अंतर गेल्यावर आम्ही एका छोटेखानी पण सुंदर अश्या शंकराच्या मंदीरापाशी पोहचलो.भोलेनाथाचे दर्शन करून आता परतीला निघायचे होते.
निघताना प्रत्येकाने आपली प्रकट मुलाखत देवून अशुतोष च्या ’स्व’-वाहिनीला सहकार्य केले, आणि घसरत घसरतच जवळपास मावळे परतीला निघाले.तास दिड तासात आम्ही गुरूच्या घरी पोहचलो दुध नसले तरी “मायेच्या साईने” भरभरून असा गरमागरम चहा मारून पुन्हा संजयच्या रथात बसून नेरळ स्टे. गाठले आणि कर्जत ला वडापाव हाणून कशीबशी रेल्वेत जागा मिळवली.२ तास उभे राहून संजयच्या करामती बघत पुणे स्टे. गाठले आणि शेवट उतरल्यावर दोस्तांनी पुढच्या मोहीमेच्या आखण्या करत एकमेकांना मिठ्या मारल्या व आपापल्या घरी रवाना झाले. मी स्वप्नपूर्तीचा आनंद घेत घरी जाउन आता पुन्हा आपल्या सह्याद्रीचे एक नवे स्वप्न पाहण्यासाठी लगेचच हंतरूणात पसरलो होतो......