Thursday, November 19, 2015

कट्य़ार काळजात घुसली.. का(?)

दिपालवी च्या आगमना प्रित्यर्थ मराठी रसीकांना मिळणारी खास भेटम्हणून कट्यार काळजात घुसली या गाजलेल्या संगीतनाटकावर आधारीत चित्रपट येतोय याचा सर्व मराठी रसीकांना नक्कीच आनंद झाला, ही संगीतभेट लौकरात लौकर मिळावी म्हणून झाडून सर्व तिकीट खिडक्या भरून वाहिल्यादेखील.उत्तम कलाकार, दर्जेदार आणि कसलेले गायक व संगीतप्रेमींसाठी ठेवलेले चित्रपटाचे नाव यामूळे चित्रपट चालणार यात शंका नव्हतीच/नाहीच पण मूळ कथेला वेगळेच वळण दिल्या कारणाने रसीकांना मिळालेली भेट ही "खास" भेट नक्कीच नाही बनू शकली याचे दु:ख झाले....त्यामूळे काही लोकांनी मांडलेले आणि मला वाटलेले हे समीक्षण.
दार्व्हेकरांनी अत्यंत विचारपूर्वक केलेल्या लिखाणाने व आपल्या सूरेल गळ्याने खांसाहेबांच्या भूमिकेत पंडित वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेले नाटक म्हणजे "कट्यार काळजात घुसली". हे नाटक अजरामर होण्यामागची २ मूख्य कारणे म्हणजे त्यातील संगीत आणि दुसरी म्हणजे या नाटकाची रचली गेलेली गोष्ट. या नाटकातीलं प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात स्व:तचा असा निर्माण केलेला आदर हेच तर या नाटकाचे वैशीष्ठ. पंडितजि व खांसाहेब हे मूळ नाटकात जरी एकमेकांचे (संगीत) स्पर्धकच दाखविलेले असले तरीही त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात खांसाहेब या पत्राबद्दल "कमालीचा" द्वेष कोठेच तयार होत नाही किंवा पंडितजिंचा शिष्य  सदाशिवने खांसाहेबना हरवून राजगायकपद मिळवून त्यांचा बदला घ्यावा असेही प्रेक्षकांना सतत वाटत राहात नाही हीच या नाटकाची किमया होती. रंगमंचावर अंकांनपाठोपाठ  हे नाटक आपोआप उलगडत जाते ते फ़क्त "स्वर, संगीत, त्यावरील प्रेम व ती संगीतकला यांनाच "मध्यभागी"/फ़ोकस ठेऊन आणि त्यामुळेच या नाटकात कोणीही एकमेकांचे  अजात शत्रू  नसतानाही केवळ लेखन आणि संगीताच्या जोरावर संघर्ष निर्माण करण्यात दार्व्हेकर कमालीचे यशस्वी ठरले हे मान्यच केले पाहिजे." आपल्या स्पर्धकाचा शिष्य असल्यामुळे नाही तर आपल्या घराण्याच्या गायकीत कोणतीही भेसळ नको म्हणून आणि फ़क्त म्हणूनच खांसाहेब  सदाशिवला संगीत शिक्षण नाकारतात हे मूळ नाटकात स्पष्टपणे जाणवते, त्याना पंडितजींच्या गायाकीबद्दल व त्यांच्याबद्दल नितांत आदर असतोच तसेच स्व:ताच्या पत्नीने पंडितजींवर केलेल्या कपटामूळे मला राजगायकपद मिळाले ही खंत देखील खांसाहेबांना कायम सलत असते.सदाशिव च्या गाण्यावरील असलेली निष्ठा पाहून त्याचा आदर असणारे आणि “ऐसा शागीर्द मेरे घराने में क्यो नही पैदा किया” असे चिडून बोलणारे नाटकातील खांसाहेब कायम स्मरणात राहतात.(त्यांची दुश्मनी नाही) कलाकारांच्या अद्भुत स्वरांनी तृप्त असा स्वरनाट्ययोग.. अर्थात मुळात अत्यंत उत्तम संहिता व त्याला शास्त्रीय संगीताची सूरेख जोड यामुळे हे नाटक आजही एक अजरामर कलाकृती बनून राहिले आहे यात दूमत नसावे.
पण आधुनिक चित्रपटात वठवलेले खांसाहेब मुळ नाटकाच्या खांसाहेबांच्या पूर्ण विरूद्ध वाटतात, खांसाहेब व त्यांची पत्नी हे अगदी पहिल्या मिनीटापासून खलनायक आहेत हे देखील प्रेक्षकांच्या लक्षात येते.(ज्यांनी नाटक पाहिले नाही त्यांच्यादेखील) तसेच खांसाहेब आणि स्वरांसाठी अधीर असलेला सदाशिव हे दोघेही सतत सूडबुद्धीने वागत असलेले दाखवल्याने मूळ कथेचा गाभाच बरासचा बदलून जातो. सदाशिव कडे आपला शत्रू असल्यासारखे (सतत) बघणारे खांसाहेब व कहर म्हणजे “जे हात तानपुरा चालवू शकतात ते गळाही दाबू शकतात’ असे फिल्मी डाइलोग बोलणारा सदाशिव हा तोच स्वरांसाठी अधीर असलेल्या सदाशीव आहे का (?) अशी शंका मनाला चाटून जाते. आणि त्यामूळेच मूळ कथेतील गुणीजणांची कदर करणारे खांसाहेब व गायनकले करीता स्वरांची भिक मागणा-या सदाशिव यांच्या मूळ व्यक्तीरेखाच चित्रपटात जरा बाजूला पडत जातात. जी थेट स्पर्धा व दुष्मनी पुरषोत्तमजी दार्व्हेकारांना नाटकात अभिप्रेतच न्हवती तीच स्पर्धा फ़ार ठळक पणे चित्रपटात दाखवली गेली आहे असे सतत जाणवते. मुळ नाटकात "जिथपर्यंत सदाशिवचा गळा जातो , तिथपर्यंत तुमची नजर तरी जाते का ?" असे आपल्या आळशी पुतण्यांना ठणकावुन सांगणारे, पण त्याचवेळी "एकवेळ मी सदाशिवला माझी मुलगी देईन , पण माझ्या घराण्याची गायकी मात्र कधीही देणार नाही" असा निर्धार केलेले खांसाहेब प्रेक्षकांच्या मनात अजरामर स्थान मिळवतात, पण ती जागा काही काही दृश्य जास्त मसालेदार करून चीत्रपटातील खांसाहेब नक्कीच गमावून बसले आहेत. चित्रपटातील "गायन संघर्ष बाजूला पडतो आणि दूश्मनी शिगेला पोचल्याची जाणीव कायम प्रेक्षकांना होत राहते."
एक नवीन प्रयोग म्हणून सिनेमा बघायला हरकत काहीच नाही पण, दुस-याच्या चांगल्या कामात स्व:ताची भेसळ करणे योग्य नसून मूळ निर्मात्याचा तो अपमानच असू शकतो असे मला तरी वाटते. मूळ नाट्कातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे, "सूरेल गाणी/नाट्य़पदे ज्यावरच हे नाटक अजरामर झाले आणि त्या नाट्कावर चित्रपट बनविण्य़ाची ईच्छा देखील त्यामूळेच झाली असणार, पण चांगले पाव डझनापेक्ष जास्त दिग्गज गायक सोबतीला असताना नाटकामुळे अजरामर झालेली गाणी फारशी न खुलवता काही मिनिटांत आटोपती घेतली आहेत याची सल अभिजात संगीत ऐकायला आलेल्या प्रेक्षकांच्या मनात कायम राहते हे नक्की." नाटक व चित्रपट यांची तुलना केल्यामुळे हे भास होत असतीलही कदाचीत पण 'नाटकाचा चित्रपट बनवला ' अशी कबूली आणि  अशीच जाहीरात देखील खूद्द निर्माते व सर्व कलाकार करीतात त्यामूळे मायबाप प्रेक्षकांना(किमान मला तरी) तूलना न करणे शक्य होत नाही... नाटकाचाच चित्रपट करायचा होता तर मुळ गोष्टीला कोणताही धक्का न लावताही चांगले लिखाण करून चित्रपट यशस्वी करताच आला असता व मायबाप प्रेक्षकांना अजूनही तृप्त करीता आले असते असे नक्कीच वाटते. उच्च दर्जा राखत सूरेल गाणी प्रेक्षकांना मिळून देखील चित्रपट्गृहातून बाहेर पडताना मूळ कथेत झालेल्या विचीत्र बदलामूळ संगीताचे महात्म्य बाजूला पडल्याची खंत वाटते व चंदेरी कट्य़ारीवर असलेल्या संगीताच्या धारेपेक्षा अहंकारामूळे निर्माण झालेल्या दुश्मनीची धार अधीक बोचरी वाटते.
तरीही चित्रपटातील जमेच्या बाजू सांगावयाच्या झाल्याच तर, राहुल देशपांडे, शंकर महादेवन, महेश काळे आणि अरिजितसिंगसारखे तयारीचे गायक घेत गायकीचा दर्जा राखण्याची घेतलेली काळजी नक्कीच स्तूत्य आहे, शंकर महादेवन व टीम ने सूंदर शब्दांना अभिजात संगीताने नटवून कर्णमधूर आणि उत्तम दर्जाची निर्माण केलेले संगीत फ़ार अप्रतीम झाले आहे. तसेच बॉलीवुडच्या सिनेमांच्या बरोबरीत भव्य, देखणी, भरजरी आणि नजर खिळविणारी कलाकृती पाहून डोळ्यांचे पारणे फ़िटते आणि अचूक कलाकारांची निवड करून बरेचवेळा त्यातील काही वाहवत जाणा-या कलाकारांना  योग्य पद्धतीने लगाम लावण्यात सूबोध भावें नक्कीच यशस्वी ठरले आहेत.अजरामर झालेल्या या नाटकावर चित्रपट बनवीण्याची केवळ हिम्मद दाखवणे नाही तर त्यात अजून काही गाणी भरून त्यांचा दर्जा राखण्याकरीता केलेला प्रयत्नांत पहिल्याच दिगदर्शनात सूबोध भावें यांनी बाजी मारली आहे. यामूळे मराठी संगीत नाट्यांना नवे स्थान प्राप्त होऊन नवा चाहता वर्ग देखील नक्कीच मिळेल फ़क्त.... चाहत्या वर्गाला मूळ कथेतील पात्रांबाबत होणारा गैरसमज नसता झाला(जो दूनियादारीत देखील झाला) तर अत्यंत आनंद वाटला असता. असो..

भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच),
निलेश गो. वाळिंबे.


तळटीप :-  सदर समीक्षण हे वैयक्तीक असून यात कोणाच्याही भावना दुखवीण्य़ाचा उद्देश नाही तसेच कोणाचाही अपमान करीण्य़ाकरीता हे केलेले नसून केवळ मला जे जाणवले (माझा वेळ आणि पैसे घालवून) ते मांडण्य़ाचा प्रयत्न आहे

Thursday, April 2, 2015

|| सह्याद्रीतल्या घाटवाटेत स्वागत नववर्षाचे ||

३१ डिसें. च्या रात्री काहींना मद्यधूंद होवून नाचून पाय दुखवून घेणे आवडते तर काहींना सह्याद्रीची पायपीट करून पाय दुखवून घेणे आवडते... पाय दोन्हीकडे दुखतात नक्कीच पण दोघांची "नशा" मात्र फ़ार वेगवेगळी असते. यातल्या सह्यवेड्यांची जी नशा असते ती काही औरच म्हणता येईल.पायपीट करून नूतन वर्षाची सुरूवात निसर्गाच्या कुशीत करायला मिळणे म्हणजे सारे वर्ष आनंदात जाणार हीच त्यांच्या मनातील भावना असते. म्हणूनच "भरारी" च्या मावळ्यांनी या वर्षाअखेरीस आपण फ़क्त किल्ले न करता तगड्या घाटवाटा तूडवायच्या त्यांच्या कुशीत सरत्या वर्षाला निरोप देयचा तसेच नूतन वर्षाची सुरूवात देखील त्या पवित्र सह्याद्रीतूनच करण्याचे पक्के केले आणि भन्नाट बेत ठरला... 

पुण्याहून साम्रद या गावी गाडीने पोचायचे तेथून निसर्गाचे वरदान लाभलेल्या करोली घाटातून उतरण्यास प्रारंभ करायचा -- बाण सुळक्याच्या पायथ्याला जिथे सांदण घळ संपते तेथील नैसर्गिक डोहापाशी सरत्या वर्षाचे अखेरचा मूक्काम टाकून -- दुस-या दिवशी पुढे नदीपात्रातून आजोबा पर्वतावरील वाल्मिकी आश्रमात दुसरा मुक्काम टाकायचा आणि -- अवघड आणि अनवट अश्या गुहेरीच्या दारातून प्रवेश करून तिसरा मुक्काम करत -- कुमशेत मार्गे पुण्यनगरीस परत यायचे.मग काय असा रांगडा बेत ठरल्यावर मेलामेलीअंती तब्बल १२ मावळे तयार झाले आणि  ३० डिसे २०१४ ला रात्री गणेशस्तवन करून गाडीचा धुराळा उडाला. 

गाणी म्हणत, गप्पा मारत, न आलेल्या मावळ्यांच्या नावाचे उद्धार करता करता गाडीत झोपण्यास मध्यरात्र उलटली आणि पहाटे पहाटे खास 'बांग' ऎकण्यासाठी गाडीचे ब्रेक लागले व 'गाडी लागल्याने' आमच कोंबड आरवल.(अर्थबो्ध होत नसेल तर घाटवळणाचे रस्ते ST ने माझ्याबरोबर फ़िरा आणि तो आनंद अनुभवा (अर्थातच माझे तिकीट तुम्ही काढून)) तसे सर्वजण जागे झाले आणि पून्हा गप्पाचे फ़ड रंगले. सूमारे पहाटे ६, साडेसहाच्या दरम्यान आमची गाडी डोंगराच्या कुशीत वसलेल्या छोटेखानी पण सूंदर अश्या 'साम्रद' या गावी पोहचली.आवश्यक साहित्याची बांधाबांध झाल्यावर आपापले पिट्टू खांद्यावर टाकून मावळ्यांनी शिवरायांचे नाव घेतले आणि वाटाड्या सोबर आमची तंगडतोड सुरू झाली. २ वर्षापूर्वी दोर लावून सांदळ घळ चढताना ज्या जागेवर मुक्काम टाकण्यात आला होता त्याच ठिकाणी म्हणजे सांदण घळीच्या अगदी पोटात असलेल्या निसर्गरम्य डोहापाशी आम्ही या वर्षाअखेरचा शेवटचा मूक्काम टाकणार होतो, फ़क्त या वेळी उतरण करोली घाटातून सुरू केली होती. उत्तूंग सुळक्यांच्या मधून जाणारी ही पायवाट फ़ारच सुरेख आहे. १५-२० मिनिटात थोडे उतरून छोटासा रॉक पॅच पार करून आमची वाट आता डाव्या बाजूने पुढे जात होती आणि हरिशचंद्र गडावरील प्रसिद्ध अश्या कोकण कड्याची जणू प्रतिकृतीच म्हणता येईल अश्या अतिशय सुंदर मिनी कोकणकड्याचे ते विराट (नाव मिनी असलेतरी विराटच) रूप दिसले आणि सह्याद्रीच्या त्या मदमस्त रूपाला सलाम ठोकून आम्ही पुढे निघालो. हवेत तसा गारवा असल्याने मावळ्यांची दमछाक फ़ारशी न होता मस्त गप्पागोष्टी करत प्रवास सुरू होता. आणि पूढील तीन दिवसातील संपूर्ण ट्रेक मधे असंख्य वेळा ऎकू आलेले सूदीप माने उर्फ़ चेन्नई रिटर्स अर्थात हिमाल्यपूत्र याचे ते वाक्य कानावर आले आणि आम्ही पहिला थांबा घेतला. "काहीतरी खायला आहे का ?? " प्रचंड केविलवाण्या स्वरात 'काहीतरी खायला आहे का' हे वाक्य उद्गारायचे व त्याबरोबर जगातील सर्वात जास्त कूपोषीत मूलाला लाजवेल असा चेहरा करून पुढ़च्या २ मिनीटात काहीतरी खायला मिळवायचेच यात या माणसाचा हातखंडा. मग काय पटापट ३ दगडांची चूल मांडून त्यावर गरमागरम मॅगीचा पहिला नाष्टा तयार झाला व त्यावर उड्या पडल्या लगोलग फ़क्कड चहापान उरकून थोड्या विश्रांतीअंती पुढच्या प्रवासाला सुरूवात झाली. घसा-यावरून सरकत एकमेकांना हाक देत साधारण दुपारी २-३ वाजता आम्ही थेट मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो देखील.    

चहूबाजूला उत्तुंग डोंगर, हिरवीगार वनराई, प्रसंन्न शांतता, खळखळत जाणारा झरा, त्याचाच पुढे जाउन बनलेला छोटासा धबधबा आणि धबाबा कोसळणा-या पाण्याचे नितळ पाण्यात रूपांतर करून  मनाला एक विलक्षण शांती देणारा तो नैर्सगीक डोह. सह्याद्रीच्या उंचीचा जणू पुरावाच म्हणून थेट आकाश फ़ाडून स्वर्गात घुसलेला उत्तुंग बाण सुळका, निसर्गाचा अविष्कार ठरलेली ती नैसर्गीक सांदण घळ अश्या अतिशय प्रसंन्न ठिकाणी आम्ही पोहचलो होतो. सरत्या वर्षाच्या मावळत्या दिनकराला आज येथून प्रणाम करतानाच नूतन वर्षाच्या त्या रवीला देखील अर्घ्य अश्या निसर्गरम्य ठिकाणाहून देता येणार या गोष्टीचा मनोमन आनंद होत होता. जणू सह्याद्रीच्या पर्वत रांगांनी गोल फ़ेर धरून आम्हा लेकरांना त्याच्या पोटात खेळण्यासाठीच ही जागा बनवली असावी असा मनोमन समज करून खांद्यावरच्या पाठविशव्यांना थोडा आराम देउन आमच्या उड्या पडल्या त्या थेट स्वच्छ, नितळ आणि थंडगार पाणी असलेल्या त्या डोहात. जलतरणाचा मनोमन आनंद घेत अंग मोकळे करून मनसोक्त दंगा करून आम्ही पुन्हा डोहाच्या काठावर विसावतो तोच पुन्हा तो आवाज कानावर पडला..."काहीतरी खायला आहे का ?" आणि भुकलाडू, भडंग, गूळपोळी, पू-या, बिस्कीटे असा चमचमीत माल बाहेर काढता काढता संपून देखील गेला. पोटपूजा उरकून आता मावळ्यांचा स्वछंदी विहार सुरू झाला होता, मग छायाचित्रकारीतेचा छंद जोपासणा-यांचा क्लिकक्लिकाट सुरू झाला तर दुसरीकडे मुक्कामाच्या जागेची साफ़सफ़ाई करून पथा-या पसरून शिळोप्याच्या गप्पांचा फ़ड जमला. थोड्याच वेळात १५ जणांचा मुंबईचा एक गट सांदण घळ उतरूण याच ठिकाणी मुक्कामाला आला आणि त्यांची चूल पेटते ना पेटते तोच पून्हा तो आवाज आला "काहीतरी खायला आहे का ?" आता मात्र त्या केविलवाण्या चेह-याने चक्क चूल मांडायला घेतली. सरपण गोळा करून शिधा बाहेर काढण्यात आला व बल्लवाचार्याचा पोशाख मला चढवून 'लसूण तडका मारके मूगाच्या खिचडीची' फ़र्माईश झाली.कोणी कांदा चिरून घेत होता, कोणी किराणा लावून घेत होता, कोणावर पिण्याच्या पाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली तर कोणी रिकामटेकडा चूली फ़ुंकू लागला. एका चुलीवर पाणी गरम करण्यात आले तर दुसरीचा ताबा माझ्या हाती देण्यात आला. सर्वांच्या हातभाराने आता गरमागरम खिचडी रटरटू लागली तर दूसरीकडे पापड भाजले गेले. खमंग वासाच्या त्या खिचडीवर शेवटी पेश्शल...साजूक तूप का लसूण तडका देण्यात आला.  पान मांडली गेली व वदनी कवळ घेता... च्या उच्चाराने गरमागरम खिचडी पापडावर ताव मारण्यात आला. मस्का मारून माझ्या पाककलेवर जी स्तुतीसुमने उधळली गेली त्यामुळे मला २ घास जरा जास्तच गेले. मनसोक्त ताव मारून (पार खरपूडी काढून खाउन) तृप्तीचे ढेकरांची पोचपावती दिली गेली आणि भांडी घासून पालथी देखील पडली. आता पून्हा त्या चांदण्यात गप्पाचे फ़ड रंगू लागले तेवढ्यात ४० जणांचा कोल्हापूर करांचा १ मोठा गट मूक्कामी पोहचला. एकंदर ५०-६० माणसे एवढ्या जागेत कशी बसणार ? आता ही लोक रात्री दंगा/पार्ट्या करणार अश्या शंका आमच्या मनाला चाटून गेल्या ख-या पण त्या पार फ़ोल ठरल्या. त्या सह्याद्रीने अगदी सहजपणे सर्वांना आपल्या कुषीत घेतलेच होते.. पण धांगड्धींगा वाले देखील शहरातच मागे सोडले होते.बाकी मंडळी त्यांच्या उद्योगात असताना आता भरारी चा जागर सुरू झाला... आणि 'भरारी तानसेन' पदवी मिरवणारे राकेश साहेबांची मैफ़ल बसली. गोंधळ, भावगीते, मराठी चित्रपट गीते यांचे सादरीकरण झाले आणि कान, मन तृप्त करून टाळ्यांची दाद देत त्या अनोख्या जागी सरत्या वर्षाला निरोप देउन मंडळी निद्राधीन झाली ते.. नूतन वर्षाच्या सूर्यदर्शनासाठी.
         
         
     नूतन वर्षाच्या पहाटेलाच चक्क निसर्गाने देखील खूश होत पावसाच्या एका सरीने सर्वांना जागे केले. प्रार्तविधी उरकून, बाकी मंडळींनाआवराआवरीस मदत करून निरोप दिले गेले तोच पून्हा आवाज आलाच 'काहीतरी खायला आहे का ?' खास आग्रहास्तव गरमागरम "कांदेपोहे" कार्यक्रम पार पडला. (सगळे विवाहीत पण हा कार्यक्रम आजूनही आवडीने करतात) व पिट्टू पून्हा सज्ज केले गेले पुढच्या प्रवासाला. पुढची वाट समजून घेत आमच्या वाटाड्याला आता निरोप देण्यात आला. त्याच्या म्हणण्यानूसार... "लै लांब नाय...इथून व्हड्यानी खाली जावा तिथ थेट नंदीला भिडलानव्ह..की नंदींपासून सीधा जात राव्हा कूठ्बी नाय व्हळायच....इस्ट्रेट जात राव्हा की २-३ घंट्यात गावातच पोचताय ! " अशी अगदी तंतोतंत वेळ आणि वाट पाळत आम्ही थेट पोहचलो डेहणे या गावी. ब-यापैकी दमछाक झालेली होती पण येथून आजोबा पर्वत गाठण चांगल वाट लावणार होत म्हणून गडी जरा दम खात होते तेव्हा पुन:श्च तो आवाज घूमला..काहीतरी खायला आहे का ?' काहीतरी भूस्कट त्याच्या तोंडात कोंबत असतानाच लांबवर १ जीप जाताना दिसली म्हणून आरोळ्या ठोकल्या तर नशिबाने दादा अर्ध्या वाटेवर सोडायला तयार देखील झाले. मग काय पटापटा जीप मधे (१ जीप मधे १२+२ असे १३ फ़क्त) बसलो आणि गावाच्या नागमोडी वळणातून कौलारू घरांना मागे टाकत आम्ही निघालो आजोबा पर्वतावरील प्रसिद्ध वाल्मीकी आश्रमाकडे.. चढाच्या अर्ध्या रस्त्यात गाडीने जाण्यास मिळाल्याने आता बाकी चढाईला पून्हा जोम चढला होता. दोन्ही बाजूला उंच च्या उंच झाडे, प्रचंड बनराई आणि त्यातून जाणारी  वळणावळणाची सुंदर वाट उन्हाचा जराही चटका लागू देत नव्हती. सुमारे तास, दीडतासाची ती चढण चढूण आता आम्ही पौराणीक महत्व असलेल्या आजा पर्वताच्या अर्ध्या पाऊण उंचीवर असलेल्या 'वाल्मीकी आश्रमात' पोहचलो होतो.                                         
विविध जातीच्या सापांचा सुळसूळाटामूळे आणि रंगीबेरंगी पक्ष्यांचा किलबीलाटामुळे प्रसिद्ध असलेला,निसर्गसौंदर्याचा वरदहस्त लाभलेला 'आजोबा डोंगर' म्हणजे ट्रेकसाठी खरच उत्तम पर्याय म्हणता येतो. या गडाला 'अजापर्वत' किंवा 'आजोबाचा डोंगर' असेही म्हणतात.. नावाप्रमाणेच हा गड सर्व डोंगररांगांमध्ये वडिलधाऱ्या डोंगराप्रमाणे भासतो. प्रचंड वनराईमधून विहार करत आश्रमापर्यंत पोहचणे, पुढे घसा-याच्या वाटेवरून सीतेच्या पाळण्यापर्यंत चढण चढणे आणि त्यापूढे अतिशय अवघड असे प्रस्तारोहण दोराच्या साह्याने पार करणे या सर्व गोष्टींमुळे गिर्यारोहकांना मोहित करणाऱ्या या 'आजोबा डोंगराच्या' नावाचीदेखील एक पुराणकथा सांगितली जाते; याच डोंगरावर बसून वाल्मिकी ऋषींनी 'रामायण' हा धर्मग्रंथ लिहिला, या डोंगरावर सीतामाईने लव, कुश यांना जन्म दिला व लव-कुश वाल्मिकी ऋषींना आजोबा संबोधत, म्हणूनच या डोंगराला 'आजोबा' असे नाव प्राप्त झाले, अशी अख्यायिका सांगितली जाते. म्हणूनच या डोंगरवर वाल्मिकीऋषींचा आश्रम व त्यांची अतिशय सुंदर समाधी आहे. अनेकांचे श्रध्दास्थान असलेली ही पवित्र जागा फ़ारच शांत आणि निसर्गाची पुरेपूर उधळण झालेली आहे. अनेक वर्षे मोठ्या श्रद्धेने आणि पारंपारीक पद्धतीने या जागेचे महात्म्य आजतागायत जपले गेले आहे.सध्या २ साधू महाराजांकडून या ठिकाणाची व्यवस्था, येणा-या जाणा-या भक्तांची काळजी, रोजची पूजाअर्चा मोठ्या भक्तीभावाने यथासांग पार पाडली जाते. यांच्या अगोदर अनेक वर्षे या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या साध्वी स्त्री ने आपला देह याच ठिकाणी ठेवल्यानंतर त्यांची छोटीशी पण छान समाधी बांधून या दोन साधूंनी मोठ्या आनंदाने तेथील कारभार सांभाळला आहे.एकाचवेळी १०० च्या वर जास्त भावीक/पर्यटक व्यवस्थीत मुक्काम करू शकतील एवढी मोठी धर्मशाळा या ठिकाणी बांधली असल्या कारणाने राहण्याचा प्रश्न भेडसावत नाही. तसेच बारमाही सूमधुर नैसर्गीक पाण्याच्या टाक्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील उद्भवत नसल्याने भक्ताचा मोठा ओढा या ठिकाणी ओढला जातो. अश्या या नितांत सुंदर आणि पवित्र ठिकाणी नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आमचा चमू पोचल्याने अगदी पापमुक्त झाल्याचे भासले.योगायोगाने नववर्षाच्या निमित्ताने ठाण्यातून 
दर्शनाकरीता आलेल्या एका कुटुंबाने बनवलेला झणझणीत तयार आमटी भात व कुरकूरीत बटाटा भजी आग्रहाने आम्हा मंडळींना जेवू घातली त्यामूळे आजच्या स्वयंपाकाच्या ड्यूटी ला मला चक्क सूट्टी मिळाली होती.आयत्या मिळालेल्या गरमागरम जेवणावर ताव मारून धर्मशाळेत पिट्टू ठेवले गेले आणि वाल्मीकींच्या समाधीचे दर्शन घेवून त्या निसर्गरम्य आश्रमाच्या प्रांगणात पुन्हा निवांत गप्पांचे फ़ड रंगले ते थेट शेकोटीभोवती मध्यरात्र उलटेस्तोवर. मधेच थंडीवर मात करण्यासाठी फ़क्कड चहा बनवला गेला आणि माकडांच्या माकडचेष्टांचा मनमूराद आनंद घेवून मंडळींनी विस्तीर्ण आणि स्वच्छ अश्या धर्मशाळेत पाठा टेकल्या आणि क्षणार्धातच सर्वजण घोरण्याच्या स्पर्धेत सहभागी देखील झाले.
 प्रात:काली नानाविध पक्ष्यांच्या किलबिलाटाने प्रसंन्न पहाटेची ती कोवळी सूर्यकीरणे अंगावर घेण्यासाठी सह्यरांगातील आजोबा मानल्या जाणा-या त्या पर्वतावर मावळ्यांचा आता पुन्हा विहार सुरू झाला होता. नैसर्गीक कूंडातील थंडगार पाण्याने सुर्चीभूत होऊन आश्रमातील आरतीला हजेरी लावली गेली आणि ध्यानधारणा करून फ़क्कड चहा झाला. आज आमच्यातले ३ मावळे काही अपरीहार्य कारणामुळे अर्ध्यातूनच परत निघणार होते त्यांच्यासाठी म्हणून खास सोयाबीन पुलाव बनवण्यात आला आणि त्यांना निरोप देवून आम्ही पर्वतावर बाकी भटकंती करून पुढच्या प्रवासाला लागलो. आता पुन्हा वाटाड्या शोधणे आवश्यक होते कारण मिळविलेल्या माहितीवरून गुहेरीचे दार गाठणे वाटते तेवढी सोप्पी गोष्ट नव्हती. फ़क्त सापडण्यास कठीण नसुन ती पार करणे देखील कष्टप्राय असल्याने वाटाड्या शिवाय जाऊ नका असा सल्ला अनेक अनुभवींकडून मिळाला असल्याने आम्ही वाटाड्याच्या शोधात निघालो आणि खाली धनगर वाडीत राहण्या-या, रानावनात भटकंती करून त्याच निसर्गावर आपली गुजराण करून त्या निसर्गाला आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक समजत असलेल्या फ़ासेपारधी समाजातील संपूर्ण कुटूंबाशीच आमची भेट झाली तोवर दुपार टळत आलेली होती. आमच्या विनंतीस मान देवून महिला मंडळास घराकडे धाडून मामा, भाचे असे दोघेजण
आम्हाला वाट दाखविण्यास आपली गिलवर सोबत घेवून तूम्हाला मुक्कामाची जागा दाखवून आजच आम्ही माघारी फ़िरणार या बोलीवर येण्यास तयार झाले आणि आमचा आनंद द्विगुणीत झाला.कमितकमी थांबे घेत निघालात तर संध्या. ७ ते साडेसात च्या सूमारास शेवटच्या थोड्या अवघड प्रस्तारोहणापाशी आपण पोहचू असे सांगीतल्यामूळे पावले शक्य तितक्या झपाझप टाकत मावळे निघाले होते.भातखेचर ओलांडून आजोबा पर्वताला उजव्या हाताला सोडत आमचा मोर्चा आता खड्या चढाला लागला होता. घामाच्या धारा पूसत पाणवठ्यावर थोडा दम घेत आम्ही घनदाट अश्या कारवीत घुसलो आणि चढण आजूनच वाढत गेली. वाटेत आलेली कारवी तूडवत वेळप्रसंगी तिचाच आधार घेत पहिल्या प्रस्थारोहणापाशी मावळे विसावले होते.एकमेकांचा आधार घेत पाठपिशव्यांना पुढे ढकलत पहिला पॅच पार पडला पण आता चांगलाच दम निघाला होता तरिही गुहेरीच्या दाराचे आजून दर्शन देखील होत नव्हते.दमछाक वाढत होती, चढ वाढत होते आणि सोबतीचा सूर्यप्रकाश कमी होत अंधांर देखील वाढत होता. पण मावळे थांबले नव्हते (थांबायला जागाच नव्हती त्या वाटेवर ही गोष्ट वेगळी) वेग जरी मंदावला असला तरी
एकमेकां साह्य करू.. म्हणत हात देत, पाठपिशव्यांची अदलाबदल करून मंडळी पुढे जात होती. पहिला, दूसरा, तिसरा कठीण प्रस्थारोहण टप्पा पार करून देखील गुहेरीच्या दाराचे दर्शन झाले नव्हते. "पटापट चाललात तर आजून फ़क्त १० मी." हे एकच वाक्य फ़क्त गेल्या १ तासापासून कानावर पडत होते पण वाट काही संपत नव्हती. सूर्यनारायण अस्ताला गेल्याने आता विजे-यांच्या झोतात आमची चढण सुरू होती, थोडे अवघड वाटावे असे चवथे प्रस्तारोहण आले ते पार केल्यावर डावीकडे वळून उजव्या बाजूला पून्हा चढण सुरू झाली आणि अखेरीस त्या घळीचे शेवटचे टोक म्हणजेच तो माथा दूरवर का होईना पण एकदाचा दिसला. आता खडी चढण चढताना आमच्या पाठीमागे खोलवर फ़क्त अंधाराचे साम्राच्य पसरलेली भयाण दरी दिसत होती.त्यात मूरूम जरा ठिसूळ झाल्याने वाट थोडी धोक्याची होती. सावकाश पणे आमची वाटचाल सुरू होती. आता दमछाक, त्यात अंधार आणि घसा-याची वाट यामूळे वेग फ़ारच मंदावला होता. थोड्याच वेळात आता सर्वजण पाचव्या आणि संपूर्ण मोहिमेतील कठीण अशा प्रस्तारोहणापाशी पोहचलो होतो. वाटाड्याने पुढे होत सर्वप्रथम सर्व पाठपिशव्या वरती घेत आता १-१ मावळा पूढे होत होता. लहान चूकीला देखील क्षमा नसल्याने अगदी सावकाश आणि आत्मविश्वासाने एक एक पाऊल टाकत सर्वजणांनी तो टप्पा पार केला व पूढची वाट धरली. समोर खरच २० मिनिटात पोहचता येईल अश्या ठिकाणी आता सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. जवळपास १५-२० मिनिटामध्ये सर्वजण शेवटचा टप्पा पार करून माथ्यावर पोहचले होते. आमचा आनंद आता गगनात मावत नव्हता. अंधार असल्याने वरून बघताना त्या भयाण दरीचा पक्का अंदाज या क्षणी येत नव्हता पण जी वाट पार करून आम्ही पोहचलो होतो त्यावरून अंदाज बांधणे अवघड नव्हते. खूप वेळ धापा टाकणारी छाती आता गर्वाने फ़ूलली होती शिवरायांचे नाव घेत पून्हा एकदा माथ्यावरील कारवीत मंडळी घूसली आणि वेगातच आम्ही माथ्यावरील तळ्यावर विसावलो. शेकोटी पेटवून चूल मांडली गेली व गरमागरम मॅगी तयार झाले.

निसर्गाच्या कुषीत घूसून त्याच्या खडतर वाटा पार करत, थंडगार वा-यात, बोच-या थंडीत देखील दमछाक होऊन वाहणा-या घामाच्या धारा पुसत, वाट शोधत, झाडे वेलींचा आधार घेत सवंगड्यांसमवेत चढाई करून, दगड गोट्यांतून, घसा-यातून तोल सांभाळत, आपल्याला मित्रांना कोणतीही ईजा होऊ नये म्हणून पूरेपूर काळजी घेत सरतेशेवटी माथा गाठायचा, शिवरायांच्या नावाने आरोळी ठोकायची, भारत मातेचा जयजयकार करायचा आणि गरमागरम भोजन चोपायचे व निसर्गाच्या कुषीत साठलेले अमृतासमान पाणी ढसाढसा पित त्याच्या गारव्याची अनुभुती घ्यायची.... या पेक्षा मोठा आनंद तो काय. पोटपूजा उरकून अंथरूण टाकले गेले आणि अथांग अवकाशाखाली लाखो चमचमत्या चांदण्यांच्या साथीत शेकोटीच्या उबेमधे मंडळी निद्राधीन झाली. सकाळी पून्हा आलेल्या वाटेवर फ़ेरफ़टका मारून ज्या भन्नाट वाटेने आम्ही गुहेरीचे दार गाठले त्या वाटेचे छायाचित्रण झाले आणि पिट्टू खांद्यावर टाकून परतीचा प्रवास सुरू झाला. परत एकदा २-३ तासाची पायपीट करून आम्ही कुमशेतच्या 'ठाकरवाडी' या गावी पोहचून आमच्या येणा-या गाडीची वाट पहात विश्रांती घेतली. दुपारी ११ वाजता येणारी आमची गाडी ४ वाजता (फ़क्त ५ तास उशीराने)  पोहचली आणि त्या सह्याद्रीला मुजरा करून ट्रेक च्या गप्पा गोष्टी करत परतीचा प्रवास सुरू झाला. नारायणगावा जवळ आमच्या सर्वांच्या आवडत्या खानावळी मधे पोटभर चुलीवरचे जेवण हादडून पून्हा पुण्याकडे रवाना झालो. 

आता मध्यरात्र होत होती आणि मंडंळीं घराकडे निघाली होती. थोडाफ़ार थकवा जाणवत देखील होता, खरचटलेल्या खुणा ठणका देत अंगावरच अस्तीत्व दाखवत होत्या पण तरीदेखील...
नेहमीच्या सडकेवर, पाऊलवाटांवरून चालण्यापेक्षा या घाटवाटा तूडवून वेगळीच मजा आली होती. आलेला थकव्याची पर्वा नव्हती .तब्बल ४ दिवस वेगळ्याच विश्वात घेऊन गेलेला हा सह्याद्रीचा प्रवास. सरत्या वर्षाचा शेवट गोड करून येण्या-या नवीन वर्षासाठी नवचेतना, नवा जोष, नवी ऊर्जा घेवून जगण्याची नवी उर्मी देऊन गेला होता हे मात्र नक्की. हीच तर त्या सह्याद्रीची त्या निसर्गाची आम्हा सह्यवेड्यांस मिळालेली नववर्षाची भेट होती जी चिरकाळ टिकणार होती. जी जगण्याची शिकवण देत होती, निसर्गावरचे प्रेम द्विगुणीत करणारी होती.येत्या नववर्षात जास्तीत जास्त सह्यभटकंती करण्याची संधी मिळो ! याच एका मागणीने आता मी देखील घरी पोहचलो होतो.

भेटा अथवा लिहा, (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे
९८२२८७७७६७

सहभागी वीर :- अमोद राजे, राकेश जाधव, निलेश महाडीक, भास्कर कुलकर्णी, निखिल केळकर, सुदीप माने,अक्षय बोरसे,अश्विन मेनकुदळे, राहूल सारडा, विकास पोखरकर,प्रसाद डेंगळे,निलेश वाळिंबे.




    

Wednesday, August 13, 2014

॥ श्री अमृतेश्वर मंदिर.. मोहरी ॥

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी म्हणजे हे पुणे शहर आणि त्याच्या आसपासचा परिसर. महाराजांची पहिली राजधानी किल्ले राजगड ही देखील पुणे जिल्हातच. थोडेथोडके नव्हे तर तब्बल पंचवीस-तीस पेक्षा जास्त किल्ले आज पुणे जिल्हात अभिमानाने इतिहासाची साक्ष देत ताठ मानेने उभे आहेत. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाण्या-या या पुण्यनगरीस केवळ किल्लेच नव्हे तर अनेक प्राचीन मंदिरांकरीता देखील ओळखले जाते. अश्या या पुण्यापसून सुमारे ४५ कि.मी. असलेल्या गुंजण मावळच्या खो-यात आणि छत्रपती श्री. शिवरायांच्या चरणस्पर्शाने ज्या गावाचे सोने झाले ते माझे गाव ‘मोहरी’ म्हणजेच महुरी बुद्रुक. या माझ्या गावामधल्या अतिप्राचीन मंदिराबद्दल माहिती सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न.
हेमाडपंथी शैलीच्या बांधकामाचा उत्तम नमूना असलेले श्री अमृतेश्वराचे यादव कालीन मंदिरा करिता प्रसिद्ध असलेले  गाव म्हणजे मोहरी. सूमारे ४०० ते ५०० ऊंबरा असलेले छोटेखानी,  शहराच्या अगदीच जवळ पण आधुनिकतेच्या रेट्यात आजदेखील आपल गावपण जपून मोठ्या थाटात वसलेले आहे. पूर्वी “महुरी बुद्रुक” अशी नोंद असलेल्या नावाचा पुढे अपभ्रंश होत आज ‘मोहरी’ या नावाने ते ओळखले जाते.गुंजवणी व शिवगंगा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेला हा गाव म्हणजे अनेकांचे श्रद्धास्थान.          
             
 पुणे-सातारा महामार्गावरून कात्रज-शिवापूर-चेलाडी-कापूरहोळ ओलांडल्यावर उजव्या हाताला भोर फ़ाटा लागतो.त्याला वळून भोर कडे जाताना शहरी जीवनातून बाहेर पडत, ग्रामीण शैलीच्या, हिरव्याकच्च रानात आपल प्रवेश होतो. दोन्ही बाजूला लांबवर पसरलेली हिरवीगार शेते, वृक्षराई आपल्या मनाला एकदम प्रसंन्न करतात. समोर आडव्या पसरलेल्या सह्याद्री च्या शृंखलेत राजगड, तोरणा, रोहिडा, रायरेश्वर,केंजळगड असे अनेक किल्ले इतिहासाची साक्ष देत उभे असतात. तर पाठिमागे पुरंदर, वज्रगड आपल ठाण मांडून बसलेले दिसतात.
नागमोडी रस्त्याने आपला प्रवास सुरू होतो आणि आपण गुंजवणी नदीवर बांधलेल्या पुलावर पोहचतो. तो ओलांडला की कासुर्डी गावाच्या बस थांब्याला उजवीकडे वळण घेताच आपण निसर्गाच्या आणि सह्याद्रीच्या आणखीनच कुशीत घुसल्याचे जाणवू लागते."खुणा गावच्या दिसू लागल्या दूर अंतराहुनी । अंतरी हर्ष येई दाटुनी ॥" या कवितेच्या ओळींचे आपोआप गुंजन केले जाते. दुतर्फ़ा झाडी, काळ्या आईची मशागत करण्यात रमलेले शेतकरी,त्यांची काळी कसदार जमीन,  शेणाने सारवलेल्या अंगणातील ती कौलारू घरे, गळ्यात घंटा बांधून आपल्याच नादात त्यांचा मंजूळ आवज करत बागडणारी गुरे वासरे, पाण्याचे लहान मोठे पाट,शिवरायांचे वास्तव्य ज्या भूमीत सर्वात जास्त राहिले त्या डोंगर द-यात हिरवाईचे शालू लपेटून नटलेली सह्याद्री ची रांग या सगळ्यांचा आस्वाद घेत आपला प्रवास सुरू असतो.गावरान मनाचा एक वेगळाच ‘श्वास’ मग आपल्या मनाला भिडू लागतो. याच रस्त्याने सुमारे २ कि. मी. पुढे गेल्यावर आपण मोहरीत दाखल होतो. व्यसनमुक्त गावाचा सन्मान लाभलेले हे गाव खूप मोठे नसले तरी स्वत: चे वेगळेपण जपत आज अभिमानाने उभे आहे. 



याच गावातील ‘अमृतेश्वराच्या’ नावाने प्रसिद्ध स्वयंभू असे देखणे शंकराचे अतीप्राचीन मंदिर आजदेखील भक्तांच्या अलोट गर्दीने वाहत आहे. पुरातन असलेल्या येथील अमृतेश्वर मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार झालेला आहे. तसेच शिवकाळातील या गावाचे व मंदिराचे महत्व देखील नक्कीच ‘दखल’ घेण्याजोगे आहे.
हैबतराव शिळिमकर (मुळचे शिंदे) हे महाराजांचे सरदार यांच्याकडे १२ मावळापैकी ‘गुंजण मावळाची’ सुभेदारी होती त्याकाळी त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याच्या काही नोंदी आढळतात. पुढे इनामदारांपैकी श्रीमंत नारायण बाबूराव वैद्य हे पेशव्यांतर्फ़े नागपूरकर भोसल्यांकडे वकील होते त्यावेळी १७६३ च्या श्रावण महिन्याच्या सुमारास देवाल्याच्या शिखराच्या अस्तगिरीचे काम पूर्णत्वास नेल्याचा उल्लेख एका पत्रात मिळतो. तसेच मंदिरासाठी सहा सेवेकरी नेमण्यात आले होते त्या ब्राम्हणांपैकी ‘कै. श्री. शिवराम बल्लाळ वाळिंबे’ व ‘कै. श्री. हरभट पुरोहित’ यांनी गावोगाव भटकून वर्गणी गोळा करून सन १९०५ साली मंदिरापुढे लाकडी सभामंडप उभारला  व उत्सव मंडळाने भक्तगणांसाठी १९३५ साली धर्मशाळा बांधली असे देखील दाखले आहेत. सध्या आपण पाहतो तो सन २००० साली गावकी ने लोकवर्गणीमधून लाकडी मंडप उतरवून त्या ठिकाणी सिमेंटचा मंडप घातलेला आहे. शिवकालात महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गावात श्री. शिवाजी महाराज आणि श्री. दादोजी कोंडदेव हे अमृतेश्वर मंदिरामधे जवळपासच्या गावातील अंतर्गत तंटे सोडवून न्यायनिवाडा करण्यासाठी बैठका घेत असे सांगितले जाते. तसेच “सुभेदार सर्जेराव मांग” यांना मावळातून रायगडावर एक महाप्रचंड तोफ़ घेवून जाण्याची जबाबदारी देखील याच मंदिरात सोपविण्यात आली. इतकेच नव्हे तर, शिवरायांच्या काळातील पानसे आणि गावखंडेराव या दोन घराण्यातील कुळकर्णी वतनाचे भांडणात खरेखोटे ठरविण्यासाठी राजांच्या आदेशाप्रमाणे याच मंदिरात शके १६९० मध्ये “दिव्यप्रयोग” झाल्याचा उल्लेख देखील पानसे घराण्याचा इतिहास आवृत्ती पहिली सन १९२९ या पुस्तकात आढळतो. अश्या त्या शिवशंभो च्या वास्तव्याच्या ठिकाणी तमाम मराठी मनाचे दैवत साक्षात श्री. छत्रपती शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेल्या ‘अमृतेश्वर’ मंदिराची रचना व परिसर देखील फ़ार सुरेख व देखणा आहे. 



अमृतेश्वर मंदिरामागून १ ओढा वाहता असून ओढ्याकाठी चिरेबंदी बांधणीची तीन विलोभनीय तळी आहेत. पावसाअभावी नदी नाले कोरडे पडून पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते त्या वेळी देखील आजवर या तळीतील पाणी आटलेले नाही. अवीट गोडीचे पाणी असलेल्या या शेकडो वर्षापुर्वीच्या तळ्यांवरच सध्या विद्युत मोटारी बसवून गावाला पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान शमविली जाते. मंदिरापुढे सुंदर वनराई असून एका छोटेखानी कमानीचे प्रवेशद्वारातून आपण मंदिर परिसरात जातो. आत गेल्यावर आपल्या डाव्या हाताला एक प्राचीन, सुबक अशी ‘दिपमाळ ’ आपले लक्ष वेधून घेते. तिचे निरीक्षण करून समोर दिसणा-या मूळ मंदिराकडे प्रस्थान केल्यावर मंदिराची विभागणी एकूण तीन भागात केलेली आपणास आढळते. सर्वात प्रथम आपणास शंकराचे वाहन ‘नंदी’ याचा मंडप दिसतो. दगडात घडवलेली नंदीची रेखीव मूर्ती तिच्या भव्यतेमूळे आपल्याला आकर्षित करते. नंदीचे दर्शन घेवून आपण संपूर्णपणे कातळात कोरलेल्या यादवकालीन मंदिराच्या सभामंडपी प्रवेश करतो. चार मोठ्या खांबावर उभ्या असलेल्या सभामंडपात प्रवेश करताच, शिवमंदिरी अनूभवली जाणारी शांतता आणि हवेतील गारवा आपणास जाणवल्याशिवाय रहात नाही.एका भल्या मोठ्या घंटेला मग आपण स्पर्श जरी केला तरी शेकडो आवर्तने घेणारा तिचा तो सुंदर नाद आपल्या कानात साठवत असतानाच मंदिरात दोन्ही बाजूंना असलेल्या दोन सूबक दिवड्या आपल्या नजरेस पडतात.गाभा-याच्या मध्यभागी ६० से.मी. * १०० से.मी. आकाराचे पक्षीरूपी प्रकारातील “द्वि शरभांसह युद्धरत पक्षीदेहदारी गंडभेरूंडाचे” पाषाणात कोरलेले चित्र नजरेस पडते. या चित्रात महाकाय द्विमुखी पक्षी दोन शरभांशी झुंज देत आहेत पण यात कोणीही जेता किंवा जीत दाखवलेला नाही हे विशेष. पुढे समोरच गाभा-याच्या बाहेर उजव्या बाजूस पूरातन श्री महिषासूरमर्दीनी तसेच शिवपार्वती अतिशय कोरीव आणि सुबक मूर्त्या नजरेस पडतात तर डाव्या बाजूला श्री गणेशाची शेंदूर लावलेली मूर्ती विराजमान झालेली दिसते. गाभा-यात प्रवेश करताना आपणास उतरून तळात जावे लागते. प्रशस्त सभामंडपातून अंतराळात प्रवेश केल्यावर गाभा-याच्या दरवाजाजवळ दोन्ही बाजूच्या खांबांवर पारंपारीक पद्धतीची सूबक शिल्पे कोरलेली आढळतात.त्यात… 

भगवान शंकराने धारण केलेल्या काल्पनिक पशूचे रूप म्हणजे “शरभ” हे चित्र ब-याच शिवमंदिरात व गडांवर आढळणारे येथेदेखील नजरेस पडते. या शरभ संकल्पनेबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. शिवाचा नि:सीम भक्त म्हणून ओळखल्या जाणा-या ‘हिरण्यश्यपूच्या’ वधा पश्चात नर-सिंहाने जनतेला देखील त्रास देण्यास सुरूवात केली. त्याने मोठ्या प्रमाणात उत्माद केला.त्याचा नाश करण्याकरिता स्वत: शंकराने पशू, पक्षी व नर यांच्या एकत्रीत शक्तीचे रूप धारण केले व नरसिंहास धडा शिकवीला. तेच रूप हे ‘शरभ’ नावाने संबोधले जाते.त्या शरभाच्या शिल्पात देखील खूप विविधता आढळते. एकूण २९ प्रकारांत गणल्या जाण्या-या शरभ आकृत्यांपैकी एक अतिशय देखणे आणि महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर (उदा: शिवनेरी-हत्ती दरवाजा,सिंहगड-कल्याण दरवाजा व पुणे दरवाजा,लोहगड-नारायण व हनुमान दरवाजा,प्रतापगड-दुसरा व तिसरा दरवाजा,रोहिडा- दुसरा व तिसरा दरवाजा,सोलापूरचा किल्ला,उद्गीरचा किल्ला, पुरंदर-बालेकिल्ला तिसरा दरवाजा) आढळणारे असे “पंखविहीन केवल शरभ” आपणास या मोहरी येथील अमृतेश्वर मंदिराच्या गाभा-यात प्रवेश करताना डाव्या बाजूच्या खांबावर  कोरलेले दिसते. त्याच्या खालचे शिल्प हे पुरूषविग्रह अर्थात अर्धमानवी (Anthropomorphic) प्रकारातील अतिशय दुर्मिळ समजले जाणारे “द्विगज विजयी अर्धमानव देहधारी गंडभेरूंडाचे” चित्र नजरेस पडते. या शिल्पाकृतीस तैलरंगाचे लेप फ़ासल्यामुळे आज आपणास त्याची सुबकता फ़ार निरखून पहावी लागते. एका द्विमुखधारी पक्ष्याने आपल्या दोन्ही हातात साप पकडलेले असून, पायातही प्रत्येकी एक असे दोन हत्ती पकडलेले आहेत. त्याच्या मागील बाजूस पंख आणि पोटापाशी मानवी मस्तक दर्शविलेले आहे. कटीवस्त्र परिधान केलेल्या या रेखीव चित्राची आपणच मूर्खपणाने केलेली दुरावस्था पाहून मन विशण्ण होते.येथेच आपणास “अव्याळ” शिल्प देखील आढळते.तर छत आणि खांब हे महाराष्ट्रातील इतर प्राचीन मंदीराप्रमाणे सूबक कोरीवकाम केलेले दिसतात. या प्राचीन मंदीराचा  मंदिरातील स्वयंभू शाळूंका विरहीत शिवपिंडी म्हणजे शिवभक्तांचे श्रद्धास्थान. या शिवपिंडीवर सहसा
आढळणारी शाळूंका नसून त्यावर “गोपद्माचे” चिन्ह आहे.अतिशय सुरेख आणि अप्रतिम अश्या शिवपिंडी पुढे आपण मनोभावे नतमस्तक होतो. आपण नमस्कार करून उठताच पिंडीच्या मागच्या बाजूला असलेल्या कोनाड्यात आपोआपच आपले लक्ष वेधले जाते.बघताक्षणी मन मोहून टाकणारी, सुबकता, सुंदरतेच्या सर्वात उकृष्ठ नमूना असलेली. अत्यंत प्राचीन, रेखीव 

आणि अपार कष्टाने कोरीव काम करून घडवलेली “श्री विष्णू-लक्ष्मी” मूर्तीची आपणास भूरळ पडते.चोरीचा प्रयत्न करीत असताना न निघालेल्या ही अतिप्राचीन मूर्ती म्हणजे कलेचा उत्तम नमूनाच होत. असे ऐकीव आहे की याच गाभा-यातून एक तळघरात जाणारा रस्ता होता पण कालांतराने तो आता लूप्त झालेला असल्याने दिसत नाही. स्वत: अमृतेश्वर रात्रौ या ठिकाणी विश्राम करतात अशी भाविकांची श्रद्धा असल्या कारणाने आज देखील अनेक वर्षे या ठिकाणी रोज रात्री भक्तिभावे त्यांचा बिछाना घातला जातो. मंदिरातून बाहेर पडून आपण आता प्रदक्षिणा मार्गावर येतो.मंदिराच्या बाहेरील बाजूने देखील आपणास सुबक असे कोरीवकाम नजरेस पडते, मंदिराच्या भिंतींना बाहेरून देखील शरभ, गंडभेरूंडाची विविध रूपे कोरलेली आढळतात.  प्रदक्षिणा पूर्ण करून आपण मंदिराच्या डाव्या बाजूला पोहचतो, त्या ठिकाणी सुंदर असे गोमुख आढळते. त्याच्याच बाजूला “गजजेता शरभाचे” कोरीव शिल्प आपण पाहू शकतो.तसेच कळसावर देखील विविध देवदेवतांच्या सुंदर आकृत्या कोरलेल्या दिसतात.मुख्य मंदिराच्या आवारातच आपणास तुळशी वृंदावन पहावयास मिळते व छोटेखानीच देवीचे आणि मारूतरायाचे मंदिर देखील दृष्टीस पडते.

या मंदिरातील शिवपिंडीचा इतिहास देखील फ़ार वेगळा असून त्याची कथा रोचक वाटते. पुर्वीच्या काळी गावात राहणारा एक कोळी नित्यनियमाने आपली गुरे घेवून नदीकाठावर (संगमावर) चरायला जात त्यावेळी त्याची एक गाय एका ठराविक जागी नेहमी आपल्या ‘दुधाची धार’ देत असे  ही गोष्ट त्या कोळ्याच्या लक्षात आली म्हणून त्याने त्या ठिकाणी शोध घेतल्यावर त्याल तिथे दोन पिंडी आढळल्या. त्यातील एक पिंड त्याने काढण्याचा प्रयत्न केला पण ती त्याच्याकडून काही हलेना. त्या रात्री त्याला अमृतेश्वराने स्वप्नात येवून दृष्टांत दिला की, ‘तुझ्याकडील या गाईचे जे खोंड (बैल) आहे त्याच्या मदतीने ही पिंडी बाहेर काढ’. त्याप्रमाणे प्रयत्न करताच ती पिंड त्या जागेवरून काढण्यास त्याला यश आले. ती काढलेली शिवपिंडी ज्यावर त्या गाईचे पाउल उमटले होते ती त्याने या मंदिरामधे आणून ठेवली. त्यावेळेपासून कोळी समाजाला या मंदिरात मोठा मान दिला जातो. सापडलेल्या पिंडीच्या त्या मूळ जागेवर (संगमावर) पाणी नसेल त्यावेळी आपणास आजदेखील ती राहिलेली दुसरी पिंड पाहण्यास मिळते. असे जाणकार सांगतात. 

शंकराचा प्रमुख समजला जाणारा महाशिवरात्र उत्सव देखील येथे यथासांग पार पडतो. पूर्वापार चालत आलेल्या पद्धतिनुसार गावातील ब्राम्हण कुटुंबियांकडून हा महाशिवरात्र उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो जात-पातीचे राजकारण बाजूला सारून त्या उत्सवात देखील ग्रामस्थ मंडळी यथाशक्ती सहभागी होतात. शेकडो वर्षे चालत आलेल्या या उत्सवाची कथा देखील मोठी रंजक आहे.
मोहरी हे गाव वाईचे वैद्य यांस शाहू महाराज यांनी सन १७४२ साली इनाम म्हणून दिल्याचे दाखले आहेत. पुढे १८१३ साली पूजाअर्चेची नीट व्यवस्था चालावी म्हणून वैद्य यांनी सहा वेगवेगळ्या ब्रांम्हणांस या ठिकाणी घरे बांधून दिली आणि एका सेवेकरी ब्राम्हणाने दुमासे सेवा करण्याची सनदेत शर्त घातली गेली.त्या बदल्यात त्यांना भोर संस्थानातर्फ़े काही मुशाहिरा मिळत असे.अश्या या देऊळवाड्यात राहणा-या कुटुंबांपैकी एक श्री. केळकर यांना श्री अमृतेश्वर महादेवाचा दृष्टांत झाला आणि त्याच्या आदेशाप्रमाणेच सुमारे शंभर, सव्वाशे वर्षापूर्वी हा उत्सव साजरा करण्याची प्रथा रूढ झाली. यात देऊळवाड्यातील ब्राम्हण त्यांचे आप्तस्वकीय मोठ्या आनंदाने सहभागी होत. पुढे जवळपास सर्वजण उपजिवीकेसाठी गाव सोडून बाहेर गेली. तरी आज खास उत्सवाच्या दिवसात केवळ श्रद्धेपोटी, प्रेमापोटी या आर्थिक धकाधकीच्या आयुष्यात सलग तीन दिवस नि:स्वार्थी भावनेने सर्वजण मित्रपरिवारासह त्या ठिकाणी वेळात वेळ काढून हजर राहतात व संपूर्ण उत्सव यथासांग पार पाडतात. त्याचबरोबर चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुडीपाडवा व त्रिपुरारी पोर्णिमा या दोन दिवशी गावकरी आणि भक्तमंडळी मोठ्या आनंदाने मंदिरी दाखल होतात त्यावेळी गावात मोठी जत्रा भरविली जाते.    

         
नवे कपडे,विद्युत रोशणाई, फ़टाक्यांची अतिषबाजी,खेळणी,मिठाई वाटप,रेवड्या-भेळेचे ठेले यांनी गावाला एक वेगळाच रंग आलेला असतो.अबाल-वृद्धांची गर्दी,चिल्ल्यापिल्ल्यांच्या दंग्याने गावाचे वातवरणच बदलून जाते. मंदिरापुढे सर्व गावकरी असंख्य पणत्या दिवे लावून मोठा ‘दिपोत्सव’ साजरा करतात.वर्षात येणा-या प्रत्येक सोमवती अमावस्येला श्रध्येपोटी देवाला पालखीत बसवून, भजन म्हणत मोठ्या थाटामाटात गावच्या ‘संगमावर’ स्नानासाठी आजही मोठ्या भक्तिभावाने घेवून जातात. अश्या या माझ्या लाडक्या गावात आपण देखील एकदा आवश्य भेट द्या ! आणि निसर्गाची लयलूट असलेल्या तसेच यादवकालीन शिल्पस्थापत्याचा उत्तम नमूना असलेल्या ‘अमृतेश्वर’ मंदिरास येवून त्याच्या दर्शनाने येण्या-या अनुभवाची प्रचिती घ्या व त्या अद्न्यात कलाकारांच्या कलेला अवश्य दाद देवून अभिवादन करा…बाकी काही नाही पण अविस्मरणीय यादवकालीन हेमाडपंथी सुरेख मंदिर, ज्यांच्यात आजही माणुसकी दिसेल अशी माणसे आणि बालकवींच्या कवितेतील या ओळी तरी तुमच्या नक्कीच लक्षात राहतील यात शंका नाही. 

                                                        ऐलतटावर पैलतटावर, हिरवाळी घेऊन
                                                        निळा सावळा झरा वाहतो बेटाबेटातून 
                                                        चार घरांचे गाव चिमुकले ऐलटेकडीकडे
                                                      रानमळ्यांची दाट लागली, हिरवी गर्दी पुढे...



भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच),

निलेश गो. वाळिंबे              

९८२२८७७७६७ 

Sunday, April 13, 2014

बाळाचे आगमन एक अविस्मरणीय अनुभव.

आता लग्न झालय आतातरी स्वत: ला बदला… जरा जबाबदारीने वागा !
आता बाप होणार आहात आतातरी बदला… जरा जबाबदारीने वागा !
ही असली वाक्ये आता ऐकून चोथा झाली आहेत खरतर, त्यांच आता काहीच वाटत नाही म्हणून ’कोडगे’ हि उपाधी देखील पटकवून झाली आहे. तरीदेखील जबाबदारीची जाणीव म्हणजे नक्की काय आणि ती कशी असली पाहिजे हे अजून तरी मला उमगले नव्हते. पण अत्यंत आनंदाबरोबरच  अचानक जाबाबदारी/काळजी असल्या शब्दांच्या जवळ जाणारी एक ’भावना’ मला त्या दिवशी जाणवली. बाळाच्या आगमनाची चाहूल लागली तेव्हाच सा-या घरी आनंदाच वातावरण झाल होत व त्याची तयारी देखील सुरू झाली होती. सौ. ना डॉ. कडे चेकअपसाठी घेवून जाणे, वेळोवेळी करावी लागणारी सोनोग्राफ़ी हे सगळ तर आता सौ. आणि माझा नित्यक्रम झाला होता. डिलेव्हरी ची तारीक १३,१४ एप्रील असल्याने तसा आजून आठवडा शिल्लक होता, त्यामूळे आज देखील फ़क्त साप्ताहीक तपासणी ला आलो होतो. तपासणी झाली आणि डॉ. साहेबांनी पून्हा केबीन मधे बोलवून घेतले. ’बाळाची वाढ पूर्ण झाली आहे पण डोक अजूनही वरच्या बाजूलाच आहे आणि पोटातल्या पाण्याची पातळी त्या मानाने खूपच कमी झाली आहे. एकंदरीत पाहता नैसर्गीक प्रसूती होणे जरा अवघडच आहे, लवकरात लवकर आपण ‘सिझर’ केलेले बरे.’ डॉ. चे बोलणे पूर्ण होईपर्यंत सौ. च्या चेह-यावर जरा काळजीची छटा दिसली आणि माहित नाही पण त्या काळजी ची भावना मलाही नकळत जाणवली. घरी बोलून फ़ोन करतो असे सांगून आम्ही दवाखान्यातून बाहेर पडलो.घरी आल्यावर सर्वांशी चर्चा झाली आणि अगदी पुढचाच म्हणजे ८ एप्रील २०१४ हा ’रामनवमी’ चाच दिवस पक्का करण्यात आला. लगोलग डॉ. ना फ़ोन करून पुढील तयारीची विचारपूस करून घेतली आणि तयारी पूर्ण केली.
सौ. ची काळजी तर आता तिच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होती. मलाही तशी काळजी वाटत होती पण आपल्याला असलेली चिंता न दाखवता तीची काळजी दूर करणे आवश्यक असल्याने तिला आधार देणे आता सुरू होते. आजची रात्र, फ़क्त आजची रात्र आणि उद्या.... उद्या मी ’बाप’ बनणार होतो. रात्रीची झोपदेखील मला फ़क्त उद्याचीच स्वप्ने दाखवत होती. एरवी ढाराढूर घोरत पडणारा मी सकाळी काय होईल, सगळ व्यवस्थीत पार पडेल न, फ़ार त्रास तर नाही होणार ना हिला, होणारे बाळ कसे असेल, मुलगा का मुलगी ? अश्या अनेक प्रश्णांनी मनात केलेल्या गर्दीमूळे निटसा झोपू शकत नव्हतो. पण उत्तर मात्र या कशाचेच सापडत नव्हते. सौ. ना देखील काहिच विचारता येत नव्हते. फ़क्त “सर्व काही व्यवस्थीत पार पडेल, तू काही काळजी करू नकोस” या एकाच आधारावर ती आज झोपी गेली होती. लहानपणी शाळेच्या ट्रीप ला जायच्या आधल्या रात्री जशी झोप लागता लागत नसे अगदी तशीच अवस्था आजदेखील होती. उद्याचा उगवणारा सूर्य माझ्यासाठी नेहमीसारखा नसून काही वेगळा होता हे मला जाणवत होते.
आज रामनवमी होती. सकाळीच उठून रामरायचे स्मरण कधी नव्हे ते न चूकता केले. सकाळची पोटभर न्याहरी उरकून सूनबाईंच्या हातावर दही देण्यात आले आणि आम्ही निघालो.पुढच्या काही तासात माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण माझ्यासमोर येणार होता.कदाचीत मला जबाबदारीची जाणीव करून देणारा तो क्षण आता अगदी समीप येवून थांबला होता.एका बाजूला होणारा आनंद आणि दुसरीकडे वाटणारी थोडी काळजी या दोन्हीची सांगड घालणे मनाला तितकस जमत नव्हत.पण आनंदाच्या क्षणांची चाहूल देखील एक वेगळाच आनंद घेवून येते याची आज पहिल्यांदाच प्रचिती येत होती. चक्कपणे कोणतिही गडबड न करता मी शांत होतो. दवाखान्यात डॉ., नर्सेस यांच्यां बोलण्याकडे बारीक लक्ष देत होतो, दीर्घ श्वास घेत सगळ सुरळीत पार पडेल अस स्वत:च्या मनाला पटवत होतो.उगाचच आपल्यावर फ़ार मोठी जबाबदारी आहे ही भावना आज प्रथमच नकळपणे मला जाणवत होती. पण एकीकडे होणा-या आनंदाला दुसरीकडे काळजीची एक छोटी किनार होती कारण आता तिला शस्त्रक्रियेकरता आत नेले होते. गेले काही महिने एकेक करत मोजत असलेले दिवस आठवू लागले, घरातल्या जेष्ठांनी कैक महिने अगोदर पासून सुरू केलेली तयारी आठवली. आमची पहिली भेट, लग्नात रूपांतरीत झालेल आमच प्रेम, त्यासाठे केलेले खटाटोप हा सगळा प्रवास डोळ्यांसमोर तरळून गेला. लग्नानंतरचा तो प्रत्येक क्षण आता आठवत होता, ज्यात दडलेल्या भावना कळतनकळत आजच्याच दिवसाची वाट बघत होत्या. पुढच्या काही मिनीटांतच आमच्या नात्याला कायमस्वरूपी घट्ट करणारी आणखी एक ‘वीण’ साक्षात परमेश्वराने बांधयला घेतली होती. मी बाबा बनणार होतो. घरातले सर्वजण शांत बसलेले बघून मी पण शांतच असल्याचे भासवत होतो पण मनात ’सध्याच्या या क्षणांची काळजी आणि येणा-या क्षणांची एक अनामिक ओढ होती.’एकीकडे हिला फ़ार त्रास तर होत नसेल ही काळजी तर दुसरीकडे येणा-या नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल मला शांत बसू देत नव्हती. दवाखान्याच्या व्हरंड्यात माझ्या येरझ-या सुरू होत्या नव्हे त्या जरा वाढल्याच होत्या.आणि अचानक तो क्षण समोर आला.

आतून एक नर्स एक गोजीरवाण रडणार बाळ घेवून बाहेर आली आणि माझ्या समोर धरत ’मुलगा झाला’ अस म्हणाली. खर सांगायच तर त्या नंतरच्या २ मिनीटात काय झाल हे मलाच आठवत नाही. मी हवेत होतो का जमिनीवर हे देखील मला समजले नव्हते. काही क्षणापूर्वी या जगात आलेल तान्ह बाळ मी प्रथमच पहात होतो. आणि ते बाळ माझ आहे या गोष्टीचा आनंद आता गगनात मावत नव्हता. नाळेपासून वेगळ्या केलेल्या त्या गोंडस जिवाची ‘नाळ’ आता माझ्याशी, माझ्या जीवनाशी, माझ्या आयुष्याशी बांधली गेली होती... अगदी कायमची ! केवळ काही निमिटे वय असलेला माझा मुलगा साक्षात माझ्या समोर दिसत होता. शब्दात व्यक्त न करता येणा-या त्या आनंदात मला आता ‘तिची’ खूप प्रकर्षाने आठवण येत होती. कधी एकदा ती समोर दिसतीये आणि माझा हा आनंद द्विगुणित होतोय अस मला झाल होत. तिच्या प्रतिक्षेने अता मी पुरता बैचैन झालो होतो. तिची प्रकृती कशी असेल याची काळजी होती. थोड्याच वेळात तिला देखील बाहेर आणल गेल. शस्त्रक्रियेची वेदना जरी शरीराला होत असली तरी मातृत्वाचे ते सुख मी तिच्या डोळ्यात बघत होतो, अनूभवत होतो. दोघांनाही सुखरूप बघून मला जे समाधान आणि आनंद मिळाला तो शब्दात सांगणे माझ्यासाठी केवळ अशक्य असल्याने मी शांतपणे त्या दोघांनकडे एकवार बघीतले आणि इतकावेळ त्या आनंदा बरोबर जी काळजी, हुरहूर, चिंता लागून होती ती एकदाची निघून गेली आणि मागे राहिला होता तो केवळ आनंद, अत्यांनंद, उत्साह आणि समाधान. त्या समाधानाच्या क्षणी कुण्या लेखकाचे कुठेतरी वाचलेले ते वाक्य अचानक आठवले आणि आज प्रथमच मलाही त्या वाक्याचा ‘प्रत्यय’ आला... “कोण म्हणत फ़क्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला बाप पण हळुहळू सुटत असतो !”  

भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे


Wednesday, November 6, 2013

भरारी ची स्वारी.. ॥ कुलंग ॥ गडावरी.


महाराष्ट्राला जगाच्या नकाशावर मान मिळवून देणार एक नाव म्हणजे ‘सह्याद्री’. निसर्गाची अद्भुत अशी किमया ,एक चमत्कारच म्हणावा असा तो सह्याद्री. असंख्य आक्रमण पचवून कायम आपले रक्षण करत आज हजारो वर्षे आपल्या रांगड्या, रूबाबदार रूपात, ताठ कण्याने उभा असलेला तो सह्याद्री. आपले आक्राळ रूप आणि भव्य उंचीने भल्याभल्यांना ज्याने नामोहर केले आणि असंख्य जणांना ज्याने आपल्या प्रेमात देखील पाडले तोच हा सह्याद्री. अश्या या सह्याद्रीत देखील आपल्या उत्तूंग उंचीने आणि खडतर व बिकट वाटेने स्वत: चे वेगळेपण जपणारी अशी कळसुबाई शिखराची सह्याद्री शृंखला म्हणजे काय विचारता... इगतपूरीच्या दक्षिणेला सह्याद्रीची ही कळसुबाईची बेलाग शृंखला पुर्व पश्चिम पसरली आहे. या रांगेत अलंग, मदन, कुलंग,पारबगड, रतनगड कळसुबाई असे अनेक किल्ले शेकडो वर्षे आपले ठाण मांडुन बसलेले आहेत. सह्याद्री पर्वताची उंची याच रांगेत  सर्वात जास्त आहे. बेलाग कडे,पाताळ्स्पर्शी द-या व उध्वस्त झालेल्या वाटा यामुळे सह्यविरांना कायमच या किल्ल्यांवर जाणे आव्हानात्मक व तितकेच थरारक वाटते. याच रांगेतले अलंग, मदन, कुलंगगड हे दुर्गत्रिकूट म्हणूनच चढायला सर्वात कठीण मानले जाते. ‘भरारी’ च्या मावळ्यांचे कुलंग वर चढाई करण्याचे स्वप्न काही ना काही कारणांने आजवर बाकी राहिले होते. पण या दिपावलीच्या पूर्वसंध्येला ही नामी संधी आम्ही नक्कीच सोडणार नव्हतो. जेथे आकाश देखील ठेंगणे वाटते अश्या ‘कुलंग’ ला बिलगण्याचा बेत भरारी मधे शिजला आणि मेलामेली उरकून २५ ऑक्टो. २०१३ ला रात्रौ १२ वाजता मंडळी भेटली व विघ्नहर्ता श्री गणेशाचे स्तवन करून आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आम्हा मावळ्यांचा प्रवास सुरू झाला किल्ले कुलंग च्या वाटेने.

प्रवासात गप्पा गोष्टी करत, डुलक्या घेत पहाटे पहाटे जाग आली ती थेट कळसूबाईच्या पायथ्याच्या वारी घाटातून खाली उतरत असतानाच, सत्याला शिकारीची हुक्की आल्याने (अर्थबोध होत नसेल तर सत्याशी संपर्क करावा) तिथे काही काळ थांबून  इंदोरे मार्गे आंबेवाडीला आमची गाडी पोहोचली. आंबेवाडी गावात गाडी लावून आम्ही मावळे पुढे कुलंग कडे कूच करणार असे ठरले होते. छोटेखानीच पण टुमदार अश्या अंबेवाडीत गाडीला आराम देवून आमचा वाटाड्या ‘कैलास’ ला सोबत घेतले आणि किराणा व इतर साहित्याची विभागणी उरकली. गावातूनच समोर आपल्या अलंग-मदन आणि कुलंग हे महामल्ल आम्हाला खुणावत उभे होते. ४८२२ फुट एवढी प्रचंड उंची असलेला, अंगा-पिंडानं धष्टपुष्ट असा कुलंग अगदी उठून दिसत होता. कुलंग वर चढाई करण्याकरीता आता भरारी चे मल्ल देखील आपले शड्डू ठोकून तयार होते. तूप पोळीवर ताव मारून पाणपिशव्या भरून घेत आता आंबेवाडीला पाठ दाखवून आम्ही सर्वजण त्या निसर्गाचा आस्वाद घेत आमची वाटचाल सुरू केली.
आमच्या दोन्ही बाजूला कारवीच्या दाट झाडीतून आम्ही पुढे सरकत होतो. नुकताच पावसाळा संपला असल्याने ‘कारवी’ चांगलीच माजली होती. आमच्यापेक्षा उंच झाडी सर्वत्र असल्याने उन्हाच्या झळा जाणवत नव्हत्या पण पायपीट करून घामाच्या धारा मात्र लागल्या होत्या. मधे मधे पाणवठ्यांवर थांबत आम्ही त्या कातळातून वाहत आलेल्या थंडगार पाण्यावर आमची तृष्णा भागवत पुढच्या प्रवासाला निघत होतो. २ तास जंगल तूडवल्यानंतर आता एका धबधब्याजवळ सर्वजण थांबलो. तेथे जरा पोटपूजा उरकून थोडी विश्रांती घेत असतानाच आम्ही आज येतोय या आनंदाच्या बातमीनेच जणु काही, आमच्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी आकाशात विमान सोडण्यात आले की काय..
असा आम्ही सवंगड्यांनी अंदाज बांधला आणि त्या विमानाची काही छायाचित्रे घेतली गेली. जरा ताजेतवाने झाल्यावर नव्या दमाने आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला होता. अजूनही तासभर जंगलातूनच आमची वाटचाल सुरू होती. पुढल्या तासात आम्हाला पहिला रॉक पॅच लागला. इथे पाठीमागे बघीतल्यावर आपण चालत आलेल्या अंतराचा अंदाज सर्वप्रथम समजला. जवळपास एका छोट्या गडाची उंची आम्ही गाठली होती. अंतर जरी बरेच कापले होते तरी समोरचा कुलंग मात्र अजुनही मान पूर्ण वर केल्याशिवाय दिसत नव्हता. येथून पुढे वाटचाल करत गेल्यावर थोडीशी कठीण अशी कुलंगवर चढणारी धार लागली. सावध पवित्रा घेवून धारे वरुन चढायला सुरुवात केली. या ठिकाणी आपल्याला काळ्या कभिन्न कातळात कोरलेल्या पाय-या लागतात, ज्या की पटकन नजरेत येत नाहीत. सुरवातीला अत्यंत छोट्या नि नजरेस न पडणा-या ह्या पाय-यांचा आकार पुढे मात्र ब-यापैकी वाढत जातो. तशी आपली वाट सुकर होत जाते. या इतक्या छोट्या पाय-यांपाशी आमचा खंदा कार्यकर्ता  ‘सत्या’ कसा काय येणार, त्याचा पाय यात कसा मावणार अशी १ शंका माझ्या मनाला चाटून गेली पण तो माझा एक गैरसमज होता हे सत्या ने दाखवून दिले.
 (खर तर या इतक्या लहान खोबणीमधे सत्याने आपला (हत्ती)पाय रोवून येणे म्हणजे ५१२ एम बी च्या पेन ड्राईव्ह मध्ये संजय लिला भंसाळी चे २ चित्रपट कॉपी करण्यासारखे होते. असो.) अजून थोडे चालून गेल्यावर १ कडक असा पॅच लागतो येथे जरा जास्त सावधान रहावे लागते. अतिशय अरूंद वाट एका बाजूला कातळ तर दुसरीकडे थेट दरी दिसते. पण सर्वजण तो टप्पा देखील पार करून आता शेवटच्या टप्प्यात आले होते. येथे गडाचा पहिला दरवाजा लागतो येथेच बाजूला अतिशय सुबक आणि स्वच्छ अश्या २ गुहा आपल्या नजरेस पडतात. त्या ठिकाणी जरा विश्रांती घेवून थोड्याश्या अवघड अश्या पाय-या पार करून आम्ही आता अवाढव्य आणि अत्यूच्य अश्या कुलंग गडावर अवतरलो होतो.

 विस्तीर्ण अश्या कुलंग गडावर रानफ़ुलांची जणू जत्राच भरली होती. श्वेतांबरा,तेरडा, निसूर्डी, नभाळी, पांडा अश्या नानाविविध फ़ुलांनी पठार गच्च भरल होत. सोनकीचे तर गालिचेच आमच्या स्वागताला पसरले होते. सोबतीला फ़ुलपाखरे  जणू अत्तरदाण्या घेवून आमच्या स्वागताला तयार होती तर भूंग्याची गुणगुण आमच्या स्वागताची सनईच असल्याचा भास क्षणभर झाला. अश्या मस्त वातावरणात मग कॅमेरांचा क्लिक-क्लिकाट झाला. दरवाज्यातून आत गेल्यावर उजव्या हाताला आपल्याला गुहा लागतात. आमचा मुक्काम तिकडे ठरला असल्याने आता आम्ही सर्वजण तिकडे प्रयाण केले. पण मुंबई वरून २५ जणांच्या एका समुहाने अगोदरच गुहेचा ताबा घेतला असल्याने आम्ही रात्री गडाच्या पहिल्या दरवाज्यापाशी असलेल्या गुहेत राहण्याचा बेत केला. आणि आत्ता येथेच चहापान उरकून गडावर भटकून येणे निश्चित केले. लगोलग भरारी ‘टी मास्टर’ विकास ने मस्त चहा आणि गरमागरम मॅगी आम्हा सर्वांसाठी बनवले त्यावर मनसोक्त ताव मारून आमची भटकंती सुरू झाली. गुहेजवळच्या पायवाटेने थोडे पुढे गेल्यावर पाण्याची २-३ टाकी लागतात. ही टाकी ब-यार्पैकी मोठी असून ती पूर्णपणे कातळात कोरलेली आहेत. यातील पहिल्या टाक्यातील पाणी हे पिण्यायोग्य आहे. या
टाक्यांच्या वरील बाजूस २ उध्वस्त वाड्यांचे अवशेष दिसतात. या वाड्यांच्या आकारमानावरुन येथे नक्कीच मोठ्या प्रमाणात वस्ती असावी असे वाटते. वाडे पाहून सूर्यास्ताला खास कुलंगच्या पश्चिम टोकावर जायचे आम्ही ठरवले होते पण अचानक आलेल्या ढगांमुळे आमचा तो बेत रद्द झाला पण सूर्यास्त दिसला नाही तरिही निसर्गाने आपली जादू आम्हाला दाखवलीच. गडाचे ते विहंगम दृश्य पाहुन सर्व सामानसुमानासह आम्ही खालच्या गुहांकडे प्रस्थान केले. खालच्या गुहांमधे आता साफ़सफ़ाई करून थंडगार हवेत आमच्या गप्पांचा फ़ड जमला होता.एकीकडे गप्पा आणि दुसरीकडे रात्रीच्या भोजनाची पुर्वतयारी सुरू होती. तयारी पूर्ण झाल्यावर पाकशाळेचा ताबा सन्मानपूर्वक माझ्याकडे सोपविण्यात आला. आजचा मेनू होता मुगाची खिचडी, पापड चटणी आणि सोनपापडी. एकिकडे खिचडी शिजत होती तर तिकडे चुलीवर सुध्या ने पापड भाजून ठेवले होते. थोड्यावेळातच खिचडी रटरटली आणि त्याच्या वासाने आमचे जठराग्नी प्रज्वलीत झाले, तशी पंगत मांडली गेली आणि ‘फ़ुल्ल टू’ ताव मारला गेला. सह्याद्री च्या कुशीत बसून त्यातल्याच तळ्यांमधले ते अमृतासमान पाणी वापरून व तिथल्याच चुलींचे निखारे सा-या स्वयंपाकाची चवच बदलतात याची आज पुन्हा अनुभूती आली.

मनसोक्त ताव मारून पोटोबा शांत झाले होते. हवेत देखील आता गारवा खेळत होता. सभोवताली एकदम मस्त वातावरण होते. वरती नभांगणात ता-यांची देखील मैफ़ल सजली होती. त्यांचा लख्ख प्रकाशाने सारा आसंमंत चमकून निघाला होता. एवढ्या भव्य उंचीवर जणू त्या शेकडो तारका, नक्षत्रांच्या बैठकीतच आपण दाटीवाटीने बसल्याचा मला भास होत होता. लांबवर दिसाणारी गावे/वाड्या आता त्या तारकांच्या प्रकाशातच गाढ झोपले होते. मधेच एखादा निखळता तारा आमच्या इच्छापूर्तीचे आश्वासन देत गायप होत होता. अश्या त्या अंगावर हलका शहारे आणणारा थंडगार वारा नि आकाशात नटलेले तारांगण अश्या मदधुंद वातावरणात गड ‘जागता’ ठेवण्यास सज्ज झाले भरारी चे तानसेन. गुहेच्या दिवडीत लावलेला दिवा त्याचा मंद पण  तेजस्वी प्रकाश त्या प्रकाशात आता ‘राकेश’ नि आपले सूर आळवले आणि वातावरणात आजूनच धुंदी चढली… वा वाहवा ची दाद, टाळ्यांचा गजर, एकावर एक फ़र्माइशी आणि वन्स मोअर चा आवाज यांनी मध्यरात्र उलटली. आणि मोठ्या समाधानाने त्या गुहेतच सर्वजण निद्राधीन झालो. 

पहाटे पहाटे अक्षय ने मला जोरजोरात हाका मारून उठवले कारण, आमचा वाटाड्या कैलास ला जनावराच्या (सापाच्या) फ़ूत्कारांचे आवाज ऐकू आले आणि त्याने एकच गोंधळ मांडला म्हणून आम्ही उठून पाहू लागलो आणि सकाळी सकाळीच खळखळाटी हास्याने आमची पहाट झाली. त्याच झाल अस की काही मावळे स्लिपींग बॅग च्या आत झोपून आपल्या घोरण्याच्या कला सादर करत असताना… कैलास ला (अर्धवट)झोपेतून जाग आली आणि या अजगरांच्या घोरण्याला तो सापांचे फ़ुत्कार समजला होता. हा कार्यक्रम संपतो तो, थोड्याच वेळात लांबवर दिसणा-या कळसूबाई शिखरामागुन आपल्या भगव्या, सोनेरी छटांनी सारा आसमंत रंगवत सूर्यनारायण अवतरले आणि पाखरांचा किलबीलाटाने सार रान जाग झाल, तसा सारा माहोलच बदलून गेला. आता मावळे पून्हा एकवार गडावर हजर झाले. प्रार्तर्विधी आटोपून आम्ही आता गडाच्या पूर्वेकडे कूच केले. मदन, अलंग, कळसुबाई सारे सारे त्या कोवळ्या उन्हात न्हाऊन निघत होते त्यांना एक वेगळाच टवटवीत पणा आला होता. आळस झटकून, बलोपासना झाल्यावर,चंदनाच्या ऊटीने अभ्यंग स्नान उरकून,आई भवानीच्या आशिर्वादाचे तिलक आपल्या कपाळावर रेखून, देशरक्षणार्थ उभ्या असलेल्या मावळ्याचा रूबाब त्या कड्या शिखरांमधे दिसत होता.ते सारे सृष्टीच चैतन्य उरात साठवून आम्ही गडाच्या टाक्यांच्या समोरची दिशा पकडली आणि  एका घळीपाशी येऊन थबकलो. दुर्गस्थापत्याचा मोठा अविष्कार कुलंगच्या या घळीत पाहायला मिळाला.
 या घळीत वरील बाजूने येणार्‍या धबधब्याचे पाणी अडवून ठेवण्यासाठी बांधारा घातलेला दिसतो. या बांधा-याचे पाणी अडविण्यासाठी वरच्या बाजूस अनेक टाकी कोरून काढलेली आहेत. जेणेकरुन आधी धबधब्याचे पाणी या टाक्यांमध्ये जमा होईल, मग ही टाकी पूर्ण भरल्यावर त्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी बांधा-यांमधूनच एक वाट काढून दिलेली आहे या वाटेने हे पाणी वहात येते व एका गोमुखातून खाली पडून शेवटाला दरीत फेकले जाते.  केवळ अप्रतीम रचना बघताना ज्याने कोणी ही सुंदर रचना केली आहे, त्या स्थापत्यकाराचे नाव अज्ञात आहे हे आमच्या लक्षात आले. आज एवढे सुंदर काम करून ज्याने आपले नाव देखील कोरले नाही हे पाहून ‘गड बघायला येवून, जाताना आपली नावे कोरून जाणा-या त्या क्षूद्र मनोवृत्तीच्या माणसांबद्दलचा माझा राग आजूनच वाढीस लागला.’ पुढे थोडा फ़ेरफ़टका करून आम्ही पुन्हा गुहेपाशी जमल्यावर भरारी चे योगगुरू श्री. सतिश निकमांकडून काही योगसाधनेचे धडे गिरवीले गेले आणि  फ़ोडणीच्या भाताचा गरमागरम न्याहरीवर आडवा हात व कडक चहा मारून आवराआवर केली गेली. आता गडाला मुजरा ठोकून सर्वजण परतीच्या प्रवासाला निघालो.

गड उतरताना तसा कसच लागणार होता.पहिले दोन पॅच तर अगदीच व्यवस्थित उतरायला लागणार होते.एक जरी पाय चुकला तर खाली दरी आ वासुन उभी होती. सरळ उतरायला फ़ारस जमत नव्हत. कारण माझ्या पायात जरा गोळा आला होता त्यात पाठीमागे बॅग खाली टेकत होती. मग क्रॉस होऊन कातळभिंतिचा आधार घेऊन उतरण चालू केली. तर काहि कार्यकर्ते उलटे उतरत होते. एकमेकांना आवज, आधार देत सर्व कडे पार करून एकदाचे कारवीच्या रानात घुसलो आणि घसरगुंड्या करत पुढल्या तासा,दिड तासात सर्वांनी गडाचा पायथा गाठला. पायथ्यालाच एका ओढ्यामधे मग धडाधड उड्या पडल्या आणि मनाने शुद्ध असलेल्या मंडळींनी आपली शरिरशुद्धीदेखील उरकली. “नहा, धोके, चकाचक होके…” सर्वजण गाडीत बसलो आणि पुनवडी कडे मार्गस्थ झालो. गप्पा, गाणी करत वाटेत हॉटेल सर्जा मध्ये तांबडा-पांढरा रस्सा, भाकरी, शेव भाजी आणि मास वडी वर मनसोक्त ताव मारून. प्रसाद डेंगळे उर्फ़ वारे बत्तीवाले अर्थात डेंगळे तृतीय यांच्या अभिनव शोधांवर जोरदार चर्चा झाडत वेळ कसा गेला कोणाच्याच लक्षात आले नाही. कुलंग स्वारीचे (आणि डेंगळे च्या शोधांवरच्या चर्चेचे देखील ) अनेक दिवसांचे स्वप्न आज पूर्णत्वाला आले होते.  भरारी च्या मावळ्यांनी आज आकाशाला गवसणी घालण्याचा एक यशस्वी प्रयत्न पार केला होता. हाता पायांमधे वेदना, खरचटणे हे तर नेहमीचेच होते.पण आज त्या सह्याद्रीच्या कुशीत जे काही अनुभवलं जे काही मिळवल ते केवळ एक स्वप्न होतं. कुलंग वर चढाई केल्याच समाधान होत.भरारी च्या शिरपेचात आज मानाचा अजून एक तूरा खोवला गेला होता. शांतपणे गाडीत डोळे बंद करून बसलो होतो मधेच जाग आली तर महाराष्ट्रात संताच्या वास्त्यव्याने पवित्र झालेल्या देहू, आळंदी, च्या जवळून आम्ही पुण्यनगरीत प्रवेश करीत होतो त्या पवित्र भुमी जवळच होत्या म्हणूनच असेल कदाचीत पण अचानक त्या वाटेवर श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचे बोल आठवले आणि मन समाधान पावले…. “याच साठी केला होता अट्टाहास !”

भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे.                                                                                                                                    ९८२२८७७७६७






मार्ग :- पुणे-नारायणगाव-संगमनेर-भंडारदरा-बारी-ईंदोरे-अंबेवाडी
पाण्याची सोय :- गडावर मुबलक पाणी आहे पण वाटेतल्या प्रवासात पाण्याचा भरपूर साठा असणे अत्यावश्यक.
लागणारा कालावधी :- अंबेवाडीतून सुमारे ४-५ तास.
  
इतर छायाचित्रांसाठी :- https://picasaweb.google.com/111727050074656731618/Kulang2627Oct2013?feat=email

https://plus.google.com/photos/116885383589105899440/albums/5940068771074651201


https://plus.google.com/photos/105098712578296142266/albums/5940103945063919681?authkey=CK7H1v3h5cKqXg

मोहिमेतील सहभागी मावळे :- सतिश सुर्यवंशी (सत्या), सतिश निकम (रॉकेल), राकेश जाधव (राक्या),अक्षय बोरसे (नथूराम), सुधीर जुगधर (सुध्या), अमित पानसरे (पेढ्या), विकास पोखरकर (कात्या), प्रसाद डेंगळे (वारे बत्तीवाले, डेंगळे तृतीय) अमोद राजे (सेनापती), निलेश वाळिंबे (वाळ्या)